Tuesday, March 29, 2011

कधी कधी...गझल

मी मला शोधण्या धावतो कधी कधी,
पाहतो अंतरी घावतो कधी कधी,

चेहरे ओढतो चेह-यावरी जरी,
सांडतो आतला भाव तो कधी कधी.

वागतो मी असा साळसूद की जणू,
दात मी वेगळे दावतो कधी कधी.

आतला नाद मी दाबला किती जरी,
तो विवेकापरी चावतो कधी कधी.

ऐक रंग्या जगा सांगतो घरोघरी,
अंतरीचा हरी पावतो कधी कधी.
=================
सारंग भणगे. (२९ मार्च २०११)

Saturday, March 26, 2011

सचिनची बॅट - पाकचे पानिपत

मार जोरदार तू फटका,
पाकचा फटाका फुसका.
इथवर बसला मटका,
निघेल मटका फुटका.

प्रत्येक षटकामागे मार,
उंच उंच एक षटकार.
शतकांचे शतक कर तू पार,
शतकातील या चमत्कार.

खेळ असा धडाकेबाज की,
खेळण्याआधि भरेल धडकी.
धडे अकरा हिरवी पाकी,
फुटतील कडकी सारी मडकी.

बॅटचे तुझिया पाणी पाज,
डोळ्यात पाणी उतरेल माज.
पाणीदार तुझा निराळा बाज,
पानिपत पाकचे बंद आवाज.
==============
सारंग भणगे. (२६ मार्च २०११)

GOD OF CRICKET - स्तवन

जय देव जय देव जय सचिन राया I
आलो मी 'शाहीद' तुझिया रे पाया II

लढूनी जिंकूनी आम्ही पोचलो 'सेमी' I
जरी होती आमची चमू निकम्मी II
रामाशी लढताना रावणापरी कामी I
झुंजूनी झुंजूनी आम्ही होऊ निकामी II

हरवताना जरा करा गयावया I
आलो मी 'शाहीद' तुझिया रे पाया II१II

धोनी रैना युवी तुझीच रूपे I
योगक्षेम सा-यांचा तुझिया कृपे II
मिळूनी सारे तुम्ही खेळता ग्रुपे I
मरण यावे आम्हा क्रिकेट नृपे II

शरण आलो तुजला क्रिकेट ह्रुदया I
आलो मी 'शाहीद' तुझिया रे पाया II२II
==================
सारंग भणगे. (२६ मार्च २०११)

Monday, March 21, 2011

अभिसार वादळाशी

ही वाट वेदनेची चालून आज आलो,
ऐका गझल अशी जी चाळून आज आलो.

हातात मी निखारे घेऊन धावताना,
माझ्या नशीबरेषा जाळून आज आलो.

डोळ्यात दाटलेले आभाळमेघ होते,
गालांवरी सरींना गाळून आज आलो.

दु:खास सूर होते नासूर बोचणारे,
काळीजपुष्प माझे सोलून आज आलो.

राज्याभिषेक झाला आनंद तो क्षणाचा,
काटा-किरीट डोई घालून आज आलो

वाहून पार गेले 'जीवन' कसे कळे ना,
'काळा'कडे पुलाच्या खालून आज आलो.

हे भोग प्राक्तनाचे नर्कात भोगतो मी,
दु:खे जराजराशी टाळून आज आलो.

रंग्या म्हणे करावा अभिसार वादळाशी,
उध्वस्त शांततेला भाळून आज आलो.
====================
सारंग भणगे. (२१ मार्च २०११)

Sunday, March 20, 2011

माळून काजव्यांना...

माळून काजव्यांना आल्या सजून राती,
स्पर्शात चांदण्याच्या गेल्या भिजून राती.

चोरून धीट मोठा शिरतो गवाक्ष वाटे,
प्रेमी युगुल गाती, "याव्या अजून राती.

गज-यास मोग-याच्या चुरगाळले कितीदा,
गंधाळला बिछाना गेल्या कुजून राती.

पाण्यावरी तरंगे प्रतिबिंब तारकांचे,
चुंबावया जळाला आल्या धजून राती.

आल्हाद चांदण्याचा अल्लाद पांघरूनी,
थंडीत शारदाच्या गेल्या थिजून राती.

