Saturday, December 13, 2014

* घुसमट *


तू घरी येतोस...मी दार उघडते
तूझा चेहरा हसरा नसतोच
मीच हसते थोडी गालात.....
नेहमीप्रमाणे मख्ख असतोस तू
मी बडबडत राहते स्वयंपाकघरातून
तू हातातली मोज्यांची वळकटी
माझ्या शब्दांसकट बूटात ठेवतोस...
मी विचारत राहते अनेक प्रश्न
सांगत राहते काहीबाही
दिवसभरात घडलेले...दिसलेले....ऐकलेले
....हातपाय धुवून येताना तू
फ़िरवून जातोस यंत्राप्रमाणे तुझा हात
माझ्या घामेजलेल्या अंगावरुन...
मला कळतं रे...तुझे स्पर्श तर नक्कीच कळतात
किळसवाणे वाटतात तुझे स्पर्श
जेव्हा मी जीव तोडून बोलत असते
आणि तू खेळत असतोस
माझ्या चेतनाहीन अवयवांसोबत...मख्खपणे...
"हो" किंवा "नाही" च्या पलिकडे उत्तर नसते
माझ्या एकही प्रश्नाला तुझे
आणि मी मुर्खासारखी घुटमळत राहते
तुझ्या आजूबाजूला...
तुझा तुटपुंजा सहवास मिळवण्यासाठी...
जेवणाची ताटं करकरतात...भरली जातात
निमूटपणे रिकामीही होतात
माझे बोलणे चालूच असते
तुझे ऐकणेही चालू असते...
तशाच ओल्या हातांनी
अंथरुणं जमिनीवर कोसळतात
घाबरल्यागत... डोळे मिटून...
कदाचित त्यांनाही माहित असावं
कि थोड्या वेळात सुरु होणार आहे
तुझे बोलणे आणि माझे फ़क्त ऐकणे....
तुझा दिवस इथेच संपतो
माझा मात्र संपत नाही
मी अंधारातही बघत राहते
तुझ्या चेहर्‍यातला मख्खपणा
अगदी पहाट होईपर्यंत...
--संतोष वाटपाडे (नाशिक)
-------------------------------------------------
कविता हे अभिव्यक्तीचे सर्वात सशक्त माध्यम. अभिव्यक्ती म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे आपल्या भाव-भावना कलात्मक पद्धतीने मांडणे. त्यामुळे सहसा कवितांमधून आपले अनुभव, आपल्या जाणीव, भाव-भावना आणि विचार व्यक्त होताना दिसतात. एका अर्थाने कविता हे कवीच्या स्वत्वाचे दर्शन असते. कुठल्याही प्रसंगावर कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा ती त्या प्रसंगाबाबतचा कवीचा दृष्टीकोनच व्यक्त करते.

पण काही वेळा तटस्थ राहून; दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्या दुसऱ्याच्या भूमिकेतून आपले कथन काव्यातून करणे किंवा आपला दृष्टीकोन व्यक्त करणे हे काही खूप नवीन नाही. परंतु तटस्थ राहून स्वत:वरच टीका करणारी कविता हि अगदी नवीन नसली तरी विरळा असते असे वाटते.

संतोषजींच्या ह्या कवितेत कदाचित ते स्वत:चा दृष्टीकोनच मांडत असतील, परंतु स्त्रीच्या भूमिकेत शिरून; तटस्थ राहून; एका अर्थाने स्वत:वरच टीका करण्याचा प्रामाणिकपणा ह्या कवितेत निश्चितपणे जाणवला.

तसे पाहता कविता काही अनोख्या विषयावर नाही. अनेक स्त्रियांनी (कदाचित पुरूष कवींनी देखील असेल) अशा प्रकारची स्त्रीवादी म्हणवली जाईल अशी कविता कैक वेळा लिहिली असेल. परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पुरुषाने अशी कविता लिहिताना इतका प्रामाणिक तटस्थपणा आढळलेला नाही.

कवितेचे शीर्षक बिन-महत्वाचे असते असा एक सर्वसाधारण सार्वत्रिक समज आहे. परंतु इथे मला कवितेच्या शीर्षक हे सूचक वाटते. म्हटले तर कवितेला अनेक रंग देता येऊ शकतील. उदा: ह्या कवितेला ‘पिळवणूक’ असेही शीर्षक देता आले असते, आणि ते तसे दिले गेले असते तर कवितेचा भावार्थ बदलला असता, असे मला वाटते. परंतु ‘घुसमट’ हे शीर्षकच कवितेविषयी उत्सुकता निर्माण करणारे आहे, तसेच ते कवितेचा गाभा सांगणारे आहे. कवितेतील शब्दातून जितके काही व्यक्त होते ते कवितेच्या ह्या शीर्षकाने अधिक ठळक होते, असे मला वाटून गेले.

