Monday, December 30, 2013

पाऊस

तुला 'जीवना'चे दिले दान आहे
तुझा जन्म हे जीवना दान आहे
मला कोरड्या रूदनाची समस्या
तुझे क्रंदणे हे समाधान आहे
 
नभी वीज ती गूज सांगे मनाचे
मनी अंकुरे बीज आलिंगनाचे
कुठे दूर ऐकावया येत आहे
मला मेघमल्हार तव स्पंदनाचे
 
घनावीण वीणा न वाजे मनाची
विणू वीण दोघे तनाशी तनाची
अरे कृष्णवर्णा तुला काय वर्णू
करूणाघना वंचना जीवनाची
 
झरा 'जीवना'चा उरी वाहु दे ना
नदी यौवनाने उतू जाउ दे ना
किती काळजाचे चरे मी सहावे
घडा अमृताचा रिता होउ दे ना
======================
सारंग भणगे. (२८ डिसेंबर २०१३)

Sunday, December 22, 2013

लिलाव

मैत्रीत भेटल्याचा जो हावभाव केला
घेता मिठीत त्यांनी पाठीत घाव केला

माझ्या घरात आले होऊन पाहुणे ते
मजलाच काढण्याचा त्यांनी ठराव केला

मी जिंकलो तरीही राहून शल्य गेले
माझेच दोस्त होते ज्यांनी उठाव केला

आमंत्रणे कशाला देता कलेवराला
'गेल्या'वरी प्रितीचा खोटा बनाव केला

मागावयास आले ते सर्व देत गेलो
सारे विकून आता माझाहि  भाव केला

माझ्या विरोधकांचा त्यांनी विरोध केला
राहीन एकटा हे जाणून डाव केला

कंगाल पार झालो देऊन मी उधाऱ्या
देणेकरीच माझे ज्यांनी लिलाव केला
--------------------------
सारंग भणगे. (22 डिसेंबर 2013)

Saturday, December 21, 2013

आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

माझे सवंगडी ते हा दूर भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

ह्या गोल जीवनाचा आहे परीघ मोठा
जो ‘आत’ शोध घेतो त्याचाच ‘व्यास’ झाला

होता सभोवताली सारा कुटुंब-कबिला
वाटे तरी ‘अखेरी’ अज्ञातवास झाला

श्रीमंत दालनांच्या दारी उभा भिकारी
ह्या इंडियात ऐसा नंगा-विकास झाला

प्यादे गरीब साधे छळतात त्यास सारे
झालो वजीर जेव्हा त्याचाहि त्रास झाला
========================
सारंग भणगे. (२१ डिसेंबर २०१३)

Tuesday, December 17, 2013

आता असेच व्हावे

सारेच कोसळावे आता असेच व्हावे
कोणास ना टळावे आता असेच व्हावे

माझ्या कलेवराला जाळून त्या झळांनी
थोडे तुम्ही जळावे आता असेच व्हावे

ह्या एकटेपणाची शिक्षा दिली जयांनी,
त्यांना हि ते छळावे आता असेच व्हावे

वैषम्य हेच की ते माझ्याच आतड्याचे
हे त्यांसही कळावे आता असेच व्हावे

ना मारले कि त्यांनी मज तारलेहि नाही
निष्क्रिय पाघळावे आता असेच व्हावे

(आहे पतंग वेडा माझ्याच मी दिव्यांचा
माझ्यात मी जळावे आता असेच व्हावे)
---------------------------------------------

सारंग भणगे (१६ डिसेंबर २०१३)

Saturday, December 7, 2013

Ketan Mehta's "Mirch Masala" - - some thoughts which overflowed my mind!


 I was always big fan of Hindi parallel movies. Would not claim that I have watched too many of them, but whatever few of them I may have watched, I always admired them from bottom of my heart.

I love watching mainstream movies also and I strongly believe that mainstream or so to say typical box movies also do exhibit a lot of art performances, but nonetheless parallel movies were always very close to my heart.

I am so glad that now there does not exist anything called parallel movie. In other words, parallel movies also became mainstream movies, or parallel movie makers perhaps learnt the 'art' of making a real 'art' movie which can be admired by any class or which also can be box office hit, or may be taste of people really became classy or matured enough to watch parallel sort of movies these days. Recent one, Lunch Box is the best example of this (though I did not find it too appealing to me)

Mainstream movies used to be like our playback singers; whereas parallel movies were like classical singers who would perform in concerts like 'Sawai Gandharwa'.

Anyway, I have no knowledge of either of these arts, but as an ordinary viewer and admirer of those movies, I felt like sharing my thoughts with all.

All these thoughts started flowing in mind after I watched Ketan Mehta's 'Mirch Masala' last night after a long time.

I remembered seeing this movie quite some time back on some TV channel or perhaps on Doordarshan (solo channel of our childhood days - thanks DD).

This movie, 'Mirch Masala' is an excellent creation by Ketan Mehta and his crew. Actors included most dynamic and versatile acting stalwarts like Smita Patil, Nasruddin Shah, Om Puri as centre cast and supported by long list of supporting actors including Deepti Naval, Suresh Oberoi, Raj Babbar (almost a guest appearance), Mohan Gokhale (he died at very young age, but during our childhood days he was one of the well known actors in Marathi cinema and television. I still remember his Marathi TV serial 'Shwetambara'), Supriya Pathak, Ratna Pathak, Dina Pathak, and most surprisingly in almost a side role none other than Paresh Rawal (when I watched this movie many years back, perhaps I did not recognize Paresh Rawal. He was not so known then. Its fun to watch such lead actors of today's time in such inconsequential support roles in some of those old movies. This shows how much struggle they must have made to reach this stage, and then I feel very pity about this great 'art industry' which gives so many movies to children of ex-stars like Sonakshi Sinha, Akshay Khanna, Fardeen Khan....list is really too long)

I do not think that anyone needs to say anything in praise of performances of these actors. But the one who outclassed everyone was Om Puri. Almost 28 years back, he played a role of 70-80 year old man, who braves to fight against tyranny of Nasruddin Shah (a police officer during British rule) and ultimately sacrifices his life. Om Puri was brilliant in depicting this character of brave old security guard of ‘Mirch Karakhana’, but what admired even more is his make-up. His make-up man and movie Director’s keenness in ensuring that at that young age (Om Puri technically never looked young :)) Om Puri should still appear old of 70-80s. One natural advantage obviously was Om Puri’s face, which has natural wrinkles on to it, but none the less, make-up man has really did an extremely wonderful job in Om Puri’s make-up. Even Om Puri’s hair, beard and hair colour has come out so perfect to suit his muslim old man’s character!

