१९९६ साली एक बातमी वर्तमानपत्रामध्ये आली कि कुणी एक सनदी अधिकारी कि जे मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पहात होते, त्यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक जीवनात प्रवेश करायचे ठरविले आहे. बातमीमध्ये असेही नमूद केलेले होते कि दहा वर्षे प्रशासकीय सेवेत व्यतीत केल्यानंतर अशी स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असा निर्णय त्यांनी सेवेमध्ये रुजू होतानाच घेतला होता. बातमीमध्ये पुढे असेही नमूद केल्याचे स्मरते कि निवृत्ती नंतर त्या अधिकाऱ्याने पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या प्रांगणात एक सभा घ्यावयाचे योजले होते, आणि त्या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि वाजपेयीजींच्या सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री, श्री. अरुण शौरीजी ह्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले होते. मी त्यावेळी कायद्याच्या शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षांमध्ये होतो. उमेदीचा, वेगळ्याच नवलाईचा आणि उत्साहाचा तो काळ, जेव्हा सामाजिक जाणीवा अधिकच सजग होत्या, आणि अशी काही बातमी वाचून कुतूहल तर जागे झालेच होते. त्यामुळे मी सभेतील त्यांचे भाषण ऐकायला सभास्थळी पोहोचलो. ते सनदी अधिकारी सभेमध्ये नक्की काय बोलले ते आत्ता अजिबात स्मरत नाही, परंतु त्यांच्या भाषणाने मी प्रचंड प्रेरित झालो होतो, आणि घरी येऊन मी त्यावर एक छोटासा लेखही लिहिला होता. मला तो माझाच लेख फार आवडला होता (मध्यंतरी तो शोधला, पण दुर्दैवाने तो सापडला नाही).
त्यानंतर त्यांच्याविषयी कुठे ना कुठे काही ना काही वाचनात, ऐकिवात येत राहिले असेल. पण पुन्हा त्यांना ऐकण्याचा, पाहण्याचा योग १९९९ साली रामकृष्ण मिशन मध्ये १२ जानेवारी ह्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीपूर्वी आयोजित केलेल्या एका व्याख्यानमालेच्या निमित्ताने आला. ह्या व्याख्यानमालेत रोज एका वक्त्याचे भाषण असायचे. काही वक्त्यांची भाषणे २ दिवसही होती, पण ह्या सनदी अधिकाऱ्यांचे व्याख्यान सलग ३ दिवस होते. सलग ३ दिवस त्यांचे व्याख्यान आणि तेही स्वामी विवेकानंद ह्या विषयावर म्हणजे पर्वणीच होती. अर्थातच इतर सर्व वक्त्यांमध्ये मला सर्वात अधिक आवडली ती ह्यांचीच व्याख्याने. अमोघ वक्तृत्व आणि पांडित्यपूर्ण सखोल अभ्यास ह्यांनी त्यांची व्याख्याने अत्यंत प्रभावी झाली होती.
२००१ साली मी Rotaract Club चा President असताना आम्ही एक फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही ह्या सरांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. अर्थात हि कल्पना माझीच होती. मला आठवते त्याप्रमाणे कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि छोटासा वार्तालाप देखील झाला होता. पण कार्यक्रमाच्या दिवशी माझा एक सहकारी त्यांना घरातून कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी उशिरा पोहोचला आणि त्यामुळे त्यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला (दिल टूट गया था मेरा तब!).
त्यानंतर बरीच वर्षे त्यांना ऐकण्याचा योग आल्याचे मला आठवत नाही. पण साधारणपणे २०११-१२ च्या सुमारास मी त्यांच्या एका कविता संग्रहाचे audio book विकत घेऊन त्यांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकल्या. बहुतेक सर्व कवितांमधून राष्ट्रप्रेरणा देणारा, सामाजिक आणि चिंतनात्मक असाच आशय होता. शब्दप्रभुत्व आणि आशय संपन्न कविता सरांच्या गंभीर आवाजात ऐकणे हि एक अनोखी उपलब्धी होती. त्या कविता संग्रहाचे नाव होते "रात्र गहिरीच्या तिसऱ्या प्रहरी" आणि त्याचे कवी आहेत श्री. अविनाश धर्माधिकारी सर.
