Tuesday, December 7, 2010

'ई-वर्ले अक्षर'

हे अक्षर जे ई-वरले
ऐकुनी काळीज गहिवरले!

प्रतीभेच्या त्या उज्वल वाटा;
उदधिवरती प्रशांत लाटा;
कुसुमावरती फुलुनी काटा;
रोमांचित ते थरथरले,
ते अक्षर हे ई-वरले II१II

पाऊस बोले अमुची वाणी;
गाई गारवा अमुची गाणी;
ग्रीष्मावरती शिंपून पाणी;
मेघस्वरांनी सरसरले,
ते अक्षर हे ई-वरले II२II

साखरे सारखी गोड अक्षरे;
सुस्वर गाती काव्यपाखरे;
रसिक ऐकती मोदमंदिरे;
भावसुधेने जे भरले,
ते अक्षर हे ई-वरले II३II

आंत्रनेत्र (Internet) तो भिजून जातो;
नभपटलावर (virtual) दिसून जातो;
ह्रुदय-कोंदणी बसून जातो;
मनामनातुन जे अंकुरले,
ते अक्षर हे ई-वरले II४II

मरणानंतर सरणावरती;
फुटलेल्या अन धरणावरती;
पाऊल पडता पर्णावरती;
नाद समेचे कुरकुरले/ चुरचुरले,
ते अक्षर हे ई-वरले II५II
=================
सारंग भणगे. (५ डिसेंबर २०१०)

Saturday, December 4, 2010

संमोहिनी

अशी ही रूपगर्विता चालली वनामध्ये
यौवनास पाहुनी सळसळी मनामध्ये

सांजवात चोरटा छेडतो निलाजरा
हासतो गुलाबही होउनी लाजरा

पावलास स्पर्शता धन्य ती वसुंधरा
चालते; नाचते तृणात ती सुंदरा

गोड बोल बोलते माधुरी ती मोहिनी
घालते सहजचि मोहना संमोहिनी.
================
सारंग भणगे. (४ डिसेंबर २०१०)

Friday, October 8, 2010

सारे मला मिळाले

ह्रदयात साचलेले
सारे तीला कळाले,
पाहून स्मित ओठी
सारे मला मिळाले.

पाण्यात पाहणारे
सारे उगा जळाले,
बेडीत गुंतताना
सारे मला मिळाले.

घेता कवेत तिजला
देहभानही पळाले,
वणव्यात पोळताना,
सारे मला मिळाले.

लावण्य पाहुनी ते
शशी चांदणे गळाले,
चिडवून त्यास थोडे
सारे मला मिळाले.
==========
सारंग भणगे. (८ ऑक्टोबर २०१०)

Tuesday, September 28, 2010

मोरोपंतांची "केकावली"

'सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.
सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो,
वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो.'

लहानपणी शाळेत शिकवलेला एक श्लोक एवढंच त्याचं जीवनात स्थान होतं. पण पुढे कधी तो वाचनात येऊन त्याछ्या अर्थानं, त्याच्या माधुर्यानं अपाण भारावून जाऊ असे खचित वाटलेही नव्हते. पण मोरोपंतांच्या या केकेशी आता चांगलाच परिचय झाला आहे.

या आणि अशाच १२१ सुरस केकांचे 'केकावली' हे प्राकृत भाषेतील अत्यंत प्रसिद्ध काव्य आहे. प्राकृत भाषेला मिळालेली ती एक देणगीच आहे.

'व्यासांनंतर सत्प्रमेय रचनाचातुर्य ज्या लाभले' असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा महाकवि मोरोपंतारचनाही रचना.

काव्याच्या नावातूनच कविच्या महानतेची जाणीव होते. "संसारातील तापत्रयाने पीडित होणा-या मयूराने 'दयामृतघना'च्या वृष्टीसाठी टाहो फोडला. हा टाहो म्हणजे 'केका', व त्यांची ही आवली (अर्थात माला किंवा माळ), अशी ही केकावली".

पण खरेतर, "श्रेष्ठ भगवद्भक्त कवीने स्वोद्धारासाठी आर्त मनाने केलेला धावा" हेच केकावलीचे खरे स्वरूप वर्णन होय. हे काव्य म्हणजे मोरोपंतांचे ह्रद्गतच आहे. म्हणूनच त्याला पंतांच्या काव्यात सर्वोच्च स्थान प्राप्त झाले.

ज्या भवनावेगात ज्ञानदेवांनी भावार्थदीपिका लिहीली, ज्या भक्तीरसाने ओथंबून तुकोबांना गाथा स्फुरली, ज्या उत्कटतेने गदिमांनी श्रीरामचरित्र गीतातून उतरवले, त्याचप्रमाणे प्रभुप्रसादाच्या अत्युत्कट आतुरतेने मोरोपंतांच्या मुखातून केकागंगा स्त्रवली. त्यामुळे केकावली वाचताना ह्रदयांत आनंदाच्या लाटा उत्पन्न होतात.

'दयामृतघना, अहो हरि! वळा मयूराकडे' अशी मोराच्या मुखातून बोलणा-या कविची आर्थ हाक म्हणजे केकावली', हा अर्थ कोणासही आकर्षित करणारा आहे.

'सदाश्रितपदा सदाशिवमनोविनोदस्पदा' या चरणानं केकावलीची सुरूवात होते. हे वाचून कदाचित असं वाटण्याचा संभव आहे कि, केकावली भयंकर क्लिष्ट आहे की काय? पण तसे नाही. पंतांचे काव्य हे प्रसाद गुणाने युक्त म्हणहे सुगम अर्थाचे आहे. पण पंतांचा संस्कृत ग्रंथांचा प्रचंड अभ्यास असल्याने त्यांच्या काव्यात संस्कृतशब्दप्राचुर्य दिसते. सामान्यजनांना जरी केकावली थोडी क्लिष्ट वाटली तरी पंतकाव्याचा थोडा परिचय झाला कि ती सोपी वाटू लागते.

पण पंत भाषेच्या शुद्धिबाबत अत्यंत जागरुक होते. वाटेल ती रुपे घालने त्यांना पसंद नव्हते. भाषाशुद्धिबाबत मराठी माणूस पंतांचा निश्चितच ऋणी आहे.

'न जे प्रिय सदोष ते, प्रिय सदोषहि चांगले.
स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दमी रांगले.'

इथे स्वतोक म्हणजे स्वतःचा मुलगा व कर्दमी म्हणजे चिखल हे शब्द अगदि चपखल वापरले आहेत.

