Saturday, July 23, 2022

एकांताचा ध्यास असावा एकाकीपण सोडून द्यावे

असू दे देव्हारा शब्दांचा गाभारी पण मौन असावे


प्रेम नसावे कुणावरही प्रेमावरती प्रेम करावे

आनंदावर सारे करती दुःखावरही खूप करावे


देण्यासाठी जन्म आपला दातेपण पण देऊन जावे

देणे म्हणजे गतजन्मींच्या थकीत ऋणांचे बस् परतावे


कधी व्हावे शहर आपण कधी परंतु अरण्य व्हावे

बंध जुळावे अनेकांशी तरी अंतरी अनन्य रहावे


कुणीच आपले नसेल तेव्हा आपण कुणाचे होऊन जावे

धरा-नभाने दूर सारता क्षितीजवासी होऊन जावे


असेल भंगुर क्षणेक जीवन इंद्रधनुसम दिसून जावे

असे जगावे कि जगण्याने मरणालाही अश्रू फुटावे.

============================


  • सारंग भणगे (२६ जून २०२२)

Monday, May 18, 2020

क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे


क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे आयुष्याची गझल जमावी
रसिका केवळ नको शेवटी हर शेराला दाद मिळावी

सुरेख लिहितो गझला त्याला अपार असते दु:ख म्हणे पण
फसते त्याला दु:खच नसते गैरसमजूत अशी नसावी

आयुष्याच्या मुशायऱ्याला हजर हजारो रसीक श्रोते
हरेक मिसरा जिच्याचसाठी अशी गझल पण हजर नसावी?

असून सारे तिच्या विना हे जगणे वाटे अशी गझल की
शेर कितीही लिहिले तरीही मतल्या शिवाय पूर्ण न व्हावी

बाप होतसे शेर प्रसंगी आणिक होते जमीन आई
मक्ता घेउन त्यांचा आपण गझल मुसलसल पूर्ण करावी

कधी वाटते गझलेला मी जन्म दिला ती माझी मुलगी
पुन्हा वाचता जाणवते की अशीच माझी माय असावी
=============================
सारंग भणगे (१८ मे २०२०)

Sunday, May 17, 2020

जीवनधारा

किती दूरचा प्रवास आहे
नदीस माहित नाही
सारे अंतर पळे निरंतर
शेवट शोधत नाही

दोन किनारे फुलवित जाणे
असा ध्यासही नाही
पांथस्थांची तृषा भागवू
अशी आसही नाही

शुष्कपणाचे दु:ख तिला ना
तरी ‘कोरडी’ नाही
जिते बुडवते; प्रेत तारते
म्हणून ‘तिरडी’ नाही

‘वाहत जाणे’ इतके करते
नदधर्माचे पालन
‘जीवन’धारा म्हणजे असते
निजकर्माचे वाहन
============
सारंग भणगे (१७ मे २०२०)

Tuesday, April 14, 2020

जागृती


अंतरात ज्ञानाला आरपार शोधावे
कोपरे नि कंगोरे तास तास तासावे
आतल्या निनादांचे शांत सूर ऐकावे
धाडतील स्वत्वाचे देवदूत सांगावे

बाह्यरूप विश्वाचे मोहलिप्त छायेचे
पांघरूण आत्म्याला नाशवंत कायेचे
पारतंत्र्य देहाचे जाणताच तू होशी,
मुक्त दूर जावोनी रागरंग मायेचे

दे मला अशी भक्ती दूर सार आसक्ती
ना अहं असूया वा वासना कि अतृप्ती
अमृतस्य पुत्रोऽहं हेच ब्रीद गुंजावे
आत्मलीन होण्याची दे असीम तू शक्ती
========================
सारंग भणगे (१४ एप्रिल २०२०)

Sunday, March 29, 2020

शांत तेवते मनात वात एक मंदशी

शांत तेवते मनात वात एक मंदशी
आत सांडता प्रकाश होय हर्ष मानसी
शांतता निनादता मनास स्थीरता मिळे
विश्व जाणते अशा नरोत्तमास तापसी

ज्ञान ग्रंथ वेद वाक्य ज्ञात त्यास देव ना
वेसणात बांधतो तरी विकार वासना
वेष्टनात बांधले शरीर तुच्छ मानतो
साधना उपासनेत खर्च सर्व चेतना

चित्त फाटते कधी बघून दीनदु:खिता
काळजातुनी फुटे अपूर्व काव्यसंहिता
सार साधनेतले सुबोधवाक्य सांगतो
शब्द त्यास की म्हणू जणू अमोघ अमृता

वाढताच व्यग्रता अलिप्त होउनी बसे
कूर्मतत्व बाणुनी सुषुप्त तृप्त होतसे
आत्मभान जागतां अनेक दीप पेटती
अंतरातला प्रकाश सर्वदूर जातसे
======================

सारंग भणगे (२९ मार्च २०२०)

Friday, December 20, 2019

सावली मला तुझी सदैव जाळतेच का?