प्राजक्त रातराणी; गातात गंधगाणी,
'सारंग' ऐकताना गेल्या निजून राती.
===================
सारंग भणगे. (२० मार्च २०११)

Wednesday, March 16, 2011

घेतली नाही कधी माघार मी.२

साहले कित्येकदा ते वार मी,
घेतली नाही कधी माघार मी.

वीख आहे साचले सा-या जगी,
तृप्त आहे अमृताची धार मी.

पोसलेले दु:ख त्यांनी अंतरी,
सौख्यबीजे धारुनी गर्भार मी.

पैलतीरी जावयाला झुंजती,
पार गेलो या जगाच्या पार मी.

जिंकण्याची हाव आहे सारखी,
गैर का स्वीकारणे हो हार मी?

हास्य थोडे आसवांना वाटले,
रामकामी हात देतो खार मी.

सांगतो रंग्या तुम्हा जे मानले,
झुंजण्याला जीवनाचे सार मी.
===============
सारंग भणगे. (१६ मार्च २०११)

Tuesday, March 15, 2011

घेतली नाही कधी माघार मी.

पर्वताला रेटुनी बेजार मी,
घेतली नाही कधी माघार मी.

मारल्या त्यांनी किती टपला मला,
स्पर्श होता जाणले; अंगार मी.

कोण होतो कोण आहे ना कळे,
कोण असण्याच्याच गेलो पार मी.

आजचे हे सूर्य त्यांना सूट द्या,
काल त्यांना बोललो अंधार मी.

सत्य नाही मिथ्य नाही भास हे,
सावल्यांचा मांडला बाजार मी.

ओळखीचे आज जाती दूर का?
सोडला नाही तसा संसार मी.

सर्व मुंग्या वारुळाशी गुंतल्या,
या जगाशी गुंफला श्रृंगार मी.

ऐक रंग्या सांगुनी गेला कधी,
एवढे आभाळ त्या आधार मी.
==============
सारंग भणगे. (१५ मार्च २०११)

Sunday, March 13, 2011

म.क.

केव्हातरी शोधत आलो कवितेचे आंगण,
म.क. ने मग लावले माझ्या प्रतिभेला वंगण II

होते माझ्या मनात नुसते शब्दांचे कोळसे,
म.क. झाली ठिणगी धरते कविता बाळसे II

इथे भेटले गत जन्मीचे सगे-सोयरे किती,
म.क. जुळवी नाती-गोती जन्मांचे सोबती II

नुसते नाही दळत येथे कवितांचे पीठ हो,
म.क. म्हणजे काव्यप्रभुंचे व्यासपीठ हो II

काव्यनभातील सर्व पाखरे इथे किलबिलती,
म.क. वरल्या कविता वाचून गुंडही गलबलती II

इथे वाहती कवितारुपी नाईल-व्होल्गा-गंगा,
म.क. इतकी सर्वव्यापी कि वाटे आकाशगंगा II

जगन्मान्य ती अता होतसे बहुविध तीची रूपे,
म.क. झाली दिगंत त्रिलोकी कवितेच्या कृपे II
======================
सारंग भणगे. (१३ मार्च २०११)

प्रेरणा: रणजीत राजे यांचे 'म.क. पुराण' आणि रमेश महाराज यांचे 'म.क. उवाच'

Tuesday, March 8, 2011

"चाफा अबोल झाला"

(चाल पारंपारिक "शुभमंगल बोला" गाण्याची)

परसामध्ये पारिजात तो 'पल्लवीत' झाला,
फुले वेचती भाग्य'शलाका' मोहवीत त्याला,
१सुख-'दु:खा'च्या संसाराचा शुभारंभ झाला I
'आनंदा'च्या संसाराचा शुभारंभ झाला IIध्रुII

बोला शुभमंगल बोला (४)



ओंजळीतली फुले अर्पुनी शुभचिंतन केले,
हाती उरले सुवास २माझ्या शुभमंगल झाले...
हाती उरले सुवास आता शुभमंगल झाले,
आनंदाने दोघे मिळुनी सुखवेली डोला II१II

बोला शुभमंगल बोला (४)

सुखस्वप्नांचे उंच मनोरे बांधा हर्षभरे,
विसरूनी 'आम्हा' आनंदाने नांदा सौख्यभरे,
'हसता हसता' येतो भरूनी 'आप्तांचा' डोळा II२II