पंतांचे आणखि एक वैशिष्ट्य म्हणजे पंतांचा कल्पनाविहार. मोरोपंतांच्या पूर्वी हजारो प्राचीन कवींनी परमेश्वराची शेकडो स्तोत्रे केली. त्यांतही शंकराचार्यांसारख्यांचे ईश्वरकाव्य हे अतिशय उद्बोधक, भक्तिरसपुर्ण आणि ह्रदयंगम आहे. परंतु मोरोपंतांचे कल्पनाचातुर्य हे सर्वांपेक्षाहि लोकोत्तर वाटते. पंतांचं कल्पनाचातुर्य पाहून मी तर दिग्मूढ झालो. काव्याला फक्त भावना लागतात असं मानणारा मी, भावनेच्या अन्नाबरोबरच काव्याला कल्पकतेचे वस्त्र व शब्दांचा निवाराही लागतो असे मानू लागलो. पंतांची एक उपमा इथे मला सांगाविशी वाटते.
=============

मला तू खूप काही दिलेस. पण तरी एक स्वोद्धाराची कमी ठेवलीसच आणि ही कमी भरून काढने किती आवश्यक आहे ते सांगण्यासाठी लिहीतात -

"अलंकृतिमती सती मनि झुरे! न जो संगती"

म्हणजे श्रृंगार केलेली पतिव्रता जर पति समागम झाला नाही तर मनात झुरत असते.

एके ठिकाणी भगवंताबद्दल सुंदर कल्पना रुपक अलंकाराच्या उपयोगाने केली आहे.

"कवीश्वरमनः पयोनिधीसुतास्तुतीच्या पते"

म्हणजे कवींचे मन हाच जणू क्षीरसमुद्र आणि त्याची मुलगी म्हणजे स्तुती हीच सागरकन्या लक्ष्मीदेवी व तीचे स्वामी म्हणजे तू. स्तुती कविंच्या मनातून उद्भवते व लक्ष्मी ही सागरकन्या होय. हा कल्पनाविलास मोठा मनोरम आहे.

आणखि एका ठिकाणी पंत ईश्वराला या भवमहानदीतून पार ने असे म्हणतात. पण त्यासाठी नाविकाला म्हणजेच ईश्वराला द्यावे लागणारे भाडे, मलाच साधुजनांना विकून वसूल कर, असा चमत्कृतीपूर्ण व कल्पनाचातुर्याने ओतप्रोत असा युक्तीवाद दिसतो. पंतांचा युक्तीवाद अनेकदा निरुत्तर करणारा असतो. केकावली हे काव्य म्हणजे स्वोद्धारार्थ केलेल्या युक्तीवादांची मालिकाच आहे. पंत देवाविरुद्ध दावा लावून केस स्वतःच लडवत आहेत व ह्या युक्तीवादात अनेक पौराणिक कथांचे आधार घेतात व या कथांचा केस लॉ सारखा उपयोग करतात.

पंत गजेंद्र, द्रौपदी व अर्जुन यांची उदाहरणे देतात व म्हणतात "ईश्वरा, तु त्याच्या मदतीस धावलास मग माझाही उद्धार कर. तुम्ही कंसाच्या दासीकरता आपले ऐश्वर्य व सुख सोडून हवी तसली नीचकर्मे करायला धावता; तुम्ही सीतेच्या वेड्या हट्टापायी मूढपणे धावलात, असे ठणकावून विचारून मग माझी ईच्छापूर्ती अंधवृत्तीने का नाही करत? असा सवाल टाकतात.

जेव्हा भगवंत म्हणतात कि इतके दिवस तुला भौतीक गोष्टीतून माझी आठवण का नाही झाली? तेव्हा पंत म्हणतात कि तुझी माता यशोदामाई तुला मांडीवरून खाली ठेऊन दूध उतरवायला धावलीच होती ना! पंतांची ही खुबी मोठी मनोरंजक आहे.

'समुद्धरसि एकटा जरि जडासि या कर्दमी'.

या केकेमध्ये पावसाने झालेल्या कर्दमातून गोवर्धनगिरी उचललास तसेच मलाही कामक्रोधादि वासनांच्या कर्दमातून उचल. एकिकडे पार्थिव कर्दम तर दुसरीकडे अध्यात्मिक कर्दम, असा सुंदर श्लेष इथे साधला आहे.

आणखि एका केकेत पंत म्हणतात -

'कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली'.

अर्थात, यमराज्याच्या सैन्याचे पांढरे निशानच जणू असे हे म्हातारपण दिसू लागले आहे. साधे म्हातारपण आले असे सांगताना किती कल्पकतेने लिहीले आहे.

पुढे लगेच पंत लिहीतात -

'पुरःसरगदांसवे झगडतां तनू भागली'.

पुढे चाल करून येणा-या रोगांबरोबर झगडून माझे शरीर थकू लागले आहे. अत्यंत सुंदर व कल्पनातीत, पण तरिहि अत्यंत समर्पक असे सर्वश्लोकव्यापी रूपक वापरले आहे.

अशा प्रकारे पंतांचे काव्य रुपक, दृष्टांत, उपमा, विरोधाभास, विशेषोक्ति, अर्थान्तरन्यास आदि अनेक अलंकारांनी सजलेले आहेत.

पंतांची एक सुंदर केका इथे सांगावी वाटते. गंगेचे वर्ण करताना पंत लिहीतात -

'जिच्या जळमळे तुळे न शरदिंदुचे चांदणे'.

जीच्या पाण्यावरील फेसाशी शरदाच्या चांदण्याची देखिल तुलना होऊ शकत नाही.

गंगा यमुनेपेक्षा श्रेष्ठ हे सांगताना पंत लिहीतात -

जशि सुधा तशि न काकवी.

पंतांची शब्दरचना व त्यातील यमक, अनुप्रास, श्लेष आदिंचा उपयोग हे ही अतिशय माधुर्यपूर्ण आहे.

विमुक्तिबहुसाधने तदितरे गणिनाच तो,
सजूनि वरवल्ल्की तव सभांगणि नाचतो.

येथे शब्दांची मधुर रचन दिसते. तसेच पाच अक्षरी यमक अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण, अर्थपूर्ण वाटतो. वरवल्लकी असे नारदाच्या वीणेला संबोधून काव्यसौंदर्य वृद्धिंगत केले आहे.

'दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे'.

म्हणजे दयारूपी अमृताने जिचे ह्रदय भरलेले आहे अशी ती आई, कुळाला काजळाप्रमाने कलंक असणा-या मुलाला कंटाळत नाही.

अशा अवघड रचनांबरोबरच 'पिता जरी विटे, विटो, न जननी कुपुत्री विटे' व म्हणून 'म्हणति भले न रिण जन्मदेचे फिटे', अशा सोप्या पण अर्थपूर्ण रचनाही पंतांनी केल्या आहेत.

