Sunday, December 28, 2008

माझेच शब्द होते

भले शब्‍द होते, बुरे शब्‍द होते,
जसा अर्थ घ्यावा तसे शब्‍द होते

कळलेच अर्थ नाही; ना भाव ही तुला गं,
मौनातले गूज माझ्या; सांगित शब्द होते.

का साऊलीस माझ्या पाहूनी तु भिवावे,
अबोल व्यक्त झाले; ते माझेच शब्द होते.

गाईले गीत गूढ; मिठीत गाढ तुझिया,
गात्रात धुंद झाले; ते माझेच शब्द होते.

आज अस्मानही जहाले, साऊळे सांद्र दाट,
ते गात दुःख होते; ते माझेच शब्द होते.

मी अवघाच फ़ाटलो कि; वा-यास सांधताना,
वादळात ध्वस्त झाले; ते...... माझेच शब्द होते....
======================================
सारंग भणगे. (28 डिसेंबर 2008)

Thursday, December 18, 2008

निसर्गवैभव.

आज फ़ुटावे अस्मानाला पंख त्याने उडून जावे,
घेऊन हाती हात ढगाचा क्षितीजानेही झुलुन घ्यावे.

गोड फ़ुटावे धरतीलाही सुर सुगंधित गाण्याचे,
सागर लाटी कान देऊनी गान ऐकतो पाण्याचे.

पानावरती दंवबिंदुंनी पहाटकाळी उगा निजावे,
पिउन सारी मेघममता धरतीनेही चिंब भिजावे.

उंच कड्याच्या ओठांमधुनी निर्झरबालक खेळावे,
तरूणाईच्या परसामध्ये फ़ुलाफ़ुलांचे मेळावे.

तृणांवरती नाचतनाचत समीरालाही झुलवावे,
इंद्रधनुचे दान देऊनि आकाशाला खुलवावे.

घट्ट ओल्या मातीमध्ये मुळामधूनी पसरावे,
किरणांसंगे खेळत असता सूर्यालाही विसरावे.

हिरवाईच्या लतामंडपी तुळसमंजि-या हलती-डुलती,
पर्णसड्यातुन गंधमाधवी मोहवती मधुमालती.

शांत वनावर फ़ुंकर घाली वारा अवखळ निलाजरा,
काट्यावरती गुलाब फ़ुलला अतीव बुजरा नि लाजरा.
(कातरवेळी वाटेवरती रंग पिसारा खुले साजरा)

डोंगर भासे निळेनिळे नि पहाड काळे कभिन्न,
पलाश पिंपळ पळस अवघे दुरुन भासती अभिन्न.

पहात राहतो निसर्गवैभव डोळे भरुनि मोदभरे,
काव्यामधुनी गाणे गातो ऐका जन हो नादभरे.
=======================================
सारंग भणगे. (7 डिसेंबर 2008)

Tuesday, December 16, 2008

१४ डिसेंबर २००८ - पुणे स्नेहमेळावा.

१४ डिसेंबर २००८ - पुणे स्नेहमेळावा.
(ही तर फ़क्त सुरुवात...........)

"जगणे केवळ जगणे नाही
हे बंध अवीट नात्यांचे
शब्द सारे एक जहाले
गाव वसवण्या कवितांचे"

वृत्तांत काय लिहावा. जे अनुभवायचे ते शब्दात कसे बांधावे! अतिशयोक्ती नाही, जे मनात आले, तेच लिहीतोय.

दुपारची ४ ची वेळ, डिसेंबरच्या गारव्यात खुपच सुखद वाटत होती. एका नवीन विश्वाचा अनुभव घेण्याची हुरहुर घेऊनच पु.ल.देशपांडे उद्दानापाशी पोचलो. सर्वचजण अनोळखी असणार होते. पण ओळखिचे "धागे" ऑर्कुटवर जुळले होतेच. आताचा कार्यक्रम म्हणजे त्या "अमूर्त नात्यांना" "मूर्त स्वरूप" देण्याचाच प्रयत्न होता कदाचित.

प्रथम सुप्रियाशी ओळख झाली. ती 'सह' आली असल्यामुळे मला एक सुखद आश्चर्य वाटलं, सुप्रियाचं नाही; ह्रिषिकेशचं.

