Sunday, December 30, 2012

Poem on me

शब्दयोद्धा कल्पवृक्षा
दीर्घ प्रतिसाद दायका
जिजाऊ शिवराय भक्ता
लाडकया सारंग दा ॥१॥
.
तुझ्या ठाई कल्पनाशक्ती
तुझी कवितेवरती भक्ती
अगाढ तुझा शब्दसाठा
लाडकया सारंग दा ॥२॥
.
भाग्यवान कम्यूनिटी
तू जिचा सेनापती
आता क्षतीची ना भीती
लाडकया सारंग दा ॥३॥
.
नवनवे काढून विषय
वातावरण मंगलमय
तू कल्पनांचा विजय
लाडकया सारंग दा ॥४॥
.
जमविशी गाठीभेटी
तत्पर नेहमी मैत्रीसाठी
तूच शिक्षक तूच दोस्ता
लाडकया सारंग दा ॥५॥
.
काही नियम जरी चुकले
तू पटकन सांगितले
तुझ्यावरून कितीक शिकले
लाडकया सारंग दा ॥६॥
.
तू प्रेरणादाई शक्ती
तू मैत्रीची संपत्ती
तू दिलेस किती किती
लाडकया सारंग दा ॥७॥
.
स्क्रॅप योगे जिंकशी मने
फुलविशी विचार सुमने
आनंददायी तुझे असणे
लाडकया सारंग दा ॥८॥
.
हे सारंग वर्णन स्तोत्र
क्षद्देने जो सदा पठे
सदैव सर्व गुण संपन्न
मित्रसंपत्ती तया भेटे ॥९॥
.
॥ इति श्री ऑरकूट पुराणे कविता खंडे सारंग वर्णन स्तोत्र संपूर्ण ॥

- Tushar Joshi

Monday, December 24, 2012

स्वराज्याची शपथ

मराठमोळ्या मातीमध्ये मत्त मातली म्लेंच्छ-भुते,
मर्द मराठे मरून उरली जिवंत त्यांची भ्याड भुते.
 
झुगारण्या ते अजस्त्र जोखड मावळ-स्कंधी रुतलेले,
उभारण्या ते अवनत मस्तक यवन पदांशी झुकलेले.
 
पराक्रमाच्या नावेमधुनी संकट सिंधू तरावया,
गिरी रायरी सारे जमले अरि निर्दालन करावया.
 
नेत्रांमधल्या स्फुल्लींगांची तप्त अर्पिली खूप फुले,
छातीमध्ये स्वातंत्र्याच्या दृढ स्वप्नाचा दीप जळे.
 
धमन्यांमध्ये उसळत जाते अभिमानाची लाट नवी,
ओठांमध्ये जयघोषाची गीते गाती वीर कवी.
 
धडधडणाऱ्या काळजातुनी प्रदीप्त तारा तडितेच्या,
भळभळणाऱ्या बोटांमधुनी धारा रक्तिम सरितेच्या.
 
विशाल भाळी तिलक रेखुनी दिली गर्जना वकुबाने,
स्वातंत्र्याचे तख्त स्थापण्या शपथ घेतली शिवबाने.
===================================
सारंग भणगे. (२७ नोव्हेंबर २०१२)
 

Sunday, December 23, 2012

Sachin Tendulkar retires from ODI

Finally He called it a day! While I was looking forward for Him to retire, when I hear it, I feel sad. It perhaps is similar feeling when someone you love passes away after a long ailment. You are fade up of his age & ailment, but losing him is still a great pain to you, because you always loved him.

Good Bye the Hero of Indian Cricket! You could have done this when you were at the peak of revere...nce for every Cricket lover just about 21 months back. You didn't play a single one day international after that, but took 21 long months to announce your retirement. If you had retired then, the feeling of all of us would have been utterly different. Nevertheless, we still love you and love you a lot!

You entertained us for so many years and we remembered you countless of times. You are an icon of Indian Cricket and a living legend who will be talked about for centuries. Your contribution to Indian Cricket is invaluable. You stood strong in all odds - shameful defeat in 1996 World Cup, Bookie rackets making all fouls in this Gentlemen's game, monkey gate scandal and many more matters like this. You emerged even stronger every time when criticism or injuries inflicted upon you, and you answered every time by your performance, and we actually witnessed someone proving our childhood lesson of ‘action speaks louder than words’!. We see lot of larger than life heroes in Cinema, but we know that this all is mere fiction. But with you, we have stories to tell to our next generation, of real life hero who, we witnessed living a life, which was truly ‘larger than life’. You always modestly responded to the praise and kept your feet always on the ground. We salute to your courage, faith in cricket and your immortal spirit to play.