यमक हा तर पंतांना 'करतलामलकवत', म्हणजे हाताच्या मळासारखा होता. तो कुठेही ओढून ताणून न बसवता, अर्थगम्य व काव्यभाव जपणारा असाच आहे. याचे सुंदर उदाहरण म्हणजे,

'अगा प्रणतवत्सला! म्हणसि त्या जनां पावलां,
म्हणोन तुमच्याच मी स्मरतसे सदा पावलां'.

एकाच शब्दाचा दोन वेगळ्या अर्थांनी दोन चरणात उपयोग करून सुंदर यमक साधला आहे.

शिवाय -

'सदैव अपराध हे रचितसे कोटि, गा!
स्वयेंहि कथितो, न तिळहि लाज, मी कोटिगा!'.

यात पहिला कोटि ही एक संख्या व गा हे संबोधन आहे. तर दुसरा कोटिगा म्हणजे कोडगा.

यमकाबरोबरच अनुप्रास हे ही केकावलीचे वैशिष्ट्य आहे.

एका केकेत मुर राक्षसाचा नाश करणारा म्हणून मुरांतक व त्रिपुरांचा अन्तक शंकर तो पुरांतक असा सुंदर अनुप्रास आहे.

शिवाय, 'सदाश्रितपदा सदाशिव मनोविनोदास्पदा' यात स, द, र या अक्षरांवर सुंदर अनुप्रास आहे.

'कृतांत शिवला नसे, तंव दिसे, बरे पावणे'.

अर्थात, जोवर अटळ मृत्यु गाठत नाही तोवरच हे ईश्वरा, तु पावलेला बरा.

अशी स्वोद्धाराची याचना करणारे पंत, शंकराने वृकासुराला दिलेल्या वराने तुम्ही स्वतःवरच संकट ओढवून घेतले; असा ईश्वराचा उपहासही करतात.

अर्थात, ईश्वराची प्रशंसा करताना ते थकत नाहीत. ईश्वराला उद्देशून त्यांनी वापरलेली काही संबोधने खरोखरच विलक्षण आणि विलोभनीय आहेत. काही उदाहरणे पाहु:

'जगन्नायका, जगज्जनका,दयमृतघना, प्रणतवत्सला, सुदुस्तरविपन्नदीसेतुला (तरून जाण्यास अत्यंत कठिण अशी जी अनर्थांची नदी, तीच्यावरील सेतु), सदाश्रितपदा, भवपयोधिच्या पारदा (संसार समुद्रातुन तारून नेणा-या)' ई.

अशी संबोधने वापरून म्हणतात, तुझ्यासारख्या उत्तम सुकाणुधराशिवाय आमची जीवननौका 'भवोदधितटि' कशी लागणार!

भक्त प्रल्हादाविषयी पंतांनी लिहीलेल्या काही पङ्क्ति अतिशय साध्या पण परिणामकारक आहेत.

"किती वय? कसे तप प्रखर? काय विश्वास तो
ध्रुव ध्रुव खरा, स्तवा उचित होय विश्वास तो".

अशांच पंतांच्या काही विस्मयकारक ओळी पाहुया -

"मुखी हरी वसो तुझि कुशलधाम नामावली
क्षणांत पुरवील जी सकळ कामना मावली'.

पंतांचे मन संतांप्रमाणे भगवद्भक्तीमध्ये रममाण होणारे होते. 'मनभवच्चरितत्री जडो' असे म्हणणारे पंत पुढे म्हणतात,

"न निश्चय कधी ढळो, कुजनविघ्नबाधा टळो,
न चित्त भजनी चळो, मति सदुक्तमार्गी वळो.
स्वतत्व ह्रदया कळो. दुरभिमान सारा गळो,
पुन्हा न हे मन मळो, दुरित आत्मबोधे जळो".

ओळींमधला अर्थ तर स्पष्टच आहे. स्वतःसाठी पुनःपुन्हा ईश्वराची आळवणी करणारे पंत ईश्वराकडे सकलजनांना सद्बुद्धि देण्याविषयी प्रार्थना करतात. अति भावनावेगाचे प्रासादिक प्रत्यंतर म्हणजे पंतांचे केकावलीतील शेवटचे श्लोक. हे श्लोक म्हणजे पंतांच्या प्रतिभेचा कळस आहेत.

पंतांनी भगवत्पदापासून केकावलीस प्रारंभ करून, ते सत्संगावर येऊन ठेपले. म्हणजे भगवत्पदप्राप्ति हे साध्य व सत्संग हे साधन होय, असाच यातुन अर्थ निघतो.

'सदाश्रितपदा' ने सुरू होणारे आणि

"सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो".

या ओळींनी सांगता करणारे केकावली हे काव्य ज्ञानदेवांच्या 'ओम नमोजी आद्या' ते 'जे खळांची व्यंकटी सांडो' या भावार्थदीपिकेप्रमानेच भावभक्तिपुर्ण असे काव्य आहे.

केकावलीचा आस्वाद कविप्रेमींनी आयुष्यात नक्किच घ्यावा अशी मनोमन ईच्छा!

"शारदशोभा"

निळे सुंदर वैभव विलसे,
हिरवी माया गर्भार हसे,
वाद्यवृंद तो मेघस्वरांचा,
सलील संगीत वर्षा बरसे.

क्षणात पिवळे क्षणात काळे,
सात स्वरांचे रंग आगळे,
कधी कवडसे मुठीत गवसे,
मूठ उघडता तुषार भोळे.


सौंदर्याची शारद शोभा,
जणु मेनका उर्वशी रंभा,
गगन मंडपी शुभ्र चांदणे,
कोजागिरीची सालस आभा.

इंदुसंगे असंख्य तारका,
सहस्त्र-कांता कृष्ण द्वारिका,
चांदण भरल्या तडाग काठी,
रास खेळती कृष्ण गोपिका.

तृप्त चांदणे अमृत झरते
सरींकरिता सरिता झुरते,
सळसळणा-या पानांमधुनी,
सरीसरींनी सलील सरते.

भ्रमरास मोहवी रास फुलांचा,
रसपान खगांना मधुर फळांचा,
उमलुन उदरी कोमल अंकुर,
स्तनपान सोहळा हरीत मुलांचा.

पुर्वा उधळीत झेंडु बकुळा,
हिरवी धरती पिवळ्या माळा,
निळ्या तडागी शुभ्र पाखरे,
रंगवैभवी शारद लीळा.

