Wednesday, March 16, 2011

घेतली नाही कधी माघार मी.२

साहले कित्येकदा ते वार मी,
घेतली नाही कधी माघार मी.

वीख आहे साचले सा-या जगी,
तृप्त आहे अमृताची धार मी.

पोसलेले दु:ख त्यांनी अंतरी,
सौख्यबीजे धारुनी गर्भार मी.

पैलतीरी जावयाला झुंजती,
पार गेलो या जगाच्या पार मी.

जिंकण्याची हाव आहे सारखी,
गैर का स्वीकारणे हो हार मी?

हास्य थोडे आसवांना वाटले,
रामकामी हात देतो खार मी.

सांगतो रंग्या तुम्हा जे मानले,
झुंजण्याला जीवनाचे सार मी.
===============
सारंग भणगे. (१६ मार्च २०११)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...