Thursday, January 18, 2018

"वसुधैव कुटुंबकम"

हमादच्या सीरियान वाळवंटातली वाळू
आता भिजू लागली आहे,
लाल भडक रंगाचे पाणी पुरवल जातंय
रियाधहून; तेहरानहून; दोहाहून; 
अंकारा; बगदाद; काबुल आणि अगदी वाॅशिन्गटनहून सुद्धा

आणि ह्या तांबड्या सिंचनातून
तिथे उगवली आहेत 
आलेप्पोच्या संस्कृतीला हडप करणारी
लसलसत्या जिव्हांची वारेमाप रोप

अदेनच्या आखातात धुमसत आहेत
रक्त-मांस गिळंकृत करायला अधीर असलेले कैक भस्मासुर
पेटलेले बगदाद, मोसूल; श्रीनगर आणि राखाईन 
राख राख होण्यासाठीच जणू आ वासून बसलेले;

आणि सोमालिया आणि वेनेझुएलाचे भूकबळी 
मृत्युच्या जातक भुकेचे बळी होण्यासाठी आसुसलेले....

गोलन टेकड्यांवर विखुरले आहे 
आभाळाने दिलेला हिरवा रंग पुसून
मानवाने दिलेल्या अमानवी लाल भडक रंगाचे कुरण

सोल आणि टोक्यो धरून बसलेत जीव मुठीत
प्योंगयांगने त्यांच्यावर नेम धरून
धनुष्यावर चढवलेला आण्विक तीर 
कधी सुटेल ह्याचा नेम नाही, ह्या भीतीने

चंगेझ; तैमुर; तुघलक; खिल्जी पासून 
हिटलर; स्टालिन; माओ; गद्दाफी; इदी अमीन 
ओसामा; बघदादी आणि अल असद पर्यंत
पृथ्वीच्या पाठीवर उमललेल्या संस्कृतींना
मृत्युच्या कराल दाढात ढकलणाऱ्या
विकृतींवर मात करत,

हिमाचलच्या उत्तुंग कड्यावर
एक निर्वस्त्र योगी ध्यानमग्न अवस्थेत
उच्चारण करत बसला आहे;
"वसुधैव कुटुंबकम"  
"वसुधैव कुटुंबकम"
=====================
सारंग भणगे (७ जानेवारी २०१८)

मन बैरागी

कुटुंब कबिला नको काफिला मस्त जगावे आनंदाने
गगनाखाली जगणाऱ्यांवर प्रेम करावे प्राणपणाने

मन बैरागी माझा कोणी ना नात्याचा ना गोत्याचा
मायबाप त्या फांद्या बुंधा जिथे झोपलो त्या झाडाचा

कुटुंब होऊन जाते माझे पळभर घेतो आश्रय ज्यांचा
मी तर आहे ह्या प्राण्यांचा त्या पक्ष्यांचा फुलाफळांचा तृणपात्यांचा

ओढा व्हावे आयुष्याने ओढ नसावी वहात रहावे
तुडुंब पाणी पितात त्यांचे नकळत आपण कुटुंब व्हावे

अंतर जरीही कितीही असले तरी नसावे मनात अंतर
दिगंतराचा होऊन जा तू ह्या विश्वावर माया अंथर
================================

सारंग भणगे (१८ जानेवारी २०१८)

Wednesday, January 3, 2018

सचिन - एक आठ'वण'

काही काही आठवणी असतात त्या वणासारख्या, जखमा भरून आल्या तरीही कायम मागे उरतात, कधीही न मिटण्यासाठी!

Star Trek ही TV Serial दूरदर्शन हे एकमेव TV Channel असण्याच्या जमान्यातले दिवस. Star Trek संपले कि मी, सचिन, राहुल आणि आशु Start Trek-Star Trek खेळायचो. कुणीतरी Captain, कुणीतरी Spoke कि कोण तो लांबकान्या असे एकेक character व्हायचो, आणि आमच्या लहानग्यांच्या मनातून काहीतरी stories निर्माण व्हायच्या, जो आमचा खेळ व्हायच्या.