Suresh Oberoi (what a base voice he has got, at times I love to hear him more than Amitabh Bachhan or Om PurI0 was another surprise. He was good actor and he has done some nice roles too in mainstream movies. But watching him in the role of ‘Mukhi’ was really a wonderful experience. He did very balanced performance. His character is of a typical orthodox male chauvinist head of the village, who takes pride in ‘keeping a mistress’; not caring about his own wife or family, he is submissive to Nasruddin Shah (the Police Officer); but does not lick his shoes (avoiding to say what they say in English for this Marathi proverb) and not at all kind hearted; but not as ruthless as Nasir is shown. He was very well suited to his role and looked fabulous in that typical Gujarathi (or Kathewadi) costume.

Nasir has done very well again, doubtlessly. But I felt that he was not suited for the role. He neither had physique of a cruel; ruthless; tyrannical Police Officer nor a villain-ish face. I think Ketan Mehta has always tried to show Nasir in those days’ Police Officer’s costume to cover Nasir’s physical limitations and have got typical Indian ‘mardani’ moustache to cover Nasir’s calm & caring face. Perhaps despite umpteen effort, they could not overcome Nasir’s these natural limitations.

Overall, movie was indeed great experience. It left with storm of questions in my mind, such questions answering them would not only be extremely tough, but daring to think of those answers itself makes one very uneasy. We are talking of rapes and sexual exploitations today, perhaps more due to media publicity (and I am not saying that this is wrong), but so many such incidences of persecution on women must have happened on the past.

Movie goes on to show so many things. It’s not merely about Nasir’s oppression on women, he is equally cruel to men. One scene of the movie really shakes you from bottom. After Smita Patil slaps Nasir for his attempt of sexual advancement towards her, Smita Patil runs away and takes shelter in ‘Mirch Karakhana’, Nasir is adamant that he must get Smita Patil for his sexual pleasure, who is safe behind close doors of ‘Mirch Karakhana’ guarded by Om Puri bravely and firmly, not allowing anyone to dare entering inside. Nasir gives ultimatum to villagers to handover Smita Patil to him; else threatens them to burn down the village to ashes. Sheepish Villagers, humbled and humiliated, go to Nasir and request him that they will hand her over if Nasi promises that he will never after make such demands. Within no time, Nasir ridicules such request and demands the name of the person who made such request.

If you love this kind of genuine art exhibition, please do watch this movie, if had not seen it before!


http://www.youtube.com/watch?v=1G183S7w34g

Wednesday, December 4, 2013

सोसले तू भोगले मी

 

सोसले तू भोगले मी
पेटला तू पोळले मी II

भाकरीसाठी उपाशी
राबला तू रापला,
भाकरीला भाजताना
हात माझे
..............भाजले मी II१II

पोट झाडाचे भराया
तू स्वत:ला गाडले,
खोड-फांद्यांच्या उरीचे
घाव निर्दय
................झेलले मी II२II

पावले थकली तरीही
तू पुढे चालायचा,
ज्या ठिकाणी थांबला तू
त्यापुढे रे
...................चालले मी II३II

पाहिले आभाळ तेव्हा
तू दिले झोके सुखे,
तू मला, अन त्या नभाला,
सावरूनी
............घेतले मी II४II

देत गेला तू मलाही
घेतले नाही कधी,
तू दिलेल्या आसवांना
पाजले तू
..............प्यायले मी II५II
===================
सारंग भणगे (२६ नोव्हेंबर २०१३)

Wednesday, November 13, 2013

एकटी मी

काळजाचे काठ मोडू पाहते
दुःख ओसंडून गाली सांडते
 
ह्या जगाने बंध सारे तोडले
एकटी मी सावलीशी भांडते
 
वेदनांच्या पाहुण्यांचा राबता
आसवांच्या सोबतीने राहते
 
मज पुरावे वेदनांचे मागती
मी कुठे काही कुणाला मागते?
 
कोरडे आभाळ आहे फाटले
पापण्यांशी स्वप्न धागे जोडते
 
प्रेयसी की भोगदासी ना कळे
नागव्या दुःखासवे मी झोपते
 
लाभले ना सौख्य देवाजी मला
तेच दिधले तू मला जे झेपते
 
आप्त अस्तित्वासही नाकारती
जीवनाचे मीच थडगे बांधते
 
गाव माझ्या भावनांचा जाळला
वेस आयुष्या तुझी ओलांडते
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)

Sunday, October 27, 2013

दुःख


ऐकण्या पुरतेच त्याला चाहते,
दुःख माझे मूक होऊ पाहते.

काळजामध्ये कट्यारी खोवल्या,
भावना रक्तात माझी नाहते.

गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.

दु:ख आहे पोरके माझ्यापरी,
प्राण माझा होऊनी ते राहते.

द्रौपदीचा वारसा माझ्याकडे,
पंचप्राणांच्या चुकांना साहते.
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)
 

Wednesday, October 2, 2013

प्रिया बावरी



तुझ्या रूपाने संमोहित हि झाली अवघी धरणी
नयनअंगणी मधुबन फुलले तुला पाहुनी सजणी
...
किती साजिरा तुझा गोजिरा मला चेहरा वाटे,
मयूरपिसारा जणू पाहुनी नभ मेघांनी दाटे,
सारंगांना भीती नसे कि फुलाभोवती काटे.

रती-अप्सरा भरतील पाणी प्रिया तुझिया चरणी,
नयनअंगणी मधुबन फुलले तुला पाहुनी सजणी II१II


गोड गोजिरी लाज लाजरी तुळसमंजिरीसम ही,
निरांजन मी म्हणू तुला कि देव्हाऱ्यातील समई,
भूपाळीची हाळी जैशी येते प्रभात समयी.

जरी झुरावे कुणी कितीही प्रिया उमेशराणी,
नयनअंगणी मधुबन फुलले तुला पाहुनी सजणी II२II
---------------------------------------------------
सारंग भणगे (१ ऑक्टोबर २०१३)



Tuesday, July 23, 2013

ती येते आहे



गंध फुलांचे रंग ऋतूंचे घेऊन गेली होती,
वाटेवरती काटे गोटे ठेऊन गेली होती,
अत्तर शिंपत वाऱ्यावरती तरळत येते आहे
मधाळ ओठांमधून गाणे निथळत येते आहे….

ती येते आहे, ती येते आहे……

वादळवारा घोंघावू दे,
सागरलाटा रोरावू  दे,
प्राणांची मी करून होडी धावून येईन सजणी,
पंख जीवाचे लावून सखये झेपावीन मी गगनी,

प्राणपाखरू प्राणप्रियेला शोधत येते आहे,
ती येते आहे, ती येते आहे……

डोळे माझे शिणले आता,
स्वप्नांनाही चिणले आता,
क्षितिजावरती लुकलुकणारा तारा बनून ये ना!
चकोरास या तहानलेल्या अमृतदर्शन दे ना!

