Saturday, January 25, 2014

सांजसंध्या

गिरीवरावरी विराट सूर्यबिंब टेकले
तमा वरी कुणीतरी सुरम्य चित्र रेखले


चितारली नभांगणात दिव्य रंगसंगती
जणू निळ्या जलाशयात रंग ते तरंगती


हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे


दिमाखदार तारका नभात पाय टाकता
गुलाब गालिचे शशांक अंथरेल स्वागता


समीर संथ थंड गार घालताच फुंकरा
उन्हात तापली धरा निवू बघे जराजरा


भराभरा घराकडे गुरे खुरे पिटाळती
रुणूझुणू रुणूझुणू जणू नुपूर बोलती


खगास आस कोटरास जायची खुणावते
प्रिये समीप जावया अधीरता दुणावते


निराश मित्र मावळे प्रिया न त्यास लाभते
वधू बनून श्यामला शशी घरी प्रवेशते


जना मनास भावते कवीसही विभाव ही
निवांत सांज सावळून जन्मते विभावरी
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Tuesday, January 21, 2014

राधा - २


प्रिय राधा,

 

कशी आहेस? कित्ती दिवसात तुझे पत्रच आले नाही! पाठवलेच नाहीस कि आपल्या post खात्याच्या कार्यक्षम कारभारामुळे मला मिळाले नाही! अर्थात तुला हे माझे पत्र मिळाले आणि त्याचे तू उत्तर लिहिलेस आणि ते मला पोहोचले तरच ते कळेल, नाही का.

 

मी तसा मजेत आहे. खरेतर ‘तसा’ हे चुकूनच लिहून गेलो. मी तसे लिहावयाला नको होते. मला कल्पना आहे कि तुला त्यातून काय वाटणार आहे याची. पण खरोखर सहज लिहिता लिहिता मी तसे लिहून गेलो गं! आत्ता माझ्याकडे पेनाचे खोडरबर देखील नाही, आणि ज्यावेळी हे पत्र लिहितो आहे त्यावेळी कुठली दुकानं उघडी असणार! तुला तर कल्पना आहेच माझी पत्र लिहायची वेळ!

 

नाही, ती वेळ बदलली नाही. बदलेल असेही वाटत नाही. आठवतंय, मी दिवसा तुला एक पत्र लिहिलं होतं, आणि मग त्याचं उत्तर येण्याऐवजी तूच घरी आली होतीस भेटायला इतक्या लांबून, मी आजारी वगैरे आहे का असे पाहायला. तुझं येणं आवडतंच गं, पण मी आजारी आहे का पाहायला आलीस, आणि मी आजारी नाही म्हटले तेव्हा कपभर चहाही न घेता निघून गेलीस............ते आवडलं नाही. म्हणूनच, ज्यावेळी कदाचित आकाशात चंद्रालाही झोप लागत असेल अशाच वेळी मी तुला पत्र लिहू शकतो! तसेही त्या चंद्राशिवाय, आकाशातल्या ताऱ्यांशिवाय, कळवळणाऱ्या काही जनावरांपेक्षा आणि माझ्या मनात तुझ्या विषयी उठलेल्या वादळांशिवाय आणखी ह्यावेळी कोण कुठे जागे असते!

 

sorry, हे देखील लिहून गेलोच! तुला सांगू, काही वेळा शब्द साथच देत नाहीत, आणि काही वेळा जणू पेनाला गळती लागल्यासारखे निबमधून ते झिरपत जातात जणू. निसरड्यावरून आपला पाय सटकतो ना तसा ह्या शब्दांचादेखील पाय घसरतो कधी कधी असेच वाटते.

 

असो! मी छान मजेत आहे. तू इतकी ओरडयाचीस म्हणून ऑफिसमध्ये वेळेत जायचा, मन लावून काम करायचा खूप प्रयत्न केला, करत असतो. पण तुला माहिती आहे ना, औषधाचा डोस एकदा दोनदा घेऊन चालत नाही. काही काही रोग असे असतात कि त्यांना वारंवार आणि सातत्याने औषध घ्यावेच लागते. पण काही काही दूरच्या गावांमध्ये कुठे दवाखाने आणि औषधाची दुकानं असतात! तिथले रोगी नाहीत का कधीतरीच औषध घेतात कुणी शहरा-बिहराकडून घेऊन आले तर, आणि मग जेव्हा औषध मिळत नाही तेव्हा खोकत राहतात; कण्हत राहतात! आपल्या देशात गरीबीच फार आहे बघ.

 

नवीन काय वाचते आहेस? म्हणजे तुला मिळत का वाचायला काही? आणि नाही मिळालं तरी काही बिघडत नाही गं. नुसती पुस्तकं वाचून कुणी मोठं होत का? पुस्तकी किडे होतो आपण. मी देखील हल्ली अजिबात पुस्तकं वाचत नाही............पहाटेपर्यंत! हं! झोपेचं माझं पहिल्यापासून तसं वाकडंच, तुला तर माहितीच आहे. मग त्याची कशाला काळजी करायची उगाच. अग काही काही माणसांना झोप कमी चालते; पुरते. मग रात्री फक्त रातकिड्यांच अद्भुत संगीत ऐकत बसण्यापेक्षा बसतो आपला काहीतरी पुस्तकाची पान उघडून, त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही.