Anyway, I have no words to offer in your praise. I would just finish saying that you will always persist in our hearts as our ‘Real Hero’, and that we would long cherish your innings. In today’s time, if someone asks me to show a Role Model who can inspire us to keep doing good work, I would have no hesitation to look upon you as the same.

Friday, December 21, 2012

एकदा तरी

पडेल का हवे तसेच दान एकदा तरी?
जमेल का कधी गझल महान एकदा तरी?
 
सखे, तुझ्या मनास जिंकण्या विडाच घेतला,
तुझ्या मुखात रंगु देत पान एकदा तरी.
 
पिऊन रूप चांदणे अवीट लाघवी तिचे,
अता तरी मिटेल का तहान एकदा तरी.
 
प्रदीर्घ रात्र वाटते तुझ्या विना मला प्रिये,
कुशीत ये नि वाटु दे लहान एकदा तरी.
 
अखेर रंगलीस तू कवेत माझिया सखे,
घडेल का असे खरे निदान एकदा तरी.
==========================
सारंग भणगे. (२० डिसेंबर २०१२)

Thursday, December 6, 2012

निरोप ..

पापण्यांच्या पाकळ्यांवर जमलेले दव
ओघळत राहिले हळुवार ..
कित्येकदा, त्या वेळी ..
...

दाटलेल्या कंठात शब्दांची गर्दी
अडखळली वाक्ये
कित्येकदा त्या वेळी ..

थरथरत्या मनात, भावनांचा प्रपात
लपवले कंपित हात,
कित्येकदा त्या वेळी..

अखेरची नाही भेट, जुळतील वाटा पुन्हा
समजावले मनाला,
कित्येकदा त्या वेळी..

चिडलो, रडलो, हसलोही जरा खिन्नपणे,
नेमका निरोपच घ्यायचा राहिला ..
अखेरचा .. त्या वेळी ..

-कल्याणी
पहाटे १:४५

टिप : 'Life of Pi' चित्रपटातील एका प्रसंगाने प्रेरित !
========================================================================

कविता अत्यंत सुरेख आहे!
 
पापण्यांच्या पाकळ्या, त्यावरल दंव, अर्थात अश्रू, हे कदाचित नवीन नसेल. परंतु यातून कवियित्री एक भावनिक मार्दव शब्दातून निर्माण करते. समोर उभी राहते, एका खिन्न फुलाची अश्रूत भिजलेली पाकळी......
 
मला यात 'रडणे' हि प्रक्रिया अपेक्षित नसून, त्यातून मनाची खिन्नावस्थाच अधिक प्रतीत करण्याचा प्रयत्न कावियीत्रीचा प्रयत्न असावा असे वाटते.
 
'कित्येकदा त्यावेळी' हि कवितेची मध्यवर्ती theme. इथे त्यावेळी म्हणजे नक्की कुठल्या वेळी (?), किंवा नक्की काय घडले असताना हे कवियित्री कुठेच स्पष्ट करत नाही. परंतु त्यामुळेच वाचकाच्या मनात त्याच्या जीवनाशी निगडीत एखादा प्रसंग आपोआपच उभा राहतो आणि पहिल्याच फटक्यात हि कविता केवळ कावियीत्रीची न राहता, कवितेच्या मुलभूत वैश्विक अपेक्षित नियमानुसार ती कविता सर्वांची होते, खऱ्या अर्थाने वैश्विक होते.
 
इथे मनाची ती खिन्नता, उद्विग्नता, विषण्णता अधिक गहिरी होते कारण 'त्यावेळी' अशी मनाची अवस्था 'कित्येकदा' झाली होती, ती अनामिक मूक असावे कित्येकदा गळाली होती, यातून ती भावगहनता अधिक प्रतीत होते, त्यातील आर्तता अधिक अधोरेखित होते.
 
सुरुवातीलाच पकडलेला हा सूर संपूर्ण कवितेमध्ये मग पुन्हा कधी ढळतच नाही......उलट तो अधिक अधिक उत्कट होत जातो.
 
अशा मानस अवस्थेमध्ये शब्दांचे मुके होणे, हातांचे कंपित होणे....हे सारे स्वाभाविक शारीरिक आणि मानसिक परिणाम अत्यंत परिणामकारकरित्या कावियीत्रीने मांडले आहेत, आणि ते देखील कवितेतील भाव-सूर कुठेही फार कमी-अधिक होऊ न देता! आणि प्रत्येक वेळी 'त्या कुठल्यातरी अनामिक वेळी' हे घडले आहे हे वारंवार मांडून वाचकाला त्या प्रसंगाबद्दल औत्सुक्य निर्माण करतानाच त्याच्या जीवनातील कुठल्याही भाव-व्याकूळ प्रसंगाचे स्मरण करून देण्याची ताकद या कवितेच्या ओळींमध्ये जाणवली.
 