- सारंग भणगे. (२७ सप्टेंबर २०१०)

Saturday, May 15, 2010

सुख-दु:ख

सुखाच्या महाद्वारी; दु:खाचे पहारेकरी

सुखाच्या अंतरी; दु:खाचे मारेकरी

सुख बाहेर शोधावे; दु:ख आतून भेटावे

सुखाच्या दूर वाटा; दु:खाचा खोल वाटा

सुख असे जर बिंब; दु:ख प्रतिबिंब

सुख कोरडे कोरडे; दु:ख ओले चिंब

सुख ते मृगजळ; दु:ख ते वादळ

सुख पाहुणा असती; दु:ख जन्माचा सोबती

सुख हरवली गाय; दु:ख घराकडे पाय

सुख देवाची मुर्ती; दु:ख देवाची आरती

सुख मागून ना मिळते; दु:ख देऊन टाकते

सुख घडवी रावण; दु:ख घडवी जीवन.
===================
सारंग भणगे. (२००९)

शरपंजरी

निशब्द होती रात्र आणि गूढ होता वारा
कोलमडल्या शरीरास या शरांचा सहारा
नुरली आता क्षुधा कशाची कसली ना तृष्णा
प्राण होता थांबलेला पाहण्यास्तव कृष्णा.

जिंकले नाही कुणी रणी ना हरलेही कुणी
हारजीत ती मुळीच नसते; केवळ लढणे रणी
जया असतो उदय; असतो अस्तही निश्चित त्याला
ईच्छामरणाचे हे वीख हा भीष्मची केवळ प्याला

मज असेल अस्त तरी त्याला वराचा आहे शाप
शिवतील पिंडा काक तरीही चुके न जीवनताप
शरसंभारांनी मी निजविले शूर किती संगरी
शरीरभार टाकूनी निजलो हतबल शरपंजरी...
=======================
सारंग भणगे. (१५ मे २०१०)

Sunday, May 9, 2010

तुच होती का तिथे?

चांदण्याचा स्पर्श होता नाचल्या लहरी जीथे
त्या तळ्याच्या गे किनारी..... तुच होती का तिथे?

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?

श्वेतवस्त्रे नेसलेली पुष्पमाला घातलेली;
कुंतलांची गर्द वेणी मोग-याने गुंतलेली.
बाग होती लाजलेली चालताना तु तिथे, [१]

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?

शीळ घाली रान वारा हालली वेलीफुले;
रोमरोमातून रात्री चांदणे व्योमी खुले.
चूर होता चंद्र वेडा पाहुनि तुजला तिथे, [२]

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?


नीलकांती त्या नभाला मेघकाळे वेढले;
दर्शनाच्या वासनेने ग्रीष्मकाळी ओढले.
पाहताना मोर वेडे नाचले का गे तिथे? [३]

तुच होती का तिथे गंSSS तुच होती का तिथे?

गाज होती आसमंती वेदनेची का तरी?
काळजाचे झाड होते बोडके गे का तरी?
भास होता तो तुझा गे तूच नव्हती का तिथे? [४]

तूच नव्हती का तिथे गंSSS तूच नव्हती का तिथे?
=======================
सारंग भणगे. (९ मे २०१०)

Saturday, May 8, 2010

सखी

सखी माझी होती
लग्नाच्या हो आधि
आता केवळ साधी
बायको ती ॥१॥

आता पुसे जाब
उशीर का होई
आधि वाट पाही
परतीची ॥२॥

मरावे ऑफीसात
घरी कटकट
सखी चटपट
वाटतसे ॥३॥

सखी दिसे सुंदर
शरीर नि मुख
मिळे किती सुख
काय सांगु ॥४॥

बरिस्ताची कॉफी
असे मस्त हॉट
सखीही मग हॉट
वाटतसे ॥५॥

भोळा नि भाबडा
होऊन येतो घरी
खरी असे ऊरी
बायको ती ॥६॥
========
सारंग भणगे. (२६ डिसेंबर २००९)

Friday, May 7, 2010

कळी

दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला
त्या पुर्वेच्या रंगसकाळी जागे करूनि गेला
मरगळलेला आळस आता मागे पडुनि गेला

दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला...

छोटी छोटी कळी होती आली फुलुन वेली,
पहाटवेळी डोलत होती बाला नवीनवेली,
रवीकिरणांचे त्या भ्रुलीशी धागे जुळुनि गेला.

दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला...

त्या किरणांशी खेळत असता गाली चढली लाली
खेळीमेळी जोडगोळी अश्शी जमुन गेली
हिरमुसलेला वारा आणिक रागे पळुनि गेला.

दरवळणारा गंध फुलांचा बागेमधुनि आला...
====================
सारंग भणगे. (जानेवारी २०१०)

रोग जीवनाचा

झाला उजाड तो माळ; गेली गुरे परतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)

वीज आसमंती नाचे
दिस असे पावसाचे
वीज वाजे काळजात
जीव पडे काळजीत.
देव उगा ना कोपला; तेल नाही आरतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)

हीर गोल गेली खोल
झाली पाखरे अबोल
खाती पीकालाच शेते
खत माणसांची प्रेते.
डोळा कोरडा कोरडा येई ऊर भरतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)

पान पान ओरबाडी
तुटे जीवनाची नाडी
घेई जगण्याचे सोंग
साला जीवनाचा रोग.
शोधी गिधाडाच्या जाती कधी हाडे मरतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)
====================
सारंग भणगे. (४ मे २०१०)

Thursday, April 22, 2010

ठेविले अनंते तैसेचि रहावे!

ठेविले अनंते तैसेचि रहावे?
उगा वाटेल ते का सहावे?
मरत मरत असे का जगावे?
पाणी वाहील तसे का वहावे?

भोगांचे दु:ख मना न लावावे;
कर्तृत्वाने परि स्थितीशी लढावे,
कधी कधी जरी हरून जावे,
हरण्याआधि दोन हात करावे.

अकर्मण्य होऊन रहावे,
त्यापरि मृत्युसि आवळावे,
खाटल्यावर बसून मागावे,
त्यापरि कर्माचे फळ मिळावे.

साचुन पाण्याचे डबके व्हावे,
कि वाहुन निर्मळ पाणी व्हावे,
उरी घेऊनी खारटपणा,
सागरापरी खळाळत रहावे.

ठेविले अनंते तैसेचि रहावे!
=============
सारंग भणगे. (२२ एप्रिल २०१०)

Wednesday, April 21, 2010

आनंद

दु:खाच्या डोहात; आनंदाचं पाणी,
आर्त आलापीतुन; स्वच्छंदी गाणी.

फाटक्या वस्त्राला; निर्मळ अस्तर,
हरलेल्या प्रश्नाला; उत्साही उत्तर.