 

काळजी करायचीच झाली तर ह्या कडाक्याच्या थंडीत डांबराच्या निगरगट्ट रस्त्याच्या कडेला कुत्र्यासारख झोपणाऱ्या त्या भिकाऱ्यांची करावी किंवा धरणामध्ये जमीन बुडालेल्या; आतड्यात फक्त पीळच उरलेल्या; सरकार दरबारी हक्काचा मोबदला मागण्यासाठी कित्येक कोस चालत तालुक्याच्या गावाला आलेल्या शेतकऱ्याची करावी, नाहीतर ....................

 

म्हणूनच मी तुला पत्र लिहित नाही! लिहायला घेतलं कि काहीतरी भलत-सलतच लिहितो जातो. जिथे सलतंय तिथे असंच होत कि काय कोण जाणे! राधे, सोलवाटलेल्यानं विव्हाळायचही नाही का गं!

 

असो, माझ्या जखमांच रक्त हळूहळू माझ्या शाईत उतरायला लागलं आता बहुदा. ते वाचून तुझ्या डोळ्यात अश्रुंच रक्त तरारेल. म्हणून इथेच थांबतो आता!...............पुन्हा उद्या लिहीनच ना तुला पत्र, ह्या रात्रीला तांबडं ढुशी द्यायला सुरुवात करायच्या वेळी!

 

आणि हो, सर्वात महत्वाचं राहिलंच कि! अग बाई, लवकरात लवकर जरा तुझा पत्ता कळव कि!

 

सारंग

राधा - १


प्रिय राधा,

 

आज प्रथमच तुला प्रिय लिहिण्याचं धाडस करतो आहे; पण खरंतर ते ‘प्रिय सागर किंवा प्रिय समीर’ हे लिहिण्याइतकंच सहज आणि उत्स्फूर्त होतं, आणि जे सहज असतं ते निर्मळ असतं असं निदान मला तरी वाटतं. त्यामुळे त्यात धाडस खरंतर नाहीये. ‘पण सहजपणे आपल्या हातून घडते ती चूक निर्मळ आणि पवित्र असली, तरीही त्याची जाणीव हि त्रासदायकच असते.’ तेव्हा ह्या धाडसाला मनावर घेऊन नकोस.

 

खरंतर यात धाडस कोणतच नव्हतं. कारण जे प्रिय असतं त्याला ‘प्रिय’ म्हणण्यात काय चूक? पण आपल्याला जे ‘प्रिय’ असतं ते जगाला ‘अप्रिय’ असेल किंवा त्याहून अधिक म्हणजे आपल्याला जे ‘प्रिय’ वाटतं, ते वाटणं त्या ‘प्रियालाच’ अप्रिय वाटत असेल तर...... तर मात्र ते निश्चितच चूक असलं पाहिजे, आणि मग ‘प्रिय’लाही ‘प्रिय’ म्हणायचं धाडस करावं लागतं!

 

असो! तुला वाटेल माझं घोडं ‘प्रिय’पाशीच अडलं कि काय! किंवा मी खरंतर तुला पत्र नव्हे तर ‘प्रिय’ ह्या शब्दाची ‘चिकित्सात्मक मीमांसा’ करून, ‘प्रिय’ असण्याचे विषदीकरण व ‘प्रियाप्रियाचे संकलनात्मक विश्लेषण’ करतो आहे कि काय! पण तसं नाहीये. मी मला जे ‘प्रिय’ आहे..........

 

पुन्हा मी ‘प्रिय’ भोवतीच रुंजी घालतोय. खरंतर हे पत्र मी माझ्या ‘भावनांची सतरंजी’ अंथरण्यासाठी लिहित होतो. पण लिहिता लिहीतच कधीतरी किंवा कदाचित त्या आधीच माझ्या साऱ्या भावनाच शुष्क होऊन गेल्या.

 

मी एकदा लिहिले होते कि ‘काही भावनांची फुलं शब्दांचा सुगंध न घेताच कोमेजतात.’ पण काही वेळेला मात्र ‘शब्दांच्या लाटा उसळत असतात, पण भावनांच्या नावा त्यावर उतरतच नाहीत’. अशा वेळच्या लिहिण्याला अर्थ उरत नाही. त्यात नकळतच शुष्कपणा येतो.

 

आज काहीशी स्थिती तशीच आहे. खरंतर तुला काही लिहायचं म्हणजे शब्द सुचण्यापेक्षा ते हृदयातून उमटायला हवेत. बुद्धीला विचार करायला संधीच मिळाली नाही पाहिजे. पण आज तसं नाहीये. माझ्या हृदयातील भावनांचा सागर ओहोटीला गेलाय कि तुझ्याबद्दलच्या प्रेमाचा झराच आटून गेलाय? कदाचित तसच असावं! अग पाऊसच पडला नाही तर तो झरा तरी कसा टिकेल!