पूर्ण मी असेन जर अपूर्ण वाटतेच का?
उत्तरे मिळूनही सुटेचनात पेच का?

पांढऱ्या ढगा तुला सवाल एक थेट हा
सावली मला तुझी सदैव जाळतेच का?

झोपलीस त्या कुशीवरी सखे निवांत तू
सांगतेस जे तुझे अतीव प्रेम हेच का?

पोरगी विचारते मला खडा सवाल की
सात वाजता घरात मीच हे असेच का?

दु:ख ना तुला तरी कवी कशास व्हायचे?
फाटले नसेल तर उगा शिवायचेच का?
=====================
सारंग भणगे (१७ डिसेंबर २०१९)

Saturday, October 12, 2019

वृत्तबद्ध कविता

वृत्तबद्ध कविता प्रत्येक कवीने लिहायचा प्रयत्न केलाच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे. वृत्त हे कवितेचे व्याकरण आहे, अर्थात शास्त्र आहे. कविता हि मुळात कला आहेच, परंतु प्रत्येक गोष्टी मध्ये कला आणि शास्त्र ह्यांचा संगम हा प्रतिभेचा उच्चांक ठरतो. विज्ञानामध्ये जितके शास्त्र असते तितकीच कला पण असते. वैज्ञानिकाला देखील प्रतिभेची आवश्यकता असते. त्या प्रतिभेमुळे; सृजनशीलतेमुळे एकच विज्ञान शिकणारा कुणी एक शास्त्रज्ञ बनतो तर दुसरा कुणी केवळ एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत राहतो.

तर मला असे म्हणायचे आहे कि जर कविता करायची असेल तर कवितेचे व्याकरण समजणे; त्याचा अभ्यास करणे, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी अभ्यास; सराव आणि साधना करणे हे सारे एक परिपूर्ण कवी होण्यासाठी आवश्यक आहे.

हे लिहीत असताना गायन कलेचा विचार मनात आला, आणि स्वाभाविकपणे किशोर कुमार समोर आला. किशोर कुमार हा शास्त्रीय संगीत न शिकलेला, परंतु असामान्य प्रतिभा लाभलेला गायक! त्याने त्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर पार्श्वगायन क्षेत्राचे शिखर गाठले. परंतु तरीही जर भीमसेनजींची तुलना किशोरशी केली तर भीमसेनजींच्या गायन प्रतिभेविषयी अधिक आदर वाटतो. खरेतर अशी तुलना योग्य नाही, परंतु मला असे वाटते कि गायनकलेचे शास्त्र शिकून त्याचे शिखर गाठणारा, हा पार्श्वगायनाचे शिखर गाठणाऱ्यापेक्षा अधिक उजवा वाटून जातो. अर्थात हे वैयक्तिक मत असू शकते!

तर मूळ मुद्दा हा कि कवीने वृत्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कवी कवितेविषयी किती गंभीर आहे ह्याचा वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास आणि  सराव करणे हा एक महत्वाचा घटक होऊ शकतो.

अर्थात ह्याचा अर्थ केवळ वृत्तामध्येच कविता लिहिली पाहिजे, हा अट्टाहास मला हास्यास्पद आणि अतिरेकी वाटतो. वृत्तांच्या सरावाने वृत्तबद्ध वृत्ती (हे स्वामी निश्चलानंद ह्यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक देखील आहे) तयार झाल्यावर कवीला अमुक एक कविता हि कुठल्या आकृतिबंधामध्ये जन्मली पाहिजे ते देखील उत्स्फूर्तपणे यायला हवे. मग त्यामध्ये केवळ वृत्तामध्येच कविता जन्म घेणार नाही, तर ती कविता उपजत असताना स्वतः:चा आकृतिबंध ठरवून येईल. जर वृत्तबद्ध वृत्ती शक्य असेल तर कवितेच्या सृजनाची हि उत्स्फूर्त प्रक्रिया देखील शक्य आहे. त्यामुळे कविता हि केवळ वृत्तातच असावी असे मत एकांगी वाटते.