अर्थाच्या दृष्टीने कविता सरळ आणि थेट आहे. असे वाटून गेले कि हीच कविता; हीच भावना जर स्त्रीने लिहिली असती तर कदाचित ती इतक्या सरळ आणि थेट नसती लिहू शकली. माझ्या इथेच अभिव्यक्तीमधील तो फरक जाणवतो.

शब्द बुटात ठेवणे; घामेजले अंग; चेतनाहीन अवयव; तुटपुंजा सहवास; ताटं करकरणे; निमूटपणे रिकामी होणे; अंथरूण घाबरणे; ई. ठिकाणी कविता जिवंत होते, ती अनेक निर्जीव गोष्टींना सजीव करते. ते सर्व वाचताना कवितेत व्यक्त केलेल्या भावना जिवंत होतात, अधिक खोल आणि ठळक होतात. कविता मनाचा ठाव घेत राहते आणि वाचक कवितेत गुंतून राहतो, कवितेशी त्याची सह-अनुभूती होते. काव्याच्या दृष्टीकोनातून हि सर्व कवितेची सौंदर्यस्थळ आहेत, आणि भावनेच्या दृष्टीकोनातून कवितेला भावनिक खोली देणारी स्थळ आहेत.

मला कवितेमध्ये सर्वात आवडलेला भाग म्हणजे –

कदाचित त्यांनाही माहित असावं
कि थोड्या वेळात सुरु होणार आहे
तुझे बोलणे आणि माझे फ़क्त ऐकणे...

कवितेच्या अंताला कविता उच्चांकाला पोहचते. मी पहिल्यांदा जेव्हा हि कविता वाचली तेव्हा मला ह्याच ओळी हे कवितेचे वैगुण्य वाटल्या. कवीला नक्की काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही. परंतु जेव्हा मी आत्ता ह्या कवितेवर माझे विचार लिहायला लागलो तेव्हा मला ह्या ओळी अंगावर येणाऱ्या वाटल्या, आणि हे सर्व लिहित असताना माझ्या अंगावर वारंवार अक्षरश: काटा आला, डोळे किंचित पाणावले.

ते त्याचे ‘बोलणे’ काय आहे ह्याचा अर्थबोध हा पुरूष म्हणून मला अतिशय उद्वेगजनक वाटला! ती जे बोलते आणि तो जे बोलतो ह्यातील हि तफावत पुरूष म्हणून मला लाजायला लावणारी वाटली.

संतोषजी, कविता इथे जिंकते. ह्या क्षणी मी ह्यावर अधिक लिहू शकत नाही, परंतु तुम्ही हे जे लिहिले आहे त्याला सलाम. एरवी छान वाटणारी, पण फार काही outstanding न वाटणारी हि कविता इथे अक्षरश: उच्चांकाला पोहोचते, आणि वाचकाचा; विशेषत: पुरूष वाचकाचा कडेलोट करते एवढेच म्हणून मी इथे थांबतो!

तुझे दुःख माझे

कधी सोबतीच्या नसाव्यात शर्ती
मनाच्या तळाशी जपावीत नाती
तुझे विश्व माझे न झाले जरीही
तुझे दुःख माझे असावे तरीही

तुझे भाव माझ्या मनाला कळावे
तिथे पेटले की इथेही जळावे
न अद्वैत माझे तुझ्याशी जरीही
तुझे दुःख माझे असावे तरीही

जरी दूर आहेत दोन्ही किनारे
नदी आटता एक होतात ना रे
सुखे नीर वाहे, न तेव्हा जरीही
तुझे दुःख माझे असावे तरीही

नसे अंतराची तशी खंत मोठी
उरी अंतरी तूच आहे सभोती
तु राधा न माझी न मीरा जरीही
तुझे दुःख माझे असावे तरीही

नसावीस माझी असे दु:ख माझे
असेही जरासे तुझे दु:ख माझे
मिळाले तुझे प्रेम नाही जरीही
तुझे दुःख माझे असावे तरीही

जणू शिंपल्याच्या मधे शुभ्र मोती
असावी तशी अंतरी गाढ प्रीती
तुझे आणि माझे असा भेद नाही
तुझे दुःख माझे असावे तरीही
=====================
सारंग भणगे.
(13 डिसेंबर २०१४)

