Showing posts with label रसग्रहण. Show all posts
Showing posts with label रसग्रहण. Show all posts

Saturday, October 21, 2017



कलापूर्ण व्हावे.. जगावे असे की..
सुरांसोबती ताल मिसळून जावा..
धुमारे फुटावे हजारो... मनाला..
निळाभोर.. आकाश पक्षी उडावा..

कधी चित्र-रंगात गुंतून जाता
जुन्या चौकटीतून बाहेर यावे
पहाव्यात रेषा..उमलती कशा या
कलामंदिरी.. फक्त देणे उरावे

कलाकार आहेच 'तो' ही निराळा
रुजे पंचभूतात गाणे प्रवाही
असे गूढ शिल्पात कोरून जाई
उरे ना कला.. ना कलाकार राही

* सुनीति लिमये
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुनीतिताई, फार म्हणजे फार सुरेख रचना आहे!

रणजित नेहेमी म्हणत असतो कि कवितेला छान लय असली कि कविता वाचावीशी वाटते आणि हे खरेच आहे. कविता लयबद्ध असली कि तिला एक वेगळीच उभारी येते. म्हणजे प्रत्येक कविता ही मोरासारखी सुरेख असतेच; पण ती छान लयीत असली कि जणू मोराने तो पिसारा पूर्ण फुलवला कि तो कसा अधिक मनोहर दिसतो, तसे काहीसे होते! तुमच्या ह्या कवितेला इतकी सुंदर लय आहे कि वाचायला खूप मजा आली.

अशा लयबद्ध कवितेला सुंदर शब्दांची साथ मिळाली तर तो पिसारा फुलवलेला मोर जणू आनंदाने थुईथुई नाचू लागला आहे असा अनुभव मिळतो. अतिशय साधेच, पण तरीही कवितेला एकदम अनुरूप असे शब्द तुमच्या कवितेचे सौंदर्य खुलवत आहेत. प्रासादिक कवितांचा उद्देश हाच असतो कि वाचकाला त्यातून एक आनंद मिळावा, आणि तुम्ही जसे लिहिले आहे कि ‘सुरांसोबती ताल मिसळून जावा’; तसे तुमचे हे शब्दसौंदर्य त्या नादमय कवितेच्या सौंदर्यात फार सुरेख मिसळले आहेत.

शब्दांना नाद असतो, पण शब्दातून चित्र देखील निर्माण होते. कुणास ठाऊक मेंदूच्या किंवा मनाच्या कुठल्या कुठल्या अंगांना ते शब्द स्पर्शून जातात आणि कुठल्या कुठल्या संवेदनांना सुखावून जातात! पण अशी सौंदर्यपूर्ण कविता मनाला फार आल्हाद देऊन जाते! त्यासाठी नादमधुर तसेच समर्पक आणि सौंदर्यपूरक शब्द कवितेत योजणे ही सोपी कला नाही. शेकडो कविता वाचल्यावर मग असा अनुभव क्वचित मिळून जातो!

पण कवितेचा खरा आत्मा असतो तो म्हणजे तिचा आशय! ह्या कवितेत जर आशय नसता तर तो पूर्ण पिसारा फुलवून आनंदाने नाचणारा मोर हा एखादा लोकांचे कृत्रिम रंजन करण्यासाठी तयार केलेल्या electronic / मानवनिर्मित मोरासारखा वाटला असता. सौंदर्यपूर्ण कवितेत तितकंच सखोल आणि सघन आशय जेव्हा मिसळलेला असतो, तेव्हा ती कविता खऱ्या अर्थाने जिवंत होतेच; पण कवितेला अधिक उदात्तता देखील येते.

तुमच्या ह्या कवितेत आयुष्य अधिक परिपूर्ण; कलात्मक कसे जगावे हा संदेश हा त्या आशयाचा पाया रचतो, पण शेवटी तुम्ही जेव्हा ‘उरे ना कला.. ना कलाकार राही’ ही ओळ लिहिता तेव्हा जीवन कितीही सुंदर असले तरीही जीवनाची अगदी खरी परिपूर्तता ही त्या तत्वात विलीन होण्यात; कला आणि कलाकार हे द्वैत देखील संपण्यात आहे, हे लिहिता तेव्हा केवळ नतमस्तक व्हावे वाटते!

इतक्या छोट्या कवितेत इतके रंग असे भरले आहेत कि क्षणभर थक्क होऊन गेलो मी! फार आवडली ही रचना!

- सारंग

Saturday, December 13, 2014

* घुसमट *


तू घरी येतोस...मी दार उघडते
तूझा चेहरा हसरा नसतोच
मीच हसते थोडी गालात.....
नेहमीप्रमाणे मख्ख असतोस तू
मी बडबडत राहते स्वयंपाकघरातून
तू हातातली मोज्यांची वळकटी
माझ्या शब्दांसकट बूटात ठेवतोस...
मी विचारत राहते अनेक प्रश्न
सांगत राहते काहीबाही
दिवसभरात घडलेले...दिसलेले....ऐकलेले
....हातपाय धुवून येताना तू
फ़िरवून जातोस यंत्राप्रमाणे तुझा हात
माझ्या घामेजलेल्या अंगावरुन...
मला कळतं रे...तुझे स्पर्श तर नक्कीच कळतात
किळसवाणे वाटतात तुझे स्पर्श
जेव्हा मी जीव तोडून बोलत असते
आणि तू खेळत असतोस
माझ्या चेतनाहीन अवयवांसोबत...मख्खपणे...
"हो" किंवा "नाही" च्या पलिकडे उत्तर नसते
माझ्या एकही प्रश्नाला तुझे
आणि मी मुर्खासारखी घुटमळत राहते
तुझ्या आजूबाजूला...
तुझा तुटपुंजा सहवास मिळवण्यासाठी...
जेवणाची ताटं करकरतात...भरली जातात
निमूटपणे रिकामीही होतात
माझे बोलणे चालूच असते
तुझे ऐकणेही चालू असते...
तशाच ओल्या हातांनी
अंथरुणं जमिनीवर कोसळतात
घाबरल्यागत... डोळे मिटून...
कदाचित त्यांनाही माहित असावं
कि थोड्या वेळात सुरु होणार आहे
तुझे बोलणे आणि माझे फ़क्त ऐकणे....
तुझा दिवस इथेच संपतो
माझा मात्र संपत नाही
मी अंधारातही बघत राहते
तुझ्या चेहर्‍यातला मख्खपणा
अगदी पहाट होईपर्यंत...
--संतोष वाटपाडे (नाशिक)
-------------------------------------------------
कविता हे अभिव्यक्तीचे सर्वात सशक्त माध्यम. अभिव्यक्ती म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे आपल्या भाव-भावना कलात्मक पद्धतीने मांडणे. त्यामुळे सहसा कवितांमधून आपले अनुभव, आपल्या जाणीव, भाव-भावना आणि विचार व्यक्त होताना दिसतात. एका अर्थाने कविता हे कवीच्या स्वत्वाचे दर्शन असते. कुठल्याही प्रसंगावर कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा ती त्या प्रसंगाबाबतचा कवीचा दृष्टीकोनच व्यक्त करते.

पण काही वेळा तटस्थ राहून; दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्या दुसऱ्याच्या भूमिकेतून आपले कथन काव्यातून करणे किंवा आपला दृष्टीकोन व्यक्त करणे हे काही खूप नवीन नाही. परंतु तटस्थ राहून स्वत:वरच टीका करणारी कविता हि अगदी नवीन नसली तरी विरळा असते असे वाटते.

संतोषजींच्या ह्या कवितेत कदाचित ते स्वत:चा दृष्टीकोनच मांडत असतील, परंतु स्त्रीच्या भूमिकेत शिरून; तटस्थ राहून; एका अर्थाने स्वत:वरच टीका करण्याचा प्रामाणिकपणा ह्या कवितेत निश्चितपणे जाणवला.

तसे पाहता कविता काही अनोख्या विषयावर नाही. अनेक स्त्रियांनी (कदाचित पुरूष कवींनी देखील असेल) अशा प्रकारची स्त्रीवादी म्हणवली जाईल अशी कविता कैक वेळा लिहिली असेल. परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पुरुषाने अशी कविता लिहिताना इतका प्रामाणिक तटस्थपणा आढळलेला नाही.

कवितेचे शीर्षक बिन-महत्वाचे असते असा एक सर्वसाधारण सार्वत्रिक समज आहे. परंतु इथे मला कवितेच्या शीर्षक हे सूचक वाटते. म्हटले तर कवितेला अनेक रंग देता येऊ शकतील. उदा: ह्या कवितेला ‘पिळवणूक’ असेही शीर्षक देता आले असते, आणि ते तसे दिले गेले असते तर कवितेचा भावार्थ बदलला असता, असे मला वाटते. परंतु ‘घुसमट’ हे शीर्षकच कवितेविषयी उत्सुकता निर्माण करणारे आहे, तसेच ते कवितेचा गाभा सांगणारे आहे. कवितेतील शब्दातून जितके काही व्यक्त होते ते कवितेच्या ह्या शीर्षकाने अधिक ठळक होते, असे मला वाटून गेले.

अर्थाच्या दृष्टीने कविता सरळ आणि थेट आहे. असे वाटून गेले कि हीच कविता; हीच भावना जर स्त्रीने लिहिली असती तर कदाचित ती इतक्या सरळ आणि थेट नसती लिहू शकली. माझ्या इथेच अभिव्यक्तीमधील तो फरक जाणवतो.

शब्द बुटात ठेवणे; घामेजले अंग; चेतनाहीन अवयव; तुटपुंजा सहवास; ताटं करकरणे; निमूटपणे रिकामी होणे; अंथरूण घाबरणे; ई. ठिकाणी कविता जिवंत होते, ती अनेक निर्जीव गोष्टींना सजीव करते. ते सर्व वाचताना कवितेत व्यक्त केलेल्या भावना जिवंत होतात, अधिक खोल आणि ठळक होतात. कविता मनाचा ठाव घेत राहते आणि वाचक कवितेत गुंतून राहतो, कवितेशी त्याची सह-अनुभूती होते. काव्याच्या दृष्टीकोनातून हि सर्व कवितेची सौंदर्यस्थळ आहेत, आणि भावनेच्या दृष्टीकोनातून कवितेला भावनिक खोली देणारी स्थळ आहेत.

मला कवितेमध्ये सर्वात आवडलेला भाग म्हणजे –

कदाचित त्यांनाही माहित असावं
कि थोड्या वेळात सुरु होणार आहे
तुझे बोलणे आणि माझे फ़क्त ऐकणे...

कवितेच्या अंताला कविता उच्चांकाला पोहचते. मी पहिल्यांदा जेव्हा हि कविता वाचली तेव्हा मला ह्याच ओळी हे कवितेचे वैगुण्य वाटल्या. कवीला नक्की काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही. परंतु जेव्हा मी आत्ता ह्या कवितेवर माझे विचार लिहायला लागलो तेव्हा मला ह्या ओळी अंगावर येणाऱ्या वाटल्या, आणि हे सर्व लिहित असताना माझ्या अंगावर वारंवार अक्षरश: काटा आला, डोळे किंचित पाणावले.

ते त्याचे ‘बोलणे’ काय आहे ह्याचा अर्थबोध हा पुरूष म्हणून मला अतिशय उद्वेगजनक वाटला! ती जे बोलते आणि तो जे बोलतो ह्यातील हि तफावत पुरूष म्हणून मला लाजायला लावणारी वाटली.

संतोषजी, कविता इथे जिंकते. ह्या क्षणी मी ह्यावर अधिक लिहू शकत नाही, परंतु तुम्ही हे जे लिहिले आहे त्याला सलाम. एरवी छान वाटणारी, पण फार काही outstanding न वाटणारी हि कविता इथे अक्षरश: उच्चांकाला पोहोचते, आणि वाचकाचा; विशेषत: पुरूष वाचकाचा कडेलोट करते एवढेच म्हणून मी इथे थांबतो!