हातामध्ये चांदण-मोती उधळत येते आहे,
ती येते आहे, ती येते आहे……

रंग उषेचे गालांवरती घेऊन येते आहे;
यौवन-मदिरा गात्रांमधुनी सांडत येते आहे;
तिच्या सयीने वसंतवैभव नाचत येते आहे;
जमिनीवरती जणू तारका चालत येते आहे.

 
ती येते आहे, ती येते आहे……
-----------------------------------------------
सारंग भणगे (23 July 2013)

Tuesday, June 25, 2013

आकाशस्थ

संथ वाहत्या पाण्यावरती
शशि शलाका नर्तन करती
चंदेरी पाण्याची ओंजळ
तळ्यात धरते सुंदर धरती

अवघ्राण झुकूनी घेतो चंद्र
सलील हसते लहरीतुनी मंद्र
तनु शहारे रात्रीचे अन्
रोमांचित होते रंध्र नि रंध्र

असा अवतरे आकाशस्थ
चाळविण्या अवनीचे चित्त
श्रृंगाराला किनार सात्त्विक
काठावरले गिरि ध्यानस्थ
================
सारंग भणगे. (२४ जून २०१३)

 

Friday, June 21, 2013

झाली संध्याकाळ


जीवन धागे विणता विणता झाली संध्याकाळ
उसवीत गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ.
 
फुलाफुलांनी सजली असते आयुष्याची बाग,
परी अखेरी जाळून जाते देह चितेची आग.
मनी कुणाच्या पेटून उठतो आठवणींचा जाळ!!
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
 
कुणी लावते आठवणींचे दीपक संध्याकाळी,
कुणी विराणी उदासवाणी गाते संध्याकाळी.
घनदुःखाने भरून येते डोळ्यांचे आभाळ
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
 
संध्याछाया भिववत असता कशी सोडली साथ,
हात द्यायच्या वेळी सुटला कसा नेमका हात!
हृदयामध्ये घुसत राहतो एकांताचा फाळ
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
========================
सारंग भणगे. (२० जून २०१३)

Sunday, June 16, 2013

केतकीचे अंग माझे गंधवेडा नाग तू

केतकीचे अंग माझे गंधवेडा नाग तू
मार्ग तो मी ज्यास नाही थांग त्याचा माग तू
 
जेवढा तू राधिकेचा गोपिकांचा तेवढा,
मी फुलांचा ताटवा अन ताटव्यांची बाग तू

गुंतलेले केस माझे सोड रे तू मोकळे,
छेड तारा कुंतलांच्या आळवूनी राग तू

पाहते मी स्वप्न ज्याचे मी तयाची चंद्रिका
एकमेका पाहण्याला झोपते मी जाग तू.

घे सुखाचा घास तू अन मी उपाशी दु:खिता
ताट माझे जेवताना पाहिजे तर माग तू.
==========================
सारंग भणगे. (२ मार्च २०१३)

बेधडक


मी दिली आमंत्रणे
वेदनांनो भेट घ्या,
घाव घालू नका पाठी
जीव माझा थेट घ्या.

हारलो मी संकटांना
जिंकण्याची जिद्द आहे,
हारणे मी हीच त्यांच्या
... जिंकण्याची हद्द आहे.

घालती आघात माझ्या-
वरी वैरी दैव माझे
झुंज देणे हीच भक्ती
सांगती मज देव माझे.

धाड दूतांना यमा मी
बांधले आहे कफन,
कोण होते ते बघूया
या धरेखाली दफन
==============
सारंग भणगे. (२०१३)

Tuesday, May 28, 2013

शाश्वत!


फाटलेलं आख्खं आभाळ शिवायला;
कवितेची सुई नि शब्दांचा दोरा...... पुरायचा नाही!
अन धरतीचे अश्रू जर कागदाने पुसले;
तर कवितेसाठी कागदही उरायचा नाही!
 
आताशा कविता म्हणजेही....
कागदाच्या होड्या आणि कागदाची फुलं!
नुसत चित्रातच दिसतंय
कोवळं गवत नि आकाश खुलं.

चकचकीत काचांची चमचमणारी घरं;
सारं जगच झालं आहे शोभिवंत,
पण त्या घरांमध्ये राहायला
खरंच आहे का कुणी जिवंत!

काळोख आता लोपून गेला;
रात्रीसुद्धा दिव्यांची रोषणाई,
टीव्हीच्या गदारोळात आता
कुणी गातच नाही अंगाई.

विषण्णपणे मी आभाळाकडे बघतो....
एक तारा निखळतो;
अजूनही ‘तो’ मात्र शाश्वत आहे!
मेणाचा माणूस अखेरीस वितळतो.
=======================
सारंग भणगे. (२८ मे २०१३)
 

Saturday, April 13, 2013

कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!

काळजाच्या कळीवर भावनांचं दंव दाटलंय का!
मनाचं वस्त्र आर्ततेन कधी फाटलंय का!
प्रेमाबिमाच दुकान मनात कधी थाटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
कधीतरी कुठेतरी मनात काही सललं असेल,
कधीतरी कुणीतरी मनात थोडं फुललं असेल,
काट्यांच्या जीवनावर गुलाबाचं फुल नटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
कधीतरी कोमेजून तुम्ही देखील रुसला असाल,
कधी चूक उमजून तुम्ही मनातच हसला असाल,
झुरण्यातही आनंद असतो, हे तुम्हाला पटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
वैतागून मनात साचलेलं कधी तुम्ही ओकलं असेल
उफाळून येणारं बरंच काही कधी तुम्ही रोखलं असेल
मनात तुमच्या भावनांचं तुफान कधी सुटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
आयुष्यात असलं बरच काही घडून गेलं असेल,
मनाच्या भिंतीवरच रंगाचं लिंपण उडून गेलं असेल,
मनाच्या क्षितिजावर कधी तांबडं फुटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
================================
सारंग भणगे. (जानेवारी २०१३)

Wednesday, April 10, 2013

मी जिंकायचा कधी प्रयत्नच केला नव्हता; त्यामुळे मी कधी हरलोच नाही!
 
जिंकण हारणं हा आहे फक्त एक पाठशिवणीचा खेळ;
जिंकल्याशिवाय हारू शकत नाही; नि हरल्याशिवाय जिंकू शकत नाही!
 
जिंकणारा हारणाऱ्याला एकच सांगून जातो, 'जिंकायचं असेल, तर…… हारायची तयारी ठेव;
आणि हरायचं नसेल तर ……… जिंकायची तयारी सुरु कर'!
 