वृत्त हे निश्चितपणे कवितेचा आकृतिबंध ठरवते. आकृतिबंध हे बाह्यरूप आहे, तर कवितेचा आशय हे त्याचे आंतररूप किंवा आत्मरूप आहे. आशय अधिक महत्वाचा कि आकृतिबंध हा खरेतर वादाचा मुद्दा असूच शकत नाही. आशयाशिवाय कविता अशक्यच आहे. त्यामुळे तो अत्यावश्यक आहे. आकृतिबंधाची अट हि त्यामानाने दुय्यम आहे.

अर्थात, केवळ आशय आहे म्हणून कुठल्याही आकृतिबंधामध्ये पसरटपणे गद्यप्राय कविता मांडणे, हे मलाही अजिबात पटत नाही, मान्य नाही. अशी कविता लिहूच नये अशा मी मताचा नाही, परंतु अशी कविता हि केवळ आणि केवळ स्वानंदासाठी किंवा स्वान्त सुखाय लिहावी, ती प्रसिद्ध करून त्यावर आपले कवित्व मिरवणे हे मला 'पाप' वाटते! जर अशा मुक्त कवितेला प्रसिद्धी मिळाली नसती तर मराठी कवितेचा दर्जा खूप अधिक चांगला टिकला असता असे मला तरी वाटते.

ह्याचा अर्थ पुन्हा सर्व मुक्त कविता ह्या गद्यप्रायच असतात असे नाही, किंवा त्या अगदीच अप्रसिद्धच राहिल्या पाहिजेत असेही नाही. काही अत्यंत दर्जेदार असे मुक्तकाव्य वाचले आहे आणि ते वाचल्यावर रटाळ वृत्तबद्ध काव्य वाचण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले असेही वाटले आहे.


कवितेबाबत दोन दुराग्रह मला दिसले आहेत, जाणवले आहेत. एक हा कि वृत्तबद्ध कवितेत व्यक्त होता येत नाही म्हणून मुक्तच्या नावाखाली सतत वाट्टेल ते लिहीत राहणे! ह्याने कविता-विश्वाचे साहित्यिक नुकसान होते, तर त्याच्या दुसऱ्या टोकावर मुक्त कविता हि कविताच नाही आणि केवळ वृत्त किंवा छंदबद्धच कविता रचली पाहिजे ह्याने देखील नुकसान होते.

मला कवितेसाठी मध्यममार्ग अधिक योग्य वाटतो, ज्यात वृत्तांचा योग्य अभ्यास आणि शक्यतो वृत्तांमध्ये कविता रचण्याचा प्रयत्न कवींनी केला पाहिजे, पण क्रिकेटमध्ये जसा प्रत्येक फटका हा पुस्तकात लिहिल्याप्रमाणेच मारून चालत नाही, तर त्यामध्ये काही अंशी मुक्तता हवी, तशीच काही कविता हि थोडी सैलपणे लिहिल्यास हरकत नसावी.

हे म्हणत असताना आपण लक्षात ठेवले पाहिजे कि वृत्तांच्या पाठोपाठ छंद रचना ज्या आहेत त्यामध्ये आवश्यक ती मोकळीक दिलेली आहे. ओवी, अभंग, अष्टाक्षरी ई. छंदांमध्ये नियम गणवृत्तांप्रमाणे जाचक नाहीत, आणि कवीच्या व्यक्ततेला मोकळेपणा त्यात मिळतो. कवींनी अशा छंदांमध्ये तरी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वृत्तामध्ये लिहिलेली कविता ह्यामध्ये स्वाभाविक 'बद्धता' येतेच. त्यामुळे वृत्तबद्ध लिहिण्यासाठी शब्दसंपदा अधिक हवी हे बऱ्याच अंशी बरोबर आहे. परंतु वृत्तात लिहीत असताना सहज येणारे शब्द सोडून जर जड, क्लिष्ट, अपरिचित शब्द वापरले तर ते रसभंगाला कारण होऊ शकते, हा स्वानुभव देखील आहे. वृत्तात सहज लिहिण्यासाठी केवळ सराव आवश्यक नाही तर आपण त्या कवितेवर खूप काम करणे आवश्यक आहे, खूप विचार करणे, कविता सुचून गेल्यावरही खूप काळ त्यामध्ये आवश्यक ते बदल करत जाणे, वारंवार ती कविता वाचून त्यात सुधारणा करत राहणे, हे सारे खूप आवश्यक आहे. पण आजकाल आपल्याकडे तेवढा वेळ, तेवढा संयम राहिलेला नाही. त्यामुळे जशी आहे तशी कविता पोस्ट करून मोकळे व्हायचे हि वृत्ती बळावलेली आहे. कवींनी कविता प्रसिद्ध करण्याच्या मोहापासून स्वतः:ला वाचवले पाहिजे, हे अत्यंत आवश्यक होत चालले आहे.