Sunday, November 16, 2014

आकाश

उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशाने,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधाराने ।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटाने ,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही ह्याच्याच थयथयाटाने …
मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या पेटवल्या ह्या अंबराने ,
आभाळा एवढ्या चुका देखील
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने ...
असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळलेल अंबर
आधार होता पांगळयाचा
उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची
ही होती नियती,
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।
येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....
आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)
- श्रीधर जहागिरदार

=========================================

कविता म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो आणि अलीकडे फक्त वृत्तांमध्ये लिहिलेले पद्य हेच कविता असा हेकट अट्टाहास पण काही ठिकाणी दिसतो. मुक्त लिहिताना छंदांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, गद्यरूपी पद्य; आणि त्यात तेही अतिशय अर्थाविहीन लिहिणारे महाभाग कवी मशरूमसारखे वाढल्यामुळे मुक्त कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा काहीसा झाला असावा!

परंतु जेव्हा केवळ आशयगर्भच नव्हे, तर अत्यंत आशयनिष्ठ अशी मुक्त कविता समोर येते तेव्हा वरील विवादाचे किंवा काव्य; किंवा त्याहूनही कविता म्हणजे नक्की काय ह्याचे उदाहरण मिळून जाते!

वरील लेखनप्रपंचाचे कारण असे कि वरकरणी ह्या कवितेत देखील केवळ एक विचार प्रभावीपणे मांडला गेला आहे. हाच विचार गद्य स्वरुपात मांडताही आला असता खचित, परंतु ह्या कवितेची मांडणी; त्यातील अभिव्यक्ती; कवितेत परावर्तीत झालेले विचाराचे आवर्तन हे कवितेच्या मुक्त मांडणीला न्याय देतात. कवितेची मांडणी किंवा बांधणी हि आशयाला पूरक अशी असावी; ती आशयाशी प्रतारणा करणारी नसावी असे एक सूत्र ह्या कवितेच्या अनुषंगाने विचार करत असताना माझ्या मनात आले. मुक्त कविता वाचत असताना ती तशी मुक्तच योग्य आहे कि त्या कवितेवर काव्यसंस्कार करून ती अधिक शास्त्रोक्त करायला हवी होती असा एक विचार मी अलीकडे करत असतो, आणि बहुतेकवेळा मुक्त कविता वाचल्यानंतर त्या तशा कवितेतील भाव; भावना किंवा विचार हे वृत्त-छंदादी शिस्तीमध्ये लिहिले जाणे आवश्यक होते असे वाटून जाते, कारण त्या तशा कवितांचा गाभा (आशय म्हणणार नाही, कारण अनेकदा मुक्त कवितांमध्ये तो नसतोच) हा इतका ठिसूळ असतो कि त्या तसल्या गाभ्यासाठी वृत्त-छंदमुक्ती; अर्थात सूट घ्यावी हेच पटत नाही.

ह्याउलट ह्या कवितेमध्ये जो मूळ विचार प्रकट झाला आहे कि तो कदाचित वृत्तबद्ध कवितेला पेलवला नसता; किंवा असे म्हणावे कि तो वृत्तबद्ध कवितेमध्ये तितक्याच सहजतेने आणि सशक्तपणे मांडता आला नसता. (मांडता येणारच नाही असे नाही)

इतका सशक्त वैचारिक; नव्हे तात्विक आशय इतक्या सहजतेने; पण प्रभावीपणे मुक्त कवितेमध्ये मांडणारी एकच व्यक्ती आठवते.....आसावरी गुपचूप.

थोडे नमनाला घडाभर तेल झाले, पण हे सर्व विचार ह्या कवितेच्या निमित्ताने मनात येऊन गेले.

कवितेचा केंद्रबिंदू हा एकच विचार आहे; एकच तत्व आहे असे मला वाटते. अनेकदा कवितेमध्ये विविध भाव-भावना प्रकट होतात; अनेकविध विचार मांडले जातात. परंतु ह्या कवितेमध्ये मात्र एक विशिष्ट विचाराचेच प्रकटीकरण झाले आहे. तो विचार व्यक्त होण्याआधी त्याला प्रस्तावना जोडली आहे. आकाशाचे आणि माझे नाते विविध प्रकारे दाखवून, ते नाते अधिकाधिक गडद करत नेण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. विविध अंगांनी ते नाते स्पष्ट करत नेले आहे आणि आकाश हेच जणू सर्वस्व; हेच जणू सर्व विश्व अशा विचाराप्रत वाचकाला नेऊन ठेवल्यानंतर अचानकपणे त्या सर्वास्वमधील फोलपणा; किंवा आभासीपणा दर्शवून वाचकाला चकित करण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. परंतु असे चकित करणे हाच कवितेचा उद्देश नसून, मुळात कविता हि त्या मानलेल्या सर्वस्वाचे अस्तित्वच प्रश्नांकित करते; त्या अस्तित्वालाच आव्हान देते, किंबहुना सरते शेवटी त्याचे अस्तित्वच नाकारते. हे अतिशय चकित करणारे आहे; बंडखोर आहे; क्रांतीवादी आहे. एखाद्या विचाराची उत्क्रांती होत होत त्यातून मूळ विचारला, धारणेला छेद देत त्या विचाराचे ध्रुवीकरण होते आणि संपूर्णत: विरोधी असा विचार, धारणा किंवा तत्व समोर येते, हि संपूर्ण प्रक्रिया विस्मयजनक आहे. कवितेच्या आरंभीचा आणि अंताचा विचार हे दोन ध्रुवासारखे आहेत आणि कविता ह्या दोन ध्रुवांना जोडणाऱ्या अक्षासारखी वाटते.

अनेकदा मला असे जाणवते कि अशा प्रकारच्या कवितांमध्ये ‘विचार जिंकतो; आणि कविता किंवा काव्य हे मागे राहते’. इथे काहीसे असेच मला वाटते. विचार वरिष्ठ आणि कविता दुय्यम असे काहीसे चित्र इथे निर्माण होते. म्हणजे एका अर्थाने कविता त्यातील काव्यामुळे नव्हे तर त्यातील ह्या विचारामुळे हलवते, मनाला भावते. कवितेविषयी लिहिण्यापेक्षा कवितेतील content विषयी अधिक लिहिण्याचा मोह होत राहतो. अजूनही त्याविषयी खूप काही लिहिता येऊ शकते, लिहावेसे वाटते. हा मला त्या विचाराचा, एका अर्थाने त्या आशयाचा विजय वाटतो. पण संपूर्ण कविता विजयी नाही होत असे माझे मत आहे. म्हणजे एकाच खेळाडू match जिंकून देतो आणि बाकीचे खेळाडू येतात जातात तसे काहीसे होते.

पण हे म्हणत असतानाच मी आधी म्हटले तसे कविता केवळ आशयगर्भच नाही; तर आशयनिष्ठ देखील आहे. म्हणजे कविता त्यातून जो आशय प्रकट करायचा आहे त्याच्याशी प्रामाणिक आहे. हि कविता आहे, म्हणून ती अधिक खुलविण्याचा, तिला अधिक नटविण्याचा आणि त्यासाठी कवितेत काही अधिक अनावश्यक असा मसाला भरण्याचा प्रयत्न करत नाही. एका अर्थाने कविता अव्यभिचारीपणे त्यातील मूळ गाभा प्रकाशित करते आणि बाकीच्या पसा-याला फाटा देते. उगाच तिच्या आंतरिक सौंदर्यावर बाह्यदर्शी सौंदर्याचा मुलामा चढवत नाही. त्यामुळे कविता कवीच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण करते. म्हणूनच पुन्हा वाटून जाते कि कविता एक आत्मनिवेदन मांडते कि जे वैश्विक आहे; अर्थात ते सर्वांसाठी आहे; सार्वत्रिक आहे.

वर मांडलेल्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने असे वाटून जाते कि जे कवितेचे यश आहे तेच कवितेची मर्यादा पण दर्शवते का? मला तरी ह्याचे उत्तर माहित नाही, पण मनात हा विचार येऊन जातो.

मी एवढे लिहिले म्हणजे हि कविता काही फार outstanding आहे असे मला बिलकुल म्हणायचे नाही. पण कवितेमध्ये असे काही मुलभूत आहे कि जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते.

Thursday, January 9, 2014

काय झाले ते कळेना

पाहते शून्यात कोठे राहूनी मौनात ती
काय झाले ते कळेना का अशी संदिग्ध ती

उद्ध्वस्त होते अंतरी थरकाप होतो का तिचा
आवाज मोठा ऐकता घामात होते चिंब ती

विश्वास ना दिसतो तिच्या वागण्या दिसण्यातही
हिंडते बस्स घेऊनी डोळ्यात लाखो प्रश्न ती

राग येतो रात्रीचा तिज व्यापितो अंधार का
ज्योत विझूनी अंतरीची का जाहली निस्तेज ती

लाडक्या बाबासही ना मारते मिठी ती आता
होता अचानक स्पर्श भिऊनी झिडकारते त्यांनाही ती

काय झाले ते कळेना का कळी कोमेजली
कोडे कटू सुटणार.. जेंव्हा .... काहीतरी बोलेल ती .........

© विश्वास रघुनाथ कुलकर्णी

---------------------------------------------------------------------------------------------




विश्वास कुलकर्णी – (१) – कविता क्र. ८


विश्वासजी,


आपण आपल्या ओळीचा आधार घेऊन एका अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अलीकडच्या काळात ह्या विषयावरील कविता अधिकाधिक प्रमाणात वाचनात; ऐकण्यात येऊ लागल्या आहेत. अशाही कविता आता लिहाव्या लागतात हे केवढे मोठे दुर्भाग्य आहे.


 


अशा कवितेचे रसग्रहण करावे तरी कसे!


 


काय झाले ते कळेना हि ओळ आपण आपल्या कवितेमध्ये अतिशय समर्पक योजली आहे आणि त्या ओळीत जो गर्भितार्थ आहे; सूचितार्थ अभिप्रेत आहे तो मनाला अतिशय हेलावून टाकणारा आहे. ‘काय झाले ते कळेना’ हे म्हणत असताना काय झाले आहे ते कळते ते खरोखर दु:खद आहे!


 


तिच्या मौन रूपाचे वर्णन, तिचे सतत भयभीत वागणे हे अतिशय संयत परंतु वास्तविक वाटणारे आणि मनाला घुसमटून टाकणारे असे तुम्ही लिहिले आहे. हे वाचत असताना नकळत तिची अशी घुसमटलेली, मनातून उध्वस्त झालेली, अंतर्बाह्य हादरलेली अशी एक अतिविदारक प्रतिमा नकळत डोळ्यापुढे उभी राहते आणि ती मनाला हेलावून सोडते. कविता खूप अंतर्मुख करते, आपल्या पुरुषत्वाची आपल्यालाच शिसारी वाटू लागते, अशा परिस्थितीतून जाणाऱ्या; गेलेल्या बालीकांसाठी, स्त्रियांसाठी कुठेतरी मनात करुणा दाटतेच, परंतु तिच्यावर असे अघोरी अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचून त्यांचा सूड आपणच घ्यावा अशी चीड निर्माण होते, मन अस्वस्थ होते....................... मनामध्ये अनेकविध भावनांचे प्रपात कोसळत जातात, मनातच ते दगडावर आपटून फुटून छिन्नविछिन्न होतात.............. लिहिता लिहिता ह्या विषयावर इतके लिहावेसे वाटू लागते कि आपल्या मनातून जणू शब्दांचे वादळ ह्या कागदावर भिरभिरावे असे वाटू लागते! थांबतो!