खर तर जिंकलेला कधी जिंकलेला नसतोच,
फक्त हारलेला हरला असतो, म्हणून तो जिंकतो!
 
कुणी काय जिंकलं आणि कोण किती हारलं, याचे फालतू हिशेब ठेवणारा खेळायचा आनंद घ्यायचा विसरतो, आणि मग हारायाच्या भीतीनं खेळायलाही घाबरू लागतो!
 
जो जिंकण्या - हारण्याची तमा न बाळगता खेळतो, तो खेळतच राहतो, आणि अखेरीस जिंकतच रहतो. कारण जो खेळायचा राहतो, तो जिंकायचा काय; पण हारायचाही राहतो!
 
खर तर हारणं किती मस्त आहे!
न हारणाऱ्याला जिंकायचा आनंद कसा मिळेल!
 
जर जिंकण नित्याचाच झालं तर त्यातली मजाच निघून जाईल, आनंद हरवेल, आणि जर आनंदच हरवला तर जिंकले तरी काय असा प्रश्नच आहे!
 
ज्याला हारण माहित आहे तोच जिंकतो,
कारण जिंकलेला कधीतरी हरलेलाच असतो!
 
--
सारंग भणगे (2000)

Saturday, April 6, 2013

कृष्णाचा रवि उदयाला

तम भरल्या कातरवेळी
हे सांज व्योमहि व्याकूळ,
आरक्त दिशेला फुटले
घन-अंधाराचे ढेकूळ.
 
 
नभगर्भी काळोखाच्या
उन्मत्त मातल्या छाया,
क्षितिजाच्या डोळ्यामधुनी
पाझरते काजळमाया.
 
 
अव्यक्त असा अंधार
व्यापून उरे विश्वाला
भयक्लांत भूवर यावा
त्राता कुणी जन्माला
 
 
प्रगाढ मिठी अंधारी
संध्यामग्न दिशेला,
काळोख असतो नश्वर
शरणागत अटळ उषेला
 
 
हे भीषण तम दैत्यांनो
विस्फोट उषेचा झाला
अंतिम प्रहरी येतो
कृष्णाचा रवि उदयाला
================
सारंग भणगे
(मार्च २०१३)

Saturday, March 30, 2013

----------- कल्लोळ -----------


कल्लोळ माजला, काळजात खोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल
हिरवं शिवार....करपून गेलं
आता तरी द्येवा... भकताशी बोल

भुकेल्या पिल्लाची चोच....ऱ्हांईली उपाशी
घरट्यात न्हाई दाना.....भटके आकाशी
पक्षीनीला फांदीवर... सावरे ना तोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

पसरलं न्हाई हात...घसरे ना पाय
फाटलेल्या दुधावर...येत न्हाई साय
मुंडासं केलं मोकळं...आतड्याला पीळ
आता तरी द्येवा... भकताशी बोल

खाली मुंडी हाये कशी .... जात मेंढराची
उंडारत ऱ्हाई... युती केली लांडग्यांशी
दिवस थांबंना... झाली संध्याकाल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

गहाण ठेवला सूर्य.... अंधारल्या रानी
ठीगळाला भोक पाडे, अशी जिंदगानी
कोरड्या घशाला .....आसवांची ओल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

वाटं कडं लावी डोळा... माय ही आंधळी
लांब रुंद होत जाते...कर्जाची सावली
रगात आणि घाम.... सारे माती मोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल


मरणाच्या दारी जावं... ववाळून जीव
आधाशा सारखा वाटं...पाहतोय गाव
नशिबाच्या फे-या पुढं... नाती गोती फोल
आता तरी द्येवा... बोलाव जवळ

------------------------------------------------------
शब्दशः शब्दशहा !
 
=================================================
 
मंदार,

तु पेटलास; ही कविता लिहीताना तु पेटलास. तुझ्यातलं काव्यस्फुल्लिंग जागं झालं. कविता एकदम नव्या ज्वाळेसारखि फुलुन आली. अचानक केवळ पेटलेल्या नजरेच्या कटाक्षातुन एखाद्या पलित्याने पेट घ्यावे असं ज्वलंत काव्य तुझ्या ह्रुदयातुन आज बाहेर आलं.

एक अशी लाट आवेगात किना-याकडे झेपावली कि तीच्या वेगावर नि आवेगावर भावनांचा कल्लोळ माजला.

होय कल्लोळ माजला कल्लोळ.

कल्लोळ याच शब्दाची मी वाट पहात होतो. एवढा हलवुन सोडणारा आणि ज्याला पर्यायी शब्द हा कल्लोळच असू शकतो असा शब्द या प्रसंगकाव्यात का नसावा. तु तो आणलास.

हा प्रसंग एक कल्लोळच आहे. भावनांचा, वेदनांचा आणि अस्वस्थतेचा. आणि तो काळजात खोल माजला आहे. अहाहा. काय लिहु, काही लिहीण्याची गरज आहे!

कविची मानसिकता प्रसंगात दिलेल्या घटनांच्या पलिकडे जाते. कवि आता अस्वस्थ आहे. तो गेनबाच्या भुमिकेत शिरला आहे. पटकथालेखकानं, दिग्दर्शकानं दिलेल्या निसर्गवर्णनाच्या सूचना तो विसरला. इतरांना सुंदर दिसणारं शिवार गेनबाच्या नजरेत करपून गेलंय. ज्याचं जीवनच करपून गेलंय त्याला भवतालच्या हिरव्यागच्च निसर्गाचं कसलं कौतुक.

घर जळतंय आणि कोजागिरीचं चांदणं भावेल का? मग अंतर्बाह्य तडफडणा-या उद्विग्नतेच्या ज्वालात जळणा-या आपल्या बिचा-या गेनबाला त्या निसर्गाचं काय कौतुक. त्याच्या दृष्टीत तो केव्हाच करपून गेलाय. पुढचे ठाऊक नाही, पण इथे तु गेनबा जगलास.

पक्षीनीला फांदीवर... सावरे ना तोल

- पहिल्या दोन ओळीतही एक कारूण्य आहेच आणि मला ते आधिच्या अनेक कवितांहुन अधिक भावलं. कारण सांगणं कठिण जात आहे, पण भावलं एवढं खरं.

पण त्याहुनही ही तीसरी ओळ फारच आवडली. धनाजीच्या आईने सोडुन जाण्यावर काही अतिशय करूण आणि हेलावुन सोडलेल्या काही काव्यपङ्क्ती लिहील्या गेल्या. परंतु तुझी ही ओळ खुपच वेगळी आहे. त्यात एक प्रकारचा संयतपणा आहे. पक्षिणीची उपमा आणि तीला न सावरलेला तोल लिहीताना तु कवितेचा तोल ढळु दिला नाहीस, हे फारच महत्वाचे. सुभानल्लाह!!!
 