 

चातकासारखी पावसाची वाट पाहताना; चकोरासारखा चंद्रामृतकणांसाठी झटपटताना मला जर ‘माझा पाऊस’ किंवा ‘माझे अमृतकण’ मिळालेच नाहीत तर मी जगणार तरी कसे! त्यातच जर नकाराचं विष दिलं तर मी मरणं स्वाभाविकच आहे. विष पचवायला मी नीलकंठ नाही; मी व्याधाच्या विषारी बाणानं घायाळ होऊन मरणारा ‘सारंग’; अर्थात ‘श्रीकृष्ण’ आहे. आणि खरी शोकांतिका हीच आहे कि श्रीकृष्ण असूनही मला राधेची प्रीत...............!

 

तसे तर मला हे नात्यांचे बंध नकोच होते. खरेच! हि माझी निराशा नाही, किंवा तडजोडही नाही. कुठेतरी ते पटलेलं होतं. म्हणूनच मी एकदा लिहिलं होतं,

      ‘प्रेम राखीच्या धाग्यात नसतं, प्रेम कुंकवाच्या टिळ्यात नसतं’

प्रेम अलौकिक असतं, त्याला असल्या लौकिक, भौतिक आणि प्रतीकात्मक गोष्टीत स्वारस्य नसतं.

      ‘प्रेम आत्म्याचं मिलन असतं, खुल्या हृद्याच दालन असतं’

असंही कधीतरी लिहिलं होत. मला ते पटलही होत. त्यामुळेच भौतिक सुखांच्या व आकांक्षांच्या बर्फाखालून हि अभौतिक, अलौकिक, अपार्थिव सुखाच्या अनुभूतीची नदी खळाखळा वाहतच होती. त्यामुळे एक डोळा रडत असता, दुसरा मात्र हसत होता. कोरड्या, कडक उन्हात पावलं भाजत असताना, डोक्यावर मात्र ज्ञानाचं छत्र अडग होतं. म्हणूनच मी माझ्या मनातले आवेग आणि उर्मी, त्या उसळत्या भावनांची वाफ शक्तीन व संयमानं निर्धाराच्या व ज्ञानमय निश्चलतेच्या सायीखाली कोंडू शकलो. अवखळपणे धावू पाहणाऱ्या माझ्या भावनांच्या अजाण, अबोध, असमंजस, अवखळ, नाठाळ वासराला ज्ञानाच्या दोरान संयमाच्या दावणीला जखडू शकलो.

 

त्यातूनच मला जाण आली व मला वाटू लागलं; पटू लागलं कि,

‘प्रत्येक नात्याची परिणतीच आपल्याला का अपेक्षित असते? एका सुंदर हळुवार पातळीवर आपण समांतर राहिलो तर बिघडले कुठे?

ज्याचं त्याचं प्रत्येकी एक जग असेल. त्या त्या जगातील एकमेकांच्या प्रतिमा वास्तवाशी मेळ साधणाऱ्या नसतीलही. पण जे काही होतं ते एका उच्च कलात्मक पातळीवर असेल. अनुभवातला अस्सलपणा वास्तवापेक्षाही प्रासादिक असेल.

अशा अशरीर संबंधांना नात्यात बद्ध करण्याची इच्छा का व्हावी?’ (संदर्भ ‘हृदयस्पर्शी’ – सुहास शिरवळकर)

 

ह्या विचारांनी प्रेरित झालेली माझ्या आत्म्याची कवाडं खाडकन उघडली. ज्याला प्रेमाचं नाव देत होतो, ती माझ्या मनापेक्षा जर माझ्या आत्म्याची अभिव्यक्ती असेल तर माझ्या नजरेत सारं विश्व हे समान व भेदाहीन असेल. ज्या अंतिम प्रेमाची सारेच प्रतीक्षा करीत असतात, त्याची अनुभूती प्रत्यक्ष होऊ शकली. काही क्षण का होईना, पण मनाला आत्म्याचा साक्षात्कार होऊन एका नवीन भावविश्व सृष्टीचा अविष्कार माझ्या मानस स्पर्शून गेला. त्याचे आभार कोणास मानावे हेच मला कळेना. पण मग त्याची सुरुवात जिथे झाली ते चैतन्याचे मूलगर्भ तू होतीस, म्हणून तुला हे आभार!

 

आता नात्यापलीकडच्या विश्वात आत्म्याचा प्रवेश करणे हेच जीवनाचे ध्येय राहिले. त्यासाठी अखंड, अथक प्रयत्न करणे हेच जीवनाचे खरे सार्थक! आता त्यासाठी ‘बाहेरच्या’ स्फुर्तींचा कागदी आधार नको. अंत:स्फुर्तींना बाह्यात्कारी गोष्टींचा आधार नको असतो. कारण,

      ‘आत ओसंडणाऱ्या प्रकाशाच्या लाटा, बाहेरच्या काळोखाने अंधारात नाहीत.’

शब्दांची हि कृत्रिम कारंजी इथे आता आपोआपच अस्तंगत झाली आहेत..........