बागेचं फ़ाटक उघडून मी आत जाऊन तिकिट खिडकीपाशी उभा राहिलो, आणि योगेश तपस्वीचा फ़ोन आला. फ़ोन ठेवला कि योगेश समोर हजर. खुप जुना मित्र भेटल्यासारखे वाटले. कितीतरी दिवस आम्ही भेटूया असे म्हणत होतो. पण भेटायला वेळच यावी लागते, हेच खरं.

पाठोपाठ समोरुन अविनाशकाका येताना दिसले, हुबेहुब ऑर्कुटमधल्या त्यांच्या फ़ोटोसारखे असल्यामुळे आणि २३ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात त्यांना पाहिलेले असल्यामुळे मी त्यांना लगेच ओळखले.डोळ्यासमोर माझ्या एका कवितेवर त्यांनी लिहीलेला "खरपूस" "अभिप्राय" आठवला. म्हटले, या माणसाशी पहिली दोस्ती केली पाहिजे. हासत सामोरा गेलो, त्यांनीही ओळखले. प्रत्यक्ष भेटल्यावर कुठेतरी स्पंदन जुळल्यासारखी वाटली. वाटलं, त्यांच ऑर्कुटवरचं वाक्-ताडन म्हणजे फ़क्त वरचा 'चारखण'च आहे. ग-यातला गोडवा अजुन चाखलाच नाहिये. कार्यक्रमात अविनाशकाका खुले दिल बोललेही, 'आम्ही कोणाला सोडत नाही. टीका करायची म्हटली कि सपाटून करायची. सारंगवर नुकतीच केली होती. पण कवितेवर प्रेम करायच.' एकच शिकलो, माणसाला एकच बाजु पाहून पारखु नये.

पाठोपाठ आणखि काही वयस्कर सद्ग्रहस्थ आले. ओळख झाली, पेठेकाका, आणि डोळ्यासमोर सुंदर सुंदर चित्र तरळुन गेली.

मग शशांक, शिरीन आणि प्रसन्ना भेटले. ते बराच वेळ बाहेरच होते. एकेकाशी ओळख होताना मनामध्ये यांच्याशी आपण काय काय कुठे कुठे बोललो याच्या आठवणी जमा होत होत्या.

सगळ्यांच्या चेह-यावर प्रसन्नता दिसत होती, उत्सुकता दिसत होती.

आणि मग या कार्यक्रमाच्या उर्ध्वर्यु 'आदिमाया' सोनालीताईंचे आगमन झाले.

आम्ही बागेतल्या नियोजित ठिकाणी प्रस्थान केले.

बाजुला हिरवळ, छानश्या झ-यासारखे झुळुझुळु वाहणारे पाणी, सुंदर झाडे आणि जपानी पद्धतीची झोपडीतील बैठक, यानी वातावरण हलकं, प्रसन्न वाटत होतं.

'सुरुवात कठिण असते'. कार्यक्रमाची कुठलीच आखणी करायची नाही असेच ठरवलेले होते, त्यामुळे थोडा संभ्रम होता, कि खरोखरच २-३ तास हे सगळे चालेल का? लोकांच्या काय प्रतिक्रीया असतील, बागेत खुप गोंधळ / ऊन असेल का? ई.

पण जशी सुरुवात झाली तशा माझ्या या सर्व शंका दूर झाल्या. आविनाश आणि पेठेकाकांसारखे सिनिअर लोक असल्यामुळे थोडा दिलासाही वाटला.

ओळख करुन घेणे अपरिहार्य होतेच. त्यामुळे सुरुवात ओळखिनेच केली. काही लोकांची आपापसात ओळख आधिपासून होती, पण बरेचसे जण नवीन आणि एकमेकांशी ओळख नसलेले होते.

सुरुवात माझ्यापासून केली. आणि मग एकेकाचं खरं स्वरूप कळु लागलं.

बहुदा शेवटचीच ओळख सुपर्णाची होती. त्यानंतर काहीजण आले, पण तत्पुर्वी ओळखिचा पहिला राऊंड संपलेला होता.