पसरलं न्हाई हात...घसरे ना पाय
फाटलेल्या दुधावर...येत न्हाई साय
मुंडासं केलं मोकळं...आतड्याला पीळ

- मंदार, एक अत्युच्च कडवं लिहीलं आहे. अप्रतिम. हात न पसरण्यात गेनबाचा स्वाभिमान दिसतो; पाय न घसरण्यात त्याचा प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा दिसतो, तसेच याही परिस्थितीत ढळु न दिलेला तोल दिसतो आणि यातुनच त्याचे हिरोपणाचे characater उभारून येते. तु गेनबाला खरा हिरो केलास.

फाटलेल्या दुधावर येत नाही साय - हे खुपच सुंदर उपमा आहे. ती वरील किंवा पुढील ओळीशी कसा संबंध बांधते ते निश्चित कळत नाही. कदाचित असे म्हणायचे असावे कि असं चारित्र्य सांभाळुनही जर परिस्थितीच फाटकी असेल तर त्यावर सुखाची-आनंदाची साय येणार कशी. ही ओळ या अर्थाने फारच अप्रतिम आहे, परंतु ती थोडी इतर ओळींशी सांगड बांधणारी वाटत नाही. पण एवढी सुंदर ओळ लिहील्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

मुंडाशाच्या ओळीतही नक्कि काय म्हणायचे आहे ते स्पष्ट नाही. पण मला त्यातील एक अर्थ लागतो तो असा कि मुंडाशाचा पीळ तर काढला पण आतड्या पडलेला भुकेचा, गरिबीचा, बायकोनं सोडुन गेल्याचा, तलाठ्याच्या तगाद्याचा, आईच्या आंधळेपणाचा, अर्थार्जनाचा पीळ कसा सोडवावा? असाच जर अर्थ इथे अभिप्रेत असेल तर सलाम.

हे कडवं अप्रतिम आहे. मला ह्रुदयनाथ मंगेशकरांची फी परवडणार नाही. पण हे कडवं त्यांच्याचकदे सुपुर्द करावे लागणार.

उंडारत -हाई ... युती लांडग्याशी - मेंढरांची लांडग्याशी युती कशी हे समजत नाही. इथे मेंढरं हे कशाचे रूपक म्हणुन अपेक्षित असावे ते स्पष्ट नाही. ते स्वतःचेच रूपक असे असेल तर ते फारसे योग्य वाटत नाही. इथला लांडगा हा तलाठी असू शकतो. परंतु त्याची कुणाशी युती आणि ती का हे फारसे कळत नाही. ओढुन ताणुन काही अर्थ काढता येतील, पण इतक्या चांगल्या कवितेत मी ते का काढु? त्यापेक्षा मला न पटलेले एखादे असे कडवे मी कवितेतुन काढेन. राग नसावा; लोभ वाढवावा!!
 
गहाण ठेवला सूर्य.... अंधारल्या रानी
ठीगळाला भोक पाडे, अशी जिंदगानी
कोरड्या घशाला .....आसवांची ओल

- तीस-या कडव्याची ताकद या कडव्यातही उतरली आहे, आणि म्हणुनच मध्येच लुडबुडणारे चौथे कडवे मी काढुन टाकावे असे म्हणतो, न समजलेला काही उच्च असा अर्थ नसेल तर.

सुर्याचे गहाण ठेवणे खुपच बंडखोर वाटते. एकदम अंगावर येते. 'कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली' किंवा 'हा सुर्यही जरासा लाचार पाहिला मी' अशा दर्जाची कल्पना वाटते. पण तो सूर्य कुणी गहाण ठेवला, का गहाण ठेवला, सूर्य हे कशाचे प्रतिक म्हणुन इथे गुंफलेले आहे ई. प्रश्न अनुत्तरीतच राहतात. पण मला त्याची फिकिर नाही. त्या बंडखोरपणातच एक वेगळी मजा आहे, एक विलक्षण अस्वस्थता किंवा उध्वस्तता यांचे ते निदर्शक आहे. जो सूर्य स्वयंपुर्ण आहे, प्रकाशाचे स्वयंभू उगमस्थान आहे तो कुठेतरी गहाण ठेवणे; त्यातही अंधारल्या रानी गहाण ठेवणे केवढे तरी दारूण वाटते. सृष्टीच्या नियमांचा कुठेतरी पराभव होताना दिसतो आणि त्यामुळेच ते काळजात घुसते.

ठिगळाला भोक पडणे हे किती विचित्र दारूण परिस्थितीचे द्योतक आहे. उसवलेल्या आयुष्याला इतकि ठिगळं जोडली आहेत कि आता आयुष्य हेच एक ठिगळ झालं आहे आणि आता तर ते ठिगळही उसवलं तर झाकायचं कसं. हा एक ज्वलंत सवाल आहे. आयुष्याची जीर्णावस्था वर्णन करण्यासाठी याहुन कुठलं उत्तम उदाहरण मिळावं. अफाट कल्पना आहे.

आणि पुढची ओळ तितक्याच ताकदीची. एका पाठोपाठ एक ओळी आदळतात. नुसते घणाघात होतात. घशाला पडलेली कोरड अश्रुंनी मिटवावी अशी विकलांगता आयुष्यात आली असावी! फार सुंदर ओळ लिहुन गेलास मित्रा.
 
लांब रुंद होत जाते...कर्जाची सावली
रगात आणि घाम.... सारे माती मोल

- कर्जाची सावली असते का? परंतु इथे ती पटते. कारण ती कर्जाची सावली ही दुपारच्या रणरणत्या उन्हात आडोसा देणारी, सुख देणारी शीतल सावली नाही; तर गडद अंधा-या रात्री मिणमिणत्या दिव्यात लांब-रूंद होत जाणारी भयावह सावली आहे. सावलीचा असा अर्थ इथे घेतला तर लांब-रुंद होत जाणारी ही सावली थरकाप करते कि नाही. अप्रतिम उपमा.