 


आत्ताच मी सई परांजपेंचा ‘दिशा’ पहिला. त्या अतिशय सध्या चित्रपटातील काहीही न दर्शवता दाखवलेली स्त्रीत्वाची विटंबना मनात प्रश्नचिन्हांची वावटळ निर्माण करून गेली होती कि इतक्यात तुम्ही अशाच, किंबहुन त्याहून अधिक गंभीर विषयावर संयत कविता लिहिलीत. त्यामुळे मन थोडे अधिकच सैरभैर झाले आहे.


 


इथे जे लिहिले आहे त्याला रसग्रहण म्हणावे कि नाही ठाऊक नाही, जर मी काही असंबद्ध लिहिले असेल तर माफ करा. परंतु तुमच्या कवितेमध्ये कुणाचेही मन सैरभैर करून टाकण्याची ताकद केवळ त्या विषयाच्या गांभिर्यामुळेच नाही तर त्या कवितेच्या सशक्त मांडणीमुळेदेखील आहे असे मला निक्षून इथे लिहावे वाटते. ह्याहून सुंदर आणि वाचनीय कविता असल्या तरी संवेदनशील माणसाने हि तुमची कविता निश्चित वाचावीच असा माझा आग्रह निश्चित असेल!

Sunday, January 5, 2014

पाप



पांगली पुढची पिढी अन्
लांबली अवघड प्रतीक्षा
अनुभवांती लाभली मज
निबरतेची दिव्य दीक्षा

वेदनांच्या खोल डोही
जाणिवांचा अस्त झाला
फक्त उरली बेफिकीरी
आणि काही काळ उरला

वाकुल्या दावीत आहे
सांध्यरेषा जीवघेणी
आप्त माझे गात बसती
व्यर्थ मृत्यूची विराणी

मात्र मी अस्वस्थ नाही
एकटा असलो तरीही
बाहयरूपी शांत आहे
शांत आहे अंतरीही

मी तटस्था सारखा अन्
भाव नुरले, शब्द नुरले
काय झाले ते कळेना
जास्त जगणे पाप ठरले!

- निलेश पंडित
४ जानेवारी २०१४

===========================================

निलेशदा,

खरोखर एका अप्रतिम कवितेचा अनुभव तुम्ही दिलात. मी माझ्या कुवतीप्रमाणे मला त्यात समजलेले; भावलेले जे काही आहे त्यावर मनमोकळे विचार मांडतो.

एका वेगळ्या गंभीर विषयाचा काव्यात्मक अविष्कार सादर करत असताना तुम्ही त्या स्वत: न अनुभवलेल्या परिस्थितीतील भावस्थितीचे जे अफलातून वर्णन केले आहे त्याने त्या परिस्थितीविषयी तिटकारा, भीती किंवा सहानुभूती न वाटता मला एक वेगळेच आकर्षण वाटून गेले. कदाचित माझे हे म्हणणे थोडेसे विचित्र वाटू शकते, परंतु त्या परिस्थितीतील भावावस्थेच तुम्ही केलेलं समर्थ शब्दचित्रण माझ्या कवी मनाला मोहित करून जात. कुठलीही उत्कट भावावस्था कवीसाठी आकर्षण ठरू शकते हे तुम्ही निश्चित समजू शकाल.

तुमच्या काव्यप्रतिभेतून तुम्ही त्या स्थितीतील विकलता किंवा विषण्णता वर्णन न करता त्या परिस्थितील पुरुष किंवा कदाचित स्त्रीदेखील अशा एकाकी अस्ताकडे झुकलेल्या अस्वस्थ करणाऱ्या स्थितीमध्ये देखील स्थिरतेकडे जातो; निश्चल होतो, पण तरीही ती स्थिरता; निश्चलता हि निबरपणा सारखी असते, जाणीवच बधीर करणारी असते हा केवढा मोठा विषाद तुम्ही इथे विषद केला आहे!

आधीच अवघड असलेली प्रतीक्षा लांबणे - अगदी साधे वाटणारे हे शब्द नीट विचार करता एक विदारक अनुभूती निर्माण करतात! एखाद्या खोल अंतहीन अंधकारमय गुहेतून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. आतमधून गुदमरल्यासारखा अनुभव येतो! प्रतीक्षा मुळातच कंटाळवाणी असते; त्यात अनिश्चित प्रतीक्षा हि तर अधिकच भयावह; त्यात पुढे अवघड परिस्थितीतील अनिश्चित गोष्टीची प्रतीक्षा आणखी कठीण आणि ती हि अपेक्षांच्या पलीकडे लांबणे हे खरोखरच अत्यंत विमनस्क करणारे आहे. मोजक्या शब्दात इतके सारे सांगून जाणे हे महत्कठीण काम तुम्ही इथे साधले आहे.

वर मी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ काळ जेव्हा आपण एखाद्या प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो, तेव्हा त्या परिस्थितीतून स्वाभाविकपणे निर्माण होणाऱ्या संवेदना बोथट होत जातात. हे कदाचित स्वाभाविक मानसशास्त्र आहे. अशीच हि बोथटता; निबरता अनुभवांती लाभते हेच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हि निबरता का? कारण ते ती निबरता म्हणजे संवेदनांशी केलेली फार मोठी तडजोड आहे, ती अवस्था हि काही स्थितप्रज्ञासारखी स्थिर बुद्धीची अवस्था नाही, तर भावनाहीन अशी अवस्था आहे. एका तऱ्हेने ह्या स्थितीमध्ये देखील एकप्रकारचे दु:ख ठसठसून भरलेले असतेच, परंतु निबरतेच्या कृत्रिम आवरणाखाली ते दडपून टाकलेले असते. 'दिव्य दीक्षा' यातील 'दिव्य' कदाचित अस्थायी वाटू शकतो. परंतु मला त्या दिव्य मध्ये एकप्रकारचा हतबल उपहास जाणवला. अशा निबरतेला दिव्य, अर्थात काहीतरी विलक्षण असे म्हणायचे नसून, त्या दिव्य मधून कदाचित त्या निबरतेवर अप्रत्यक्ष टीकाच करायची आहे. किंवा 'दिव्य करणे' म्हणजे एखाद्या अतिशय कठीण परिस्थितीतून काहीतरी प्राप्त करणे, कठीण परिस्थितून वाट काढत पुढे जाणे असे काही सूचित करायचे आहे असेही वाटते.

वरील निबरतेची भावना पुढील कडव्यात अधिक विस्तृत करून सांगितली आहे. जाणीव नष्ट होणे हि एकप्रकारे विमनस्क भावावस्थाच आहे. त्यातून एक प्रकारची बेफिकिरी निर्माण होते, बेदरकारपणा निर्माण होतो हि वास्तविक मानसिकता समजून घेऊन ती शब्दात ओतण्याचे कठीण काम तुमच्या ह्या कवितेत अतिशय सहजतेने केलेले दिसते.

'आणि काही काळ उरला' ह्या ओळीत ती अवस्था हि निबरता आहे असे अधोरेखित होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे सारे दु:ख, विषाद, वैफल्य आणि विकलता हि त्या निबरतेच्या आवरणाखाली दडपून टाकलेली असते; गाडून टाकलेली असते. जणू काही अतिशय थंडीमध्ये नदी गोठून जाते, परंतु त्या गोठलेल्या बर्फाच्या आवरणाखाली पाणी वहातच असते. अजूनही काही काळ उरला आहे ह्यातून न संपणाऱ्या त्या प्रतीक्षेची भावनाच गडद होते.

सांध्यरेषा - सांध्य म्हटले जाते कि नाही मला ठाऊक नाही, माझ्या आधी कधी वाचनात आले नाही.

पण ह्या कडव्यात देखील किती काही प्रत्येक शब्दातून सांगितले आहे! संध्यारेषेच्या जवळ जीवन चालले आहे हि भावना जीवघेणी आहेच. त्या रेषेचे वाकुल्या दाखवणे ह्यातून कुठेतरी त्या संध्यारेषेजवळ जाण्यातील अपरिहार्यता प्रकट होते. तसेच मृत्यूची विराणी हे देखील अद्भुत लिहिले आहे. विराणी हि विरहाच्या खोल दु:खात बुडालेली कविता असते, मृत्यूची विराणी यातून कदाचित ते आप्त मृत्यूला आमंत्रणच देत आहेत असे मला वाटले. म्हणजे 'ह्या म्हाताऱ्याला मृत्यू येवो' असे प्रत्यक्ष न सांगता मृत्यूची विराणी गाणाऱ्या आप्तांच्या कल्पनेतून ते कसे त्याच्या मृत्यूचीच वाट पाहत असतात हे मांडले आहे. हि कल्पना केवळ विलक्षण वाटते. एखादी भावना, स्थिती अधिक उत्कट करताना तुमच्यासारखा प्रगल्भ विचारवंत कवी असाच विलक्षण दाखला देतो.

एवढ्या साऱ्या भावभावनांच्या आरोह-अवरोहात; चक्रीवादळात सापडलेला, जाणीव नष्ट होऊन निबर झालेला एकाकी हतबल वृद्ध अखेरीस अंतर्बाह्य शांततेची प्रचीती घेतो, एका तटस्थतेचा अनुभव घेतो, परंतु मला तरीही वाटते कि 'जास्त जगणे पाप ठरले' हा हेलावून सोडणारा प्रश्न तो कुठेतरी अजूनही आतून शांत नाही; किंवा पूर्ण शांत नाही असेच दर्शवतो. कुणालातरी नाकी इतके जगणे आणि याची आपल्याला जाणीव असणे हि मनाला खंगवत नेणारी भावना आहे.

जीवनांताला निर्माण झालेले वैषम्य आपल्या उपक्रमात दिलेल्या ओळीतून इतक्या समर्थपणे मांडण्याची शब्दकिमया तुम्ही साधली आहेत त्याने ह्या उपक्रमाचे सार्थक झाले असेच मी म्हणेन!

अनेक धन्यवाद!


सारंग भणगे. (५ जानेवारी २०१४)

Saturday, March 30, 2013

----------- कल्लोळ -----------


कल्लोळ माजला, काळजात खोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल
हिरवं शिवार....करपून गेलं
आता तरी द्येवा... भकताशी बोल

भुकेल्या पिल्लाची चोच....ऱ्हांईली उपाशी
घरट्यात न्हाई दाना.....भटके आकाशी
पक्षीनीला फांदीवर... सावरे ना तोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

पसरलं न्हाई हात...घसरे ना पाय
फाटलेल्या दुधावर...येत न्हाई साय
मुंडासं केलं मोकळं...आतड्याला पीळ
आता तरी द्येवा... भकताशी बोल

खाली मुंडी हाये कशी .... जात मेंढराची
उंडारत ऱ्हाई... युती केली लांडग्यांशी
दिवस थांबंना... झाली संध्याकाल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

गहाण ठेवला सूर्य.... अंधारल्या रानी
ठीगळाला भोक पाडे, अशी जिंदगानी
कोरड्या घशाला .....आसवांची ओल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

वाटं कडं लावी डोळा... माय ही आंधळी
लांब रुंद होत जाते...कर्जाची सावली
रगात आणि घाम.... सारे माती मोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल


मरणाच्या दारी जावं... ववाळून जीव
आधाशा सारखा वाटं...पाहतोय गाव
नशिबाच्या फे-या पुढं... नाती गोती फोल
आता तरी द्येवा... बोलाव जवळ

------------------------------------------------------
शब्दशः शब्दशहा !
 
=================================================
 
मंदार,

तु पेटलास; ही कविता लिहीताना तु पेटलास. तुझ्यातलं काव्यस्फुल्लिंग जागं झालं. कविता एकदम नव्या ज्वाळेसारखि फुलुन आली. अचानक केवळ पेटलेल्या नजरेच्या कटाक्षातुन एखाद्या पलित्याने पेट घ्यावे असं ज्वलंत काव्य तुझ्या ह्रुदयातुन आज बाहेर आलं.

एक अशी लाट आवेगात किना-याकडे झेपावली कि तीच्या वेगावर नि आवेगावर भावनांचा कल्लोळ माजला.