सारंग.

Saturday, January 11, 2014

इशारे


आले मिळून सारे
माझे तुझे किनारे


शब्दात काय सांगू,
वाचा नं हे शहारे.


तू चुंबणे जणू कि,
ओठांवरी निखारे.


देतेस माझिया का,
स्वप्नावरी पहारे.


त्या लाघवी स्वरांनी,
घुमती मनी नगारे.


आली उषा कपोली,
हेही पुरे इशारे.


तुज पाहतो बनूनी
मी सूर्य चंद्र तारे
----------
सारंग भणगे. (डिसेंबर २०१३)

Thursday, January 9, 2014

काय झाले ते कळेना

पाहते शून्यात कोठे राहूनी मौनात ती
काय झाले ते कळेना का अशी संदिग्ध ती

उद्ध्वस्त होते अंतरी थरकाप होतो का तिचा
आवाज मोठा ऐकता घामात होते चिंब ती

विश्वास ना दिसतो तिच्या वागण्या दिसण्यातही
हिंडते बस्स घेऊनी डोळ्यात लाखो प्रश्न ती

राग येतो रात्रीचा तिज व्यापितो अंधार का
ज्योत विझूनी अंतरीची का जाहली निस्तेज ती

लाडक्या बाबासही ना मारते मिठी ती आता
होता अचानक स्पर्श भिऊनी झिडकारते त्यांनाही ती

काय झाले ते कळेना का कळी कोमेजली
कोडे कटू सुटणार.. जेंव्हा .... काहीतरी बोलेल ती .........

© विश्वास रघुनाथ कुलकर्णी

---------------------------------------------------------------------------------------------




विश्वास कुलकर्णी – (१) – कविता क्र. ८


विश्वासजी,


आपण आपल्या ओळीचा आधार घेऊन एका अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अलीकडच्या काळात ह्या विषयावरील कविता अधिकाधिक प्रमाणात वाचनात; ऐकण्यात येऊ लागल्या आहेत. अशाही कविता आता लिहाव्या लागतात हे केवढे मोठे दुर्भाग्य आहे.


 


अशा कवितेचे रसग्रहण करावे तरी कसे!


 


काय झाले ते कळेना हि ओळ आपण आपल्या कवितेमध्ये अतिशय समर्पक योजली आहे आणि त्या ओळीत जो गर्भितार्थ आहे; सूचितार्थ अभिप्रेत आहे तो मनाला अतिशय हेलावून टाकणारा आहे. ‘काय झाले ते कळेना’ हे म्हणत असताना काय झाले आहे ते कळते ते खरोखर दु:खद आहे!


 


तिच्या मौन रूपाचे वर्णन, तिचे सतत भयभीत वागणे हे अतिशय संयत परंतु वास्तविक वाटणारे आणि मनाला घुसमटून टाकणारे असे तुम्ही लिहिले आहे. हे वाचत असताना नकळत तिची अशी घुसमटलेली, मनातून उध्वस्त झालेली, अंतर्बाह्य हादरलेली अशी एक अतिविदारक प्रतिमा नकळत डोळ्यापुढे उभी राहते आणि ती मनाला हेलावून सोडते. कविता खूप अंतर्मुख करते, आपल्या पुरुषत्वाची आपल्यालाच शिसारी वाटू लागते, अशा परिस्थितीतून जाणाऱ्या; गेलेल्या बालीकांसाठी, स्त्रियांसाठी कुठेतरी मनात करुणा दाटतेच, परंतु तिच्यावर असे अघोरी अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचून त्यांचा सूड आपणच घ्यावा अशी चीड निर्माण होते, मन अस्वस्थ होते....................... मनामध्ये अनेकविध भावनांचे प्रपात कोसळत जातात, मनातच ते दगडावर आपटून फुटून छिन्नविछिन्न होतात.............. लिहिता लिहिता ह्या विषयावर इतके लिहावेसे वाटू लागते कि आपल्या मनातून जणू शब्दांचे वादळ ह्या कागदावर भिरभिरावे असे वाटू लागते! थांबतो!


 


आत्ताच मी सई परांजपेंचा ‘दिशा’ पहिला. त्या अतिशय सध्या चित्रपटातील काहीही न दर्शवता दाखवलेली स्त्रीत्वाची विटंबना मनात प्रश्नचिन्हांची वावटळ निर्माण करून गेली होती कि इतक्यात तुम्ही अशाच, किंबहुन त्याहून अधिक गंभीर विषयावर संयत कविता लिहिलीत. त्यामुळे मन थोडे अधिकच सैरभैर झाले आहे.


 


इथे जे लिहिले आहे त्याला रसग्रहण म्हणावे कि नाही ठाऊक नाही, जर मी काही असंबद्ध लिहिले असेल तर माफ करा. परंतु तुमच्या कवितेमध्ये कुणाचेही मन सैरभैर करून टाकण्याची ताकद केवळ त्या विषयाच्या गांभिर्यामुळेच नाही तर त्या कवितेच्या सशक्त मांडणीमुळेदेखील आहे असे मला निक्षून इथे लिहावे वाटते. ह्याहून सुंदर आणि वाचनीय कविता असल्या तरी संवेदनशील माणसाने हि तुमची कविता निश्चित वाचावीच असा माझा आग्रह निश्चित असेल!