खेळता खेळता खोट्या खोट्या बंदुकींनी मारामारीही व्हायची, मग त्यात कुणी मारायचं, कधी मी; कधी राहुल; कधी आशु आणि कधी सचिन. सगळे त्या खेळात मेल्यानंतर कुठेतरी जाऊन कोसळायचे, म्हणजे खरोखर मेल्यानंतर माणसाचे शरीर जसे कोसळते तसे. पण सचिन........तो उभ्या उभ्याच मारायचा, म्हणजे मेल्यानंतरही तो उभाच असायचा. आम्ही फार हसायचो त्याच्या ह्या मारण्यावर.

तेव्हा कल्पना नव्हती कि तो असाच एक दिवस उभ्याउभ्याच निघून जाणार आहे....फक्त त्यावेळी आम्ही हसत नाही तर ओक्साबोक्शी रडत असणार आहोत!

-------------------------------------------

सचिन लहानपणापासूनच तब्येतीने जाड असल्याने त्याला आम्ही अर्थात जाड्या म्हणायचो. त्याच्या चेहऱ्यावर ह्याचा कधी राग पाहिल्याच आता तरी आठवत नाही. जाडी लोक सहसा दिलखुलास हसतमुख असतात, असा माझातरी अनुभव होता. सच्या, निदान लहानपणी तरी, तसा हसतमुख नक्कीच होता. जितकं त्याच खेळातलं ते मरणं विचित्र, तितकंच त्याच हसणं सुद्धा. हसताना तो पायरी पायरी वर चढत गेल्यासारखा हसायचा. त्या हसण्याने सुद्धा आम्हाला हसू यायचे.

पण जसा जसा तो मोठा होत गेला, तसं त्याचं हसू विरत गेलं, विरळ होत गेलं. काय कारण होत? मला ते निश्चितच माहित होत, कळत होत, पण निरुपाय होतो सगळेच. परिस्थिती आणि वास्तव हे असे दोन अहि महि असतात कि त्यांवर मात करण हे भल्याभल्यांना शक्य होत नाही. घरातील आर्थिक परिस्थिती आणि त्यात राहुलचे बेलगाम वागणे, ह्यातून लहान असून सचिन राहुलपेक्षा अधिक समज असलेला झाला, कदाचित आता वाटते कि त्याच्या वयापेक्षा थोडा आधीच! 

त्याच्याभोवतीचा परिस्थितीचा काळोख जसजसा अधिक गडद होत होता, तसा सचिन मात्र अधिक उजळत होता. मला आठवतय कि लहानपणी त्याला कसलातरी मेंदूचा आजार झाला होता. त्यामुळे सुरुवातीला तो अभ्यासात जरा संथ होता. राहुल एकदम हुशार पहिल्यापासूनच. पण सचिननेही पुढे पुढे गती पकडली. त्याला असलेल्या परिस्थितीच्या जाणीवेमुळे त्याने निसर्गदत्त बुद्धिमत्तेला कष्टांची जोड दिली आणि सहजगत्या तो ICWA with rank झाला.

पाठोपाठ त्याने CA करायला घेतले, आणि आम्हाला सगळ्यांना खात्री होती कि सच्या सहजच CA होऊन जाईल. अपेक्षेप्रमाणे CA Inter सचिन अगदी हसत खेळत झाला. राहुल देखील तोपर्यंत CA Inter झालेला होता. दोघा भावांनी मिळून 'अथर्व कन्सल्टंट' अशी Accounting firm सुरू केली. सुगीचे दिवस जवळ आले होते!

--------------------------------------------

राहुल आणि सचिन दोघेही जसे बुद्धीने हुशार तसेच बोलायला कमाल. लोकांशी दोघेही इतके मिळून मिसळून वागत, आणि बोलता बोलता लोकांची खेचण्यात तर पटाईत. त्यामुळे दोघांचे प्रचंड मित्र; ओळखीचे आणि भरपूर नातेवाईकसुद्धा. त्यामुळे घरी आणि बाहेर दोघांबरोबर सतत राबता. बर मित्र परिवार म्हणजे असे नाही कि हा राहुलचा मित्र; तो सचिनचा मित्र. सगळे मित्र दोघांचेही तितकेच चांगले. सगळ्या मित्रांचे अगदी घरोब्याचे संबंध. हे सांगताना अजिबात अतिशयोक्तीने लिहित नाहीये!

