Monday, October 23, 2017

आयुष्याचे सरपण गेले सरणावरती

आयुष्याचे सरपण गेले सरणावरती
कविता सुचते आहे अपुल्या मरणावरती

राम सोबती असता कसला मोह जडाचा
काय नवल की जीव जडावा हरणावरती

तारण असते जीवन त्याचे पाण्यासाठी
जमीन जाते बळी बळीची धरणावरती

तू गेल्यावर श्वास घेतला अखेरचा मी
आता जगतो आहे केवळ स्मरणावरती

निरिच्छ होउन गाव सोडला बैराग्याने
धुळही नव्हती कणभर त्याच्या चरणावरती

डोके भिडले आकाशाला पाय भुईवर
मस्तक माझे झुके अशांच्या चरणावरती

- सारंग भणगे (२० ऑक्टोबर २०१७)

Saturday, October 21, 2017



कलापूर्ण व्हावे.. जगावे असे की..
सुरांसोबती ताल मिसळून जावा..
धुमारे फुटावे हजारो... मनाला..
निळाभोर.. आकाश पक्षी उडावा..

कधी चित्र-रंगात गुंतून जाता
जुन्या चौकटीतून बाहेर यावे
पहाव्यात रेषा..उमलती कशा या
कलामंदिरी.. फक्त देणे उरावे

कलाकार आहेच 'तो' ही निराळा
रुजे पंचभूतात गाणे प्रवाही
असे गूढ शिल्पात कोरून जाई
उरे ना कला.. ना कलाकार राही

* सुनीति लिमये
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुनीतिताई, फार म्हणजे फार सुरेख रचना आहे!

रणजित नेहेमी म्हणत असतो कि कवितेला छान लय असली कि कविता वाचावीशी वाटते आणि हे खरेच आहे. कविता लयबद्ध असली कि तिला एक वेगळीच उभारी येते. म्हणजे प्रत्येक कविता ही मोरासारखी सुरेख असतेच; पण ती छान लयीत असली कि जणू मोराने तो पिसारा पूर्ण फुलवला कि तो कसा अधिक मनोहर दिसतो, तसे काहीसे होते! तुमच्या ह्या कवितेला इतकी सुंदर लय आहे कि वाचायला खूप मजा आली.

अशा लयबद्ध कवितेला सुंदर शब्दांची साथ मिळाली तर तो पिसारा फुलवलेला मोर जणू आनंदाने थुईथुई नाचू लागला आहे असा अनुभव मिळतो. अतिशय साधेच, पण तरीही कवितेला एकदम अनुरूप असे शब्द तुमच्या कवितेचे सौंदर्य खुलवत आहेत. प्रासादिक कवितांचा उद्देश हाच असतो कि वाचकाला त्यातून एक आनंद मिळावा, आणि तुम्ही जसे लिहिले आहे कि ‘सुरांसोबती ताल मिसळून जावा’; तसे तुमचे हे शब्दसौंदर्य त्या नादमय कवितेच्या सौंदर्यात फार सुरेख मिसळले आहेत.

शब्दांना नाद असतो, पण शब्दातून चित्र देखील निर्माण होते. कुणास ठाऊक मेंदूच्या किंवा मनाच्या कुठल्या कुठल्या अंगांना ते शब्द स्पर्शून जातात आणि कुठल्या कुठल्या संवेदनांना सुखावून जातात! पण अशी सौंदर्यपूर्ण कविता मनाला फार आल्हाद देऊन जाते! त्यासाठी नादमधुर तसेच समर्पक आणि सौंदर्यपूरक शब्द कवितेत योजणे ही सोपी कला नाही. शेकडो कविता वाचल्यावर मग असा अनुभव क्वचित मिळून जातो!

पण कवितेचा खरा आत्मा असतो तो म्हणजे तिचा आशय! ह्या कवितेत जर आशय नसता तर तो पूर्ण पिसारा फुलवून आनंदाने नाचणारा मोर हा एखादा लोकांचे कृत्रिम रंजन करण्यासाठी तयार केलेल्या electronic / मानवनिर्मित मोरासारखा वाटला असता. सौंदर्यपूर्ण कवितेत तितकंच सखोल आणि सघन आशय जेव्हा मिसळलेला असतो, तेव्हा ती कविता खऱ्या अर्थाने जिवंत होतेच; पण कवितेला अधिक उदात्तता देखील येते.