हि सारी भावावस्था अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडताना कवितेतील काव्यभाव इतका सुरेख सांभाळला आहे कि वाचक आपोआपच कवितेच्या ओळींमध्ये तल्लीन होऊन जातो. मनाचे कोमेजणे इतके सुंदर फुलवले आहे कि जणू दु:खानेच शब्दांचा शृंगार केला असावा!
 
कंठाचे दाटणे, शब्दांचे आटणे हे इतके स्वाभाविक भाव अत्यंत संयत उत्कटतेने प्रकट झाले आहेत. इथे माझेही शब्द आता मला सांगत आहेत कि इतक्या सुंदर ओळींवर तुझ्या शब्दांचा साज चढवण्याचा प्रयत्न वृथा आहे, तो करू नकोस. नाहीतरी चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कशाला हवे!
 
'अखेरची नाही भेट'.....हा आशावाद भासेल कदाचित, पण तो भाबडाच आहे हे 'समजावले मनाला' मधून लगेचच स्पष्ट होते. इथे पुन्हा अशा भावावास्थेमध्ये उलगडणारा मनाचाच पुन्हा एक भाव-पदर. ती भेट कदाचित शेवटचीच असेल हे माहित असते, परंतु मन ते मनात नाही. त्यावेळी नाही, आणि नंतरही कित्येकदा नाही. मी स्वत: अशा प्रसंगातून गेलेलो आहे. त्यामुळे या शब्दातून काय सांगायचे आहे त्याची अनुभूती मी घेतली आहे.
 
पुन्हा एकदा असे ते मनाला समजावणे कित्येकदा घडते आणि मनाची भावविभोरता अधिकच ठळक होते.
 
कवितेचा शेवट केवळ अप्रतिम आहे! तो वाचल्यानंतर क्षणभर श्वासच थांबतो.
 
तो प्रसंग असा काही असतो कि त्यात केवळ रडणे नसते, चिडणे आहे, रडणे आहे, त्रागा करणे आहे, खोटे खोटे हसणे आहे. अनेक भावनांचे नर्तन मनात चालू असते कारण ते कुणाचे तरी दूर जाणे हे सहनशक्तीच्या पलीकडचे असते. तो वियोग साहणे जड असते. आणि त्या प्रसंगाला भावनांचा असा कल्लोळ स्वाभाविक असतो.
 
परंतु तिथेच ती चूक घडते. या भावनांच्या भरात कवियित्री इतकी वाहून जाते कि दूर जातानाचा निरोप राहून जातो.................... केवढी हि हुरहूर मागे ठेऊन जातो हा प्रसंग! ज्याच्या विरह भावनेत मनामध्ये इतका कल्लोळ माजला आहे, ती व्यक्ती किंवा गोष्ट दूर जाताना 'शेवटचा निरोप' हि राहून जावा! हो, इथे मला Life of Pie मधला तो प्रसंग आठवला.......
 
कविता वाचायला सुरुवात करण्याच्या आधीच वाचले होते कि हि कविता Life of Pie वरील प्रसंगावरून लिहिली आहे. परंतु स्पष्ट नव्हते झाले कि तो प्रसंग कोणता? कविता सुंदरच असल्याने लिहिता लिहिता लिहित गेलो. अगदी या शेवटच्या ओळींवर लिहित गेलो आणि 'शेवटचा निरोप' हे शब्द लिहिले आणि त्यानंतर मग अचानक Life of Pie मधला वाघाच्या जंगलामध्ये निघून जाण्याचा प्रसंग उभा राहिला.
 
हि कविता इथे संपूर्ण यशस्वी होते. कारण आधी माहित असूनदेखील वाचक कवितेवर विचार करताना ती एका विशिष्ट प्रसंगावर आधारित आहे हे विसरून जातो; आणि जेव्हा शेवटला पोहोचतो, तेव्हा तो प्रसंगच त्याला आठवतो. म्हणजे कुणाला तरी कुठल्या ठिकाणाचा रस्ता विचारावा, त्याने सहज गप्पा मारता मारता बरोबर चालायला लागावे, त्याच्या गप्पा इतक्या मनोरम असाव्यात कि आपण गप्पात हरवून; हरखून जावे आणि आपल्याला कुठे जायचे आहे ते विसरावे, आणि अचानक त्याने आपल्याला जिथे जायचे होते तिथे आणून सोडावे............असेच काहीसे झाले हे!
 