भग्न पत्थरात कोरले लेणे,
काळ्या रात्रीवर हास्याचे चांदणे.

तो वीर भेटे; मृत्युस हसूनी,
शब्द 'अक्षर' झाले; आनंदवनभुवनी.
===============
सारंग भणगे. (२७ मार्च २००९)

Sunday, April 18, 2010

चित्कार माझा

तीने आज केला बलात्कार माझा
रसिकांस वाटे तो चमत्कार माझा

घेती पिऊनी अमृताचे ते प्याले
कळेना कुणाला तो फुत्कार माझा

उडाल्या कितीदा चिंधड्या मनाच्या
हे वेडे करती उगा सत्कार माझा

मी भ्यायलो नि टाकला चाप आहे
कौरवांस वाटे हा टणत्कार माझा

उगा नावता का डोई धरूनी
सन्मानिला का हो चित्कार माझा.
================
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

Sunday, April 11, 2010

अहं ब्रह्मास्मि

त्यांच्या स्मरणार्थ माझिही काव्यांजली.

आज पहाटे कडाडली ती
नाही झाला तरी आवाज,
आणि नभाच्या निळ्या अंगणी
शांत उमटला शब्दब्रह्मसाज.

घनमेघांनी नभगर्द होई
शब्दसरींनी भिजलो आपण,
अता ग्रीष्माने भाजुन जाऊ
स्वर्गी गेला नि:शब्द श्रावण.

क्षितीजावरती शब्दब्रह्म ते
प्रतिभेचा जणु प्रतिभास्कर तो,
शब्दबाण ते नभी सोडुनी
काव्यधनुचे रंग चितारतो.

अता उरली माती केवळ
शुष्क नद्या नि फुटके ढेकुळ
बाभूळकाटे सुकली झाडे
ब्रह्म लोपले; धरती व्याकुळ.......धरती व्याकुळ!
====================
सारंग भणगे. (११ एप्रिल २०१०)

Sunday, April 4, 2010

हाय कृष्णा ये रे जन्मा!

हे इंद्र सारे झाले कुबेर,
लंकेत त्यांच्या शवांचे ढेर.

म्हणावयाला जनतेचे गुरखे,
खलनायकाला नायकाचे बुरखे.

रोज लुटताती जबरीच हुंडे,
पोसावयाला नरकाची तोंडे.

फुटली पोटे तरिही खाती,
अगणित धनाची अनंत खाती.

भूक अशी कि वडवानल जैसा,
पचनास्तवही खाती पैसा.

ऊस संपला उरला चोथा,
तो ही सुटेना लाविती ओठा.

लोणी खाती टाळुवरचे,
प्रेताच्या त्या साळसूद ते.

भाजत पोळी सरणावरती,
सौदे ठरती मरणावरती.

प्रेत जळाले उरली माती,
भूक अशी कि त्यासही खाती.

सुटली नाही जीती माणसे,
त्यासही खुडती जैसी कणसे.

असे अमुच्या का रे कर्मा,
हाय कृष्णा ये रे जन्मा!
============
सारंग भणगे. (डिसेंबर २००९)

Saturday, March 27, 2010

इंदु

या रात्रीत इंदु दळतोस काय पीठ,
खिडकीतुनी शिरतो निलाजरा धीट.

इवल्या फटीचा तुज पुरेसा सहारा,
बाहुंच्या तुरूंगाला दे चोरटा पहारा.

भिजले चुंबनात चिंब पाही काफिर हा,
रात्रीत फिरणारा एकटा मुसाफिर हा.

वेलबुटी यौवनाची देहास नक्षिदार,
प्रीतीच्या गुन्ह्याचा एकटा साक्षिदार.
================
सारंग भणगे. (२००९)

Friday, March 26, 2010

सात बाळे

आकाशाच्या पटांगणी आली सात बाळे,
कुणी तांबडे कुणी जांभळे कुणी निळे नि पिवळे.

सवंगडी खेळायाला ढग पांढरे आले,
भांडण तंटा करून सारे झाले काळे काळे.

रंग पाहुनी येती पक्षी आकाशात उडती,
रंगीत सुंदर पक्षांवरती रंगीत रंगीत जाळे.

खेळ खेळुनी दमून गेली परतुन घरात आली,
घेऊन दुलई अंधाराची मिटुन घेती डोळे.
===================
सारंग भणगे. (२५ मार्च २०१०)

Tuesday, March 23, 2010

जगावं???

रोज जुनीच पावडर लाऊन
नव्या गि-हाईकाच्या लचक्यांना
मूक साथ देत...
जगावं???

शरीराचं लक्तर घेऊन
झडलेल्या हाता-पायांनी
भिकेचे डोहाळे घेऊन...
जगावं???

हळदीचा रंग उतरायच्या आधिच
कुंकवाच्या धन्याचे
पाठ कुंकवासारखि लाल करणारे
रट्टे खात जनावरासारखं...
जगावं???

वासनेचा जहरी साप
कोवळ्या देहकळीला लुचुन
लुटलेल्या कौमार्याचा शाप वागवीत...
जगावं???

वर्षा-दोनवर्षाचं गुंजभर मांस
निरागसता लाचारीची दास
खुलण्याआधीच खुडण्यासाठी...
जगावं???

आश्रिताची आगतिकता
याचकत्वाची वंचना
लोंबणारी वृद्ध कातडी मिरवत
मृत्युचे उंबरठे झिजवत...
जगावं???
===============
सारंग भणगे. (२३ मार्च २०१०)

Friday, March 19, 2010

मधुचंद्र

अधरांस मिटुनी अधिर धरती,
आकाश उभे ते क्षितीजावरती,
आलिंगनाच्या उत्सवात येते,
चंद्रास पाहुनी सागरात भरती.

भुले पंकजाला तो भुंगा विरागी,
विलास चाले फुलाच्या परागी,
मधु पावसाने तो चिंब होई,
पतंगास आनंद जळता चरागी.

कुठे केशराचा मृद्गंध सुटावा,
कुठे अत्तराचा चिद्गंध उठावा,
कुठे अमृताच्या गंगेत न्हावे,
कुठे कस्तुरीचा सद्गंध फुटावा.

प्रणयात बुडोनी बेधुंद व्हावे,
श्रृंगार लाटात आकंठ न्हावे,
गात्रात पेटुन भरावे निखारे,
मधुचंद्ररात्री आनंद भावे.
============
सारंग भणगे. (१९ मार्च २०१०)

Thursday, March 4, 2010

तडफड

आसवांत चिंब चिंब
काळजाचे तुकडे तुकडे.
भावनांच्या चिंधड्या
पसरल्या जिकडे तिकडे.