Wednesday, December 3, 2014

बागेश्रीची कविता

घरात भिंत उभी मधोमध
अल्याड पल्याड दोन गाव
बाहेर पाटी एकच नाव...!
तिनं राखलंय एक तावदान
भिंतीच्या अगदी मधोमध,
कधी इच्छा अनावर झाली
की येते ती खिड़कीशी
पाहत राहते
कामाचा व्याप,
त्याची लगबग
तास अन् तास
त्याला जाणीवही नसते
तिच्या असण्याची...
त्यानं राखलंय एक भुयार,
हवं तेव्हा तिच्याकडे येण्यासाठी!
इच्छा अनावर झाली
की तो तिच्याकडे येतो!
शमली की जातो,
भिंतीच्या पल्याड!
तिने कित्येक संध्याकाळ
खिडकीशी काढल्यात!
-बागेश्री देशमुख
==========================
कविता अगदी स्पष्ट आहे. एक परिस्थिती ज्यात ती त्याच्या सोबतीची अनावरपणे वाट पाहत राहते; त्यावेळी त्याच्याकडे तिच्यासाठी वेळच नसतो. तो आपल्याच विश्वात गुंगलेला, आणि ती त्याच्या विश्वात गुंतण्यासाठी आतूर. त्याचे गुंगणे इतके कि तिच्याबरोबर गुंतवणूक करायला ना त्याच्याकडे वेळ, ना तसे काही भान! त्याचे ते गुंगणे तिला सतत गुंगारा देणारे. पण तो तरीही वाट पहात राहते.....कित्येक संध्याकाळी!

तो आपल्या विश्वात गुंगलेला, पण त्याने असे काही भुयारी मार्ग काढलेले कि जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हा तो सहज तिच्या पर्यंत पोहोचू शकतो. मात्र तो तिचा संग करतो केवळ आपल्या इच्छापूर्तीपुरताच, आणि एकदा का ती शमली कि तो त्या अडग भिंतीपलीकडच्या आपल्या विश्वात गुंगून जातो पुन्हा एकदा......त्याची इच्छा पुन्हा एकदा अनावर होईपर्यंत!

इथे त्याच्या इच्छा शमवणे हे मी केवळ शारीरिक वासना शमवणे अशा मर्यादित अर्थाने घेणार नाही, जरी ते ‘शमणे’ ह्या क्रियापदाच्या वापरामुळे प्रतीत होत असले तरी. कवियत्रीच्या मनात ते तशाच मर्यादित अर्थाने आहे कि नाही ठाऊक नाही, पण वाचकाला कविता व्यापक करण्याचा मुलभूत अधिकार असतो, तो वापरून मी त्या इच्छा ह्या सर्व प्रकारच्या इच्छा मानेन. कुटुंबासोबत सहवासाची देखील इच्छाच. ती त्याच्या बाबतीत केवळ एक इच्छा असते; तर तेच तिच्याबाबतीत एक जगण्याची गरज असते; आवश्यकता असते.

तिच्यासाठी भिंतीला तावदान. तिला फक्त पलीकडचे पाहता यावे म्हणून, तर त्याला भिंतीचा अजिबात अडसर नाही, कारण त्याने भिंतीखालून भुयार खणले आहे. म्हणजे ती भिंत जेव्हा त्याला हवे तेव्हा कामास येते, आपल्या विश्वात रमून जायच्या वेळी, आणि ते भुयार कामास येते जेव्हा तिच्या विश्वातून त्याला आपली इच्छापूर्ती करून घ्यायची असते.

तिला दिलेले तावदान हे वरपांगी वरदान वाटते, तिला त्याच्या विश्वात डोकावून पाहण्यासाठी दिलेली संधी वाटते. पण एका अर्थाने त्या तावदानातून पलीकडचे विश्व तिला पाहता येते जे तिला सतत वाकुल्या दाखवत राहते. त्या पलीकडच्या विश्वात त्याचे रमणे हे तिला खिजवत राहते, आणि तावदानाचे वरदान तिच्यासाठी शाप बनून राहते.

एक विलक्षण असा विसंगती-विलास ह्या कवितेत दिसून येतो. वरवर तशी साधीच वाटणारी कविता जेव्हा तिच्या दृष्टीकोनातून किंवा खरेतर तिच्या भूमिकेत शिरून पहिली जाते तेव्हा एक विमनस्क करणारं रखरखीत आणि खरखरीत वास्तव समोर येतं.

आजच्या शहरी जीवनातील एक सत्य परिस्थिती हि कविता चित्रित करते का? ह्या modern जमान्यातील स्त्रीची व्यथा हि कविता मांडते का? एक दुर्लक्षित केली जात असलेली किंवा पुरूषी प्रभाव असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये वाढत चाललेली समस्या हि कविता मांडते का? असे स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतात. कदाचित एवढा सम्यक् विचार कविता लिहित असताना होत नसतो, पण वाचक जेव्हा बारकाईने वाचतो तेव्हा कवितेची व्यापकता त्याला जाणवू शकते, आणि तसेच काहीसे माझे ह्या कवितेवर विचार करताना होऊन गेले आहे. वरवर तशी साधी आणि स्पष्ट वाटणारी कविता एका अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला शब्दांकित करते असे वाटते.