सुरेख कविता!!!!

--
सारंग भणगे

Sunday, November 4, 2012



मित्रा ,
रस्त्यावरच्या दगडांना
मायबाप नसतात
...
ते ठोकरा खाण्याकरिताच जगात असतात ..
ꣲॺ
मित्रा ,
माणसाला दुखा:श्रू गाळायला
छोटासा धक्काही कारणीभूत ठरतो
आनंदाश्रू गाळायला मात्र
आभाळभर आनंद हवा असतो ...
ꣲॺ
लोक आपल्याला डिवचतात
शिव्याशाप देतात
पदोपदी भांडतात
नाही नाही ते बोलतात ...
याचाच अर्थ आपण जगत असलो पाहिजे !
निच्छितच जगत असलो पाहिजे
उगाचच काय लोक आपल्याशी असे वागतात
मेलेल्यांशी थोडीच असं वागत असतात ...!!!
ꣲॺ
तेव्हा मित्रा
दुखः वाटून घ्यायचे नसते
वाटूनच घ्यायचे झाल्यास
जखम वाटून घ्यावी अर्धी अर्धी
आपसातच दोघांनीही ...............!!

अरविंद पोहरकर
=======================================================================================

कविता कशाला म्हणायचं? हा प्रश्न कधी कधी फारच गहन होत जातो. आशयाचा अभाव असलेल्या, म्हणजेच एका अर्थाने आत्माच हरवलेल्या, कित्येक काव्य सदृश रचना आपण अनेकदा वाचतो, पाहतो. त्यांना कविता म्हणावेच लागते, कारण त्या रचना या पद्यात्मक असतात.

याउलट कित्येक रचना या मुक्तछंदामध्ये सहज लेखणीतून झिरपलेल्या असतात, परंतु त्या मनावर कितीतरी खोल ठसा ठेऊन जातात. त्यातील आशय विचार गर्भ असतोच परंतु तो विचार करायला प्रवृत्त करणारा देखील असतो. परंतु त्यांची रचना काही वेळा काव्याच्या (खरेतर पद्याच्या म्हटले पाहिजे) मूळ नियमांमध्ये बसत नसते. अर्थात, अशा अनेक रचना मुक्तछंदीय कविता म्हणून सर्वमान्य आहेतच. परंतु तरीही या कवितेच्या निमित्ताने काव्य आणि पद्य, (कवितेचे) तंत्र आणि मंत्र याविषयी विचार मनात येऊन गेले.

अरविंद पोहरकरांच्या काव्यरचना यापूर्वी मी वाचल्याचे स्मरत नाही. त्यामुळेच कदाचित मी त्यांच्या कवितेविषयी मनामध्ये काहीच गृहीत न धरता, कुठलाही पूर्वग्रह किंवा अपेक्षा न बाळगता त्यांच्या या कवितेचा रसास्वाद घेऊ शकलो.

अरविंदजींची हि कविता मला तरी उत्स्फूर्त कवितेचे उत्तम उदाहरण वाटते. कवितेचा जन्म कदाचित अभिव्यक्ती (केवळ व्यक्त होणे नाही) या साठीच झाला असला पाहिजे, आणि हि कविता म्हणजे अभिव्यक्तीचा उत्तम नमुना वाटते. कदाचित विषयांतर होईल आणि कदाचित माझा मुद्दा विवादास्पद देखील होईल, परंतु माझा हाच मुद्दा अधिक सुस्पष्ट करण्यासाठीच मी हे विधान करण्याची हिम्मत करतो कि, काही वेळा सुरेश भट साहेबांच्या काही गझलादेखील या कलाकृती म्हणून उत्तम असल्या तरीही त्या मध्ये कृत्रिमतेचा भास होतो किंवा त्या थेट काळजाला जाऊन भिडत नाहीत. त्या कौशल्यपूर्ण वाटतात; परंतु भावपूर्ण वाटत नाहीत. याउलट जर बहिणाबाईंची कुठलीही रचना पहिली तर त्यामध्ये भावार्तता ओतप्रोत भेटते. त्यामध्ये कौशाल्याहून अधिक आशय गर्भता आणि भावपुर्णता अधिक वाटते. ती कविता थेट मनाला जाऊन भिडते, कायम लक्षात राहते. (मी हे माझे वैयक्तिक मत नोंदवत आहे, यामध्ये दोन कवींची तुलना करण्याचा उद्देश नाहीच, परंतु मी या कवींचा फार सखोल अभ्यास केला आहे असा दावा देखील नाही.)