किती साहु? कसे साहु?
आग आग होत आहे.
कुणा सांगु? काय सांगु?
राग राग होत आहे.

सैरभैर वारा वाही
मनात येते काही बाही
भयशंकेची पाल चुकचुके
अंगाची हो लाही लाही.

अंतर्बाह्य होई जळजळ
कसे पचवु हलाहल हे
ह्रदयरक्त वाहे भळभळ
आता पुरे हालहाल हे.
===========
सारंग भणगे. (४ मार्च २०१०)

Monday, March 1, 2010

का हसावा चंद्र गगनी

पौर्णिमेचा चंद्र जणु कि चंद्रकोरही माझी सजणी |
मुखकमलाला पाहुन पडते निळे चांदणे माझ्या नयनी ||
जरी भासते उदास कष्टी दु:खमग्न ती काळी रजनी |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...

सोज्वळतेचे नाव ती दुसरे, प्राजक्ताचे फुल ते हसरे,
तीला पाहता माझ्या मनिचे, भगवंताचे रूपही विसरे.
वीणा घेऊन स्वर्गस्वरांची जणु शारदा गाते गाणी |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...

ओठ मिटुनी स्मित करते, खिन्न रात्रीचे सावट सरते,
नेत्रचाप ते बाण सोडती, ओष्ठद्वयातुन अमृत झरते.
कळीसारिखे मधुर लाघव गोडगुलाबी कपोल दोन्ही |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...

इंद्रसभेच्या पटलावरती, जशी मेनका अवतरली ती,
सुरईमधुनि देवसुरेच्या, विशुद्ध गंगा झरझरली ती.
देव दानव यक्ष किन्नर, स्तुती गायिली गंधर्वांनी |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...
=========================
सारंग भणगे. (१ मार्च २०१०)

Monday, February 22, 2010

गवतफुला

फुलं किती सुंदर असतात नाही! कितीतरी रंग; कितीतरी गंध; कितीतरी आकार; नि कितीतरी प्रकार. मला वाटतं फुलं सगळ्यांनाच आवडत असतील.

एकदा तुमच्या मनात तुम्हाला माहित असलेल्या फुलांची उजळणी करून बघा बरं! गुलाब, कमळ, जाई-जुई, मोगरा, शेवंती, झेंडु...... तशी यादी खुप खुप मोठी नक्किच आहे. पण ही यादी कितीही मोठी केली तरीसुद्धा एका फुलाला तुम्ही नक्कि विसरणार; अगदि नक्कि. कोणतं ते फुल?

फुलं किती सुंदर असतात नाही! कितीतरी रंग; कितीतरी गंध; कितीतरी आकार; नि कितीतरी प्रकार. मला वाटतं फुलं सगळ्यांनाच आवडत असतील.

एकदा तुमच्या मनात तुम्हाला माहित असलेल्या फुलांची उजळणी करून बघा बरं! गुलाब, कमळ, जाई-जुई, मोगरा, शेवंती, झेंडु...... तशी यादी खुप खुप मोठी नक्किच आहे. पण ही यादी कितीही मोठी केली तरीसुद्धा एका फुलाला तुम्ही नक्कि विसरणार; अगदि नक्कि. कोणतं ते फुल?

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;

गवतफुल. पाहिलंय कधी तुम्ही ते? कुठे? नीट आठवुन बघा बरं!

कधी कुठल्या टेकडीवर, निळ्याभोर आकाशाच्या छताखाली, संध्याकाळच्या वेळेला लांबवरच्या डोंगरापाठीमागे मावळणारा सुर्य बघताना आपल्या बाजुला, आपलं कधीच लक्ष जात नाही असं, एक छोटंसं गवतफुल आपल्याकडे बघुन हसत असतं. आणि अशाच त्या छोट्याशा गवतफुलावरती ज्येष्ठ कवियित्री इंदिरा संत यांनी एक अतिशय छानशी कविता केली आहे. वाचुया का मग ही छानशी; गोडशी कविता?

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

आपण या गवतफुलाकडे एकदा बारकाईने बघु या. त्याचा निळा किंवा पिवळा रंग, त्याच्या इवल्याशा पाकळ्या आणि त्या पाकळ्यांच्यामध्ये त्या छोटुकल्या गवतफुलाचा गोडसर चेहरा. एखादं छोटंसं निरागस आणि कोमल बाळ असावं तस्सं हे गवतफुल.

बघा ना, कवियित्रीने त्या छोटुकल्या फुलासाठी रंगुल्या, सानुल्या असे किती गोंडस शब्द शोधुन योजले आहेत नाही! आपल्या डोळ्यासमोर एखाद्या छोट्याशा बाळाचा चेहरा उभा राहतो नाही. आणि मग त्या बाळाचा जसा लळा लागतो, तसा लळा या गवतफुलाचा लागला नाही तर नवलच.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

मी म्हटले ना कि एखाद्या टेकडीवर तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हे गवतफुल भेटेल खचित. पण कवियित्रीला ते माळावर पतंग उडवित असताना भेटले. इथे माळ म्हणजे मोकळे पठार किंवा आवार. आता तुम्ही म्हणाल कि आता असे मोकळे माळ राहिलेत कुठे. आणि पतंग तरी कुठे उडवतात आता.

पण म्हणुनच एकदा कधीतरी या गवतफुलाला भेटायला तुम्ही जवळ कुठेतरी टेकडीवर जा, किंवा पिकनिकला गेलात कि अशा गवतफुलाला नक्कि शोधा आणि बघा ते गवतफुल कसं तुमचं हसुन स्वागत करेल. आणि त्याचं ते इवलंसं सौंदर्य पाहुन तुम्हीदेखिल हरखून जाल, या कवियित्रीसारखेच.

बघा बघा, ती कवियित्रीदेखिल पतंग उडवताना या वा-यावर हळुवार झुलत झुलत हसणा-या गवतफुलाकडे पाहुन पतंग वगैरे सारं विसरून त्या गवतफुलाच्या रंगामध्ये हरवूनच गेली. अस्सं त्या गवतफुलाचं गोड-गोंडस रूप कि त्याचे काय वर्णन करावे! हं, काय वर्णन करावे, ते आता पुढच्या कडव्यात पाहुयात.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

या ओळी पुन: पुन्हा वाचा. त्यात किती रंग सामावले आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी त्यात वर्णन आहे, प्रत्येक रंग आणि गोष्टीला काय विशेषणं लावली आहेत...सगळं सगळं नीट बारकाईनं वाचा.