खिशात तर पैसे नव्हते; पण तरीही ते घर घेणे महत्वाचे होते. अर्थात, पैसे नसताना घर विकत घेण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे गृहकर्ज. पण गृहकर्ज ही काय भानगड असते हे कुणाला माहित होते! असल्या कामात सच्या कामाला यायचा.

आधीच ठरल्याप्रमाणे दोन तीन बँकांना visit मारायचे ठरले होते. काय कागदपत्र लागतात, Bank Manager ला आमची कर्ज परत करायची credibility आहे हे कसे पटवायचे (सुदैवाने तेव्हा Manager ला पुष्कळशा discretionary powers असत), हे सगळे कुणाला माहित, तर सच्याला. मग आम्ही दोघे अक्खा दिवसभर इथून तिथे, तिथून इथे असे फिरलो गृहकर्जाचे काम करण्यासाठी. सच्याबरोबर अख्खा दिवस घालवला, गप्पा; गोष्टी; चहा आणि काम सगळंच!

सचिन माझे tax return चे देखील काम पाहायचा. २-३ वर्ष झाले माझे tax return तयार करून file करणे सचिनच करायचा. मैत्री इतकी जवळची होती, आणि माझ्याही खिशात इतके कमी पैसे असायचे कि सच्याला कधी त्याच्या कामाचे पैसे विचारले देखील नाहीत. पण मनात ठरवले होते कि पुढच्या tax return च्या वेळी सच्याला २ शर्ट घेऊन द्यायचे.

सच्याची CA Final ची परीक्षा १-२ दिवसापूर्वीच संपली होती. घरात अजून तशी पैशाची तंगी होतीच. अथर्व कन्सल्टंटचा जम अजून काही बसलेला नव्हता. त्यामुळे सच्याने CA चा निकल लागेपर्यंत कुठेतरी नोकरी करायचे ठरवले.

सच्या तसा खरेतर आशुचा; म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा जिगरी; आणि राहुल माझा जिगरी. पण सच्याबरोबर माझे पण मस्त जमायचे.

आशुदेखील त्याचदरम्यान नोकरी शोधू लागला होता. दोघांनी मिळून दोन दिवस पेपरमध्ये असल्या-नसल्या सगळ्या नोकऱ्यांच्या जाहिराती वाचून-वेचून त्या त्या ऑफिसेसला visit मारायचा plan बनवला होता. दोघे दोन दिवस नुसते फिरत होते. म्हणजे आदल्या दिवशी सच्या पूर्ण दिवस माझ्या बरोबर होता; आणि नंतरचे दोन दिवस आशुबरोबर भिरभिरत राहिला. 

तर असे दोन दिवस फिरल्यावर आशु आणि सचिन दौलत ढाब्याला जेवायला गेले होते. रविवार, २५ मे २००१ चा तो दिवस. त्या रात्री मी जवळपास १.३० वाजता घरी आलो. एका मित्राची engagement मोडली, त्यामुळे तो जाम frustrated होता. त्याच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत सातारा रोडवरील Lotus Court च्या पायऱ्यांवर त्याला समजावत, थोपटत, धीर देत बसलो होतो. आशु साधारण तेव्हाच जेऊन घरी आला होता.

रात्र खूप झाल्यामुळे आम्ही सारे अर्थातच झोपी गेलो. सव्वा दोनचा सुमार असेल, घरचा फोन खणखणला. कुणी घेतला आठवत नाही, पण फोन राहुलचा होता. सच्याच्या पोटात खूप दुखतंय म्हणून माझ्या मोठ्या भावाला फोन केलेला. तो डॉक्टर आहे. मोठा भाऊ (आनंद) सचिनशी फोनवर बोलला, सचिन फोनवर बोलत होता म्हणून त्याने काही औषधे राहुलला लगेच आणायला सांगितली. Indigestion किंवा तसेच काहीसे असावे असे त्याला वाटले कारण सचिन फोनवर बोलत होता.