बोला शुभमंगल बोला (४)


हाती देते हात सखीचा घेऊनी माझे हाती,
पाणिग्रहणासमयी माझे कर दोघांचे हाती,
प्रीतीच्या स्वर्गाची दारे दोघे मिळुनी खोला II३II

बोला शुभमंगल बोला (४)


एक चंद्रमा किती तारका आळविती त्याला,
किती गोपीका तळमळणा-या एक मुरलीवाला,
मीरेशी का 'चाफा' धरतो अखंड अबोला II४II

बोला शुभमंगल बोला (४)
=====================
सारंग भणगे. (७ मार्च २०११)


टीपा:-

पल्लवी साहजिकच हे गीत गात असताना भांबावलेली आहे; भारावलेली आहे. त्यामुळे तीच्याकडून ज्याला आपण इंग्रजीमध्ये 'sleep of tongue' म्हणतो तसे एक दोन जागी होते. त्यामधुन तीची मानसिक स्थिती दाखवायचा प्रयत्न आहे. त्या जागा खालीलप्रमाणे:

१. इथे पल्लवी सुख-दु:खाच्या असे म्हणुन जाते. इथे दु:ख म्हणजे पल्लवीच्या मनातील दु:ख असे अभिप्रेत आहे. तसे तर संसार हा सुख-दु:खाचाच असतो; परंतु कुणाच्य लग्नात त्याच्या संसारात दु:ख देखिल असेल असे म्हणणे शिष्टाचाराला धरून नाही असे तीच्या लक्षात येते, म्हणुन ती ही ओळ दुस-यांदा म्हणते आणि 'आनंदा'चा (अर्थात आनंद हे पात्र ही यात अभिप्रेत धरून श्लेष आहे) संसार असे म्हणते.

२. हाती उरले सुवास माझ्या - असे ती पहिल्या कडव्यात म्हणुन जाते. फुलांची ओंजळ दोघांवर वाहिल्यानंतर पल्लवीकडे खरेतर गतस्मृतींचे सुवासच केवळ बाकि असतात आणि त्यामुळेच ती 'माझ्या' असे म्हणुन जाते. परंतु चूक लक्षात आल्यानंतर वास्तविक गीतात बसत नसतानाही ती ही ओळ परत दुरूस्त करून 'माझ्या' च्या जागी 'आता' असा शब्द योजुन म्हणते.

Thursday, March 3, 2011

पाऊस आणि तो

त्या पावसाचा थेंब तीच्या ओठांवर जेव्हा थांबला,
तीचा ओठ सोडाच..मी ही झालो चिंब ओला ओला.

गालांवर तीच्या जेव्हा तो रेंगाळला...
गोड्या पाण्याचा अर्थ तेव्हा कळला.

केसांना तीच्या भिजव भिजव भिजवलंस,
रात्रीच्या अंगावर काजव्यांना सजवलंस.

रंध्रा रंध्रावर तीच्या पाऊस होऊन नाचलास,
आईशप्पथ सांगतो; माणूस नाही म्हणून वाचलास.

तीला कितीदा भिजवुन तु धर्माला पाळलंस,
पण त्यामुळे मला कित्ती कित्ती जाळलंस.

एकदाच तु पडलास; आणि मला आवडलास,
एवढा पडूनही शेवटी... तीच्या छत्रीवर अडलास.

पण त्या दिवशी भरूनही कोरडाच तु धावलास,
अन पहिल्यांदाच काळजाच्या वैराण माळाला तु पावलास.
===========================

सारंग भणगे. (१८ फेब्रुवारी २०११)

कवितेच्या सविता

जीवंत होतील माझ्यामधली कवितांची प्रेते,
उजाड रानी फुलून येतील कवितांची शेते.

ग्रीष्मामध्ये भरून येईल कवितेचे आभाळ,
कवितेचा नि मळवट शोभे विधवेचे ही भाळ.

अंधाराला फोडील कविता तेजाचे खिंडार,
कुबेरासही देईल कविता रत्नांचे भंडार.

आत्म्यालाही स्फुरतील माझ्या वेदांच्या कविता,
ब्रह्मांडाला व्यापून उरतील कवितेच्या सविता.
======================
सारंग भणगे. (१ मार्च २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...