'रात्र गहिरीच्या तिसऱ्या प्रहरी' आणि 'अस्वस्थ दशकाची डायरी' हि त्यांची दोन पुस्तके मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून ऐकून होतो. हि नावेच मला इतकी आवडली होती कि ती वाचण्याची फार उत्सुकता होती. रात्र गहिरीच्या..... ऐकले ते वर लिहिलेच. 'अस्वस्थ दशकाची डायरी' काही वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून घेऊन वाचायला घेतले होते, परंतु त्यावेळी ते पूर्ण होऊ शकले नाही. पण १-२ वर्षांपूर्वी सरांनी हे पुस्तक YouTube वर ध्वनिबद्ध करून प्रकाशित केले तेव्हा पुन्हा एकदा सरांच्या अद्भुत वाचनशैलीत हे पुस्तक ऐकण्याचा योग आला. एक भाग ऐकून झाल्यानंतर पुढील भाग प्रकाशित होण्यापूर्वी प्रचंड उत्कंठा असायची. १९७५ ते १९८५ ह्या दशकामधील अस्वस्थ-धुमसत्या भारताचे प्रत्यक्षदर्शी वर्णन, अनुभव-कथन आणि विचार-प्रदर्शन सरांनी ह्या पुस्तकात केले आहे. माझा जन्म १९७५ चा. मला मी वर्तमानपत्र व्यवस्थितपणे वाचायला लागल्याचे आठवते ते Operation Bluestar पासून. त्यावेळी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर पंजाबमधील दहशतवादावर खूप बातम्या असायच्या. सरांच्या ह्या पुस्तकामध्ये पंजाबमधील तो अस्वस्थ कालावधी, आसाममधील आसूच्या आंदोलनांचा धुमसता कालावधी, गुजराथमधील विद्यार्थी आंदोलनांचा आढावा अशा भारताच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा उहापोह आहे, पण मुख्य म्हणजे सरांनी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून तसेच भारताचा कार्यकर्ता म्हणून ह्या सर्व भागांमध्ये जाऊन, पाहणी करून, त्या समस्यांशी निगडित व्यक्ती (अगदी भिन्द्रावले, प्रफुल कुमार महंता ते अडवाणीजी) ह्यांच्याशी वार्तालाप करून, तेथील भूभाग; लोकमानस, सामान्य जनता ह्या सर्वांचे अवलोकन करून त्यावर निःपक्षपाती, वास्तववादी पण तरीही राष्ट्रीय हित आणि एकात्मता हि उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन केलेले लेखन अत्यंत उद्बोधक आहेच, परंतु रोचकही आहे. सर ह्या पुस्तकातून भेटत राहिलेच, पण गेली सुमारे १० वर्षे अविनाश सर मला नित्यनेमाने YouTube वर भेटत राहिले आहेत, आणि आजही भेटत आहेत.