होय कल्लोळ माजला कल्लोळ.

कल्लोळ याच शब्दाची मी वाट पहात होतो. एवढा हलवुन सोडणारा आणि ज्याला पर्यायी शब्द हा कल्लोळच असू शकतो असा शब्द या प्रसंगकाव्यात का नसावा. तु तो आणलास.

हा प्रसंग एक कल्लोळच आहे. भावनांचा, वेदनांचा आणि अस्वस्थतेचा. आणि तो काळजात खोल माजला आहे. अहाहा. काय लिहु, काही लिहीण्याची गरज आहे!

कविची मानसिकता प्रसंगात दिलेल्या घटनांच्या पलिकडे जाते. कवि आता अस्वस्थ आहे. तो गेनबाच्या भुमिकेत शिरला आहे. पटकथालेखकानं, दिग्दर्शकानं दिलेल्या निसर्गवर्णनाच्या सूचना तो विसरला. इतरांना सुंदर दिसणारं शिवार गेनबाच्या नजरेत करपून गेलंय. ज्याचं जीवनच करपून गेलंय त्याला भवतालच्या हिरव्यागच्च निसर्गाचं कसलं कौतुक.

घर जळतंय आणि कोजागिरीचं चांदणं भावेल का? मग अंतर्बाह्य तडफडणा-या उद्विग्नतेच्या ज्वालात जळणा-या आपल्या बिचा-या गेनबाला त्या निसर्गाचं काय कौतुक. त्याच्या दृष्टीत तो केव्हाच करपून गेलाय. पुढचे ठाऊक नाही, पण इथे तु गेनबा जगलास.

पक्षीनीला फांदीवर... सावरे ना तोल

- पहिल्या दोन ओळीतही एक कारूण्य आहेच आणि मला ते आधिच्या अनेक कवितांहुन अधिक भावलं. कारण सांगणं कठिण जात आहे, पण भावलं एवढं खरं.

पण त्याहुनही ही तीसरी ओळ फारच आवडली. धनाजीच्या आईने सोडुन जाण्यावर काही अतिशय करूण आणि हेलावुन सोडलेल्या काही काव्यपङ्क्ती लिहील्या गेल्या. परंतु तुझी ही ओळ खुपच वेगळी आहे. त्यात एक प्रकारचा संयतपणा आहे. पक्षिणीची उपमा आणि तीला न सावरलेला तोल लिहीताना तु कवितेचा तोल ढळु दिला नाहीस, हे फारच महत्वाचे. सुभानल्लाह!!!
 
पसरलं न्हाई हात...घसरे ना पाय
फाटलेल्या दुधावर...येत न्हाई साय
मुंडासं केलं मोकळं...आतड्याला पीळ

- मंदार, एक अत्युच्च कडवं लिहीलं आहे. अप्रतिम. हात न पसरण्यात गेनबाचा स्वाभिमान दिसतो; पाय न घसरण्यात त्याचा प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा दिसतो, तसेच याही परिस्थितीत ढळु न दिलेला तोल दिसतो आणि यातुनच त्याचे हिरोपणाचे characater उभारून येते. तु गेनबाला खरा हिरो केलास.

फाटलेल्या दुधावर येत नाही साय - हे खुपच सुंदर उपमा आहे. ती वरील किंवा पुढील ओळीशी कसा संबंध बांधते ते निश्चित कळत नाही. कदाचित असे म्हणायचे असावे कि असं चारित्र्य सांभाळुनही जर परिस्थितीच फाटकी असेल तर त्यावर सुखाची-आनंदाची साय येणार कशी. ही ओळ या अर्थाने फारच अप्रतिम आहे, परंतु ती थोडी इतर ओळींशी सांगड बांधणारी वाटत नाही. पण एवढी सुंदर ओळ लिहील्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

मुंडाशाच्या ओळीतही नक्कि काय म्हणायचे आहे ते स्पष्ट नाही. पण मला त्यातील एक अर्थ लागतो तो असा कि मुंडाशाचा पीळ तर काढला पण आतड्या पडलेला भुकेचा, गरिबीचा, बायकोनं सोडुन गेल्याचा, तलाठ्याच्या तगाद्याचा, आईच्या आंधळेपणाचा, अर्थार्जनाचा पीळ कसा सोडवावा? असाच जर अर्थ इथे अभिप्रेत असेल तर सलाम.

हे कडवं अप्रतिम आहे. मला ह्रुदयनाथ मंगेशकरांची फी परवडणार नाही. पण हे कडवं त्यांच्याचकदे सुपुर्द करावे लागणार.

उंडारत -हाई ... युती लांडग्याशी - मेंढरांची लांडग्याशी युती कशी हे समजत नाही. इथे मेंढरं हे कशाचे रूपक म्हणुन अपेक्षित असावे ते स्पष्ट नाही. ते स्वतःचेच रूपक असे असेल तर ते फारसे योग्य वाटत नाही. इथला लांडगा हा तलाठी असू शकतो. परंतु त्याची कुणाशी युती आणि ती का हे फारसे कळत नाही. ओढुन ताणुन काही अर्थ काढता येतील, पण इतक्या चांगल्या कवितेत मी ते का काढु? त्यापेक्षा मला न पटलेले एखादे असे कडवे मी कवितेतुन काढेन. राग नसावा; लोभ वाढवावा!!
 
गहाण ठेवला सूर्य.... अंधारल्या रानी
ठीगळाला भोक पाडे, अशी जिंदगानी
कोरड्या घशाला .....आसवांची ओल

- तीस-या कडव्याची ताकद या कडव्यातही उतरली आहे, आणि म्हणुनच मध्येच लुडबुडणारे चौथे कडवे मी काढुन टाकावे असे म्हणतो, न समजलेला काही उच्च असा अर्थ नसेल तर.

सुर्याचे गहाण ठेवणे खुपच बंडखोर वाटते. एकदम अंगावर येते. 'कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली' किंवा 'हा सुर्यही जरासा लाचार पाहिला मी' अशा दर्जाची कल्पना वाटते. पण तो सूर्य कुणी गहाण ठेवला, का गहाण ठेवला, सूर्य हे कशाचे प्रतिक म्हणुन इथे गुंफलेले आहे ई. प्रश्न अनुत्तरीतच राहतात. पण मला त्याची फिकिर नाही. त्या बंडखोरपणातच एक वेगळी मजा आहे, एक विलक्षण अस्वस्थता किंवा उध्वस्तता यांचे ते निदर्शक आहे. जो सूर्य स्वयंपुर्ण आहे, प्रकाशाचे स्वयंभू उगमस्थान आहे तो कुठेतरी गहाण ठेवणे; त्यातही अंधारल्या रानी गहाण ठेवणे केवढे तरी दारूण वाटते. सृष्टीच्या नियमांचा कुठेतरी पराभव होताना दिसतो आणि त्यामुळेच ते काळजात घुसते.

ठिगळाला भोक पडणे हे किती विचित्र दारूण परिस्थितीचे द्योतक आहे. उसवलेल्या आयुष्याला इतकि ठिगळं जोडली आहेत कि आता आयुष्य हेच एक ठिगळ झालं आहे आणि आता तर ते ठिगळही उसवलं तर झाकायचं कसं. हा एक ज्वलंत सवाल आहे. आयुष्याची जीर्णावस्था वर्णन करण्यासाठी याहुन कुठलं उत्तम उदाहरण मिळावं. अफाट कल्पना आहे.

आणि पुढची ओळ तितक्याच ताकदीची. एका पाठोपाठ एक ओळी आदळतात. नुसते घणाघात होतात. घशाला पडलेली कोरड अश्रुंनी मिटवावी अशी विकलांगता आयुष्यात आली असावी! फार सुंदर ओळ लिहुन गेलास मित्रा.
 
लांब रुंद होत जाते...कर्जाची सावली
रगात आणि घाम.... सारे माती मोल

- कर्जाची सावली असते का? परंतु इथे ती पटते. कारण ती कर्जाची सावली ही दुपारच्या रणरणत्या उन्हात आडोसा देणारी, सुख देणारी शीतल सावली नाही; तर गडद अंधा-या रात्री मिणमिणत्या दिव्यात लांब-रूंद होत जाणारी भयावह सावली आहे. सावलीचा असा अर्थ इथे घेतला तर लांब-रुंद होत जाणारी ही सावली थरकाप करते कि नाही. अप्रतिम उपमा.

घाम तर या जगात मातीमोल आहेच. घाम गाळणारा रक्त ओकतो आहे अशी भयंकर परिस्थिती जगभरच आहे. पण त्याचं रक्तदेखिल कसं रे मातीमोल ठरतं? स्वर्गाच्या द्वारात प्रवेश देण्यापुर्वी प्रश्न विचारणा-या चित्रगुप्ताला हा खडा सवाल आहे. अरे कारूण्याचे आणि मायेचे गोडवे गाणा-यांनो जीथे रक्त ओकूनही ते केवळ मातीमोल होणार असेल तर 'हे जीवन सुंदर आहे' नि 'या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे' असे लिहीणा-या कविला 'जिस कवी कि कल्पना में जिंदगी हो प्रेमगीत; उस कवी आज तो तुम नकार दो' असे खडे बोल सुनवावे लागतील. अतिशय ताकदीने ही शेवटची ओळ या परिस्थितीतील गांभिर्य अत्यंत सूक्ष्मपणे आणि तितक्याच व्यापकपणे मांडते.
 
मरणाच्या दारी जावं... ववाळून जीव
आधाशा सारखा वाटं...पाहतोय गाव
नशिबाच्या फे-या पुढं... नाती गोती फोल
आता तरी द्येवा... बोलाव जवळ

- कविता समेवर येते. खुप काही सांगुन गेलेली, ढसढसा रडवुन गेलेली आणि काळजात भावनांचा कल्लोळ निर्माण करून गेलेली कविता अंतास येते. मन विषण्ण आहे, विमनस्क आहे, परिस्थिती विदारक आहे.

अशा विदारक परिस्थितीनं ग्रासून काळवंडून गेलेला हा एक सामान्य कृमीसदृश जीवाणू किती तग धरेल. ताणण्याची क्षमता संपुनही अजुन कुठल्यातरी अनामिक चिवट जिद्दीनं अदृश्य अशा धाग्यावर आयुष्याचा तोल सांभाळत चाललेला हा गेनबा आता मृत्युच्या कवेत जाण्यासाठी अधीर झाला तर त्याला काय हतबल म्हणणार? गुझारीश चित्रपटात संपुर्ण एक तप मृत्युवत आयुष्याशी चिवट झुंज देत जगण्याचा संदेश देणारा इथन शेवटी euthanasia ची गुजारीश करतो आणि ती न्याय्य मागणी आहे हे सांगायला माणसाचच मन पाहिजे असही नाही, तीच परिस्थिती गेनबाची आली आहे. आणि मग तो वेडा मरणाच्या दारी जीव ओवाळुन टाकायला अधीर होत आहे. तसे तर जीव ओवाळुन टाकण्यामध्ये एक त्यागाचा अंश आहे, आवेश आहे. पण गेनबाच्या सद्य परिस्थितीत जीव ओवाळुन टाकणं हे एका आवेशाचंच लक्षण वाटावं इतक्या समर्थपणे त्याच्या परिस्थितीचं चित्रण केल आहे.

गावाचं अधाशासारखं वाट पहाणं त्याच्या मृत्युसमोर जीव ओवाळुन टाकण्याचं समर्थन आहे. तो गाव त्याला खायला उठला आहे हे ही यातुन सुचित होतं.

गाव खायला उठला आहे आणि हा मृत्युचा घास व्हायला उठला आहे. काय भयंकर वैषम्य आहे; आयुष्याची विसंगती आहे....