Wednesday, January 8, 2014

छंद आणि वृत्तबद्ध कविता


हे सर्वमान्य आहे कि कविता लिहित असताना, किंबहुना कुठलेही लेखन करत असताना, त्याचा मुख्य गाभा हा त्याचा आशयच असतो. कवितेपुरते विचार करायचे झाले तर आशय अर्थात काव्य हेच कवितेमध्ये आवश्यक आहे. एकदा कवितेमध्ये काव्य आले; आशय आला कि ती कविता म्हणून मान्य होते; झालीच पाहिजे.

 

परंतु जसे प्रत्येक कलेला एक शास्त्र आहे तसेच काव्य ह्या कलेला देखील आहे. कुणी गाणे शिकला नाही म्हणून त्याने गाऊ नये असे मुळीच नाही. पण जर खरोखर रीतसर गाणे गायचे असेल तर गायनकलेच्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. तसेच नृत्याचे आहे, चित्रकलेचे आहे. तद्वतच कवितेचे देखील आहे. अर्थात मला असे म्हणायचे आहे आणि ते माझे मत देखील आहे कि कुणी छंद - वृत्त यांचा अभ्यास न करता कविताच करू शकत नाही किंवा करू नये असे नाही. परंतु एखादी कला परिपूर्ण उतरवायची असेल तर स्वाभाविकपणे त्या कलेच्या शास्त्राचा अभ्यास करून, ते आत्मसात करून शास्त्रोक्त पद्धतीने ती कला सादर केली गेली तर ते अधिक उत्तम.

 

हे लिहित असताना आणखी एक पैलू किंवा विचार मनात आला. इतर कालांहून काव्य ह्या कलेचा मानवी मनाशी अधिक जवळचा सबंध आहे. मुळातच काव्य, गद्याहून देखील अधिक, अभिव्यक्ती (केवळ व्यक्तता नव्हे!) म्हणून निर्माण झालेली कला आहे. त्यामुळे काव्य हे निव्वळ कलेपेक्षा देखील अधिक काहीतरी आहे. हा पैलू विचारात घेता जर काव्य हे केवळ आपल्या मनातील भावना किंवा व्यक्त करण्यासाठी वापरलेले असेल तर मी म्हणेन ते उत्स्फुर्तपणे हव्या त्या पद्धतीने येऊ द्यावे. परंतु कुठल्याही गोष्टीला 'व्यक्त होणे' असे लेबल लावून काव्यशास्त्राकडे दुर्लक्ष करणे मात्र चुकीचे आहे. अशा प्रकारे व्यक्त होत असताना आपण खरोखर किती प्रामाणिक असतो ह्याचे आपण आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे. एवढेच नाही, तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा व्यक्त व्हायचे असेल आणि त्यासाठी कवितेचा आधार घेतला असेल, तर ती कविता जगासमोर मांडलीच पाहिजे का ह्यावर बारकाईने विचार करून मगच ती तशी जगासमोर मांडवी; अन्यथा ती व्यक्तता केवळ आपल्यापुरती सीमित ठेवली तरी काय हरकत आहे!

 

छंद आणि वृत्त यांच्यामध्ये एक अंगभूत सौंदर्य असते. माझ्या मते ते सौंदर्य कवितेचे सौंदर्य फुलवायला पूरक असते. मग मुळातच सुंदर असलेली कविता जर छंद-वृत्तांचे सौंदर्य घेऊन येत असेल तर मग आपल्या कवितेला ह्या शास्त्रोक्त सौदार्यापासून वंचित का ठेवायचे! मध्यंतरी विचार करत असताना माझ्या मनात ह्या विषयावर असा विचार आला कि कविता हि एखाद्या सुंदर स्त्रीसारखी आहे असे मानले तर छंद-वृत्त हे त्या कवितेची वस्त्रे आहेत, अलंकार अर्थातच त्या स्त्रीने परिधान केलेले दागदागिने आहेत. म्हणजे कविता पूर्ण नटवायची झाली तर त्या कवितेमध्ये आशयाचा आत्मा, काव्याचे शरीर, छंद-वृत्तांची वस्त्रे, अलंकारांचे दागदागिने हे सर्वच पाहिजे. (पूर्वी कुठेतरी असेही लिहिले होते कि कवितेला भावनांचे अन्न; शब्दांची वस्त्रे; आणि कल्पनेचा निवारा लागतो, असो!) हा विचार माझाच असला तरी मला अतिशय समर्पक वाटतो. अर्थातच आशयाविना कविता म्हणजे मृत शरीर! आशयाकडे सर्वप्रथम ध्यान दिलेच पाहिजे. परंतु आशयाने समृद्ध अशी कविता जर छंद-वृत्त ह्यांच्या शिवाय असेल तर ती अनावृत्त माणसासारखीच असेल असे वाटते. अनावृत्त; अर्थात वस्त्रहीन किंवा नग्न माणूस हा काही मनुष्य नसतो का? असतोच, तद्वतच वृत्तविहीन कविता हि देखील कविता असतेच, परंतु ज्याप्रमाणे आदिम काळात कदाचित अनावृत्त राहणाऱ्या मनुष्याने वस्त्रांचा केलेला स्वीकार हा सांस्कृतिक विकासाचे लक्षण मनाला जातो, तद्वतच कविता जर छंद-वृत्त यासहीत असली तर ती अधिक सुसंकृत होईल असे म्हणणे आज घडीला थोडे धारिष्ट्याचे होईल, पण वावगे ठरणार नाही, असे वाटते!