आम्ही पुन्हा झोपलो. ३.३० च्या दरम्यान पुन्हा फोन खणखणला. राहुलने फोनवर सांगितले कि सचिनचे पोट फारच दुखत आहे आणि त्याला प्रचंड उलटी देखील झाली. तेव्हा त्याने त्यांचे family physician ह्यांच्या सल्ल्याने जोशी हॉस्पिटलला admit करायचा निर्णय घेतला होता. अर्थात आम्ही सगळे जागे झालो होतो. मी आशु आणि आनंदला म्हणालो कि तुम्ही दोघे जा, मी खूप उशिरा आल्याने दमलो आहे. मी सकाळी येतो हॉस्पिटलला. म्हणून आशु आणि आनंद तडक जोशी हॉस्पिटलला गेले........

पहाटे ५.१५ वाजता घरचा फोन खणखणला.......ह्यावेळी फोनवर आनंद होता. फोन उचलताच तो म्हणाला 'सचिन गेला........' कानावर विश्वास बसत नव्हता.......नक्की काय मनात येऊन गेले सांगता येणार नाही. आई शेजारीच उभी होती. मी तिला हे सांगताच ती इतक्या जोरात ओरडून रडायला लागली कि मी पार गोंधळून गेलो. तो आवाज ऐकून वहिनी बाहेर आली आणि तिने आईचा ताबा घेतला. त्यामुळे मला तातडीने तिथून निघता आले.

मी लगोलग स्कूटरवर टांग मारून बिबवेवाडीतून जोशी हॉस्पिटलकडे निघालो. वाटेत मित्रमंडळपाशी केऱ्या (आशु आणि सचिनचा मित्र) गाडीवर जाताना दिसला. त्याने मला पाहिले आणि गाडी तशीच टाकून 'सारंग.....' असे जोरात ओरडत माझ्या जवळ आला. मला स्कूटर सांभाळत त्याला सांभाळणे अतिशय जड गेले. कसे बसे त्याला सावरून, त्याची गाडी उचलून आम्ही जोशी हॉस्पिटलकडे निघालो.

जोशी हॉस्पिटलला पोचलो तोवर सचिनला घरी सुद्धा नेले होते. लगेच आम्ही घरी गेलो.

सचिनच्या घराच्या बिल्डींगखाली गर्दी जमली होती. सचिनचे मित्र; राहुलचे मित्र; बिल्डींग आणि परिसरातला मित्र परिवार; नातेवाईक असे सगळेच अगदीच थोड्या अवधीत जमले होते. मी घराशी त्यावेळी खूप जवळचा. मी थेट वर घरात गेलो. सचिनला जमिनीवर ठेवले होते. जो तो आक्रंदत होता. राहुल सचिनच्या शेजारी बसून त्याला गालावर मारत म्हणत होता 'ए उठ रे सच्या' उठ चल सगळे जमलेत.....'. काकूंची अवस्था बघवत नव्हती. मी थेट काकूंच्या जवळ जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आशुदेखील उभा होता आणि फारच खचलेला होता. त्याच्या मनावर स्वाभाविकच प्रचंड परिणाम झाला होता. एकूणच सगळे हवालदिल होते. 

का कुणास ठाऊक मला अजिबात रडू येत नव्हते. मी शक्य त्यांना धीर देत होतो.

काही वेळाने ambulance आली. सचिनला ambulance मध्ये ठेवले. आणखी कुणाबरोबर तरी मी ambulance मध्ये शिरलो. अजूनही मला रडू येत नव्हत! फक्त मी थोडा गलबलून म्हणालो कि ह्यावेळी शर्ट घेऊन देणार होतो. पण ............

वैकुंठात सचिनला पोहोचवले ते तो पुन्हा न परतण्यासाठी.....

------------------------------------------------------

आलेला माणूस जातोच कधी ना कधी, पण डाव रंगात आलेला असतानाच अर्ध्या ताटातून, कुणाच्या कल्पनेतील स्वप्नातसुद्धा असा विचार चुकूनही आलेला नसताना अचानक त्याला निर्दया काळाने कुणाच्या नकळत उचलून नेले. त्याच्या जाण्याच्या त्या आठवणींना आता ह्या शब्दांनी सजवून अप्रामाणिकपणा सुद्धा करावा वाटत नाही आता. पण देवसुद्धा अमानुष असतो ह्याचा प्रत्यय आला.