बघुया हं आपण आता हे वर्णन कसं सुंदर आहे. गवताच्या ज्या पात्यांवर हे छोटुसं फुल वा-यावर झुलत असतं त्या पात्याचा हिरवा गार रंग डोळ्यासमोर आणा. ते नाजुक पातं, त्याचा मऊ मऊ रेशमी स्पर्श! तुमच्या बोटांना तो स्पर्श होतोय असा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. त्या पात्यांची अलवार वा-याबरोबर होणारी अलगद हालचाल पहा. आणि मग अशा या हिरव्या नाजुक गवताच्या पात्यांमध्ये एक निळ्या-निळ्या पाकळ्यांचं ते छोटुकलं फुल कसं डुलत असेल नाही! इथे लिहीलेला निळुली हा शब्द आधी तुम्ही कधी ऐकलाय का हो! नाही ना...मी ही नाही ऐकलेला. पण इंदिरा संत यांनी तो मुद्दामच वापरलाय आपल्या छोटुकल्या-पिटुकल्या सानुल्या गवतफुलासाठी. 'निळी पाकळी' यातुन फक्त ती पाकळी निळी आहे, एवढेच सुचित होते. पण निळुली पाकळी यातुन मात्र निळी आणि छोटीशी पाकळी असे दोन्ही सुचित होते, होय कि नाही! कवितेमध्ये कवि असेच काही नवीन शब्द वापरून भाषा समृद्ध करत असतात.

तर या निळ्या निळुल्या पाकळ्यांच्या मध्ये मात्र पिवळ्या रंगांचे परागकोष असतात आणि सुर्यकिरणांमध्ये ते झगमगतात. बघा किती विहंगम रंगसंगती आहे. हिरव्या पात्यांच्या मध्ये निळ्या पाकळ्या नि पिवळे पराग असलेलं निसर्गाचं ते छोटंसं अद्भुत रूपडं किती गोड वाटत असेल नाही!

अहाहा! अशा त्या तान्हुल्या फुलाबरोबर सगळं सगळं, अगदि शाळा, टीचर, आभ्यास, विसरून त्याच्यासारखचं लहान लहान व्हावसं वाटलं ना! वाटु दे. आपल्या कवियित्रींना देखिल तेच वाटलं बरं का मित्रांनो. बघा तर खरे पुढचं कडवं...

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

लहान मुलासोबत खेळताना लहान व्हावे वाटते आणि त्याच्याबरोबरच सारे विसरून खेळत रहावे वाटते ना, तसेच या आपल्या गवतफुलाबरोबर देखिल सर्व काही विसरून त्याच्या गोडगोजि-या विश्वात हरवुन जावेसे वाटते.

आभ्यास माफ होईल का माहित नाही, पण एकदा अशाच कुठल्याशा माळरानावर जाऊन आपल्या या छोटुकल्या सानुल्या गवतफुलाला तुम्ही भेट भेट देऊन या सुंदर कवितेचा जीवंत अनुभव घेणार ना!

सारंग भणगे.

Sunday, February 14, 2010

प्रकाशप्रेत

व्याकुळ सांजवेळी डोंगरमाळ रडते;
हिरव्या पाण्यामध्ये खिन्न छाया पडते.

सुर्य क्षितीजापाठी जराजर्जर दडतो;
राऊळकळसावरती अंधार गर्द पडतो.

डोंगरसरणावरती प्रकाशश्वास मेला;
रीत्या रांजणामध्ये अंधार खोल गेला.

बंद दिशांचे पिंजरे भरले अंधाराने;
उजेड पळुन गेला मावळत्या दाराने.

जीवंत झाल्या पुन्हा गूढ उदास छाया;
गावकूसात शिरली भयजर्द काजळमाया.

अवघा आसमंत काळ्या पुरात भिजला;
वृक्षांच्या अंगोपांगी अंधार पुरता थिजला.

विश्व स्मशान झाले पुरला उजेड आहे;
प्रेतास जाळणारा उरला उजेड आहे.
==================
सारंग भणगे. (१४ फेब्रुवारी २०१०)

Tuesday, February 2, 2010

आनंद

दु:खाच्या डोहात; आनंदाचं पाणी,
दु:खाच्या मुखात; आनंदाची गाणी.

दु:खाच्या काट्यावर; आनंदाचं फुल,
आनंदाच्या फाट्यावर; दु:खाला हुल.

आनंदाच्या चुलीत; दु:खाची लाकडं,
दु:खाच्या देवाला, आनंदाचं साकडं.

दु:खाच्या जीवनात; आनंदाचा श्वास,
दु:खाच्या मथुरेत; आनंदाचा रास.
===================
सारंग भणगे. (१ फेब्रुवारी २०१०)

Wednesday, January 27, 2010

भावस्थंडिल

वृत्त - मनोरमा - गालगागा गालगागा)

पोळलेल्या काळजाला
द्या दिलासा वादळाला.

पोर छोटा पोहताना
पार गेला... हो तळाला.

ढोल वाजे भावनांचा
साथ देतो गोंधळाला.

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला.

मानताती वीर त्याला
वेळ येता तो पळाला.

काळ येता फासताती
काजळीही काजळाला.
===========
सारंग भणगे. (२७ जानेवारी २०१०)

Sunday, January 24, 2010

रजनी

संधी साधुन संध्या आली
गाली घेऊन गुलाब लाली
पीत पोत ते मऊ उन्हाचे
सांज सावली सोनसावळी

नीलनभाची सनिल आभा
क्षितीज टाके पिऊन गाभा
खगरांगांची रंगमधुरा
रम्य रमणी रजनी-रंभा

काजळवेडी गडद शर्वरी
शुभ्रचांदणे किनार भर्जरी
गर्भरेशमी कुंतल काळे
रजनी आली लाजलाजरी.
=============
सारंग भणगे. (जानेवारी २०१०)

कुणी एक कृष्ण उधार द्या रे

लखलाभ तुजला तुझे सुर्य - तारे
मी अंधारयात्री! मज अंधार द्या रे!

तमाच्या भितीची तमा रे कुणाला
मला त्या तमाचाच आधार द्या रे!

त्या उन्मत्त लाटा आल्या फिरूनी
नको जीत मजला, माघार द्या रे!

मी पेटलेलो, तुला काय त्याचे
मला पेटलेला अंधार द्या रे!

तो कृष्ण गेला अंधार झाला
कुणी एक कृष्ण उधार द्या रे!
===============
सारंग भणगे. (२३-२४ जानेवारी २०१०)

ऋतु

हवेत नुसता सुटलाय गारवा
कॉफी बरोबर ऐकावा मारवा.