आणि मग डोळे मिटलेल्या गेनबाच्या भोवती सारं आकाश फिरतंय, सारी जमीन फिरती आहे, नभोमंडल फिरत आहे, तारांगण फिरतं आहे, विश्व फिरतं आहे आणि तो स्वर्गाच्या दारात आता अतिथि म्हणुन उभा आहे; हक्कानं देवा आता मला जवळ बोलव असं म्हणत त्या निर्दय ईश्वरत्वातील मायाळुपणाच्या प्रतिक्षेत............

मंदार - HATS OFF

कैफियत !!


वेदनेच्या मी छेडून तारा ,आळविल्या यातना जेव्हा...
दाद देऊन दर्दी म्हणाले ..".व्वा! काय सुरेल गीत आहे!"

वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''

हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!

बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!

निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!

बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!

कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!


गौरी सावंत
================================================
 
वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''

- मुजरा........त्रिवार मुजरा. खच्याक् शेर आहे.

हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!

- अफ़ाट. अफ़ाट. जबरदस्त संदेश आहे हा. माणसाने आपल्या कपाळावर कोरून ठेवावा ईतका जब्बरदस्त.

बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!

- Madam, आज कहर मांडलाय आपण. अरे काय पोच आहे. काय जबरद्स्त एकावर एक घाव नुसते.

निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!

- अरे थांबा थांबा कुठेतरी. हा काव्यसुरा नुसता फ़िरतोय, गर्दनीवर गर्दनी कलम, काळजाचा भुगा पाडतोय.

बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!
- ठिक आहे, छान आहे.

कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!

- अरे तोडलात अफ़ाट काव्य. जबरदस्त.

वाचा लोकहो, याला कविता म्हणतात.
 
अगदि पुचाट शिळया मरगळलेल्या 'छान' सुंदर, अप्रतिम असल्या प्रतिक्रिया देण्याची ही कविता नाही.

गळा खाजवल्यासारखे तारस्वरात गायलेला हा अभंग नाही, हे नादधुंद गवायानं मैफ़िलीच्या मदात श्रोत्यांवर फ़ेकलेलं अस्सल नक्षत्र आहे.

हे कवितेच्या आभाळाला जोडलेलं शब्दांचं ठिगळ नाही; त्या आभाळात अढळ स्थानासाठी दावा मांडणारं काव्य आहे.

उगाच शब्दांची धुळ उडवणारी ही काव्यवाट नाही; राजप्रासादाकडे जाणारा हा राजमार्ग आहे.

गँलरीतल्या कुंडीत तांब्यातलं उरलेलं पाणी पिऊन वाढलेला हा चिनी गुलाब नाही; एखाद्या पुष्पवनाला सुगंधाचं वरदान देणारं हे कृष्णकमळ आहे.
 
कौतुक कसलं - कवितेचं, कवि/कवियित्री कोण का असेना..... माळ्याला विचारतो केव्हा, त्या फ़ुलातल्या सुगंधाचं कोडं उलगडल्यानंतरच.
 
वेदनेतुन निर्माण होतं त्याला 'आनंदवन' म्हणतात. तिथे ठसठसणा-या जखमातुन आनंदाचे स्त्राव वाहतात; वेदनेचे हुंकार तिथे जगण्याचा नवा ओंकार निर्माण करतात.

वेदना मोठीच आई असते. अशा त्या वेदनेच्या श्रीमंत गर्भाला सलाम.

अशी गोड तू... एक महाग़ज़ल!!!


फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

जणू धन्य माता तुझी जाहली,जन्म देता तुला;
पित्याने तुझ्या सार्थ गर्वात न्हावे, अशी गोड तू...

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- निरज कुलकर्णी.

=================================================

तु या गझलेत कुणाला गोड म्हटला आहेस देव जाणे, कि तुच जाणे. पण या गझले एवढी गोड कविता मी आजवर वाचलीच नाही. गझल वाचली आणि नुसता मोग-याचा घमघमाट सुटला बघ घरभर. रात्री ११.३० ला माझ्या घरात मोग-याचा वास घेऊन बायको आली आणि म्हटली 'काय चालले आहे?'. तुझे लग्न झाले असेल तर तु बायकोचा टोन, चेहरा हे सारे डोळ्यासमोर आणु शकशील.

मी अरे उगाच शंका नको म्हणुन तातडीने तुझी गझल बायकोला वाचुन दाखवली. वाटले तुझ्या गझलेनंतर ती ही तशीच गोड होईल.....

ती एवढेच म्हणाली....'याला म्हणतात कविता; नाहीतर तु!' (हे ही तु बायको या प्राण्याचे (कि प्राणिचे) हावभाव डोळ्यासमोर आणलेस तर तुला माझी केविलवाणी अवस्था लक्षात आली असेल.)

तरीही मला तुझी कविता (गझल ही कविताच असते असे मी मानतो) इतकि गोड वाटली आहे; काय सांगु! (काय ते मी सविस्तर सांगणार आहेच).

या गझलेमध्ये ती महागझल आहे हे वैशिष्ट्य आहेच. पण केवळ 'महा' आहे म्हणुन ती महान नाही. महानता ही त्या गझलेच्या रूपसौंदर्यात आहे.

अहाहा, काय गोड गझल आहे. एखाद्या सुंदर रमणीचं नितळ सौंदर्य पहाटेच्या प्रसन्नवेळी संगमरवरी शुभ्र-सफेद प्रासादाच्या गवाक्षातुन दिसावं; कि राजहंसानं मोत्याचा चारा खात असताना पुष्करणीतील पंखावर उडालेले सलील-तुषार आपले शुभ्रश्वेत पंख फडफडवुन निथळुन टाकावं. तुझ्या गझलेला उपमाच नाही; किंवा तुझ्या गझलेला इतक्या उपमा लिहीता येईल कि कालिदासाला कदाचित आकाशातुन खाली पडावं लागेल.

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

- हा मतलाच इतका गोड आहे कि काय सांगावे. सुंदर रंगबिरंगी गोड फुले...इतकि गोड कि त्यातुन मधुरस वेचुन रंगीत फुलपाखरे सगळ्या विश्वास मोहवतात; ज्या माधुर्याचे रूपक गोडपणाच्या परिसीमेला दिले जाते, तो मध मधमाशा त्या फुलातुन वेचतात....अशा गोड फुलांनी देखिल तुझ्या गोड दिसण्याने लाजुन चूर व्हावे...

निशा ही गंधितच असते आणि अशा त्या निशेने अक्षरशः गंधात न्हाऊन निघावे, मग ती निशा काय बेधुंद होईल ना!....अशी गोड तु; असा गोड तुझा मतला.
=========================

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

- तारकांनीही तुझी आसूया करावी इतकि तु गोड आहेस. यातुन तु तीच्या गोडपणाचे परिमाण द्यायला सुरूवात करतोस. हे तसे उत्तमच.

पण त्याही पुढे जाऊन चंद्र-सुर्यात त्या तारकांना सोडुन तुझ्या गोड पणाविषयी चर्चा व्हावी, हे तर अजबच, अद्भुतच. यात असाही एक अर्थ दिसतो कि दिवस-रात्र तुझ्या गोड पणाचे गुणवर्णन चंद्र-सुर्यही करत असतात; आणि त्यामुळेच तारकांनाही तुझी आसूया निर्माण होते. १०० गुण या शेराला.
===========================================

नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

- यात खरेतर तांत्रिकदूष्ट्या गोडपणाचा संबंध येत नाही. नभाला आपण कुठल्याही प्रकारे गोड म्हणत नाही. पण ते नभही धरतीला सोडुन जीच्या उंब-यापाशी झुरते ती किती गोड असेल, असा एक अर्थ निघतो. या ओळी मनावर गोड शिरशिरी ठेऊन जातात.

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

- पहिली ओळ ठीक, आहे सुंदर, पण तशी कितीतरी जणांनी ती साधली असती.

पण दुसरी ओळ मी पहिल्यांदाच ऐकतो आहे अशी उपमा. तुझा गोडपणा इतका कि दंवाने उन्हाला ओले करावे.... लक्षात येतंय का! अरे ऊन त्या दंवाला विरघळुन टाकते; पण इथे तीच्या गोडपणाची कमाल इतकि कि ते दंवाचं मार्दव उन्हालादेखिल ओलं करून टाकतं. ऊनही त्या गोडपणाच्या ओलेपणात न्हाऊन निघु लागतं.
=================

मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

- पुन्हा शेराची पहिली ओळ तशी सुरेखच, पण तशी ती पहिल्यांदाच लिहीली गेली असे नाही.

दुस-या ओळीत वरवर पाहता काही विशेष दिसत नाही. परंतु बारकाईने विचार केला तर कळते कि समर्थांनी जीथे म्हटले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे', ते बापडे कितीही खरे असो, तु इतकि गोड आहेस ना गं कि मनाचे आकंठ समाधान होते. पुर्ण तृप्त होते. एरवी मनाला असे आकंठ समाधान कसे मिळणार?
===============

तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

- पुन्हा पहिली ओळ तितकिशी पटली नाही. असे वाटले कि दुसरी ओळ पहिल्यांदा सुचली असावी आणि पहिली ओळ ही फक्त vaccum filling साठी लिहीली असावी. असो!

तुला पाहता मुलाने हसावे (यातला 'त्या' हा शब्द, जो पहिल्या ओळीशी संबंधित आहे, मी दुर्लक्षित करतो आहे); किती सुंदर कल्पना आहे. इथे मुलाने हे मी लहान मुलासाठी घेगंधकोशी''त्या फुलांच्या गंधकोशी' मधल्या 'बालकांचे हास्य का' या ओळी आठवल्या.
=================

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

- अरे राधा-कृष्ण किती करोडो कवितात येऊन गेले असतील नाही. पण इथे तु त्याच कृष्णाविषयी नि राधेविषयी (जीला तु या कवितेत गोड असे वारंवार म्हणत आहेस, तीला मी रसग्रहणापुरते राधा धरत आहे) किती वेगळे लिहीले आहेस.

मी आजवर राधेच्या-मीरेच्या गिरीधरावरील भक्तीविषयी ऐकले वाचले होते, पण कृष्णाने त्यांची भक्ती केली असे कधीच ऐकले नव्हते. किती एकतर्फी इतिहास लिहीला जातो असे आत्ता तुझ्या ये शेरावरून वाटून गेले.

ईथे श्रीधर आणि हरी हे शब्द कृष्णनिदर्शक आहेत. हे शब्द सहसा कवितेत दिसत नाही, निदान अशा प्रकारच्या कवितेतरी. परंतु इथे ते शब्द खुप समर्पक वाटतात; छान वाटतात.

पहिल्या ओळीत तु राधेच्या मधुराभक्तीचाच आधार घेतला आहेस. तसा तो सामान्यच वाटतो. पण दुस-या ओळीत तु त्या कृष्णाला, हरीला भक्तांच्या रांगेत आणुन बसवले. जे अगणितजणांचे आराध्य दैवत आहे, ज्याच्या भक्तीने कैवल्यमुक्तीचे आश्वासन मिळते, त्या हरीला तु तुझ्या 'ती'च्या भक्तगणांत आणुन बसवले.

कवितेचे सामर्थ्य यातच आहे कि जे आजवर कुणीच केले नाही, जे कृष्णाविषयी राधा किंवा मीरेच्यासंदर्भानेही कुणी कधी विचार केले नाही, ते तु तुझ्या या ओळीत आणुन दाखवलेस. कृष्णाला तुझ्या तीच्य गोडपणाचे भक्त बनवलेस, इतके जितके राधेने कृष्णावर प्रेमवर्षाव केला असेल.
===========================================

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

- पुन्हा एकदा फार वेगळे लिहुन गेलास. यम, मृत्यु वगैरे दाखले अनेकदा आले असतील अशा प्रकारच्या गझलामधुन. पण तु तीच्या गोडपणाच्या सामर्थ्याची चुणुक यमाला पराजीत करून दाखवली आहेस. आणि यमाला कसे पराजित केलेस; मृत्युवर कसा विजय मिळवला, तर तो तीला जिंकुन तुझे श्वासच चिरायु बनले तर तो बिच्चारा यम काय करणार तुझे वाकडे. तो यम प्राण घ्यायला येईल खरा, पण ज्याचे श्वास त्या गोडपणाला जिंकून चिरायु झाले आहेत, त्याला यम तरी कसा परास्त करणार.

