१९९९ साली प्रथम परमपूज्य पांडुरंगशास्त्री तथा दादा आठवले प्रणित "स्वाध्याय" परिवाराशी माझा परिचय झाला. सर्वसाधारणपणे कुठल्याही अध्यात्मिक किंवा पारमार्थिक संस्था-संप्रदायांच्या कार्य किंवा जीवनपद्धतीपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारे 'स्वाध्याय' परिवार चालतो. परंपरानाचे पालन अपारंपरिक पद्धतीने करणारा हा परिवार (संस्था किंवा संप्रदाय नव्हे!), ह्याची काही मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हणजे - गंध; टोपी; माळ ई. कुठल्याही प्रकारच्या साधनांची गरज नाही, एका जागेवर बसून केलेल्या फक्त साधना - उपासना ह्याहून अधिक कार्यशील साधक-प्रचार (भावाफेरी-भक्तीफेरी) ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे, परिवाराच्या कार्यासाठी दान-देणग्या न घेता, आणि कधीही कुणालाही न मागता, परिवाराशी निगडित असणाऱ्या प्रामाणिक निरपेक्षपणे सिद्ध झालेल्या इच्छुकांकडूनच खाजगीरित्या देणगी स्वीकारणे, उपासना करताना आनंदमय राहून प्रत्येक तंत्र-मंत्राचा अर्थ आणि ध्वनी समजावून घेऊन मग त्यांची उपासना करणे, केवळ स्तोत्र-मंत्रांमध्ये न अडकता वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी बुद्धिवादी-ज्ञानवादी बनणे ई. अशा तऱ्हेने कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग आणि भक्तियोग, अशा चारही योगांची सांगड घालून परमार्थ साधण्याचा एक अभिनव प्रयोग दादांनी ह्या देशामध्ये घडवून आणला! मला अजून आठवते आहे कि दादांना जेव्हा, ज्याला आशिया खंडातील नोबेल म्हटले जाते असा प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते एका मुलाखतीत म्हणाले होते कि हे पुरस्कार म्हणजे भगवंताची love letters आहेत!
स्वाध्याय परिवाराचा मूलमंत्र म्हणजे "स्वाध्यायान्मा प्रमद:" ह्याचा अर्थ हाच कि स्वाध्याय, अर्थात स्व-अध्याय ह्यामध्ये कधी कसूर करू नये. संस्कृत किंवा मराठीतही प्रमाद म्हणजे गुन्हा. त्यामुळे मी ह्या घोषवाक्याचा अर्थ स्वाध्याय न करणे हा प्रमाद आहे असा घ्यायचो. मुळात तुम्ही सतत स्वाध्याय करत रहा हाच संदेश त्यामध्ये स्वाभाविकपणे अभिप्रेत आहे. आता स्वाध्याय म्हणजे जरी वरकरणी औपचारिक शिक्षण झाले तरीही तुम्ही स्वतःच अध्ययन करत रहा असा असला तरी एक अर्थ असाही घेता येऊ शकेल असे वाटते कि आता भौतिक शिक्षण झाल्यानंतर स्व विषयीचा अभ्यास, म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास करत राहावे. काहीही असले तरी सतत अभ्यास करत राहा इतका साधा, सरळ, सुस्पष्ट संदेश देणारे घोषवाक्य, प्रेरणावाक्य असलेल्या परिवाराविषयी कुणासही आदर असणे स्वाभाविक असावे!
काही मोजक्या वर्षांच्या स्वाध्याय परिवारातील माझ्या सहभागानंतर आज अनेक वर्षांनी माझ्या मनात 'स्वाध्यायान्मा प्रमद:' ह्याचा उद्घोष पुनरवाने होऊ लागला आहे. स्वाध्यायाचे नवीन अर्थ, नवीन आयाम ह्यांचा शोध घ्यावा, ह्यावर विचार करावा, स्वतःच्या आयुष्यात त्यांचा समावेश अधिक प्रभावीपणाने करावा असे प्रकर्षांने प्रतीत होऊ लागले आहे. तसे तर ज्ञानतृष्णा हि सतत आहे, परंतु त्याचे रूपांतर ज्ञानसाधनेत करणे, स्वाध्यायात करणे ह्यावर आजवर चिंतन केले नव्हते, ते चिंतन आज करावे वाटू लागले आहे. ते नक्की कसे करायचे ह्यावर पुढील काळात चिंतन करून रचनात्मक पद्धतीने स्वाध्याय करावा असा ध्यास घेण्याचा मी संकल्प करणार आहे!
सारंग भणगे
No comments:
Post a Comment