थेंबात पाऊस नाचे रूणझुण
लताची सुरेल तरल गुणगुण.

उन्हाची उठे अशी काहिली
ग्रेसच्या डोळा दुपार पाहिली.

प्रत्येक ऋतुत आनंद लकेर
आनंद आदि आनंद अखेर.
============
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

सिगारेटी देवी

ओठांनी एकदा घेतली शप्पथ
ओढणार नाही आता लपतछपत.

पब्लिकमध्ये तीला लावीन ओठांना
चिमटीत धरायची सवयच आहे बोटांना.

झुरक्याचा आनंद भुरक्यात नाही
जगू भले उपाशी, पण नरकात नाही.

तीला एवढे 'मारून' नाही तक्रार
बायकोसारखि नाही बदलते 'आकार'

एवढीशी नळकांडी दूर तीचा महिमा
नको वैधानिक ईशारे 'त्राही मां त्राही मां'

कवियित्री बहुदा असावी खरी
स्वतः जळूनही ती आनंदच बिखरी.

सिगारेटी देवी तुला माझा सलाम,
आयुष्यभर राहीन बाई मी तुझा गुलाम...मी तुझा गुलाम.
======================
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

??

तो अडकलाय..
अगदि पुरता अडकलाय..
त्याच्याभोवती विणलंय
कवितेचं एक भक्कम चक्रव्युव्ह,
आणि
शब्द, भाव, छंद, वृत्त, अलंकार, गण, मात्रा, व्याकरण..
सारे त्याला आपल्या अमोघ शस्त्रांनी
विद्ध करीत सुटलेत..
अजुनही तो अपराजीत आहे,
आणि मला खात्री आहे,
तो त्या सा-यांचे आव्हान
निश्चित परतावुन लावेल.
पण मला भिती आहे..
त्याला परतीचा रस्ता ठाऊक असेल का?
असलाच तर तो मला परत भेटेल,
याच असीम आकाशाच्या,
निस्सीम छायेमध्ये,
मला माझा..
हरवलेला..


आशय!
===========
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

Thursday, January 21, 2010

आला क्षण गेला क्षण

आला क्षण गेला क्षण
फिकिर ईथे कुणा,
कालातीत मस्तीत
रहाण्याचा केला गुन्हा.

मरतो आहे ईथे जो तो
क्षणेक तरी जगतो का?
काळाला त्या आनंदाचे
आंदण थोडे मागतो का?

क्षणेकही नाही करायाची
भिती-क्षिती हो क्षणांची,
क्षण-क्षण घेऊ वेचूनि
माती आनंद कणांची.

क्षणभर द्यावा विश्रामाचा
आनंद त्या क्षणाला,
धावतोच आहे वेडा कधीचा
आयुष्य लाऊन पणाला.

आला क्षण गेला क्षण
निव्वळ मातीचे ते कण,
नाही दिला जर त्याला
आनंदाचा एक तरी क्षण.
=============
सारंग भणगे. (२१ जानेवारी २०१०)

Saturday, January 16, 2010

आली कविता आली..

बोचली दु:खपुष्पे ऊराशी
माळली माझ्याच केशी
रसिकास रिझवताना
जाळल्या माझ्याच पेशी

श्रृंगार जळून पेटण्याचे
व्यापार आतून तुटण्याचे
घातलेले बंध सारे
कवितेतून फुटण्याचे

पावलास वादळाची आस
जगण्यात मृत्युचा श्वास
पुरलेल्या अस्तित्वाच्या
स्वप्नात सत्याचे भास

मी उध्वस्त ईमला
पहा रसिक जमला
तारीफांच्या फैरीमध्ये
अवशेष विशेष रमला

जखमांच्या फुलल्या वेली
वेदना गर्भार झाली
पेटून सर्वस्व माझे
आली कविता आली..
===========
सारंग भणगे. (२००९)

काही केल्या जात नाही!

आली आली ती आतुन
गेली गेली ओसंडुन
तीला नाही तळ जरी
गेली तळा ढवळून

शोधू तीला किती कुठे
यत्न सारे झाले थिटे
एके दिनी अचानक
वेडी ऊराऊरी भेटे

ओठ तीचे ते पातळ
बांधा नि सडपातळ
स्पर्श तीला करू जाता
भासे कठिण कातळ

खोल गेली अशी आत
जशी वीज काळजात
घट्ट रूतली अशी कि
काही केल्या नाही जात..
काही केल्या नाही जात..
=============
सारंग भणगे. (१६ जानेवारी २०१०)

Wednesday, January 13, 2010

निसर्ग आई

उंच डोंगर; निळे सुंदर, हिरवी दुलई मृदुल त्यावर,
झुळझुळ पाणी; मंजुळ गाणी, वा-याचा नि विमुक्त वावर.

श्वेत ढगांची सुंदर नक्षी, निलाकाशी रंगीत पक्षी,
फुटे तांबडे क्षितीजावरती, फिटे पारणे दोन्ही अक्षी.

हसती पाने; डुलती राने, फुले सुगंधित गाती गाने,
मऊ लव्हाळी प्रातःकाळी, दंवात भिजती आनंदाने.

गार लहरी; गोड शिरशिरी, मऊ उन्हाचे पोत भर्जरी,
थंड धुक्याचा फेडित पडदा, बालकिरणे लता वल्लरी.

निर्झरकाठी तरूवर दाटी, वाकुन घेती सलिल गाठी,
चिंब भिजूनी काळे पत्थर, दाटून येते त्यांचे कंठी.

फुले गोजिरी लाजलाजरी, ताम्र आम्र नि पीत अंजिरी,
कुसुम सुंदर सारा परिसर त्यावर डुलती तुळस मंजिरी.

उर्ध्व निळाई; भू हिरवाई, सृष्टी वैभव ही नवलाई,
देवाचे हे समूर्त दर्शन, नितनित वंदन निसर्ग आई.
==========================
सारंग भणगे. (१३ जानेवारी २०१०)

Sunday, January 3, 2010

हातावरचा फोड़

कधी करते कट्टी
कधी करते बट्टी
आई म्हणते झाली आहे
हल्ली फार हट्टी

कधी पटकन रुसते
कधी खुदकन हसते
जिलबी सारखि गोलगोल
फतकल मारून बसते

कधी होते आई
कधी होते ताई
शाळा भरवुनी मोठ्यांची
कधी होते बाई

कधी मारते गप्पा
कधी मारते थापा
बाबा आणि रागवता
देते गोड पापा

आहे मोठी गोड गोड
आंब्याची फोड फोड
बाबा-आईसाठी तर
हातावरचा हा फोड
=========
सारंग भणगे. (३ जानेवारी २०१०)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...