असो, अरविंदजींची हि रचना अशीच सखोल आशयाने परिपूर्ण अशी वाटते. एकाच कवितेमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील काही विविध वैषम्यांना स्पर्श केला आहे, आणि त्या वैषम्यामध्ये असलेल्या वैगुण्यावर भाष्य करण्यापेक्षा कुठेतरी नकळत एक सकारात्मक संदेश त्यामध्ये दडला आहे. माझ्या मते कविता लिहिताना कवीचा कुठेही असा सकारात्मक किंवा विधायक संदेश देण्याचा विचार नव्हता, तर मनामध्ये निर्माण झालेल्या भाव-विचारांना व्यक्त करणे इतपतच स्फूर्तीने लिहिलेल्या या कवितेतून तो सकारात्मक संदेश आपोआपच प्रकट झाला आहे. तो संदेश किंवा विचार हा कवितेचा गाभा न बनता त्या वैषम्यावर केलेले समांतर भाष्य होऊन जाते.

कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य जे मला जाणवले ते म्हणजे कवितेमध्ये स्पर्श केलेले वैषम्य आणि त्यावरील विचारात्मक भाष्य हे दोन्ही इतके नेमके आहे कि त्यामध्ये आवश्यक संदेशात्मक भाष्य अंतर्भूत आहेच, परंतु तरीही त्या वैषम्यावर विचार संपला आहे असे वाटत नाही, किंबहुना तो विचार तिथून पुढे सुरु होतो, आणि अशा तऱ्हेने हि कविता तुम्हाला विचारप्रवण करते.

"आनंदाश्रू गळायला आभाळभर आनंद हवा" हे सांगताना आपण दु:ख करत राहतो असे सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण वेचायला विसरतो हि किती निराळ्या पद्धतीने सांगितले आहे, आणि मग पुढे आपण तो आनंद कसा वेचू शकतो यावर विचार करायला आपल्याला प्रवृत्त केलेले आहे. थोडे लिहून खूप काही सांगणे आणि खूप पुढे विचार करायला भाग पडणे हेच तर कुठल्याही रचनेचे यश असू शकते.

प्रत्येक विचारामध्ये एक प्रकारच नाविन्य देखील आहे. दगडांना ठोकर खाव्याच लागणार हे कठोर सत्य प्रामाणिक निष्ठुरपणे मांडतानाच अखेरीस जखमा वाटून घेण्याचा विचार मला कवितेमध्ये भासलेल्या त्या सकारात्मकतेचे प्रमाण तर आहेच, पण सुरुवातीला नकारात्मक वाटणारी कविता तिथे पूर्ण होते असे वाटते. साऱ्याच समस्यांना उत्तर नसते, साऱ्याच समस्या सोडवता येत नसतात; तर त्या समस्यांचा जीवनातील नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी काही उपाय करता येतात याचे हे उत्तम उदाहरण होते. एखादा अपंग व्यक्ती पुन्हा कदाचित धडधाकट होऊ शकत नाही. या समस्येला कदाचित वैद्यकीय पर्याय नसेलही, परंतु त्या व्यंगामुळे हतबल होऊन जीवनाला नाकारण्यापेक्षा व्यंग नसलेल्या अवयवांना जीवनामार्गात वापरावे असाच काहीसा धडा या विचारातून मिळून जातो.

लोकांचे शिव्याशाप थांबवता येत नाहीत हे तर जगन्मान्य सत्य. परंतु ते शिव्याशाप हेच जिवंतपणाचे एक लक्षण असू शकते असा विचार कितीजणांनी केला असेल. हा दृष्टीकोन किती बरोबर; किती चूक, किती उपयोगी कि कितपत प्रत्यक्षात आणणे शक्य या वृथा चर्चेपेक्षा हा देखील एक दृष्टीकोन असू शकतो, हा विचार मला अधिक आकर्षक वाटतो. तिथेच पुढील विचारांना सुरुवात होते.

मी या कवितेला कुठलीही विशेषणे देणार नाही. बरेचदा विशेषणांमुळे कवितेविषयी एक पूर्वग्रह निर्माण होऊ शकतो. म्हणून मी इतकेच म्हणू इच्छितो कि या कवितेला रात्री उशाशी घेऊन झोपावे, कदाचित एखाद्या चीठो-यावर लिहिलेल्या त्या कवितेचे सकाळी उठे पर्यंत एक पुस्तक झालेले असू शकते!