ह्या प्रक्रियेवर उत्स्फूर्तता गमावण्याचा आरोप स्वाभाविकपणे केला जातो. जो काही अंशी जरी मान्य केला, तरीही उत्स्फूर्तता हि केवळ कविलाच ठाऊक असते. ज्या कवितेत उत्कृष्ट आशय असतो, शब्दरचना आकर्षक असते, आणि मांडणी देखील उत्तम असते ती कविता रसिकांना अधिक भावते, अधिक काळ लक्षात राहते. मग त्यामध्ये उत्स्फूर्तता होती कि नव्हती हा मुद्दा रसिकांच्या, वाचकांच्या दृष्टीने संपूर्णतः गौण असतो. जोपर्यंत मूळ सुचलेल्या कवितेतील आशयाशी तुम्ही तडजोड करीत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या कवितेत करोडो बदल केले तरी त्यातील उत्स्फूर्तता काकणभर देखील कमी होत नाही. उलट काही वेळा विचार करता करता कवितेच्या आकृतिबंधाबरोबरच आशय देखील समृद्ध होऊ शकतो. हे सर्व अकृत्रिमपणे कसे घडवून आणायचे हि देखील कवीची प्रतिभाच आहे. केवळ कविता सुचणे हीच नव्हे तर कविता संस्कारित सालंकृत करणे हा देखील प्रतिभाविष्काराचाच भाग आहे.

लिहिता लिहिता खूपच प्रदीर्घ लिहीत गेलो. सहज सुचेल तसे लिहिले आहे. हि माझी मते मांडली आहेत, पण ह्यावर देखील पुनर्विचार करणे आवश्यक असेल हे निश्चित!

Sunday, September 15, 2019

राष्ट्रभाषा

प्रस्ताव :

हिंदी ही केंद्र सरकारच्या कारभाराची भाषा व्हावी, राज्यांच्या कामकाजाची भाषा ही त्या राज्याची प्रमुख भाषा असावी.

शिक्षणात प्रथम भाषा हिंदी, दुसरी मातृभाषा आणि तिसरी कुठलीही परकीय भाषा असावी.

खाजगी क्षेत्रात हिंदी भाषा वापरणाऱ्या कंपन्यांना विशेष फायदे द्यावेत!

ह्या भाषा रचनेवर कुणाला आपत्ती असण्याचे कारण वाटत नाही!
-----------------------------------------------------------------------

सर्वात पहिल्यांदा, मी हा विचार राष्ट्र ह्या दृष्टीकोनातून करतो आहे, राज्य किंवा व्यक्ती ह्या नाही. ते का, हे पुढे सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो.

मातृभाषा / राज्यभाषा :

पण तत्पूर्वी एक स्पष्ट असलेल्या गोष्टीचे स्पष्टीकरण कि माझ्या विचारामध्ये (किंवा प्रस्तावामध्ये) शैक्षणिक तसेच व्यावहारिक पातळीवर मातृभाषेला तेवढेच महत्व दिलेले आहे जेवढे हिंदी ह्या राष्ट्रभाषेला. म्हणजे मातृभाषा हि शिकणार आहोतच, तसेच राज्य सरकारच्या व्यवहारात त्या राज्याची भाषा हि देखील प्रमुख भाषा असेल, किंबहुना तिथे हिंदी (एक राष्ट्रभाषा म्हणून) दुय्यम स्थानी असेल.

अर्थात मातृभाषा आणि राज्यभाषा ह्यांना राष्ट्रभाषेइतकाच सामान दर्जा शैक्षणिक आणि व्यावहारिक पातळीवर असेल.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रभाषा :

माझा एक मुद्दा असा आहे कि ह्या देशाची अशी एक भाषा असावी जी प्रत्येकाला यायलाच हवी. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी आणि गुजराथ पासून नागालँड पर्यंत प्रत्येक भारतीयाला एक अशी भाषा हवी जी बोलता, लिहिता, वाचता यायलाच हवी. एक भाषा एक देश!