घाम तर या जगात मातीमोल आहेच. घाम गाळणारा रक्त ओकतो आहे अशी भयंकर परिस्थिती जगभरच आहे. पण त्याचं रक्तदेखिल कसं रे मातीमोल ठरतं? स्वर्गाच्या द्वारात प्रवेश देण्यापुर्वी प्रश्न विचारणा-या चित्रगुप्ताला हा खडा सवाल आहे. अरे कारूण्याचे आणि मायेचे गोडवे गाणा-यांनो जीथे रक्त ओकूनही ते केवळ मातीमोल होणार असेल तर 'हे जीवन सुंदर आहे' नि 'या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे' असे लिहीणा-या कविला 'जिस कवी कि कल्पना में जिंदगी हो प्रेमगीत; उस कवी आज तो तुम नकार दो' असे खडे बोल सुनवावे लागतील. अतिशय ताकदीने ही शेवटची ओळ या परिस्थितीतील गांभिर्य अत्यंत सूक्ष्मपणे आणि तितक्याच व्यापकपणे मांडते.
 
मरणाच्या दारी जावं... ववाळून जीव
आधाशा सारखा वाटं...पाहतोय गाव
नशिबाच्या फे-या पुढं... नाती गोती फोल
आता तरी द्येवा... बोलाव जवळ

- कविता समेवर येते. खुप काही सांगुन गेलेली, ढसढसा रडवुन गेलेली आणि काळजात भावनांचा कल्लोळ निर्माण करून गेलेली कविता अंतास येते. मन विषण्ण आहे, विमनस्क आहे, परिस्थिती विदारक आहे.

अशा विदारक परिस्थितीनं ग्रासून काळवंडून गेलेला हा एक सामान्य कृमीसदृश जीवाणू किती तग धरेल. ताणण्याची क्षमता संपुनही अजुन कुठल्यातरी अनामिक चिवट जिद्दीनं अदृश्य अशा धाग्यावर आयुष्याचा तोल सांभाळत चाललेला हा गेनबा आता मृत्युच्या कवेत जाण्यासाठी अधीर झाला तर त्याला काय हतबल म्हणणार? गुझारीश चित्रपटात संपुर्ण एक तप मृत्युवत आयुष्याशी चिवट झुंज देत जगण्याचा संदेश देणारा इथन शेवटी euthanasia ची गुजारीश करतो आणि ती न्याय्य मागणी आहे हे सांगायला माणसाचच मन पाहिजे असही नाही, तीच परिस्थिती गेनबाची आली आहे. आणि मग तो वेडा मरणाच्या दारी जीव ओवाळुन टाकायला अधीर होत आहे. तसे तर जीव ओवाळुन टाकण्यामध्ये एक त्यागाचा अंश आहे, आवेश आहे. पण गेनबाच्या सद्य परिस्थितीत जीव ओवाळुन टाकणं हे एका आवेशाचंच लक्षण वाटावं इतक्या समर्थपणे त्याच्या परिस्थितीचं चित्रण केल आहे.

गावाचं अधाशासारखं वाट पहाणं त्याच्या मृत्युसमोर जीव ओवाळुन टाकण्याचं समर्थन आहे. तो गाव त्याला खायला उठला आहे हे ही यातुन सुचित होतं.

गाव खायला उठला आहे आणि हा मृत्युचा घास व्हायला उठला आहे. काय भयंकर वैषम्य आहे; आयुष्याची विसंगती आहे....

आणि मग डोळे मिटलेल्या गेनबाच्या भोवती सारं आकाश फिरतंय, सारी जमीन फिरती आहे, नभोमंडल फिरत आहे, तारांगण फिरतं आहे, विश्व फिरतं आहे आणि तो स्वर्गाच्या दारात आता अतिथि म्हणुन उभा आहे; हक्कानं देवा आता मला जवळ बोलव असं म्हणत त्या निर्दय ईश्वरत्वातील मायाळुपणाच्या प्रतिक्षेत............

मंदार - HATS OFF

कैफियत !!


वेदनेच्या मी छेडून तारा ,आळविल्या यातना जेव्हा...
दाद देऊन दर्दी म्हणाले ..".व्वा! काय सुरेल गीत आहे!"

वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''

हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!

बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!

निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!

बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!

कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!


गौरी सावंत
================================================
 
वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''

- मुजरा........त्रिवार मुजरा. खच्याक् शेर आहे.

हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!

- अफ़ाट. अफ़ाट. जबरदस्त संदेश आहे हा. माणसाने आपल्या कपाळावर कोरून ठेवावा ईतका जब्बरदस्त.

बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!

- Madam, आज कहर मांडलाय आपण. अरे काय पोच आहे. काय जबरद्स्त एकावर एक घाव नुसते.

निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!

- अरे थांबा थांबा कुठेतरी. हा काव्यसुरा नुसता फ़िरतोय, गर्दनीवर गर्दनी कलम, काळजाचा भुगा पाडतोय.

बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!
- ठिक आहे, छान आहे.

कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!

- अरे तोडलात अफ़ाट काव्य. जबरदस्त.

वाचा लोकहो, याला कविता म्हणतात.
 
अगदि पुचाट शिळया मरगळलेल्या 'छान' सुंदर, अप्रतिम असल्या प्रतिक्रिया देण्याची ही कविता नाही.

गळा खाजवल्यासारखे तारस्वरात गायलेला हा अभंग नाही, हे नादधुंद गवायानं मैफ़िलीच्या मदात श्रोत्यांवर फ़ेकलेलं अस्सल नक्षत्र आहे.

हे कवितेच्या आभाळाला जोडलेलं शब्दांचं ठिगळ नाही; त्या आभाळात अढळ स्थानासाठी दावा मांडणारं काव्य आहे.

उगाच शब्दांची धुळ उडवणारी ही काव्यवाट नाही; राजप्रासादाकडे जाणारा हा राजमार्ग आहे.

गँलरीतल्या कुंडीत तांब्यातलं उरलेलं पाणी पिऊन वाढलेला हा चिनी गुलाब नाही; एखाद्या पुष्पवनाला सुगंधाचं वरदान देणारं हे कृष्णकमळ आहे.
 
कौतुक कसलं - कवितेचं, कवि/कवियित्री कोण का असेना..... माळ्याला विचारतो केव्हा, त्या फ़ुलातल्या सुगंधाचं कोडं उलगडल्यानंतरच.
 
वेदनेतुन निर्माण होतं त्याला 'आनंदवन' म्हणतात. तिथे ठसठसणा-या जखमातुन आनंदाचे स्त्राव वाहतात; वेदनेचे हुंकार तिथे जगण्याचा नवा ओंकार निर्माण करतात.

वेदना मोठीच आई असते. अशा त्या वेदनेच्या श्रीमंत गर्भाला सलाम.

अशी गोड तू... एक महाग़ज़ल!!!


फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

जणू धन्य माता तुझी जाहली,जन्म देता तुला;
पित्याने तुझ्या सार्थ गर्वात न्हावे, अशी गोड तू...

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- निरज कुलकर्णी.