 

छंदोक्त काव्य लिहिताना एक वेगळाच आनंद मिळतो हे मी स्वानुभवाने सांगतो. मी सुरुवातीपासून छंदमुक्त लिहित आलो कारण माझा वृत्त-छंद यांचा अभ्यास नव्हता. परंतु जसे जसे वृत्त समजू लागले आहे तसे काही वृत्तांमध्ये लिहिताना एक वेगळा आनंद मिळू लागला आहे. हा आनंद एखाद्या काव्याच्या निर्मितीहून अधिक मोठा नाही, परंतु काव्यनिर्मितीच्या स्वानंदाबरोबरच शास्त्रोक्त काव्यनिर्मिताचा आनंद देखील मिळत असेल तर तो निश्चितच केशर-कस्तुरी योग म्हटला पाहिजे आणि असा दोन्हीचा आनंद घेण्याचा प्रयत्न सर्वांनी निश्चित केला पाहिजे.

 

कला हि उपजत असते. ती प्रत्येकाच्या प्रतिभेतून निर्माण होते. परंतु शास्त्र हे अभ्यासावे लागते, अंगी बाणवावे लागते; आत्मसात करावे लागते. अर्थात, शास्त्र आत्मसात करणे ह्यासाठी प्रयत्न लागतात, कंटाळ्यावर मत करावी लागते, ती एकप्रकारे साधनाच असते. हि साधना काही एका दिवसात किंवा महीन पंधरा दिवसात साध्य होत नाही, त्यासाठी महिनोन महिने, वर्ष; कैक वर्ष द्यावी लागतील. ती देण्याची आपली तयारी सहसा नसते. ह्या साधनेच्या कंटाळ्यानेच आपण आपण तशाच कविता करत राहतो.

 

ह्या अनुषंगाने एक मुद्दा आणखी स्पष्ट करावा वाटतो कि छंद-वृत्त हे एकप्रकारे शास्त्र असल्याने कविता करण्यामध्ये त्यांचा अनेकदा अडथळा होतोच. कितीही अभ्यास केला, साधना केली, तरीही छंद-वृत्ताचे भान पाळत केलेली कविता हि कुठेतरी किंचितमात्र का होईना तडजोड स्वीकारूनच होते. अर्थात ह्या काव्यशास्त्राच्या नियमांनुसार कविता लिहिणे हि देखील एक कलाच आहे किंवा काव्य ह्या कलेचेच एक अंग आहे. परंतु जेव्हा शास्त्र आणि कला ह्यात निवड करायची वेळ येईल तेव्हा मी तरी कलेची निवड करेन. म्हणजेच जिथे एखाद्या विषयाची किंवा एखाद्या वेळी अभिव्यक्तीमध्ये हे शास्त्र अडथळा निर्माण करत असेल आणि त्यातून त्या अभिव्यक्तीचा मूळ आशय, विषय, विचार, भाव-भावना ह्याच हरवून जात असतील; किंवा ते काव्य कृत्रीम किंवा रसहीन होत असेल, तर त्या शास्त्राला अनुसरूनच कविता लिहिली जाणे ह्याचा पुरस्कार करणे चुकीचेच ठरेल, अशी ठाम खात्री मला वाटते. तसेच ह्या शास्त्राच्या पाठीमागे लागल्याने आपल्यातील काव्यकला हरवत जात आहे असे वाटले तर वृथा त्याच्या मागे लागावेच असेही नाही. परंतु असा निर्णय घेण्याआधी अनेकवार त्याची सखोल परीक्षा घेतली पाहिजे आणि जर मूळ कलेला; कलेच्या गाभ्यालाच धक्का पोहोचत असेल, तरच ह्या काव्यशास्त्राचा अभ्यास सोडता येईल. परंतु हे म्हणत असतानाच जो सच्चा कवी असतो त्याला हे शास्त्र आत्मसात करून आपल्यातील काव्य जपता येईल किंवा आलेच पाहिजे असेही वाटून जाते.

 

ह्या सर्वाचा अर्थ हा कि कवितेचे हे शास्त्र हे कवितेहून अधिक मोठे नसून, ते कवितेला केवळ पूरक आहे; असले पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे पंतकवितेची सामान्यजनाशी नाळ साधली गेली नाही, तद्वतच कदाचित शास्त्र आणि नियमांच्या आग्रहाने कवितेशी असलेली नाळ तुटू शकते. म्हणजेच कवीने एखादी कविता हि कुठल्या प्रकारे लिहिली गेली पाहिजे, किंवा लिहिली तर योग्य ठरेल ह्याचा देखील बारकाईने विचार केला पाहिजे, असे वाटते.