सुपर्णाने ओळख करुन द्यायला सुरुवात केली, तोवर लोक फ़ारसे बोलत नव्हते. पण सुपर्णाने मैफ़िलाचा रंग बदलायला सुरुवात केली.

कधी कल्पनाच नव्हती कि सुपर्णा एव्हढी हरहुन्नरी असेल. बंगाली, गुजराथी, मराठी अशा अनेक भाषा संस्कृतींचा तीचा परिचय आणि विविध क्षेत्रातील तीचा अनुभव हा या पुणेकर कविं मंडळींच्या दृष्टीने एक महत्वाचा दुवा असेल.

एव्हाना लोक छान मुरु लागले होते. ओळख ही केवळ ओळख परेड सारखि न होता हास्यविनोद आणि गप्पांच्या ओघात एक ओघवती ओळख घडून आली. कधीही न भेटलेले सर्वजण गहिरी जुनी ओळख असल्यासारखे वाटू लागले.

आता पुढचा महत्वाचा भाग होता. आज भेटलो, पुढे काय?

पण तो प्रश्नही दिलखुलास चर्चेत चटकन सुटला.

पुढला कार्यक्रम ठरला. लवकरच त्याची माहिती समूहावर तर मिळेलच. पण भविष्यातल्या या कार्यक्रमांची रुपरेषाही ठरली. ती आज इथे जाहीर करताना मला अतिशय आनंद होतो आहे, सार्थकतेचा.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवार पुणे येथे बैठक होईल. ५ जण त्या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी घेतील. कार्यक्रमाची आखणी, जागा, वेळ ई. गोष्टी हीच मंडळी ठरवतील आणि आपल्या समूहावर सर्वांच्या माहितीकरीता कळवतील.

आज जरी अशी सुटसुटीत मांडणी आखली असली तरी पुढे जाऊन आणखि नियोजनबद्ध आणि उपयुक्त कार्यक्रम करण्याचा मानस व्यक्त झाला.

पुढच्या कार्यक्रमांचा आराखडा मुकर्रर झाल्यानंतर......... मग तर खरा कार्यक्रम होता.......

काशीला जाऊन गंगाच पाहिली नाही (किंवा अमेरिकेला जाऊन लास वेगास...) तर काय उपयोग.

पंडितांनी एकत्र यायचं आणि शास्त्रचर्चा नाही (किंवा गाढवांनी एकत्र यायचं आणि लाथांचा सुकाळ नाही) तर मग काय मजा!!!

पहिली कविता मला वाटते पेठेकाकांनी वाचली. (चुकले असल्यास कुणिही दुरुस्त करावे).

आणि मग काव्यांचे घडे रीक्त होऊ लागले. जगदिश, अक्षदा, श्रीकांत, शिरीन, आसावरी, दस्तुरखुद्द....आणि ईतरांनीही अनेक कविता वाचल्या. (माफ़ करा मित्रांनो अजुनही सर्वांची नावे लक्षात येत नाहीयेत). सगळे चिंब चिंब झाले.

आणि जणु श्रावणसरीना कस्तुरीचा सुगंध सुटावा, असा आणखि एक सुखद अनुभव सुपर्णाने दिला.

सुपर्णाने केवळ कविता म्हटलीच नाही, तर ती गायिली...तीच्या मुग्ध गळ्यात अवीट गोडी जाणवली. तीने गायलेले हिंदी शेर (सुपर्णा त्याला काय म्हणतात ठाऊक नाही. योग्य शब्द तु नंतर सांग) हे केवळ काव्य म्हणून अप्रतिम होते असे नाही, तर तीने ते गाऊन दाखवल्यानंतर त्यात वेगळीच मजा आली, त्यातल्या भावर्थ उफ़ाळुन वर आला.

मग सुपर्णाने तीचा पहिलाच (पुन्हा कदाचित मी चुकत असेन) मराठी प्रयत्न वाचून दाखवला.



"हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है" हा प्रश्न कदाचित काही वेळाने मी जेव्हा कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली तेव्हा कित्येकांच्या मनात येऊन गेला असेल.