तो भाषा कुठलीही असू दे. उद्या सर्व भारतीयांनीं मिळून ठरवले कि ती भाषा नागा असावी तरी मला ते तत्वाश: मान्य आहे. परंतु सर्व भारतीयांची अशी एक भाषा हवीच हवी. (पुन्हा एकदा स्पष्टीकरण कि त्या राष्ट्रभाषेबरोबर मातृभाषा / राज्यभाषा हि देखील अवगत असेलच)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिंदी हि राष्ट्रभाषा :

हिंदी हि मातृभाषा असलेली लोकसंख्या ४३.% आहे. त्याच्याखालोखाल बंगाली भाषिक येतात, जी संख्या एकूण लोकसंख्येच्या ८% आहे. ४३.६ आणि ८ ह्यामधली तफावत एवढी प्रचंड आहे कि जर आपल्याला राष्ट्रभाषा हवी असेल तर हिंदी शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही.

शिवाय हिंदी व्यतिरिक्त इतर भाषिक फार मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषा लिहू, वाचू, समजू शकतात. हि संख्या सहज ६०-७०% पर्यंत जाईल. म्हणजे एवढी विविधता असलेल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या अशी आहे कि जे सहज हिंदी भाषा अवगत करू शकतील.

त्यामुळे हिंदी हीच केवळ राष्ट्रभाषा होऊ शकते. हिंदीचा आग्रह केवळ एवढ्याचसाठी.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रभाषा का? :

खरेतर ह्याचे उत्तर देण्याची आवश्यकता असू नये! पण असलीच तर विषय देखील खूप सखोल आणि विवादास्पद होऊ शकतो.

सुरुवातीला एवढेच सखेद नमूद करू इच्छितो कि ह्या देशात इंग्रजी भाषेविषयी आक्षेप घेतला जात नाही, परंतु हिंदी ह्या भारतीय भाषेचा विषय आला कि लोकांच्या अस्मिता जाग्या होतात. त्याची वेगवेगळी करणे आहेत, पण मुख्यतः इंग्रजी हि आपल्याला तारणारी भाषा आहे असा असलेला गोड गैरसमज. हा विषय जरी वेगळा असला तरीही एक निश्चित कि जे आजपर्यंत आपण केले ते आता बदलू शकतो, किंबहुना बदलायची वेळ येऊ घातली आहे. म्हणजेच आजवर आपण इंग्रजीचा राष्ट्रीय भाषेप्रमाणे उपयोग केला तो आता हळूहळू कमी करत, बंद करायची वेळ आली आहे.

इंग्रजी भाषा ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी ती तिसरी परकीय भाषा म्हणून जरूर शिकावी, पण ती बंधनकारक असू नये. कुणाला जर्मन किंवा मँडरिन किंवा फ्रेंच शिकायची असेल तर ती शिकायची इंग्रजी शिकण्याइतकीच व्यवस्था असावी. तीन भाषा आजही आपण शिकत आहोत, त्यामुळे ते फक्त काही बदल करून राबवावे!

भाषा हे फक्त संवादाचे साधन नाही तर संस्कृतीचे मूळ आहे. सुमारे १९९९-२००० साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून इंग्रजी भाषा आवश्यक करण्यात आली तेव्हा 'आपणच' नावाच्या एका शिक्षकांच्या संस्थेमध्ये मी विचार मांडले होते. तेव्हा मी हेच म्हणालो होतो कि भाषा तिच्याबरोबर संस्कृतीची अदृश्य पिलावळ घेऊन येते. संस्कृती वर जेव्हा आक्रमण होते तेव्हा माणसाच्या अस्मिता देखील बदलतात, अर्थात स्व-ओळख बदलते.

जर एखाद्या परदेशी माणसाने प्रश्न विचारला कि भारताची भाषा कुठली, तर ह्यावर आपल्याकडे उत्तर नाही. जे उत्तर आहे ते फार क्लिष्ट आहे. त्यामुळे भारताची अशी एक राष्ट्रभाषा असणे गरजेचं आहे. ती भारताची ओळख असते, ओळख सांगते!

भारताची अशी एक भाषा असेल तर ती भारताची संस्कृती, अस्मिता आणि अर्थात स्व-परिचय विश्वभर निर्माण करू शकते. जागतिक प्रभाव हा केवळ आर्थिक किंवा सामरिक शक्तीने निर्माण करता येत नाही. किंबहुना आर्थिक किंवा सामरिक सामर्थ्याने फार थोड्या देशांवर फार थोडा काळ प्रभाव निर्माण करता येतो. परंतु जर सांस्कृतिक सामर्थ्याने इतर देशांवर, जगावर प्रभाव निर्माण करता आला तर तो फार लांब काळ अबाधित राहतो, अगदी हजारो वर्षे देखील राहतो. सांस्कृतिक प्रभावाने जे साधता येते ते आर्थिक किंवा सामरिक सामर्थ्याने साधता येत नाही.