कृष्णाच्या उदाहरणा/उपमेनंतर हा दुसरा फारच उत्कृष्ट कल्पनाचमत्कृतीचा नमुना आहे. आणि अजुन पुढे येणार आहेत.
=======================

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

- अरे कुठे पोचलास. लोक अशा गोड तीच्यासाठी देवदास बनतील, चातक-चकोर बनतील, कृष्ण बनतील, जोगी-बैरागी बनतील, बरबाद कवि बनतील..... पण तु तुकाराम बनायला निघालास. या ओळींनी तु या नुसत्या मधुर कवितेला अलौकिक प्रमाण दिलेस. देवदासाचे किंवा मजनुचे प्रेमात भणंग होणे निराळे. तो केवळ भौतीक प्रेमाचा परमोच्चबिंदु मानता येईल, पण सदेह वैकुंठागमन करणा-या तुकारामाचे भणंग होणे हे परालौकिक आहे, पारमार्थिक आहे. तु यात तुकाराम आणि पांडुरंग हा संबंध सहजतेने योजुन या श्रृंगारिक कवितेला प्रासादिक करून टाकलेस. धन्य!

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

- सुरेख शेर. तुझ्या गोड हासण्याने त्या सौदामिनीवर रूसण्याशिवाय पर्यायच उरू नये....अशी गोड तु!
=================

कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

- या उपमेला मी फार गुण देणार नाही. पण ही जी रचना तु केली आहेस आणि या ओळीच्या अनुषंगाने वरच्या ओळीतला 'मुल्य' हा शब्द किती चपखलपणे योजला आहे ते लक्षात येते. हे रचनाकाराचे कौशल्य असते.
=====================

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

- पहिले म्हणजे तीच्या वर्णनाचे वाक्य असूच शकत नाही; ते महावाक्यच असू शकते. महावाक्यमधुन पुन्हा त्या गोडपणाची अलौकिकता सिद्ध केली आहे. पुन्हा हे ही कविच्या प्रतिभेचे द्योतक.

पण त्यापुढे जाऊन, महाभारत, जे भारतात विसरणे म्हणजे मृत्युसमान आहे, विसरले जावे, अशी गोड तु. प्रत्येक उपमेतुन त्या गोडपणाला श्रेष्ठत्व देण्याचा हा प्रयत्न इतका जबरदस्त जमला आहे, कि नतमस्तकच व्हावे.
==================

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

- वरील सर्व शेर एका बाजुला आणि हा शेर एका बाजुला. म्हणे गालिबविषयी का गालिबने कुणाविषयी (कदाचित मीर) असे लिहीले कि तु मला तो एक शेर दे आणि माझी आख्खि शायरी तुझी करून घे, मला तसेच म्हणावे वाटते आहे यार!

काय लिहु. ज्या बोधिवृक्षाने या समस्त विश्वातील संयम, वैराग्य आणि अनासक्तीचा सर्वोच्च आदर्श असणा-या गौतमास; विष्णुच्या आठव्या अवतारास, ज्ञानप्राप्ती करून दिली, त्या बोधिवृक्षाला तु तीच्या गोडपणाच्या मोहाने आकर्षित होऊन तीच्या दर्शनासाठी रांगेत उभे केलेस, काय रे.....कुठे शिकलास हे सारं. तीच्या गोडपणाच्या दर्शनाचा मोह इतका जबरदस्त कि त्या बोधिवृक्षालाही तो आवरता येऊ नये...अगाध, अद्वितीय......नव्हे; एकमेवाद्वितीय!
=====================

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- बास, खरंय. तु ही थकलास. शब्दही थकले. सारे शेवटी नेती नेतीच झाले. ज्याला शब्दसामर्थ हतबल करावे अशी गोड तु......

खरे सांगु त्या गोडपणाचं खरं परमोच्च वर्णन या शेवटच्या शेरात येतं. एवढी महागझल नि महान गझल लिहुनही शेवटी शब्दांचं पांघरूण त्या गोडपणाला अपुरं पडतं हेच खरं त्याचं वर्णन.

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

- एकच फसलेला शेर. वाचताना सहज न लक्षात येणारा. पण बारकाईने पाहिले तर इथे तीचे गोडपण दुय्यम-तिय्यम झाले आहे तुझ्यापुढे. तीचे नाव घेतल्याने तुला आठवावे, यात तीच्या गोडपणाची महती कशी बरे...... मला वाटते, इथे विकेट पडली आहे. असो, ते महत्वाचे नाही.

मानवंदना...!!!

मानवंदना...!!!

माणसे अशी जन्मली ती पोलादी,
डोळ्यात ज्यांच्या, जळत्या मशाली...
घावांचा त्यांच्या, सर्वांगी तप्त शृंगार,
अन रोमरोमात, जेव्हा पेटला अंगार...
मी रक्त पहिले तेव्हा.......सरता सरता पसरलेले...!

अशा हाकल्या, त्यांनी वादळात नौका,
चुकवीत किनाऱ्याच्या, काळजाचा ठोका...
तांडव, तुफान, विजा, घेऊन माथ्याशी,
ते भिडले जेव्हा, पिसाळल्या लाटांशी...
मी समुद्र पहिले तेव्हा.......वळता वळता ढवळलॆलॆ...!

खेळ त्यांचा असा दमदार,
क्षणी प्रत्येक, चढता झुंझार......
झुकल्या तमाम माना, होवुनी धुंद,
पराभवातही लढले, जेव्हा अशी झुंज...
मी मैदान पहिले तेव्हा.......हरता हरता बहरलेले...!

भोगली त्यांनी, मृत्यूची अशी नशा,
हालविली धरा,हादरल्या दाही दिशा...
ते जगले, मरणाचा असा दिव्य सोहळा,
सरणावरही शहारल्या, जेव्हा पेटत्या ज्वाळा...
मी आकाश पहिले तेव्हा.......जळता जळता उजळलेले...!

s.gouri
========================================

छान, सुंदर वगैरे प्रतिक्रिया या कवितेला येणं हा कवितेचा अपमान वाटावा. एकतर वाचणाराने निशब्द व्हावे नि प्रतिसाद सुचुच नये; किंवा या कवितेवर निदान सविस्तर निबंध लिहावा ईतका प्रशस्त प्रतिसाद असावा. सुंदर वगैरे सारख्या प्रतिक्रिया (माफ करा) पण फारच खुजा वाटतात.

कुणीतरी हिमालयाच्या उत्तुंग गिरीशिखराकडे पाहुन नुसते 'सुंदर' अशी शिळी प्रतिक्रिया दिली, किंवा लताच्या मुग्ध-स्निग्ध गळ्यातल्या सुरावटीला केवळ 'छान' असे म्हटले तर एखादा रसिक वैतागणार नाही का? माझी अशीच काहीशी स्थिती आहे.

आत्ताच भुषणच्या (मार्गस्थ उषेचा) २ अप्रतिम कविता वाचल्या. आणि या समुहावरील आत्यंतिक आणि फक्त दर्जेदारच लिहीणा-या या 'भावी शांताबाईं'ची कविता उघडली आणि जणु मखमली कागदावर सोनेरी रेखांनी कुणी अमृतमयी शब्दांची पाखर करून एखादा अत्युत्कृष्ट काव्यनमुना रेखाटलेला असावा, किंवा लिओनार्दोनं पुन्हा कबरीतुन बाहेर पडुन मोनालीसासाठी वापरलेल्या कुंचल्यानं एखादं जीवंत चित्र रेखाटावं.....तद्वत ही कविता वाटली.

वर लिहीलं ते फक्त प्रतिक्रियांविषयी...

आता थोडेसे कवितेविषयी:

"गर्जा जयजयकार" किंवा "उषःकाल होता होता"च्या दर्जाची ही अत्युत्तुंग कविता आहे. हो आहे, असा निर्णय देताना मला यत्किंचितही अडखळल्यासारखं वाटत नाही.

पहिल्या दोन ओळीत यमकाच्या अभावाने उत्कृष्ट शब्द आणि प्रभावी आशय असूनही तितकासा प्रभाव पडत नाही. पण कविता पुढे वाचाची एवढे निश्चित वाटून जाते.

आणि त्यापुढच्या ओळीत जो घावांचा श्रृंगार रेखाटला आहे तो काळजाचा ठाव घेतो. मृत्युसंगे ज्यांनी समागम केला त्यांचे घाव हा त्यांचा श्रृंगारच झाला नाही का!

आणि अशा घावांची आभूषणं भूषणानं अंगावर वागवीत या बलिदानवेड्यांच्या अंगाअंगार; अर्थात रोमारोमात, लढण्याचा; झुंजण्याचा जो अंगार पेटविलेला आहे तो खरोखरच अद्भुत आहे.

"चुकवीत किना-याच्या काळजाचा ठोका"
- अहाहा! तो सागर तर हेलावला असेलच...पण किना-याचेही काळिज हलले असेल; त्याचाही काळजाचा ठोका चुकला असेल.

तांडव, तुफान, विजा, घेऊन माथ्याशी,
ते भिडले जेव्हा, पिसाळल्या लाटांशी...
- यातील रौद्र केवळ अकल्पनीय आहे. त्या प्रतिमातुन जी सृष्टी निर्माण होते, ती अंगावर काटा आणणारी निश्चित आहे. दोन मिनिटे डोळे मिटून या ओळी पुनःपुन्हा म्हटल्या तर डोळ्यासमोर तो भयंकर वादळी रणसंग्राम उभा राहतो, आणि शरीर केवळ थरथरते.

पराभवातही लढले, जेव्हा अशी झुंज...
मी मैदान पहिले तेव्हा.......हरता हरता बहरलेले...!
- तीस-या कडव्यात या ओळी हरता हरता जिंकून जातात. पहिल्या दोन ओळी या जर एकेरी-दुहेरी धावा असतील; तर या ओळी एकदम दोन षटकार (कारण अजुन अधिक धावा क्रिकेटमध्ये नसतात) आहेत.
षटकार; छे! हे तर फटकारे आहेत. ज्यांनी जय-पराजयाची तमा न करता, परिणामांची भिती-क्षिती न बाळगता केवळ लढण्यासाठी म्हणुनच लढण्याचा हा संग्राम मांडला त्यांचे हे वर्णन. हरता-हरता त्यांनी बलिदानाची विजयपताका लावली. शत्रुही ज्या शौर्याने केवळ दिग्मूढ व्हावा, रणचंडी स्तंभित व्हावी, मृत्युही आवाक व्हावा असा तो पराक्रम या शब्दात साकारलाय.

शेवटच्या ओळी म्हणजे एखाद्या पिसाटलेल्या कविने फेकलेले शब्द-काव्यरत्न आहे. या कडव्याने कविता संपते त्यामुळे कविता एका वेगळ्याच उंचीवर जाते.

'मृत्युची नशा' या शब्दप्रयोगात त्या बेलगाम प्रवृत्ती प्रकर्षाने दिसून येते. मृत्युचे भय त्या वीरांना नव्हते याहुनही पुढे जाऊन त्यांना मृत्युची नशाच होती हे अधिक गहिरे आणि प्रभावी वाटते. 'सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है'. ते युद्ध स्वतःसाठी नव्हतं, कुणाच्या स्वातंत्र्यासाठी नव्हतं, कुणाच्या हक्कांसाठी नव्हतं, कुणाला अन्यायातुन मुक्त करण्यासाठी नव्हतं; पापावरती पुण्यानं विजय मिळवण्यासाठी नव्हतं; विस्थापितांचं प्रस्थापितांविरूद्ध नव्हतं; तो लढा 'haves' आणि 'not haves' मधला नव्हता; त्या लढ्यातुन कुठलाही 'ism' किंवा कुठलीही 'निती' उभी करायची नव्हती किंवा कुठल्याही तत्वासाठी ते नव्हतं, धरतीचा भार कमी करण्यासाठी नव्हतं कि आदर्श जीवनपद्धती किंवा संस्कृतीरक्षणासाठी किंवा पुनर्स्थापनेसाठी नव्हतं.......