मित्रांनो, जीवनातले काही क्षण तुमच्या सहवासात संपन्न झाले. त्याबद्दल व्यक्तीशः अनेक धन्यवाद. धन्यवाद म्हणताना आवर्जुन उल्लेख करेन तो म्हणजे शशांकचा. शशांक खास मुंबईहून या कार्यक्रमास हजर होता.

आणि शेवटी नक्की उल्लेख करेन तो म्हणजे नवीन मित्र श्रीकांतचा. हा मित्र कोपरगाववरुन केवळ कार्यक्रमासाठी आला. फ़क्त आलाच नाही तर उपाशी तापाशी आला. दुर्दैव कि कार्यक्रमाला कसलीच खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती.

श्रीकांत केवळ आलाचा नाही, तर त्यानं मैफ़िलीत वेगळाच उत्साह आणला. एक कविता गाऊन दाखविली, तर दुस-या कवितेवर मनमुक्त दाद मिळविली. त्याचा आयुष्यातला उत्साह पाहून एखाद्या मरगळलेल्याही चेतना मिळावी. मित्रा, तुला वारंवार भेटता येईल अशी आशा करतो.

आणि सर्व कविंमध्ये मुकाटपणे बसलेल्या दोन रसिकांना कसे विसरता येईल.

ह्रिषिकेष चाफ़ेकर आणि अरविंद सहस्त्रबुद्धे. या दोघांनी आम्हा सर्वांना २-३ तास मुकाटपणे सहन केलं. त्यांच्या रसिकतेला मुजरा करणे भाग आहेच, पण सुप्रिया आणि सुपर्णा (अरेच्चा, हा तर 'सु' योग आहे!!) यांना कविता का सुचु शकतात याचं कारणही लक्षात येतं. तुम्हा दोघांना नुसता धन्यावाद नाही, तर आम्हा तथाकथित (स्वकथित म्हणा हवं तर) कविंच्या कविता पुढच्यावेळिही ऐकण्यासाठी हे सस्नेह आमंत्रण.

आणि कार्यक्रमाला न आलेल्या, आणि ही क्षणचित्रे वाचणा-या (जळुन खाक होणा-या) सर्वांनाही या काव्यमेजवानीचं सस्नेह आमंत्रण......आजच.

एक उल्लेख टाळताही येत नाही; आणि करताही येत नाही. ती व्यक्ती कार्यक्रमाला नव्हती, मग उल्लेख कसा करायचा. पण ती कार्यक्रमाची मूळ स्फ़ुर्तीस्त्रोत आहे, त्यामुळे उल्लेख टाळणेही अशक्य.

काही लोकांना "नाम गुम जायेगा" असे म्हणत 'नामानिराळे' राहायला छान जमते. नामकाका येणार म्हणून् बरेच लोक तिथे आले होते. नामकांकडून ते न आल्याबद्दल काय penalty घेणार ते मलाही सांगा रे.


मित्रांनो, जेव्हढं आठवलं तेव्हढं लिहीलं आहे. पावसाचे सारेच थेंब झेलता येत नाही; कि केशराचा दरवळ शब्दात सांगता येत नाही. जेव्हढं आठवलं तेव्हढं लिहील आहे. तुम्ही वेचलेल्या पावसाच्या सुगंधित थेंबांच शब्दांकन करुन या माझ्या तोडक्या-मोडक्या प्रयत्नाला संपन्न करा.

अजय ने काढलेल्या चित्रांकनाची लिंक खाली देतो आहे.

अजुन सुरेशकाका, सुपर्णा ई. च्या चित्रफ़िती यापुढेच जोडाव्यात.

ज्या कविता सादर केल्या गेल्या (आसावरीः तु म्हटलेली सुधीर मोघ्यांचीही), ईथे टाकाव्यात. ते काम ज्याचे त्यानेच करावे, म्हणजे त्या कविच्या ओळखीसकट कविता इथे येईल.

सांगणे न लगे, कि न म्हटलेल्या कविता ईथे टाकू नयेत.

ही आमची "साठा उत्तराची कहाणी, पाचा (खरेतर एकाच) उत्तरी" सफ़ळ आणि संपूर्ण मानावी.

निरोप घेतो.............पुन्हा पुढच्या भेटीपर्यंतच.........पुन्हा लवकरच भेटण्यासाठी व्याकुळ होऊन.