Thursday, October 4, 2012

धांदल गडबड

जीवन यात्रे सवे संपली धांदल गडबड,
उरलेल्यांची आणि उडाली धांदल गडबड.

ओढत होतो रहाट गाडे संसाराचे,
चाकच तुटले आणि उडाली धांदल गडबड.

माणूस होता किती चांगला किती म्हणती,
'जाण्याची' का केली त्याने धांदल गडबड!

अंतर्यामी ज्ञान प्रवाहित होते तेव्हा,
शब्दांची मग संपत जाते धांदल गडबड.

तारुण्याच्या मस्ती मधला कैफ आगळा,
शैशवकाळी नुसती असते धांदल गडबड.
==========================
सारंग भणगे

Saturday, August 25, 2012

काहूर

जळलेल्या काळजाचा धूर
ध्वस्त मनातील काहूर
स्वप्ने विरून गेलेली
जळून गेलेला कापूर.
उदासीचे शेवाळे दाटले
तळ्यातले पाणी आटले
एक तारा निखळला अन
मनाचे अवकाश फाटले
सारीच गाणी विराण्या
मनात मरण कहाण्या
काळजात फक्त जखमा
साऱ्याच जुन्या पुराण्या
स्वप्नांचे इमले कोसळले
दीपस्तंभ हि ढासळले
फोफावले दु:खाचे तण;
आशांचे तृण काजळले
अस्तित्व गेले खंगून
जिजीविषा गेली भंगून
आता झालो एक शून्य
गेलो अनंतात रंगून
================
सारंग भणगे. (१९ ऑगस्ट २०१२)

सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही

पतंग बनुनी उगाच गगनी फिरत राहिलो कधी
पाण्यामधल्या पानासम अन वाहत गेलो कधी
शब्द तुझे मी स्तब्ध होउनी कधी ऐकले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
 
सूर्य जाहलो नभी एकटा उगवुन मी मावळतो
चंद्राभवती अगणित तारे म्हणून त्यावर जळतो
गगन मंडपी भेटावेसे स्वप्न पाहिले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
 
वाटांवरती एकलकोंड्या तिचीच सोबत होती
मृगजळ होऊन माझ्या पुढती प्रियाच चालत होती
हात सोडणे होते नशिबी धरणे जमले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
 
चिरविरहाने डोळ्यांमध्ये अश्रू वाहत होते
दृष्टी पुढचे दृश्य धुक्याचे धूसर धुरकट होते
पुढ्यातले ते रूप प्रियेचे, मजला दिसले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
 
हाक मारता एक जरी तू धावत आलो असतो
वादळ वारे काहूर सारे फोडत आलो असतो
जरी घुसळला अवघा सागर अमृत तरले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
 
मुकी आंधळी प्रीत आपली सरली सरणावरती
तुझे वराती मुकेच रडती माझ्या मरणावरती
तुझी पाठवण करून आता काही उरले नाही
सांगितलेही नाही तू अन मला समजले नाही
=============================
सारंग भणगे. (२५ ऑगस्ट २०१२)

Monday, July 23, 2012

चादर

झाकून चादरीने माझ्या कलेवराला,
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला.
 
टाकून चादरीला जेव्हा पुढे निघालो,
तोडून पिंजऱ्याला पक्षी नभी उडाला.
 
या चादरीस माझ्या ठिगळे जुनी पुराणी,
घेतो शिवून जखमा ज्या जाहल्या मनाला.
 
मावेचनात सारी या चादरीत माझ्या,
स्वप्ने हजार लाखो ती टांगली नभाला.
 
आयुष्य चादरीचे आहे परोपकारी,
झाकावायास जगते साऱ्या चराचराला.
---------------------------------------------
सारंग भणगे (२० जुलै २०१२)

Sunday, July 22, 2012

जादूची चादर

करतो आहे तुमच्या समोर
आता मी सादर
माझ्या जवळ आहे मुलांनो
एक जादूची चादर.
 
चादर हि पांघरलं तर
होऊन जाल गुडूप,
आणि मग जाता येईल
कुठेसुद्धा गुपचूप.
सारेच करू लागतील तुमचा
खूप खूप आदर,
अशी आहे माझ्या जवळ
एक जादूची चादर.
 
आणि बसलात चादरीवरती
मांडी ठोकून छान,
उडेल हवेत ती झाले कि मग
फिरायला मोकळे रान.
कुठल्या जायचे चौपाटीला
जुहू बांद्रा कि दादर,
अशी आहे माझ्या जवळ
एक जादूची चादर.
------------------------------
सारंग भणगे (२१ जुलै २०१२)

Saturday, July 21, 2012

विस्कटलेली चादर

मी उलगडलेली चादर तिने नेहेमी घडी करून ठेवली,
पण एकदा मात्र ती, चादरच विस्कटून निघून गेली.