सारंग भणगे

गजबजलेल्या आठवणी - "२६ जुलै २००५"

"२६ जुलै २००५"
(Reposting)

२६ जुलै २००५ हा दिवस बहुतेक सर्वांना सहज आठवत असेल. होय तोच दिवस जेव्हा मुंबईला जलौघाने करकचून मिठी घातली.

कर्मधर्मसंयोगाने त्याच दिवशी माझे मुंबईमध्ये काही काम निघाले होते. पहाटेची Volvo घेऊन मी पुण्यावरून दादरला पोहोचलो, आणि तिथून taxi ने होर्निमन सर्कलला. सकाळी वातावरण ढगाळ होते, परंतु कुठे अतिवृष्टी वगैरे होईल असे वाटत नव्हते. तसेही मुंबईला पावसाळ्यात २-३ वेळा तरी झोडपले जातेच, त्यामुळे जोरदार पाऊस मुंबईत होणे हे पुणेकरांना सुद्धा नवीन नाही. आपल्या सक्षम वेधशाळेनेदेखील स्वत:च्या प्रतिष्ठेला जागत अतिवृष्टी किंवा ढगफुटी अशी कुठलीही भानगड मुंबईत होईल असे वर्तवले नव्हते.

सकाळपासून दुपारी सुमारे ३ पर्यंत मी एका Law Firm च्या Office मध्ये कामात व्यस्त होतो. बाहेर काय चालू आहे ह्याचा काहीच पत्ता नव्हता. त्यावेळी मोबाईलवर internet वगैरे काही नसल्यामुळे तशा काही बातम्याही मिळाल्या नाहीत.

काम संपवून जेव्हा खाली उतरलो तेव्हा पाऊस पडत होता, म्हणून बिल्डींगच्या दारातच पाऊस थांबण्याची वाट पहात उभा राहिलो. बरेच लोक तिथे उभे होते, त्यांच्यातील चर्चेवरून असे काहीसे कळले कि local train बंद पडल्या आहेत वगैरे. पण हे ही तसे फार नवीन नव्हते.

काही वेळात पाऊस थांबला तसा मी प्रथम सर्कलला उभ्या असलेल्या ट्राफिक पोलीसकडे चौकशी केली, तर तो म्हणाला कि एव्हाना local train सुरू झाल्या असतील. त्यावरून मला असे कळले कि परिस्थिती normal आहे. आमच्या कंपनीचे एक ऑफिस चर्चगेट स्टेशनजवळ असल्याने मी पहिल्यांदा तिथे जायचे ठरवले. जाताना फौंटन, चर्चगेट सगळीकडेच माणसे आणि वाहतुकीची प्रचंड गर्दी दिसली. ट्रेन सुरू नसल्याचेही कळले. ऑफिसवर गेल्यावर तिथल्या लोकांनी मला लगेच मुंबई सोडण्याचा सल्ला दिला, आणि ते सगळे देखील वेळेआधी ऑफिसमधून निघत आहेत असे सांगितले. त्यावरून परिस्थिती थोडी गंभीर आहे असे कळले.

मी परत चालत हाय कोर्ट बिल्डींगच्या मागच्या रस्त्यावर आलो. वाहतूक पूर्ण ठप्प झालेली होती. जवळपास ३०-४० मिनिटे वाट पाहिल्यानंतर अखेरीस एक taxi वाला मला दादरला घेऊन जायला तयार झाला. वाहतूक इतक्या धीम्या गतीने चालली होती कि फोर्ट पासून भायखलापर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास २ तास लागले. तिथे पोहोचेपर्यंत taxi मधला gas संपल्यामुळे taxi थांबवावी लागली. मी taxi वाल्याचे पैसे चुकते केले. समोरच एक Police Van उभी होती. मी त्यांच्याजवळ चौकशी केली कि मला पुण्याला जायचे आहे, तर काय करू. त्यांनी मला भायखळा स्टेशनवर ट्रेन चालू झाली का ते पाहावे असा सल्ला दिला. (पण पुण्याकडे जाणे शक्य नाही अशी कुठलीही सूचना दिली नाही.......का ते अजून कळत नाही).