=================================================

तु या गझलेत कुणाला गोड म्हटला आहेस देव जाणे, कि तुच जाणे. पण या गझले एवढी गोड कविता मी आजवर वाचलीच नाही. गझल वाचली आणि नुसता मोग-याचा घमघमाट सुटला बघ घरभर. रात्री ११.३० ला माझ्या घरात मोग-याचा वास घेऊन बायको आली आणि म्हटली 'काय चालले आहे?'. तुझे लग्न झाले असेल तर तु बायकोचा टोन, चेहरा हे सारे डोळ्यासमोर आणु शकशील.

मी अरे उगाच शंका नको म्हणुन तातडीने तुझी गझल बायकोला वाचुन दाखवली. वाटले तुझ्या गझलेनंतर ती ही तशीच गोड होईल.....

ती एवढेच म्हणाली....'याला म्हणतात कविता; नाहीतर तु!' (हे ही तु बायको या प्राण्याचे (कि प्राणिचे) हावभाव डोळ्यासमोर आणलेस तर तुला माझी केविलवाणी अवस्था लक्षात आली असेल.)

तरीही मला तुझी कविता (गझल ही कविताच असते असे मी मानतो) इतकि गोड वाटली आहे; काय सांगु! (काय ते मी सविस्तर सांगणार आहेच).

या गझलेमध्ये ती महागझल आहे हे वैशिष्ट्य आहेच. पण केवळ 'महा' आहे म्हणुन ती महान नाही. महानता ही त्या गझलेच्या रूपसौंदर्यात आहे.

अहाहा, काय गोड गझल आहे. एखाद्या सुंदर रमणीचं नितळ सौंदर्य पहाटेच्या प्रसन्नवेळी संगमरवरी शुभ्र-सफेद प्रासादाच्या गवाक्षातुन दिसावं; कि राजहंसानं मोत्याचा चारा खात असताना पुष्करणीतील पंखावर उडालेले सलील-तुषार आपले शुभ्रश्वेत पंख फडफडवुन निथळुन टाकावं. तुझ्या गझलेला उपमाच नाही; किंवा तुझ्या गझलेला इतक्या उपमा लिहीता येईल कि कालिदासाला कदाचित आकाशातुन खाली पडावं लागेल.

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

- हा मतलाच इतका गोड आहे कि काय सांगावे. सुंदर रंगबिरंगी गोड फुले...इतकि गोड कि त्यातुन मधुरस वेचुन रंगीत फुलपाखरे सगळ्या विश्वास मोहवतात; ज्या माधुर्याचे रूपक गोडपणाच्या परिसीमेला दिले जाते, तो मध मधमाशा त्या फुलातुन वेचतात....अशा गोड फुलांनी देखिल तुझ्या गोड दिसण्याने लाजुन चूर व्हावे...

निशा ही गंधितच असते आणि अशा त्या निशेने अक्षरशः गंधात न्हाऊन निघावे, मग ती निशा काय बेधुंद होईल ना!....अशी गोड तु; असा गोड तुझा मतला.
=========================

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

- तारकांनीही तुझी आसूया करावी इतकि तु गोड आहेस. यातुन तु तीच्या गोडपणाचे परिमाण द्यायला सुरूवात करतोस. हे तसे उत्तमच.

पण त्याही पुढे जाऊन चंद्र-सुर्यात त्या तारकांना सोडुन तुझ्या गोड पणाविषयी चर्चा व्हावी, हे तर अजबच, अद्भुतच. यात असाही एक अर्थ दिसतो कि दिवस-रात्र तुझ्या गोड पणाचे गुणवर्णन चंद्र-सुर्यही करत असतात; आणि त्यामुळेच तारकांनाही तुझी आसूया निर्माण होते. १०० गुण या शेराला.
===========================================

नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

- यात खरेतर तांत्रिकदूष्ट्या गोडपणाचा संबंध येत नाही. नभाला आपण कुठल्याही प्रकारे गोड म्हणत नाही. पण ते नभही धरतीला सोडुन जीच्या उंब-यापाशी झुरते ती किती गोड असेल, असा एक अर्थ निघतो. या ओळी मनावर गोड शिरशिरी ठेऊन जातात.

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

- पहिली ओळ ठीक, आहे सुंदर, पण तशी कितीतरी जणांनी ती साधली असती.

पण दुसरी ओळ मी पहिल्यांदाच ऐकतो आहे अशी उपमा. तुझा गोडपणा इतका कि दंवाने उन्हाला ओले करावे.... लक्षात येतंय का! अरे ऊन त्या दंवाला विरघळुन टाकते; पण इथे तीच्या गोडपणाची कमाल इतकि कि ते दंवाचं मार्दव उन्हालादेखिल ओलं करून टाकतं. ऊनही त्या गोडपणाच्या ओलेपणात न्हाऊन निघु लागतं.
=================

मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

- पुन्हा शेराची पहिली ओळ तशी सुरेखच, पण तशी ती पहिल्यांदाच लिहीली गेली असे नाही.

दुस-या ओळीत वरवर पाहता काही विशेष दिसत नाही. परंतु बारकाईने विचार केला तर कळते कि समर्थांनी जीथे म्हटले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे', ते बापडे कितीही खरे असो, तु इतकि गोड आहेस ना गं कि मनाचे आकंठ समाधान होते. पुर्ण तृप्त होते. एरवी मनाला असे आकंठ समाधान कसे मिळणार?
===============

तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

- पुन्हा पहिली ओळ तितकिशी पटली नाही. असे वाटले कि दुसरी ओळ पहिल्यांदा सुचली असावी आणि पहिली ओळ ही फक्त vaccum filling साठी लिहीली असावी. असो!

तुला पाहता मुलाने हसावे (यातला 'त्या' हा शब्द, जो पहिल्या ओळीशी संबंधित आहे, मी दुर्लक्षित करतो आहे); किती सुंदर कल्पना आहे. इथे मुलाने हे मी लहान मुलासाठी घेगंधकोशी''त्या फुलांच्या गंधकोशी' मधल्या 'बालकांचे हास्य का' या ओळी आठवल्या.
=================

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

- अरे राधा-कृष्ण किती करोडो कवितात येऊन गेले असतील नाही. पण इथे तु त्याच कृष्णाविषयी नि राधेविषयी (जीला तु या कवितेत गोड असे वारंवार म्हणत आहेस, तीला मी रसग्रहणापुरते राधा धरत आहे) किती वेगळे लिहीले आहेस.

मी आजवर राधेच्या-मीरेच्या गिरीधरावरील भक्तीविषयी ऐकले वाचले होते, पण कृष्णाने त्यांची भक्ती केली असे कधीच ऐकले नव्हते. किती एकतर्फी इतिहास लिहीला जातो असे आत्ता तुझ्या ये शेरावरून वाटून गेले.