ते कदाचित युद्धच नव्हतं, लढाचं नव्हता.

एका क्षणानंतर या सर्व जाणीवा पुसून जाऊन मृत्युशी समागम करण्यासाठी केलेली ती मृत्युची नशा होती. त्यात मृत्युविषयी कटुता नव्हती; राग, द्वेष, मत्सर किंवा स्पर्धाही नव्हती. त्यांना चढलेला होता बलिदानाचा कैफ; सर्वस्व असे काही राहिले नव्हते, परंतु लौकिकार्थाने जे सर्वस्व होते त्या सर्वस्वावर पाणि सोडुन, मृत्युचे पाणिग्रहण करण्यासाठी निघाले होते ते अनाम वीर. 'मृत्युची नशा' यात असं फार मोठंसं काही लिहुन टाकलंय.

आणि त्याचमुळे त्यामुळे त्यांच्यासाठी मरण हाच दिव्य सोहळा झाला. पण हा सोहळाही ते जगले. मरताना, मरण्याचाच सोहळा जगणे ही केवढी अद्भुत, पण तरिही या अशा अनाम वीरांविषयीची केवढी वास्तवदर्शी, कल्पना आहे. म्हणजे कवि जी कल्पना करतेय ते खरेतर वास्तव आहे. असे वास्तव कि जे आपण केवळ कल्पनेतच विचार करू शकतो. पण असे केवळ कल्पनीय असे वास्तव जे जगले त्यांच्या मृत्युसोहळ्याच्या जगण्याविषयीची ही ओळ या संपुर्ण काव्याला केवळ झळाळीच देत नाही तर अतिशय उंचीवर घेऊन जाते. मोजक्या शब्दांमध्ये त्या झुंजीचा संपुर्ण ईतिहास जो आणला आहे तो केवळ अद्वितीय आहे.

"सरणावरही शहारल्या, जेव्हा पेटत्या ज्वाळा..."

या ओळी वारंवार शरीरावर शहारा निर्माण करतात. 'सागरा प्राण तळमळला' हे गीत वाचुन जर हेलावला नाही तर तो माणुस कसला. तद्वतच, या ओळींनी जर शरीरावर रोमांचांची फुलं फुलली नाहीत तर खरोखरच त्याच्या मनुष्यत्वाविषयी किंवा मनुष्यत्वाची जीवंतपणाविषयी शंका घ्यावी लागेल.

त्या थरथरणा-या ज्वाळाही शहारल्या असतील, नक्किच असतील. केवढे अद्भुत सामर्थ्य निर्माण केले या ओळींनी या काव्यात. क्षणभर शेषशय्येवर योगसमाधित असणा-या जगत्पालकाच्याही डोळ्यात काकणभर का होईना अश्रु तरळुन गेले असतील. त्या निर्जीव ज्वाळा, ज्या आजवर निर्विकार निर्दयतेने ज्या शरीरावर आप्तांनी निस्सिम प्रेम केले त्या शरीराच्या ओंडक्याला जाळुन टाकत असतील. परंतु या विभुतींच्या शरीराला जाळताना त्या ज्वाळाही हेलावल्या नसतील तर नवलच.

"मी आकाश पहिले तेव्हा.......जळता जळता उजळलेले...!"

ही सांगता बरेच काही सांगुन जाते. बलिदानाची परमोच्च पातळी ही कदाचित आध्यात्मिक स्थितप्रज्ञतेकडे जात असावी. त्या वीरांच्या शरीरांना जाळणा-या अग्निशिखांनी जळुन जळुन जाताना ते आकाश आत्म्याच्या तेजोवलयांनी उजळुन गेले असेल काय? कि त्या हुतात्म्यांच्या गगनोगमनाने त्या आकाशात त्यांची तेजस्वी आभा पसरली असेल! कि अग्निच्या ज्वाळातुन त्यांच्या तेजःपुंज आत्मतेजाचे कण संपुर्ण व्योमाला व्यापुन प्रकाशांकित करून टाकत असतील! कि त्यांच्या बलिदानाने ते आकाश दिपून गेले असेल!

असे अनेकविध अर्थ आणि आशय यातुन बाहेर पडतील. पण तरीही या अर्थ न लावता मनामध्ये भरून ठेवायच्या मनाला भारून टाकणा-या ओळी आहेत.

रचनेच्या दृष्टीने पाहिले तरी देखिल ही रचना एकदम वेगळी आणि unconventional दिसते. त्यातील शेवटच्या ओळी या संपुर्ण कडव्याचा परिणाम सांगणा-या आहेत. त्या चार ओळी जरी स्वतंत्रपणे वाचल्या तरी त्यातुन एक काव्य निर्माण होतं आणि या संपुर्ण काव्याचा आशय सांगितला जातो. हेच ते वेगळेपण.

खुप लिहीले आणि या काव्यापुढे शब्दप्रभा आणि शब्दसामर्थ्यही तोकडे पडते आहे, म्हणुन थांबतो. परंतु या काव्याने दिलेला अनुभव अशा अनेक काव्यांना जन्म घालेल अशी खात्री वाटते.
- सारंग भणगे.

Sunday, January 13, 2013

आत्मशोध

एकदा बाकीचे प्रश्न सोडून
एकच प्रश्न डोक्यात घेत..
कोऽहम कोऽहम करत..
खूप आत जावं..
तिथे आत्मशोध नावाच्या प्रकरणामध्ये ..
काही प्रश्न विचारावेत ...
निरागस हसणारा तू कुठे गेलास?
आणि काही उपप्रश्न हि विचारावेत ..
कि नक्की प्रश्न कशाचा आहे?
निरागसतेचा कि हास्याचा ?


आणि मग याचीहि खोटी उत्तरं देत ,
आत्मशोध संपूर्ण झाला ..
असा शेरा मारून ..
ते प्रकरण ..
कायमचे मिटवून टाकावे आपल्यापुरते ...
आणि एका नवी प्रकरणाला सुरुवात करावी..
विश्वशोध ..
कारण इथे खोटेपणा केल्यावर ..
तिथे कुणीच विचारत नाही खरी उत्तरं..!!

Vinayak Ujalambe
================================


विश्वाशोध मागची संकल्पना फारशी कळली नाही. प्रश्न हास्याचा कि निरागसतेचा हा प्रश्नही सुस्पष्ट नाही. काय म्हणायचे आहे ते कळते आहे, परंतु आत्मशोध सारख्या विषयात हे विषयांतर वाटते, निदान इतर काही विचारगर्भ ओळी वाचल्यावर तरी!
 
निरागस हसणारा कुठे गेलास? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्यातून किती आत्मशोध घडेल ठाऊक नाही, पण निरागसपणा म्हणजे विकारांची पुटं न चढलेलं मन, असे मी समजतो. खरेतर फक्त विकाराच नाही तर विचार देखील.
 
अध्यात्य्माच्या दृष्टीकोनातून विचार केला (माझ्या मर्यादित ज्ञान आणि समजुतीनुसार) तर निरागसता हि परमेश्वराच्या जवळ नेणारी असते. कारण विकारहीन मन म्हणजेच मुक्त मन. परंतु खरी मुक्त हि केवळ विकारांपासुनाची मुक्ती नसावी. खरी मुक्ती हि ऐहिक, भौतिक विचार-भाव-भावना, अगदी जरी त्या विकारवश नसल्या तरीही, त्यांच्यापासुनाची मुक्ती असावी. म्हणजे निर्विकार आणि निर्विचार अवस्था हे कदाचित निरागसपणाचे निकष असावेत. बघा ना, लहान बालकाला आपण निरागस म्हणतो. लहान बालकामध्ये विकार नसतात, तसेच विचारही नसतात. काही भाव-भावना जरूर असतात, परंतु त्या विकारवश नसतात. त्या बालकाला राग, द्वेष, मत्सर किंवा काम इत्यादी विकारांची लागणही झालेली नसते कि त्याच्या मनातून कुठल्याही प्रकारचे विचारदेखील नसतात, म्हणजेच ते मन मुक्त असते.
 
विचार देखील एक प्रकारे विकारच असतात. निदान विचारातून विकार निश्चितच निर्माण होतात. कदाचित अध्यात्माच्या दृष्टीकोनातून हर्ष, उत्साह हे देखील विकाराच असावेत. त्यामुळे विचारातून निर्माण झालेल्या अशा सकारात्मक भावना देखील एक प्रकारे विकाराच मानल्या जाऊ शकतात. आता बघा ना, साधा सुंदर निरागस शब्द आणि मी त्याच्यावर विचार मांडून मांडून त्या शब्दातील निरागसता घालवून टाकली कि नाही! म्हणूनच कुठेतरी विचार देखील विकार मूलक असावेत असे वाटून जाते.
 
म्हणजे निरागसता म्हणजे अगदी मुक्त मन असे जरी नसले, तरी वर म्हटल्या प्रमाणे मुक्त मनाच्या प्राप्तीची सुरुवात निरागसतेतून होत असावी काय! (हा एक प्रश्नही आहे आणि विचारही)
 
परमेश्वराच्या जवळ जाने म्हणजेच आत्मप्रत्यय येणे; आत्मप्रचीती येणे. म्हणजे अत्माशोधाचे फलित होणे. म्हणजे आत्मशोधाची सुरुवात कदाचित 'निरागसपणा कुठे गेला?, आणि त्या निरागसपणात देखील आलेलं ते निरागस हसू कुठे गेलं?' अशा प्रश्नाने होऊ शकते. कदाचित कविता येथेच यशस्वी होऊन जाते. कवीने कुठेतरी खूप खोल विचार न करताही त्याला सहजपणे आत्मशोध कसा घ्यावा हे उमगलेलं असावं, असं वाटून जातं.
 
आता या कवितेचा दुसरा परिच्छेद म्हणजे एक प्रकारे उपरोध आहे. किंबहुना संपूर्ण कविताच कुठेतरी उपरोधाच्या अंगाने लिहिली आहे. परंतु हा उपरोध कुणाचा उपहास करणारा नसून, मला वाटते त्याप्रमाणे आत्मशोध घेण्यामध्ये मनुष्यप्राण्याला आलेल्या एक प्रकारच्या अपयशातून निर्माण झालेला तो उपरोध असावा. मला खात्री आहे कि कवीने तो उपरोध जाणून बुजून न लिहिता, तो त्या भावनेतून आपोआपच कवितेत प्रकट झाला आहे. काही जणांना माझे हे उपरोधाचे मत पटणार नाही, परंतु तो वेगळा विषय आहे.
 
जसे एखादे सरकारी प्रकरण बंद केले जाते किंवा त्याहूनही अधिक म्हणजे एखाद्या सरकारी रुग्णालयात मृत रोग्याची फाईल (याला काही मराठी शब्द आहे का हो!) बंद केली जाते, तशाच कोरडेपणातून अत्माशोधाचे प्रकरणदेखील बंद केले जाते अशी काहीशी वैफल्यग्रस्त भावना या उपरोधातून प्रकट होते. म्हणजे अत्माशोधासारखा विषय देखील केवळ एक प्रकरण होऊन राहिला आहे असेच कुठेतरी कवीला सुचित करावयाचे असावे.
 