रस्त्यावर घोटभर पाणी साचले होते. एव्हाना बहुदा ६ वाजले असावेत, पण प्रकाश होता. भायखळा स्टेशनजवळ रस्त्यावरील लोकांना ट्रेन विषयी विचारता ते हसलेच. ते म्हणाले ट्रेन काही उद्यापर्यंत सुरू होत नाही. मला परिस्थितीची थोडी थोडी कल्पना येऊ लागली होती. पण डोक्यात एकच विचार पक्का होता कि दादरला पोहोचायचे, पुण्याची Volvo पकडायची आणि ह्या रगाड्यातून सुटायचे. मी भायखळाकडून दादरकडे पायी चालायला सुरुवात केली.....

रस्ताभर किमान घोटाभर पाणी होतेच होते. कुठे कुठे ते वाढून गुढघाभर होते. मी तसाच चालत होतो. रस्ता काही पूर्ण माहित नव्हता, पण लोकांना विचारात पुढे मार्गक्रमण चालू होते. माझ्याबरोबरीने शेकडो-हजारो लोक चालत होतेच, त्यामुळे कुठेही panic झाल्यासारखे वाटले नाही. बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टीतील लोक रस्त्यावर येऊन कुठे खड्डे असतील तर चालणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करत होते, काही ठिकाणी पाण्याला वेग होता तिथे त्यांनी मानवी साखळी केली होती, काही ठिकाणी चालणाऱ्या लोकांना ते पाणी पुरवत होते, जमेल तशी मदत करत होते.....काय म्हणावे ह्याला....अजूनही आठवून कृतज्ञतेने डोळे ओलावतात. एक दृश्य विवक्षित आठवते. एका ठिकाणी एका म्हाताऱ्या जोडप्याची कार रस्त्याच्या मध्येच बंद पडली होती, आणि ते ती कार बाजूला घेण्यासाठी ढकलत होते. लगेच आसपासची पोरे-लोक त्यांच्या मदतीला धावली, आणि त्यांनी बहुदा ती कार एका बाजूला लावली असेल! चालणारे लोक अगदी व्हीटीपासून सुद्धा चालत होते, पण कुठेही थकवा किंवा तक्रार नव्हती. त्यामुळे मी देखील शांतपणे चालत होतो.

आधी घरी फोन झाला होता आणि मी त्यांना एवढेच सांगितले होते कि मी पुण्याला येईन, मी सुरक्षित आहे. लोअर परेलपाशी माझ्या वाहिनीचा फोन आला तिने तिच्या मुंबईतील नातेवाईकांचे पत्ते दिले. मोबाईलची battery मारायला टेकली होती म्हणून मी मोबाईल बंद केला.

flyovers पूर्ण गाड्यांनी भरलेले होते. लोअर परेलमध्ये पाणी वाढून गुढघाभर झाले होते. दादरच्या जवळ पोहोचलो तर लाईट गेलेले होते. कुठेतरी एक रस्ता मी चुकलो बहुदा आणि एका अगदी कमी गर्दी असलेल्या रस्त्याला लागलो. तिथे जवळपास कुणीच चालणारे दिसत नव्हते, आणि पाणी देखील कमरेपर्यंत झाले होते. मला पोहता येत नसल्याने, आणि एवढे जास्त पाणी, अंधार, निर्मनुष्य रस्ता ह्यामुळे तिथे जरासा मी धास्तावलो. पण चालत राहिलो.

शेवटी दादरच्या पुलाखाली पोहोचलो जिथून पुण्याच्या buses जातात, आणि तिथे पोहोचल्यावर पहिल्यांदाच मला असे समजले कि पुणे बिणे भूल जाओ! तिथे मला कळले कि मुंबई - पुणे रस्ताच पाणी भरल्याने बंद पडला आहे. आता काय करायचे! मी दादर स्टेशनच्या जवळपास कुठेतरी हॉटेल मध्ये राहावे असा भाबडा विचार केला, आणि पूनम पासून ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व हॉटेलकडे चौकशीसाठी जाऊ लागलो. तिथे पाणी खूप जास्त भरले होते. जवळपास छातीच्या पातळीपर्यंत पाण्यात मी चालत होतो. संपूर्ण अंधार होता. एक दोन हॉटेलच्या दारातूनच निराश परतल्यावर मला लक्षात आले कि कुठल्याही हॉटेल किंवा लॉजमध्ये जागा मिळणे शक्य नाही. मग काय करायचे!