तुमच्या ह्या कवितेत आयुष्य अधिक परिपूर्ण; कलात्मक कसे जगावे हा संदेश हा त्या आशयाचा पाया रचतो, पण शेवटी तुम्ही जेव्हा ‘उरे ना कला.. ना कलाकार राही’ ही ओळ लिहिता तेव्हा जीवन कितीही सुंदर असले तरीही जीवनाची अगदी खरी परिपूर्तता ही त्या तत्वात विलीन होण्यात; कला आणि कलाकार हे द्वैत देखील संपण्यात आहे, हे लिहिता तेव्हा केवळ नतमस्तक व्हावे वाटते!

इतक्या छोट्या कवितेत इतके रंग असे भरले आहेत कि क्षणभर थक्क होऊन गेलो मी! फार आवडली ही रचना!

- सारंग

Tuesday, October 17, 2017

वयात आलेल्या माझ्या मुली

वयात आलेल्या माझ्या मुली,

आता जेव्हा तू माझं बोट सोडून
ह्या रस्त्यांवर उतरशील,
तेव्हा तुला भेटतील
ह्या शहरात वावरणारी
अनेक जंगली श्वापदे,
दिसतील कोल्हे; लांडगे; गिधाडे;
आणि अनेक जळवा; पिसवा,
अंगाला लुचणाऱ्या; रक्त पिणाऱ्या!

लुचेल एखादी जळू तुझ्या मऊ कोमल त्वचेला;
लचके तोडायला अंगावर धावतील लांडगे;
आणि फसवतील काही लबाड कोल्हे
तुला त्यांचं भक्ष्य करण्यासाठी!

तू लढ; हरू नकोस; भिऊ नकोस!
ह्या कभिन्न जंगलात भिन्न रहा आणि चालत रहा!

एखाद अनावर जनावर
तुला ओरबाडून; तुझ्या तनुची लक्तरं करू पाहील
जरी भक्ष झालीस तरी तुझ लक्ष्य विसरू नकोस,
स्वत:ची घृणा तर कधीच करू नकोस!!

शरीरावर झाले आघात
तरी तुझ मन त्यापासून अस्पर्श ठेव,
शांत रहा, पण भ्याडपणाने गप्प राहू नकोस!
अन्यायाचा थयथयाट कितीही असला तरी
तुझ्या अंतरंगातल्या अमर्याद शक्तीच्या थैमानापुढे
त्यांचा टिकाव लागणार नाही!
त्या शक्तींना टिकव, 
आणि वेळप्रसंगी
त्या शक्तींचा टिकाव ह्या श्वापादांवर घालून
त्यांच्या नृशंस; हिडीस वृत्तीला ठेचून मार!

पण असा बदला हेच जीवनाचे ध्येय
बनवू नकोस!
तुझ ध्येय कितीतरी उदात्त आहे,
ते ओळख; पारख!

ह्या जळवा; पिसवा फेकून दे
आणि तुझा काजवा शोध!
होय, ह्या घनघोर जंगलात
काही काजवेही भेटतील तुला;
हा विश्वास ठेव!

आणि नाहीच मिळाला एकही काजवा
तर तुझ्या मनमंदिरात काजव्यांचे थवे शोध!
त्या काजव्यांची मशाल जेव्हा तुझ्या अंतरंगात पेटेल
तेव्हा हे जंगल देखील उजळून निघेल!!!

तेव्हा जग तुझ बोट धरून चालायला शिकेल!
============================
सारंग भणगे (११ ऑक्टोबर २०१७)

आर्तता काव्यात येते दाटुनी

आर्तता काव्यात येते दाटुनी
आत आहे तेच येते आतुनी

कष्टणाऱ्या बांधवांना भाकरी
गोड आहे विठ्ठला नामाहुनी

उंबऱ्यावर जाहली माझी प्रिया
माप येता वेदना ओलांडुनी

बोचरी असहायता पुरुषा तुझी
कृष्णमयता साध्य राधा होउनी

खोल विहिरीतून कविता काढतो 
मोट शब्दांची तिच्यावर बांधुनी
==================
सारंग भणगे (१६ ऑक्टोबर २०१७)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...