Friday, October 12, 2018

इकडे तिकडे कितीही फिरलो तुझ्याचसाठी राखीव मी

इकडे तिकडे कितीही फिरलो तुझ्याचसाठी राखीव मी
तुझाच होतो तुझाच आहे तुझाच राहो आजीव मी

काडतूस मी माझ्यामध्ये दारू भरली ठासून पण
बंदुकीमधे भरले नाही म्हणून आहे निर्जीव मी

काळीज म्हणे दु:खाला की बेट्या छिन्नी आहेस तू
घाव घातले म्हणून झालो सुंदर मंदिर कोरीव मी

भावभावना विचार ह्यांनी ओबडधोबड होतसे मन
अमिबा त्याच्या मनात म्हणतो मनापुढे तर रेखीव मी

युद्ध तसे तर चालू असते शस्त्रे केवळ निरनिराळी
स्वकियासंगे लढण्या धरले पेनस्वरूपी गांडीव मी
===========================
सारंग भणगे (८ आॅक्टोबर २०१८)

Thursday, October 4, 2018

मन देखील चिरता येतं

पोळलेलं असतं खूप
कुणी फुंकर मारणारंही नसतं जवळ
तेव्हा...
रडू सुद्धा येत नाही आजिबात

काळीज फाटलेलं असतं
आभाळाहून अधिक
एकटं बसून रहातं खोपटामध्ये
जवळ गेलं तर फिस्कारतं
दुरून पाहिलं तर...
ओक्साबोक्शी रडतं,
एकांतात

विळीवर कांदा चिरावा सहज
मन देखील चिरता येतं तसं
पाकळी पाकळी वेगळी होते
पाणी येतंच तेव्हा डोळ्यातून

एकदा भांडीकुंडी मांडायची 
मनाच्या साऱ्या वेडगळ स्वप्नांची
खूप वेळ खेळून
मग लाथाडून मोडून टाकायची
त्याला कळतं तरी...
मांडायचं ते सारं मोडायचं असतं

शेवटी होडी करून मनाची
द्यायची सोडून
पावसाच्या...आसवांच्या पाण्यात
आणि पहात बसायचं तिला वहात जाताना
ओली होऊन.... मोडून जाईस्तोवर

- सारंग भणगे (२ ऑक्टोबर २०१८)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...