तसाच छातीभर पाण्यातून चालत पुन्हा दादरच्या fly over कडे आलो. पोटात एव्हाना खड्डा पडला होता. नशिबाने थोडा शोध घेतल्यावर एका पंजाबी restaurant मध्ये जागा मिळाली. बूट, सॉक्स सगळे काढून, pant खालून fold करून चक्क मांडी घालून तिथे बसलो. नशिबाने काहीतरी खायला मिळाले. बराच वेळ तिथे असाच घालवला. तेव्हा असे ठरवले कि आजची रात्र दादरच्या पुलाखाली काढायची. तिथे भरपूर गर्दी होतीच.

जेवण करून खरोखर दादरच्या पुलाखाली आलो, इकडे तिकडे फिरत राहिलो. कुठे बसायला जागा मिळते का पहात होतो. वाहिनेने तिचे बाबाही मुंबईत अडकले आहेत आणि ते गिरगावात त्यांच्या भावाकडे राहिले आहेत असे कळवले होते. त्यांचा पत्ताही दिला होता. पण गिरगावला परत जायचे कसे हा प्रश्नच होता. असाच फिरत असता, अचानक एक taxi आली आणि त्यातून काही लोक उतरले. मी त्या taxi कडे धावलो आणि त्याला गिरगावला येणार का विचारले. तो थोडा विचार करून हो म्हणाला. चर्चगेटवरून येऊन पुन्हा आता गिरगावला जायचे ही एक थट्टाच होती. जर तिथल्या पोलिसांनी योग्य मार्गदर्शन केले असते तर कदाचित एवढा उपद्व्याप झालाच नसता.

मी taxi मध्ये शिरतोय एवढ्यात ४-५ एकदम झोपडपट्टी category ची दारू प्यायलेली मुले अचानक taxi मध्ये शिरली. त्यांची स्थिती पाहून त्यांना काही बोलणे म्हणजे भांडण ओढवणे होते. मी त्यांना सांगून पहिले कि मी ह्या taxi त बसतोय, तर ती म्हणाली तुम्हीही बसा आम्हीही बसतो. मी मान्य केले आणि निघालो, पण मनात धास्ती होती कि न जाणो वाटेत ही मुले काही दगाफटका करतील. पण झाले उलट, दारू प्यायलेली असली तरी त्या मुलांना कुठे पाणी साचले आहे, कुठे नाही ते माहित होते. त्यांनी taxi वाल्याला guide करत कमी पाण्याच्या रस्त्याने एका ठिकाणापर्यंत नेले आणि ती उतरली. पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता!

मग आमची स्वारी निघाली गिरगावकडे. taxi वालाही बरा होता, कुठेही तक्रार न करता, खूप वेळा रस्ता बदलत बदलत त्याने शिताफीने रात्री सुमारे १.३०-२ च्या सुमारास मला गिरगावात पोहोचवले....

त्या रात्री मी माझ्या भावाच्या चुलत सासऱ्यांच्या दोन खोल्यांच्या घरातल्या चाळीत राहिलो. त्यांचाच एक जुना लेंगा घातला. भावाचे सासरे तिथेच होते. चुलत सासरे अपंग, त्यांची एक Cancer असलेली बहिणही तिथेच होती. त्याचदिवशी तिची केमो झालेली, त्यामुळे त्यांनाही खूप त्रास होत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच्या दुकानातून कपडे खरेदी केले. एक दिवस आणखी त्याच चाळीत काढला. चाळीत बहुतेक घरात असेच 'बिन बुलाये मेहमान' होते. बऱ्याच घरातील कुणी ना कुणी घरी परतलेले नव्हते वगैरे बरेच काही!

माणसांचे, माणुसकीचे पुष्कळ रंग त्या दिवशी पहिले. मुंबईला त्या दिवशी पावसाने जरी धुवून काढले तरीही माझ्या मनातील तो दिवस कुठल्याही पाण्याने धुवून टाकता येणार नाही!

सारंग भणगे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...