चीनने हे ओळखले असावे. चीन debt trap, military expansion and dominance ह्यानंतर आता सांस्कृतिक प्रभावावर काम करते आहे. भाषेचे महत्व ते ओळखत आहेत. नेपाळ ह्या भारताच्या पूर्वापार मित्र असलेल्या राष्ट्रांमधील शाळांमधून आता मँडरिन (म्हणजे चीनमधील प्रमुख भाषा) आवश्यक भाषा म्हणून शिकवले जाणार आहे. हि फार काळजीची बाब आहे.

"विविधतेमध्ये एकता" हे तत्व फार चांगले आणि आदर्श आहे. पण व्यवहाराच्या पातळीवर ते पूर्णतः यशस्वी ठरतेच असे नाही. भाषा आणि धर्म ह्या माणसातील कलहाचे सर्वात मोठे कारण असते. दोन्ही गोष्टी अस्मितेच्या निदर्शक असतात. एकवेळ धर्माच्या पगाड्यातून माणसाची मुक्तता माणूस करून घेऊ शकतो, परंतु भाषेच्या पगाड्यातून माणूस कधीही सुटू शकत नाही. १४० कोटींच्या देशात एक भाषा नसल्यामुळे एकसूत्रता नसणे स्वाभाविक आहे. दोन वेगवेगळे भाषिक हे त्यामुळे संवाद साधू शकत नाहीत, दुसऱ्या राज्यात जाऊन व्यवहार करू शकत नाहीत, शिकू शकत नाहीत आणि प्रामुख्याने भावनिक दृष्ट्या विभक्तच राहतात. हेच जर संपूर्ण भारतातील प्रत्येक भारतीयाला एक भाषा तरी अशी असेल कि जी बोलता, लिहिता, वाचता येत असेल तर व्यावहारिक; तसेच भावनिक पातळीवर सर्व भारतीय एकत्र होऊ शकतात.

माझ्या मते जितके काश्मीर भारताचा भाग झाल्यानंतर भारत एक झाल्याची भावना संपूर्ण भारतभर व्यक्त केली, तीच भावना एक भाषा असेल तर निर्माण होईल.

के. सिवन ह्यांना चांद्रयानच्या संदर्भात प्रश्न विचारताना तुम्ही तमीळ असल्याने तुम्हाला अभिमान वाटतो का असे विचारले तेव्हा त्यांनी मी भारतीय असल्याने मला अभिमान वाटतो असे उत्तर दिले. ह्या उत्तरातील भावनेला 'एक देश; एक भाषा' असेल तर अधिक बळ मिळेल अशी माझी प्रामाणिक समजूत आणि भावना आहे.

मराठी भाषेवरचे प्रेमापोटी मी मराठी भाषा शिकणार आहे, ती राज्यपातळीवरील व्यवहारात वापरणार आहे. इंग्रजी किंवा इतर परकीय भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला प्रतिनिधित्व करण्यासाठी शिकणार आहे, वापरणार आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर व्यवहार करण्यासाठी, एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी हिंदी भाषा (किंवा इतर कुठलीही एक भारतीय भाषा) राष्ट्रभाषा म्हणून शिकणार आहे, वापरणार आहे!

हे माझ्या डोळ्यासमोरील चित्र आहे!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी हिंदी हि उर्दू प्रधान हवी कि आणखी काही हा मुद्दा वेगळा आहे. मराठी हि पुण्याची कि वऱ्हाडी कि कोकणी कि आणखी कुठली हा जसा प्रश्न येत नाही, तसाच तोही येणार नाही. हे सर्वच भाषांबाबत आहे. त्यामुळे असले किरकोळ मुद्दे आणूच नयेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

फायदा-तोटा हा मुद्दा जेव्हा कायदा केला जातो तेव्हा उरतच नाही. तरीही इंग्रजी जरूर निवडावी जर ती फायद्याची वाटत असेल तर. माझ्या प्रस्तावात / विचारात त्याला पूर्णपणे स्थान आहे. तसेही तीन भाषा शिकल्या जात आहेतच, त्यात सुसूत्रीकरण आणावे आणि भारताची अशी भाषा निर्माण व्हावी एवढी साधी हि गोष्ट आहे.

- सारंग भणगे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...