हिंजवडीमध्ये माझे ऑफिस असल्याने बिबवेवाडी ते हिंजवडी ह्या सुमारे ३५ किलोमीटरच्या, १-१.५ तासाच्या प्रवासात माझे वाहन चालवता चालवता मी YouTube वर जे काही सतत ऐकत असायचो त्यात सरांची अनेक व्याख्याने त्यांच्या चाणक्य मंडळाच्या किंवा त्यांच्या वैयक्तिक channel वर ऐकत आलो आहे. गेल्या १० वर्षातील सरांचे Youtube वरील एकही व्याख्यान मी miss केलेले नाही, अगदी अनावधानाने झाले असेल तरच. सर्वप्रथम Youtube वर चाणक्य मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात सरांनी दिलेली अनेक विषयांवरची अप्रतिम व्याख्याने ऐकण्यात आली. एक वर्ष सरांनी विविध देशांमध्ये घडून आलेल्या क्रांती, उदा. अमेरिकेतील यादवी युद्ध, फ्रांसमधील Joan of Arc ची चित्तथरारक जीवनगाथा, जपानमधील Meiji Restoration ची अद्भुत कहाणी, चीनच्या यादवीमधील माओचा Long March आणि अर्थातच भारताविषयीचे कारगिल युद्ध अशा काही कथा आणि त्यातील कथासार अत्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या अफाट वक्तृत्वशैलीत सांगितल्या आहेत. त्यानंतरच्या वर्षात पर्यावरण, दहशतवाद, जागतिकीकरण, लोकशाही, अण्वस्त्र युद्धे अशा अनेक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण, रोचक, रोमांचक अशी व्याख्याने आहेत. हळूहळू सरांनी अनेकविध विषयांवर व्याख्याने, भाषणे, पुस्तक वाचन, मार्गदर्शनपर संभाषणे, संवादपूर्ण चर्चासत्र असा ज्ञानाने ओतप्रोत, वक्तृत्वाने समृद्ध, विषय वैविध्याने नटलेला प्रचंड खजिनाच YouTube च्या माध्यमातून सर्वांसाठी खुला केलेला आहे. सरांचा दिग्मूढ करून सोडणारा व्यासंग, अभ्यास, वक्तृत्व ह्याबरोबरच विनम्रता, बोलण्या-वागण्यातील तरुणाई, राष्ट्र-प्रथम हि अविचल भूमिका, भारतीय संस्कृती; साहित्य, संस्कार ह्याविषयीचा सार्थ अभिमान, विज्ञान असू द्या कि गणित; शास्त्र असू द्या कि कला; साहित्य असू द्या कि संगीत, सर्वच विषयांचा अत्यंत सखोल अभ्यास आपल्याला अचंबित करून सोडतोच, पण त्यांची व्याख्याने ऐकता ऐकता आपण श्रीमंत देखील होत जातो. त्यांची प्रेरणादायी भाषणे देखील उत्तम काम करण्याची प्रेरणा देतात. उत्तमता आणि प्रतिभा ह्याच्या संगमातून उत्तम काम करून देशाला पुढे घेऊन जाणे हा त्यांचा सततचा संदेश असतो. प्रत्येक भाषणाची सुरुवात 'सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा' ह्यांनी सर करतात, वारंवार महाराष्ट्राची भूमिका हि भारताला समृद्ध आणि समर्थ करण्याची आहे, आणि भारताची भूमिका 'वसुधैव कुटुंबकम' हि आहे ह्याचे स्मरण करून देतात. पुस्तके कशी वाचावीत, अभ्यास कसा करावा, अभ्यासाचा उद्देश काय असावा, वाचनाचा वेग कसा वाढवावा, वेळेचे नियोजन कसे करावे अशा एक ना अनेक मार्गदर्शपर विषयांवरील त्यांची व्याख्याने सर्वांनाच अत्यंत उपयुक्त आहेत.
सरांची हि व्याख्याने मी एकूण अगणित तास ऐकली आहेत, सतत ऐकत असतो आणि ऐकत राहीन. त्यांच्या ह्या भाषणातून ज्ञान, कौशल्य, स्वयंप्रेरणा, शिस्त, नियोजन, विनम्रता, देशप्रेम, लोकप्रेम, संस्कृती प्रेम, अस्मिता, अभ्यास, व्यासंग, वक्तृत्व, निश्चय, धैर्य नि धीरोदात्तता, अशा किती किती गोष्टी माझ्या परीने शिकल्या आहेत, शिकतो आहे, शिकत राहणार आहे! त्यांनीदेखील हे सर्व videos माझ्याप्रमाणेच अनेकांना खूप काही शिकता यावे ह्याच उदात्त हेतूने post केलेले आहेत. आणि त्यामुळेच माझ्याप्रमाणेच अनेकांचे श्री अविनाश धर्माधिकारी हे एक 'अविनाशी गुरूवर्य' आहेत हे कबूल करताना मला अतिप्रचंड आनंद होत आहे. सरांना निरामय दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्याप्रती मनापासून प्रार्थना!
--
सारंग भणगे
No comments:
Post a Comment