माणूस मी विस्कटलेला तरी, कसातरी सावरलो,
पण तेव्हा पासून मात्र चादर आवरायलाहि बावरलो.

आता असतात माझ्या घरात त्या चादरी तशाच पडून,
सांगतात घड्या त्यांच्या, 'गेलय बराच काही घडून'.
 
चादरींचे ते बोळे मी तर आता साधे बघतही नाही,
खर सांगू मित्रांनो, मी तर आता साधे जगतही नाही.
---------------------------------------------------------
सारंग भणगे (२० जुलै २०१२)

Wednesday, July 18, 2012

बाहुपाशी घे मला

बाहुपाशी घे मला होऊनी तू शिंपला,
जोखडात प्रीतीच्या वृषभराज जुंपला,
तनु रणात या जणू शाल्व-शंख फुंकला,
ऋण तरुण रात्रीचे फेडता तू जिंकला.

करू गुन्हा रे सख्या पुन: पुन्हा सारखा,
मिलनात माझिया स्वत:स हो तू पारखा,
च-हाट चालू दे तुझे; चालू दे हा चरखा,
नकोत ऋतू मास नि नकोत वार तारखा.

देह हा जणू कळी, हरेक वेच पाकळी,
होऊनी भुजंग तू कवळून घे हि कर्दळी,
माझिया गळ्यातली अतूट हो तू साखळी,
श्वास होऊनी सख्या भरून टाक पोकळी.
------------------------------------------------
सारंग भणगे. (१८ जुलै २०१२)

Monday, July 16, 2012

रंग मोराचे फिकेसे वाटले

एवढे का तू मनाला लावले
सोड आता जाहले ते जाहले

पावलांचे माग मागे सोडले
आपसूकच संकटांचे फावले

ज्या सुखांचा घेत होतो शोध मी
"बोध" होता मीच त्यांना टाळले

एवढी झाली सुखाची ओल की
गंज माझ्या लेखणीला लागले

दु:ख होते अंतरी त्याच्या खुणा
काव्य माझ्या जीवनी फोफावले

पाहताना पंढरीचा सावळा
रंग मोराचे फिकेसे वाटले
-----------------------------------
सारंग भणगे (१६ जुलै २०१२)

Friday, June 29, 2012

तू

हाताच्या रेघांवर तू नसलीस
तरी काळजाच्या रेघांवर अजूनही तूच आहेस...

पाऊस जरी पडला नाही तरी,
गदगदलेल्या आभाळात तूच आहेस......

आलेल्या पत्रांच्या शाईत तू कुठेच नव्हतीस,
पण जाळलेल्या पत्रांच्या राखेत तूच आहेस...

माझ्या उषेच्या प्राचीत तू कधीच नव्हतीस,
पण मावळणाऱ्या संध्याछायेत तूच आहेस......

माझ्यावर झालेल्या वारांमध्ये तू कधीच नव्हतीस,
पण झालेल्या प्रत्येक जखमेत तूच आहेस......

माझ्या जगण्यात तू कणभरही नव्हतीस,
पण माझ्या कणाकणान मरण्यात तूच आहेस......
---------------------------------------------------------------
सारंग भणगे (२९ जून २०१२)
 

ठिणगी

कवितांचा पेटवी वणवा
या काळजातली ठिणगी
आभाळभर बोलू लागे
माझी अबोल मुलगी.

शब्दांवर शब्दांचे घर्षण
कवितेची ठिणगी उडते
नि केव्हा हृदयावरती
कवितेची ठिणगी पडते.

कवितांच्या वाचून ठिणग्या
कधी विशाल क्रांती पेटे
नि जीवनी वेचून ठिणग्या
कविता विशाल होते.

कधी ठिणग्या विझून जाती
उरते नुसती धगधग
कवितांमधून मग वाहे
ओसाड नदीची तगमग.

कधी अशी पडावी ठिणगी
या भाव उदधि माझ्या

कवितांच्या भगव्या लाटा
जाळती मनास माझ्या.