Sunday, January 5, 2014

पाप



पांगली पुढची पिढी अन्
लांबली अवघड प्रतीक्षा
अनुभवांती लाभली मज
निबरतेची दिव्य दीक्षा

वेदनांच्या खोल डोही
जाणिवांचा अस्त झाला
फक्त उरली बेफिकीरी
आणि काही काळ उरला

वाकुल्या दावीत आहे
सांध्यरेषा जीवघेणी
आप्त माझे गात बसती
व्यर्थ मृत्यूची विराणी

मात्र मी अस्वस्थ नाही
एकटा असलो तरीही
बाहयरूपी शांत आहे
शांत आहे अंतरीही

मी तटस्था सारखा अन्
भाव नुरले, शब्द नुरले
काय झाले ते कळेना
जास्त जगणे पाप ठरले!

- निलेश पंडित
४ जानेवारी २०१४

===========================================

निलेशदा,

खरोखर एका अप्रतिम कवितेचा अनुभव तुम्ही दिलात. मी माझ्या कुवतीप्रमाणे मला त्यात समजलेले; भावलेले जे काही आहे त्यावर मनमोकळे विचार मांडतो.

एका वेगळ्या गंभीर विषयाचा काव्यात्मक अविष्कार सादर करत असताना तुम्ही त्या स्वत: न अनुभवलेल्या परिस्थितीतील भावस्थितीचे जे अफलातून वर्णन केले आहे त्याने त्या परिस्थितीविषयी तिटकारा, भीती किंवा सहानुभूती न वाटता मला एक वेगळेच आकर्षण वाटून गेले. कदाचित माझे हे म्हणणे थोडेसे विचित्र वाटू शकते, परंतु त्या परिस्थितीतील भावावस्थेच तुम्ही केलेलं समर्थ शब्दचित्रण माझ्या कवी मनाला मोहित करून जात. कुठलीही उत्कट भावावस्था कवीसाठी आकर्षण ठरू शकते हे तुम्ही निश्चित समजू शकाल.

तुमच्या काव्यप्रतिभेतून तुम्ही त्या स्थितीतील विकलता किंवा विषण्णता वर्णन न करता त्या परिस्थितील पुरुष किंवा कदाचित स्त्रीदेखील अशा एकाकी अस्ताकडे झुकलेल्या अस्वस्थ करणाऱ्या स्थितीमध्ये देखील स्थिरतेकडे जातो; निश्चल होतो, पण तरीही ती स्थिरता; निश्चलता हि निबरपणा सारखी असते, जाणीवच बधीर करणारी असते हा केवढा मोठा विषाद तुम्ही इथे विषद केला आहे!

आधीच अवघड असलेली प्रतीक्षा लांबणे - अगदी साधे वाटणारे हे शब्द नीट विचार करता एक विदारक अनुभूती निर्माण करतात! एखाद्या खोल अंतहीन अंधकारमय गुहेतून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. आतमधून गुदमरल्यासारखा अनुभव येतो! प्रतीक्षा मुळातच कंटाळवाणी असते; त्यात अनिश्चित प्रतीक्षा हि तर अधिकच भयावह; त्यात पुढे अवघड परिस्थितीतील अनिश्चित गोष्टीची प्रतीक्षा आणखी कठीण आणि ती हि अपेक्षांच्या पलीकडे लांबणे हे खरोखरच अत्यंत विमनस्क करणारे आहे. मोजक्या शब्दात इतके सारे सांगून जाणे हे महत्कठीण काम तुम्ही इथे साधले आहे.

वर मी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ काळ जेव्हा आपण एखाद्या प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो, तेव्हा त्या परिस्थितीतून स्वाभाविकपणे निर्माण होणाऱ्या संवेदना बोथट होत जातात. हे कदाचित स्वाभाविक मानसशास्त्र आहे. अशीच हि बोथटता; निबरता अनुभवांती लाभते हेच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हि निबरता का? कारण ते ती निबरता म्हणजे संवेदनांशी केलेली फार मोठी तडजोड आहे, ती अवस्था हि काही स्थितप्रज्ञासारखी स्थिर बुद्धीची अवस्था नाही, तर भावनाहीन अशी अवस्था आहे. एका तऱ्हेने ह्या स्थितीमध्ये देखील एकप्रकारचे दु:ख ठसठसून भरलेले असतेच, परंतु निबरतेच्या कृत्रिम आवरणाखाली ते दडपून टाकलेले असते. 'दिव्य दीक्षा' यातील 'दिव्य' कदाचित अस्थायी वाटू शकतो. परंतु मला त्या दिव्य मध्ये एकप्रकारचा हतबल उपहास जाणवला. अशा निबरतेला दिव्य, अर्थात काहीतरी विलक्षण असे म्हणायचे नसून, त्या दिव्य मधून कदाचित त्या निबरतेवर अप्रत्यक्ष टीकाच करायची आहे. किंवा 'दिव्य करणे' म्हणजे एखाद्या अतिशय कठीण परिस्थितीतून काहीतरी प्राप्त करणे, कठीण परिस्थितून वाट काढत पुढे जाणे असे काही सूचित करायचे आहे असेही वाटते.