तुमचाच............सारंग भणगे.


http://www.orkut.co.in/Main#Album.aspx?uid=13466013627587130606&aid=1229289059

Friday, December 12, 2008

सुंदर या वाटेवरती, तरुवरांची दाटीवाटी

सुंदर या वाटेवरती,
तरुवरांची दाटीवाटी,
जन्मांतरीची नातीगोती,
जुळतील वधुवर गाठीभेटी।

श्वास उठे रानातून,
निःश्वास सुटे पानातून,
आभास ते कवडश्यातून,
सोनपाऊले गगनातून।

वेडी बाकडी साथवियोगी,
पानांशीच मग करती सलगी,
एकांताचे ताप भोगी,
वाट अवघी झाली जोगी.


Tuesday, December 9, 2008

भक्त एकादशी



जीवनरोग जरा व्याधी । अहं वासना त्यासी बाधी ॥
म्हणोन संजीवन समाधी। ज्ञानदेवे घेतली ॥१॥

तरी भक्तीचा सोहळा । अखंडित वाहे विमळा ॥
भेटती भक्तीच्या ओहोळा । ओहोळ अनेक ॥२॥

भक्तीसूर्य प्रकटला । व्योमी प्रकाश दाटला ॥
चिन्मय चिद्घन कोंदटला । दिठीच्या कठी ॥३॥

भक्तीरस लागे वाहू । आळंदिहूनि निघे पाहू ॥
ग्राम नामे देहू । प्रकटला तुका ॥४॥

तुक्या झाला भणंग । भक्तीत जाहला दंग ॥
विठ्ठल नाम तरंग । मनात उठती ॥५॥

संसार जाहला व्यर्थ । मोह तुटला स्वार्थ ॥
उरला केवळ परमार्थ । उपकारापुरता ॥६॥

अमृताचा यावा वीट । पांडुरंग ऐसा अवीट ॥
विठ्ठलाचे पायी वीट । तुका जाहला ॥७॥

तुटले सारे मोह पाश । देह झाला अवकाश ॥
मृत्यु येणे अवकाश । विधिलिखित सारे ॥८॥

अता विठ्ठला राहवेना । तुका दूर पाहवेना ॥
वियोग कसा साहवेना । कैवल्यधामी ॥९॥

वैकुंठदूत धाडिले । यमनियम मोडिले ॥
भक्त ह्रुदयी भिडले । अद्वैत प्राप्ती ॥१०॥

वैकुंठी पोचली काया । भक्त विठ्ठलाचे पाया ॥
ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झाला कळस ॥११॥
==================================
सारंग भणगे. ( 9 डिसेंबर 2008)

Sunday, December 7, 2008

खुळी

तू होतास माझ्या अंतरात सामावलेला,
मी तुला 'तू' म्हणावे, एवढाच दुरावा होता.

होती अजुनी माझ्या श्वासात जाग तुझी
तू होतास माझा याचा पुरावा होता.

मिठीत गाढ तुझ्या उब प्रेमाची होती,
सहवास अन् तुझा मस्त गारवा होता.

मी रुसले असे नित्य तू म्हणायचा,
मला छेड़ण्याचा तुझा कावा होता.

मी सावली तुझी; तू अस्तित्व माझे,
वेडी असे खुळी मी सा-यांचा दावा होता.
====================
सारंग भणगे. (७ डिसेंबर २००८)

Saturday, December 6, 2008

मुक्तपक्षी

उनाड हसतो खुल्या अभाळी
गंधित गातो सोनसकाळी
पानावरती दंवबिंदूंनी
नाचनाचतो प्रभातकाळी.

भिरभिरतो मी कळीपाकळी
शिरशिरतो अन् मऊ लव्हाळी
झरझर पाणी निर्झरगाणी
हुंदडतो अन् अरण्यजाळी.

पावसात मी ढगात राहतो
चिंब धरती दुरून पाहतो
हिवाळ्यातल्या थंडीमध्ये
धुक्यामधूनी मी वाहतो.

ऊन्हाळ्याची सोनझळाळी
ऊन सावली आळिपाळी
किरणांचे ते पोत भरजरी
संध्या येते रम्य सावळी.

