Tuesday, April 12, 2011

जिंकलो मी कधीच नाही

जिंकलो मी कधीच नाही,
हारण्याचा रिवाज नाही.

पार्थ नाही तरी भेदूनी,
सार्थ झालो परास्त नाही.

पंकजाच्या परागकोषी,
अंतसमयी विषाद नाही.

दु:ख होते निरोप घेता,
संधिकाली किमान नाही.

मोग-याची मिजास मोठी,
जायची चुरगळून नाही.

जीत रंग्या जरी नसेना,
हारलेला मनात नाही.

"हार असते मनात" - रंग्या,
जिंकणारा अजीत नाही.
==============
सारंग भणगे. (१२ एप्रिल २०११)

Monday, April 4, 2011

अपराध....कविता

असा कोणता मी अपराध केला,
जगण्यास म्हणती प्रमाद केला.

झुरळेच ना मी मारली चुकिने,
गिधाडांनी माझा जल्लाद केला.

कडेच्या भिका-या पाजले मी पाणी,
पुढा-यांनी माझा 'आझाद' केला.

सांगितल्या चार गोष्टी हिताच्या,
म्हणतात कि मी प्रतिवाद केला.

माणसाने कविला माझ्यातल्या हो,
रंग्या म्हणे, बरबाद केला.
===============
सारंग भणगे. (३० मार्च २०११)

विश्वविजयी अश्वमेध

अभेद्य आहे अमचा किल्ला
अजिंक्य आहे अमची सेना
शत्रु कुणीही उभा राहता
उडवून टाकू त्याची दैना

काळालाही भिणार नाही
पाऊल अमुचे पुढेच राही
अशा गर्जु दे विजयगर्जना
दुमदुमती त्या दिशात दाही

उत्तुंग असती अमुची स्वप्ने
क्षितीजाच्याही पल्याड शोधू
कभिन्न काळ्या काळ-कातळी
विजयाचे अन लेणे खोदू

दणकट अमुच्या छातीवरती
घाव घणाचे सोसून घेतो
पराक्रमाच्या कसोटीवरती
बळकट बाहु घासून घेतो

कधी वादळे उभी ठाकती
किती संकटे वाट रोखती
उलथूनी त्यांना अमुचि सेना
विजय-यशाचे मंत्र घोकती

जिंकणे केवळ ध्येय नसूनी
जिंकणे अमुचे जीवन आहे
जिंकण्यासाठी वेचतो आम्ही
सदैव अमुचे तनमन आहे

विश्वविजयाचा हा वारू
त्रिखंड जिंकूनी अजिंक्य झाला
घराघरातुन गुढी उभारू
अश्वमेध हा यशस्वी झाला.
=============
सारंग भणगे. (४ एप्रिल २०११ - चैत्र शुद्ध प्रतिपदा)

Friday, April 1, 2011

बस चंद करोडों सालों में

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

.
- गुलजार

========================================

जीथे होईल युगाचा अस्त....काळाच्या क्षितीजावर...

अस्तित्वाच्या सा-याच खाणाखुणा जातील पुसल्या,
अन त्या अस्तित्वाच्या मावळण्यात...
सा-याच चर-अचरांच्या व्यक्तीमत्वाला शाप असेल...
धुसरतेच्या संदिग्ध धुक्यात असंदिग्धपणे हरवून जाण्याचा,

सुर्यही मग हरवून बसेल त्याच्या व्यक्तीमत्वाच्या उज्वल खुणा...
पेटलेल्या तप्त ज्वाळांच्या 'अनादि' वादळाने अविरत धगधगत असलेले ते अखंड यज्ञकुंड...
'अनंत' न राहता आता केवळ हिमवादळाने थंड पडलेल्या अविचल आस्तित्वहीन थडग्याप्रमाणे...
थंड होऊन पडला असेल;

किंवा...

आभाळाच्या निळ्या नभपटलावर;
उधार घेतलेल्या तेजाने वलयांकित असलेला...
क्षयग्रस्त चंद्रमा,
प्रकाशाच्या अस्तित्वात स्वतःचे अस्तित्व हरवून जाण्याचा प्रघातच बंद होईल...

नश्वरतेचा हा शाप दोन ध्रुवांच्यामध्ये पसरलेल्या या असीम धरेलाही बाधेल...

तेव्हा...तेव्हा...
दिक्कालाच्या या विनाशी शापातुन अबाधित राहिलेला...

एक थंड.........आणि तरिही जळालेल्या कोळशासारखा आपल्यातच हरवलेला एक तुकडा....
त्या धुंद; कुंद; धूसर; धूरकट अंधारलेल्या प्रकाशात भटकेल....


पण कल्पांताच्याही पलिकडे जाणा-या विचारांना वाटतं....

एक विनाशाच्या वादळाला थोपवून धरणारं....
अविनाशी...अन्....अनाहत
शब्दांचं अग्निवादळ....
उडत उडत विनाशाच्या परिघाला ओलांडुन...
काळवंडुन विझत चाललेल्या सुर्यावर जाऊन पडेल.....
तर...

सुर्याच्या कलेवरात चैतन्याचं एक नवीन वादळ उठेल...
त्याच्यातल्या सृष्टी फुलवणा-या दीप्तीमान प्रभेच्या अस्तित्वाचं!!!
===============================
सारंग भणगे. (३१ मार्च २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...