वरील निबरतेची भावना पुढील कडव्यात अधिक विस्तृत करून सांगितली आहे. जाणीव नष्ट होणे हि एकप्रकारे विमनस्क भावावस्थाच आहे. त्यातून एक प्रकारची बेफिकिरी निर्माण होते, बेदरकारपणा निर्माण होतो हि वास्तविक मानसिकता समजून घेऊन ती शब्दात ओतण्याचे कठीण काम तुमच्या ह्या कवितेत अतिशय सहजतेने केलेले दिसते.

'आणि काही काळ उरला' ह्या ओळीत ती अवस्था हि निबरता आहे असे अधोरेखित होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे सारे दु:ख, विषाद, वैफल्य आणि विकलता हि त्या निबरतेच्या आवरणाखाली दडपून टाकलेली असते; गाडून टाकलेली असते. जणू काही अतिशय थंडीमध्ये नदी गोठून जाते, परंतु त्या गोठलेल्या बर्फाच्या आवरणाखाली पाणी वहातच असते. अजूनही काही काळ उरला आहे ह्यातून न संपणाऱ्या त्या प्रतीक्षेची भावनाच गडद होते.

सांध्यरेषा - सांध्य म्हटले जाते कि नाही मला ठाऊक नाही, माझ्या आधी कधी वाचनात आले नाही.

पण ह्या कडव्यात देखील किती काही प्रत्येक शब्दातून सांगितले आहे! संध्यारेषेच्या जवळ जीवन चालले आहे हि भावना जीवघेणी आहेच. त्या रेषेचे वाकुल्या दाखवणे ह्यातून कुठेतरी त्या संध्यारेषेजवळ जाण्यातील अपरिहार्यता प्रकट होते. तसेच मृत्यूची विराणी हे देखील अद्भुत लिहिले आहे. विराणी हि विरहाच्या खोल दु:खात बुडालेली कविता असते, मृत्यूची विराणी यातून कदाचित ते आप्त मृत्यूला आमंत्रणच देत आहेत असे मला वाटले. म्हणजे 'ह्या म्हाताऱ्याला मृत्यू येवो' असे प्रत्यक्ष न सांगता मृत्यूची विराणी गाणाऱ्या आप्तांच्या कल्पनेतून ते कसे त्याच्या मृत्यूचीच वाट पाहत असतात हे मांडले आहे. हि कल्पना केवळ विलक्षण वाटते. एखादी भावना, स्थिती अधिक उत्कट करताना तुमच्यासारखा प्रगल्भ विचारवंत कवी असाच विलक्षण दाखला देतो.

एवढ्या साऱ्या भावभावनांच्या आरोह-अवरोहात; चक्रीवादळात सापडलेला, जाणीव नष्ट होऊन निबर झालेला एकाकी हतबल वृद्ध अखेरीस अंतर्बाह्य शांततेची प्रचीती घेतो, एका तटस्थतेचा अनुभव घेतो, परंतु मला तरीही वाटते कि 'जास्त जगणे पाप ठरले' हा हेलावून सोडणारा प्रश्न तो कुठेतरी अजूनही आतून शांत नाही; किंवा पूर्ण शांत नाही असेच दर्शवतो. कुणालातरी नाकी इतके जगणे आणि याची आपल्याला जाणीव असणे हि मनाला खंगवत नेणारी भावना आहे.

जीवनांताला निर्माण झालेले वैषम्य आपल्या उपक्रमात दिलेल्या ओळीतून इतक्या समर्थपणे मांडण्याची शब्दकिमया तुम्ही साधली आहेत त्याने ह्या उपक्रमाचे सार्थक झाले असेच मी म्हणेन!

अनेक धन्यवाद!


सारंग भणगे. (५ जानेवारी २०१४)

पुस्तक



कधी वाटते पुस्तकासारखी तू ।
कवीता कधी नाटकासारखी तू ।।

तुझे ओठ दोन्ही उला आणि सानी
तुझ्या दंतपंङती जणू गीत ओळी
कटाक्षात 'भोळ्या' तुझ्या श्लेष वाटे
अभिधा कधी व्यंजना भाव डोळी

कधी बालका सारखी हासता तू
मला वाटते मुक्तकासारखी तू ।।1।।

तुझी घट्ट वेणी गझलेप्रमाणे
बटा कुंतलाच्या जणू मुक्तछंदी
कपोलांसवे नासिकेची त्रिवेणी
खळ्या दोन गालात आनंदकंदी

कितीही तुला वर्णिले मी तरीही
अधू-याच प्रास्ताविकासारखी तू ।।2।।
======================
सारंग भणगे. (29 डिसेंबर 2013)


Related Posts Plugin for WordPress, Blogger...