ईथे श्रीधर आणि हरी हे शब्द कृष्णनिदर्शक आहेत. हे शब्द सहसा कवितेत दिसत नाही, निदान अशा प्रकारच्या कवितेतरी. परंतु इथे ते शब्द खुप समर्पक वाटतात; छान वाटतात.

पहिल्या ओळीत तु राधेच्या मधुराभक्तीचाच आधार घेतला आहेस. तसा तो सामान्यच वाटतो. पण दुस-या ओळीत तु त्या कृष्णाला, हरीला भक्तांच्या रांगेत आणुन बसवले. जे अगणितजणांचे आराध्य दैवत आहे, ज्याच्या भक्तीने कैवल्यमुक्तीचे आश्वासन मिळते, त्या हरीला तु तुझ्या 'ती'च्या भक्तगणांत आणुन बसवले.

कवितेचे सामर्थ्य यातच आहे कि जे आजवर कुणीच केले नाही, जे कृष्णाविषयी राधा किंवा मीरेच्यासंदर्भानेही कुणी कधी विचार केले नाही, ते तु तुझ्या या ओळीत आणुन दाखवलेस. कृष्णाला तुझ्या तीच्य गोडपणाचे भक्त बनवलेस, इतके जितके राधेने कृष्णावर प्रेमवर्षाव केला असेल.
===========================================

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

- पुन्हा एकदा फार वेगळे लिहुन गेलास. यम, मृत्यु वगैरे दाखले अनेकदा आले असतील अशा प्रकारच्या गझलामधुन. पण तु तीच्या गोडपणाच्या सामर्थ्याची चुणुक यमाला पराजीत करून दाखवली आहेस. आणि यमाला कसे पराजित केलेस; मृत्युवर कसा विजय मिळवला, तर तो तीला जिंकुन तुझे श्वासच चिरायु बनले तर तो बिच्चारा यम काय करणार तुझे वाकडे. तो यम प्राण घ्यायला येईल खरा, पण ज्याचे श्वास त्या गोडपणाला जिंकून चिरायु झाले आहेत, त्याला यम तरी कसा परास्त करणार.

कृष्णाच्या उदाहरणा/उपमेनंतर हा दुसरा फारच उत्कृष्ट कल्पनाचमत्कृतीचा नमुना आहे. आणि अजुन पुढे येणार आहेत.
=======================

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

- अरे कुठे पोचलास. लोक अशा गोड तीच्यासाठी देवदास बनतील, चातक-चकोर बनतील, कृष्ण बनतील, जोगी-बैरागी बनतील, बरबाद कवि बनतील..... पण तु तुकाराम बनायला निघालास. या ओळींनी तु या नुसत्या मधुर कवितेला अलौकिक प्रमाण दिलेस. देवदासाचे किंवा मजनुचे प्रेमात भणंग होणे निराळे. तो केवळ भौतीक प्रेमाचा परमोच्चबिंदु मानता येईल, पण सदेह वैकुंठागमन करणा-या तुकारामाचे भणंग होणे हे परालौकिक आहे, पारमार्थिक आहे. तु यात तुकाराम आणि पांडुरंग हा संबंध सहजतेने योजुन या श्रृंगारिक कवितेला प्रासादिक करून टाकलेस. धन्य!

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

- सुरेख शेर. तुझ्या गोड हासण्याने त्या सौदामिनीवर रूसण्याशिवाय पर्यायच उरू नये....अशी गोड तु!
=================

कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

- या उपमेला मी फार गुण देणार नाही. पण ही जी रचना तु केली आहेस आणि या ओळीच्या अनुषंगाने वरच्या ओळीतला 'मुल्य' हा शब्द किती चपखलपणे योजला आहे ते लक्षात येते. हे रचनाकाराचे कौशल्य असते.
=====================

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

- पहिले म्हणजे तीच्या वर्णनाचे वाक्य असूच शकत नाही; ते महावाक्यच असू शकते. महावाक्यमधुन पुन्हा त्या गोडपणाची अलौकिकता सिद्ध केली आहे. पुन्हा हे ही कविच्या प्रतिभेचे द्योतक.

पण त्यापुढे जाऊन, महाभारत, जे भारतात विसरणे म्हणजे मृत्युसमान आहे, विसरले जावे, अशी गोड तु. प्रत्येक उपमेतुन त्या गोडपणाला श्रेष्ठत्व देण्याचा हा प्रयत्न इतका जबरदस्त जमला आहे, कि नतमस्तकच व्हावे.
==================

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

- वरील सर्व शेर एका बाजुला आणि हा शेर एका बाजुला. म्हणे गालिबविषयी का गालिबने कुणाविषयी (कदाचित मीर) असे लिहीले कि तु मला तो एक शेर दे आणि माझी आख्खि शायरी तुझी करून घे, मला तसेच म्हणावे वाटते आहे यार!

काय लिहु. ज्या बोधिवृक्षाने या समस्त विश्वातील संयम, वैराग्य आणि अनासक्तीचा सर्वोच्च आदर्श असणा-या गौतमास; विष्णुच्या आठव्या अवतारास, ज्ञानप्राप्ती करून दिली, त्या बोधिवृक्षाला तु तीच्या गोडपणाच्या मोहाने आकर्षित होऊन तीच्या दर्शनासाठी रांगेत उभे केलेस, काय रे.....कुठे शिकलास हे सारं. तीच्या गोडपणाच्या दर्शनाचा मोह इतका जबरदस्त कि त्या बोधिवृक्षालाही तो आवरता येऊ नये...अगाध, अद्वितीय......नव्हे; एकमेवाद्वितीय!
=====================

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- बास, खरंय. तु ही थकलास. शब्दही थकले. सारे शेवटी नेती नेतीच झाले. ज्याला शब्दसामर्थ हतबल करावे अशी गोड तु......

खरे सांगु त्या गोडपणाचं खरं परमोच्च वर्णन या शेवटच्या शेरात येतं. एवढी महागझल नि महान गझल लिहुनही शेवटी शब्दांचं पांघरूण त्या गोडपणाला अपुरं पडतं हेच खरं त्याचं वर्णन.

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

- एकच फसलेला शेर. वाचताना सहज न लक्षात येणारा. पण बारकाईने पाहिले तर इथे तीचे गोडपण दुय्यम-तिय्यम झाले आहे तुझ्यापुढे. तीचे नाव घेतल्याने तुला आठवावे, यात तीच्या गोडपणाची महती कशी बरे...... मला वाटते, इथे विकेट पडली आहे. असो, ते महत्वाचे नाही.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...