ऋतूरंगाची सुरेख नक्षी
निसर्गवैभव माझ्या वक्षी
विहंगम अवघ्या सृष्ठीमध्ये
स्वच्छंद गातो मुक्तपक्षी.
=============================
सारंग भणगे. (ऑक्टोबर 2008)

रीक्त राहिले धुपाटणे

सोलवटलेल्या मनांस आता
कसली पुसता स्वप्ने काय?
आटलेल्या नदास पुसती
आहे तुजला तहान काय?

फ़ाटलेल्या झोळीमध्ये
उगा शोधती शीळे तुकडे,
अंबर कसले तुटले झुंबर
अन् शोधी तारका चोहीकडे.

स्वप्नांनाही भाव असता
भरले असते बाजार तयांचे,
अनंत जखमा देऊन करती
शिवण्यास्तव मोल सूयांचे.

पोळीवरती भूक मोफ़त
जगण्यावर अन् स्वप्ने,
सुख-दुःख गेले वाहून अन्,
रीक्त राहिले धुपाटणे.
=============================
सारंग भणगे. (6 डिसेंबर 2008)

Tuesday, December 2, 2008

वैधव्य

वैधव्य माळते भाळी
श्रृंगार मोकळ्या गळी
मी भोगूनही अभोगी
भोगतो भोग भोगी

वृक्षाविना लतिका
ग्रीष्मातील कलिका
फ़ुलणे शाप मला
सजणे पाप मला

पापी न काय भृंगखल
गुंजारतो जो उच्छृंखल
कुंतलात गुंतेल यास्तव
विरुप दिसावे त्यास्तव

वीराण व्याकुळ भूमी
पहाणे पाप व्योमी
निवडुंग कोरडे शाप
मृगजळही पाहणे पाप

मरणाचा चेक

मरणाचा तो इतिहास; अन् जगण्याचा अट्टाहास
जीवंत माझ्या मनात जगायची हलकट जिद्द्
पडलेल्या ईमल्यांना सावरण्यास अधिक खांदे तयार
मसणवाटेत घेऊन जाणा-या तिरडीला लावलेल्या खांद्यांहुनही
"राम बोलो भाई राम" चे गजर विरण्याआधीच
घडळ्याचे गजर सुरु,
अन् जीवनाचे न संपणारे 9.07 चे प्रवासही
डोळ्यातल्या अश्रुंच्या मुदत ठेवी
बिनव्याजी पुन्हा रिन्यू होतात
अन् हास्याची दिनवाणी कैश क्रेडिटस्
कायमच डिफ़ॉल्टमध्ये राहूनही
सदाच विचकट लाचार हसत राहतात
जगण्याची बैंक बुडत नाही तोवर सारी खाती चालु ठेवायची
आणि त्या यमदूतानं मरणाचा चेक वठवला
कि दिवाळखोरी जाहीर करत
हा पत्त्याचा डाव आवरायचा
मुंबईला असल्या मरणांचं वावड नाही
हवे असतील तर हवे तेव्हढे भुखंड
स्मशानभूमीसाठी मंजूर करुन आणू
शासनाकडून.......
==============================
सारंग भणगे. (2 डिसेंबर 2008)

Monday, December 1, 2008

आणि बुद्ध हसला!

हे साचले खच प्रेतांचे; प्रेषितांच्या भूमीत,
ना खचले, कच खाऊनी, इमले भस्मीभूत.

तो ताज पहा सरताज उभा होता दिमाखात,
जळुनही उभा आज हा पहा पाहतो खेदात.

रडलो, सडलो, धडधडलो; परी ना पडलो,
पोळुन, रक्तपंचमी खेळुन, मरणाशी लढलो.

उत्तान मान; ही शान; आण अम्हा देशाची,
हे पंचप्राण दिले दान; वाण मग कोण कशाची.

हे युद्ध जे क्रुद्ध; अनिरुद्ध ना थांबायाचे
शत्रुविरूद्ध त्या अशुद्ध; "अन् बुद्धाने हसायचे".
====================================
सारंग भणगे. (6 डिसेंबर 2008)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...