तो उपरोध 'विश्वाशोध' यामध्ये देखील जाणवतो. जरी मला हे विश्वाशोधाचे प्रकरण अत्माशोधातल्या खोटेपणाशी कसे निगडीत याचा अर्थबोध फारसा झाला नाही, तरी देखील एवढे मात्र लक्षात येते आहे कि जिथे अत्माशोधावर प्रकरण बंद केल्याची 'लाल फीत' लावली जाऊ शकते, तर त्यासमोर विश्वाशोध काय चीज आहे!
 
कवितेचे कौतुक असे आहे कि कविता इथेच थांबते, उगाच त्या विषयावर असंबद्ध चर्चा चर्वण न करता, कुठल्याही प्रकारे विस्ताराचा मोह (आणि दोषही) आवरून कविता नेमकेपणाने संपते. कवीशी व्यक्तिगत परिचय असल्याने याची कल्पना आहे कि कवीला कवितेचा अंत दिसतो आणि मग कविता स्फुरत जाते. म्हणजेच कवीला कवितेतून नेमके कुठे जायचे आहे ते आधीच माहित असते, त्यामुळे तिथे कसे जायचे एवढाच प्रश्न जो उरतो, तो कवी त्याच्या स्वभावाप्रमाणे सहजतेचा मार्ग स्वीकारून सोडवतो.
 
कवितेतील दुसरा सुरेख भाग म्हणजे कविता खरोखरच कुठेतरी आत्मशोधाचा प्रयत्न करते. तिथे तो निरागस हास्याचा प्रश्न येतो.
 
तिसरा खूप महत्वाचा भाग म्हणजे, कवितेमध्ये कुठे कवी डोकावला आहे असे वाटत नाही. म्हणजे कवी त्रयस्थपणे हि कविता मांडतो. त्यामध्ये त्याचे विचार मिश्रित करत नाही. कवी कवितेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे असे वाटत नाही. कवितेच्या विषयाला हे खूपच पूरक आहे.
 
चौथा सौंदर्याचा भाग म्हणजे कवितेला कुठलाच मुलामा नाही. कविता एखाद्या निर्वस्त्र सुस्नात कुमारीकेसारखी वाटते. थोडी काहीतरी भलतेच रूपक योजल्याबद्दल माफी असावी, परंतु जे मनात आले ते लिहिले....................अगदी निरागसपणे! म्हणायचे एवढेच आहे कि कवितेमध्ये कवीची अहंमन्यता किंवा तत्सम कुठला अभिनिवेश दिसत नाही. कविता टाळ्या किंवा वाहवा घेण्यासाठी लिहिली आहे असे वाटत नाही.
 
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कविता वाचताना तुम्हाला फारसा विचार करावा लागत नाही कि वाचल्यानंतर काही विचारांचा कल्लोळ वगैरे ती ठेऊन जात नाही. परंतु तरीही कवितेवर विचार जरूर केला पाहिजे असे वाटूनही जाते.
 
सर्वावर कडी म्हणजे, कवितेमध्ये जो प्रश्न आहे तेच त्याचे उत्तर आहे. कविता नुसता पर्ष्ण विचारून जाते असे वाटले तरी ती खरेतर उत्तर देऊन जाते, जे तुम्हाला शोधावे देखील लागत नाही. कविता कुठेही वाचकाची परीक्षा घेत नाही; आत्मपरीक्षणाचे डोसही पाजत नाही, परंतु हवे असल्यास आत्मशोध घेऊ शकता असे काही सुचवते.
 
लिहिता लिहिता कविता उलगडत जाते, कवितेवर लिहायला घेतले तेव्हा २-४ ओळी लिहू शकेन असे वाटले होते. परंतु हा तर एक लघु निबंध झाला तरीही लिहायची उर्मी संपली नाही, असेच काहीसे कवितेबाबत होते.
 
आता थांबतो. वाचणार्यांनी माझेच कौतुक करावे इतपत तसेही मी आता लिहिलेच आहे. असे काही लांबलचक लिहिले कि लोक आपोआपच कौतुक करतात, बरेचदा हे लांबलचक लिहिलेले न वाचताच.
--
सारंग भणगे

Thursday, December 6, 2012

निरोप ..

पापण्यांच्या पाकळ्यांवर जमलेले दव
ओघळत राहिले हळुवार ..
कित्येकदा, त्या वेळी ..
...

दाटलेल्या कंठात शब्दांची गर्दी
अडखळली वाक्ये
कित्येकदा त्या वेळी ..

थरथरत्या मनात, भावनांचा प्रपात
लपवले कंपित हात,
कित्येकदा त्या वेळी..

अखेरची नाही भेट, जुळतील वाटा पुन्हा
समजावले मनाला,
कित्येकदा त्या वेळी..

चिडलो, रडलो, हसलोही जरा खिन्नपणे,
नेमका निरोपच घ्यायचा राहिला ..
अखेरचा .. त्या वेळी ..

-कल्याणी
पहाटे १:४५

टिप : 'Life of Pi' चित्रपटातील एका प्रसंगाने प्रेरित !
========================================================================

कविता अत्यंत सुरेख आहे!
 
पापण्यांच्या पाकळ्या, त्यावरल दंव, अर्थात अश्रू, हे कदाचित नवीन नसेल. परंतु यातून कवियित्री एक भावनिक मार्दव शब्दातून निर्माण करते. समोर उभी राहते, एका खिन्न फुलाची अश्रूत भिजलेली पाकळी......
 
मला यात 'रडणे' हि प्रक्रिया अपेक्षित नसून, त्यातून मनाची खिन्नावस्थाच अधिक प्रतीत करण्याचा प्रयत्न कावियीत्रीचा प्रयत्न असावा असे वाटते.
 
'कित्येकदा त्यावेळी' हि कवितेची मध्यवर्ती theme. इथे त्यावेळी म्हणजे नक्की कुठल्या वेळी (?), किंवा नक्की काय घडले असताना हे कवियित्री कुठेच स्पष्ट करत नाही. परंतु त्यामुळेच वाचकाच्या मनात त्याच्या जीवनाशी निगडीत एखादा प्रसंग आपोआपच उभा राहतो आणि पहिल्याच फटक्यात हि कविता केवळ कावियीत्रीची न राहता, कवितेच्या मुलभूत वैश्विक अपेक्षित नियमानुसार ती कविता सर्वांची होते, खऱ्या अर्थाने वैश्विक होते.
 
इथे मनाची ती खिन्नता, उद्विग्नता, विषण्णता अधिक गहिरी होते कारण 'त्यावेळी' अशी मनाची अवस्था 'कित्येकदा' झाली होती, ती अनामिक मूक असावे कित्येकदा गळाली होती, यातून ती भावगहनता अधिक प्रतीत होते, त्यातील आर्तता अधिक अधोरेखित होते.
 
सुरुवातीलाच पकडलेला हा सूर संपूर्ण कवितेमध्ये मग पुन्हा कधी ढळतच नाही......उलट तो अधिक अधिक उत्कट होत जातो.
 
अशा मानस अवस्थेमध्ये शब्दांचे मुके होणे, हातांचे कंपित होणे....हे सारे स्वाभाविक शारीरिक आणि मानसिक परिणाम अत्यंत परिणामकारकरित्या कावियीत्रीने मांडले आहेत, आणि ते देखील कवितेतील भाव-सूर कुठेही फार कमी-अधिक होऊ न देता! आणि प्रत्येक वेळी 'त्या कुठल्यातरी अनामिक वेळी' हे घडले आहे हे वारंवार मांडून वाचकाला त्या प्रसंगाबद्दल औत्सुक्य निर्माण करतानाच त्याच्या जीवनातील कुठल्याही भाव-व्याकूळ प्रसंगाचे स्मरण करून देण्याची ताकद या कवितेच्या ओळींमध्ये जाणवली.
 
हि सारी भावावस्था अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडताना कवितेतील काव्यभाव इतका सुरेख सांभाळला आहे कि वाचक आपोआपच कवितेच्या ओळींमध्ये तल्लीन होऊन जातो. मनाचे कोमेजणे इतके सुंदर फुलवले आहे कि जणू दु:खानेच शब्दांचा शृंगार केला असावा!
 
कंठाचे दाटणे, शब्दांचे आटणे हे इतके स्वाभाविक भाव अत्यंत संयत उत्कटतेने प्रकट झाले आहेत. इथे माझेही शब्द आता मला सांगत आहेत कि इतक्या सुंदर ओळींवर तुझ्या शब्दांचा साज चढवण्याचा प्रयत्न वृथा आहे, तो करू नकोस. नाहीतरी चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कशाला हवे!
 
'अखेरची नाही भेट'.....हा आशावाद भासेल कदाचित, पण तो भाबडाच आहे हे 'समजावले मनाला' मधून लगेचच स्पष्ट होते. इथे पुन्हा अशा भावावास्थेमध्ये उलगडणारा मनाचाच पुन्हा एक भाव-पदर. ती भेट कदाचित शेवटचीच असेल हे माहित असते, परंतु मन ते मनात नाही. त्यावेळी नाही, आणि नंतरही कित्येकदा नाही. मी स्वत: अशा प्रसंगातून गेलेलो आहे. त्यामुळे या शब्दातून काय सांगायचे आहे त्याची अनुभूती मी घेतली आहे.
 
पुन्हा एकदा असे ते मनाला समजावणे कित्येकदा घडते आणि मनाची भावविभोरता अधिकच ठळक होते.
 
कवितेचा शेवट केवळ अप्रतिम आहे! तो वाचल्यानंतर क्षणभर श्वासच थांबतो.
 
तो प्रसंग असा काही असतो कि त्यात केवळ रडणे नसते, चिडणे आहे, रडणे आहे, त्रागा करणे आहे, खोटे खोटे हसणे आहे. अनेक भावनांचे नर्तन मनात चालू असते कारण ते कुणाचे तरी दूर जाणे हे सहनशक्तीच्या पलीकडचे असते. तो वियोग साहणे जड असते. आणि त्या प्रसंगाला भावनांचा असा कल्लोळ स्वाभाविक असतो.
 
परंतु तिथेच ती चूक घडते. या भावनांच्या भरात कवियित्री इतकी वाहून जाते कि दूर जातानाचा निरोप राहून जातो.................... केवढी हि हुरहूर मागे ठेऊन जातो हा प्रसंग! ज्याच्या विरह भावनेत मनामध्ये इतका कल्लोळ माजला आहे, ती व्यक्ती किंवा गोष्ट दूर जाताना 'शेवटचा निरोप' हि राहून जावा! हो, इथे मला Life of Pie मधला तो प्रसंग आठवला.......
 
कविता वाचायला सुरुवात करण्याच्या आधीच वाचले होते कि हि कविता Life of Pie वरील प्रसंगावरून लिहिली आहे. परंतु स्पष्ट नव्हते झाले कि तो प्रसंग कोणता? कविता सुंदरच असल्याने लिहिता लिहिता लिहित गेलो. अगदी या शेवटच्या ओळींवर लिहित गेलो आणि 'शेवटचा निरोप' हे शब्द लिहिले आणि त्यानंतर मग अचानक Life of Pie मधला वाघाच्या जंगलामध्ये निघून जाण्याचा प्रसंग उभा राहिला.
 
हि कविता इथे संपूर्ण यशस्वी होते. कारण आधी माहित असूनदेखील वाचक कवितेवर विचार करताना ती एका विशिष्ट प्रसंगावर आधारित आहे हे विसरून जातो; आणि जेव्हा शेवटला पोहोचतो, तेव्हा तो प्रसंगच त्याला आठवतो. म्हणजे कुणाला तरी कुठल्या ठिकाणाचा रस्ता विचारावा, त्याने सहज गप्पा मारता मारता बरोबर चालायला लागावे, त्याच्या गप्पा इतक्या मनोरम असाव्यात कि आपण गप्पात हरवून; हरखून जावे आणि आपल्याला कुठे जायचे आहे ते विसरावे, आणि अचानक त्याने आपल्याला जिथे जायचे होते तिथे आणून सोडावे............असेच काहीसे झाले हे!
 
सुरेख कविता!!!!

--
सारंग भणगे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...