हे स्थंडिल व्हावे जीवन
अन त्यात पडावी ठिणगी
कि चेतविण्या ज्वाळांना
हे जीवन व्हावे ठिणगी.
--------------------------------
सारंग भणगे (२९ जून २०१२)

Thursday, June 28, 2012

जीवना

फार झाल्या जीवनाच्या यातना
तू विजेता हारलो मी जीवना

भारताच्या संस्कृतीची थोरवी
भूतकाळाच्याच साऱ्या वल्गना

काय डोळे हे इशारे बोलती
ओठ थोडे खोलुनी तू सांग ना

दूर ती गेली तरी ना एकटा
आज माझ्या संगतीला वेदना

जिद्द आहे जिंकण्याची; याहुनी
दैव देते कोणतीही साथ ना

नित्य नेमे पाहतो फोटो तुझा
ही नसे का दिव्य माझी साधना!

वादळा धावून ये तू अंगणी
मी उभा दारी तुझी जा खैर ना
===================
सारंग भणगे. (१९ जून २०१२) 

Sunday, June 17, 2012

ओढ वेदनेची

जखमा फुलून आल्या
हृदयावरी फुलांच्या,
शृंगार साज केला
अश्रूतुनी दवांच्या

मज ओढ वेदनेची
काट्यातुनी फुलावे,
चुपचाप अन रडावे
वक्षात यामिनीच्या

प्रेतास पाकळ्यांच्या
अभिप्रेत शोक आहे,
गाणे समीर गातो
शोकात मूक त्यांच्या

काही सुकून गेल्या
दु:खाविना कळ्याही,
वेचावया न कोणी
त्या सोबती क्षणांच्या

त्या साद घालती का
मेघास आर्त वेड्या,
त्याने तरी रडावे
डोळ्यातुनी ढगांच्या

हे गीत वेदनांचे
कोणास गीत वाटे
गाणे न या कहाण्या
गंधार्त जीवनाच्या.
=============
         सारंग भणगे (१७ जुने २०१२)

Saturday, June 16, 2012

खपली

=१=
जखमा इतक्या झाल्या कि
वाट पाहतो सरणाची,
आता तरी खपली धरावी
जगण्यावरती मरणाची.
=२=
जखमा म्हणजे फुलणे असते
खपली म्हणजे सुकणे,
जखमा म्हणजे वाहत राहणे
खपली; 'त्याला' मुकणे.
=३=
इतक्या जखमा देशील का रे
चाळण होईल आत्म्याची,
फुलेल ओल्या जखमांवरती
खपली माझ्या कवितेची.
==================
सारंग भणगे. (१४ जून २०१२)

Monday, May 14, 2012

हासली ती


हासली ती का मला तो भास झाला,
हाय दोन्ही कल्पनांचा त्रास झाला.

काल त्याला पाहिले जादूच झाली
तोच आता जीवनाचा श्वास झाला.

बाहुपाशी ज्या सखीच्या धुंद झालो,
बायको होताच त्याचा फास झाला.

नाच गाणी लाज लज्जा सोडलेली,
त्यात भक्ती आणली की रास झाला.

देवकीचा तान्हुला पाळे यशोदा,
मातृप्रेमाचा नव्हे हा ऱ्हास झाला.

जीवघेण्या यौवनाच्या स्वामिनीचा,
जीव घेण्या काळ जाता दास झाला.
-------------------------------------------
सारंग भणगे. (६ मे २०१२)

Tuesday, April 24, 2012

बिखरे पन्ने


हर एक पन्ने पे शुरू एक नयी किताब है;
हर एक याद एक पुरा हुआ ख्वाब है.

बिखरे है पन्ने या सुलझे है कई सवाल;
हर पन्ने पे लिखा शायद कोई जवाब है

है पड़ी कितनी सारी बंद किताबे दुकान में;
बिखरे पन्ने याने जैसे खुली हुई किताब है

खुला हूँ ऐसे मै जैसे खुला असमान, वर्ना
लोगो के चहरोंपे जाने कितने नकाब है.

पन्ने होंगे बिखरे हुए हुजुर ये आपके लिए
मेरे लिए तो वो मेरी साँसे अजी जनाब है
----------------------------------------------
सारंग भणगे (२४ एप्रिल २०१२)

Saturday, April 21, 2012

योग नाही


पावसाने आज यावे योग नाही
ती भिजावी मी पहावे योग नाही

जाग येते राग येतो या दिसाचा
ती निजावी मी बघावे योग नाही

पाठमोरी पाहताना नित्य वाटे
ती हसावी मी भुलावे योग नाही.

रातराणी पाहताना रोज वाटे
ती फुलावी मी खुलावे योग नाही

मीच परवाना शमा ती का नसावी,
ती जळावी मी जळावे योग नाही

जीवनाच्या खिन्न वाटा चालताना
ती वळावी मी दिसावे योग नाही
------------------------------------
सारंग भणगे. (२० एप्रिल २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...