तिचे तावदान आणि त्याचे भुयार हि प्रतीके ह्या कवितेचा प्राण आहेत. मागे एका कवितेवरील चर्चेमध्ये 'काव्यमूल्य’ असा शब्द/ विषय चर्चेला आला होता. त्याची व्याख्या त्यावेळी केली गेली नाही. पण ह्या क्षणी मला जर ह्या कवितेतील काव्यमूल्य विचारले तर हि दोन प्रतीके; हि दोन रूपके ह्यात ह्या कवितेचे काव्यमूल्य संपुटीत झाले आहे असे मला वाटते. वरवर ती सामान्य वाटतील, पण त्या दोन प्रतीकांमागे एक विशिष्ट विचार आहे असे मला वाटते.

काव्याच्या व्युत्पत्ती आणि उत्पत्तीविषयी विचार करायचा झाला तर हि प्रतीके हि हेतुपुरस्सर योजून जन्माला येत नाहीत. कविता सहसा उत्स्फूर्त नसते असा मानणारा एक वर्ग आहे, परंतु मी व्यक्तिश: कविता हि उत्स्फूर्त असते अशा school of thought चा आहे. अर्थात, उत्स्फूर्तता म्हणजे काय हे थोडे समजून घेण्याचा भाग आहे, परंतु तो विषय अलहिदा वेगळा. तर हि प्रतीके माझ्या मते उत्स्फुर्तपणे कवितेमध्ये लिहिली गेली असावीत, आणि ते तसे असेल तर मला असे वाटते कि हे सारे कुठेतरी अंतर्मनात कोरले गेलेले असते जे परावर्तीत होऊन कविता रूपाने साकार आणि व्यक्त होते; गोचर होते. तो एखादा विचार, अनुभव, अनुभूती मनामध्ये किंवा अंतर्मनामध्ये नकळतपणे वास करून असते आणि केव्हातरी ती त्या डोहाच्या तळातून सळसळत बाहेर येऊन मनाच्या तळ्याच्या दर्शनी प्रतलावर तरंगांच्या रूपाने उमटते. मागे एकदा उमेशदांनी म्हटल्या प्रमाणे परावाणी मनाच्या खोल गुहेतून प्रवास करत करत आपल्या नकळतपणे वैखरीमध्ये ‘परा’वर्तीत होते आणि कविता निर्माण होत असावी! तो विचार बीज बनून मनात रूजत राहतो आणि जेव्हा तो परिपक्व होतो तेव्हा मनाची जमिनीखालचे अव्यक्त प्रतल फाडून कवितेच्या माध्यमातून धरतीवर फुलारतो.

हे सर्व लिहिण्याचे कारण एवढेच कि सुरूवातीला जेव्हा मी हि कविता वाचली तेव्हा ह्यात काव्य काय? प्रत्येक असल्या सामान्य विचाराचे काव्य लिहिलेच पाहिजे का? प्रत्येक विचारला कवितेमध्ये बांधलेच पाहिजे का? ई. प्रश्न माझ्या मनात येऊन गेले. परंतु मी जेव्हा कवितेवर अधिक बारकाईने विचार करू लागलो तेव्हा ही कविता वाचनातून समजण्याच्या पलीकडे समजू लागली.

अखेरीस एवढेच लिहू इच्छितो कि हि कविता स्त्रीच्या भूमिकेतूनच; नव्हे त्या भूमिकेशी समरस होऊन वाचली पाहिजे तेव्हाच ती मनाच्या संवेदनांच्या तारा कुठेतरी हलक्याश्या छेडू शकेल. एका अर्थाने स्त्रीचे तिच्या पतीविषयी, प्रियकराविषयीचे भावविश्व केवळ एकाच प्रतीकातून उलगडून दाखवणारी कविता मला आवडली.

म्हटले तर कवितेत हवे तेवढी वैगुण्य काढता येतील. परंतु जेव्हा एकदा कवितेतील संवेदनेशी माझी समवेदना झाली तेव्हा मला त्या वैगुण्यांवर बोट ठेवण्यातच वैगुण्य वाटू लागले.........इथेच थांबतो, कारण पुढे असे लिहायचे प्रसंग बरेच येतील!

- सारंग भणगे.

Sunday, November 23, 2014

राघव समयी


नभपटलावर नयनमनोहर I
बहुविध सुंदर I रंग उमलले II

गिरिवर कंदर घन-वन त्यावर I
नभचर सुस्वर I मंद किलबिले II

रविकर वैभव अनुभवते भव 
कनक महोत्सव अंबर खुलले ll

सुमन सुशोभित पुलकित गंधित l
तुळस विराजित अंगण फुलले ll

दशरथ नंदन नित नित वंदन l
स्मरण चिरंतन राघव उठले ll
====================
सारंग भणगे (१८ नोव्हेंबर २०१४)

Wednesday, November 19, 2014

रसग्रहण

‘First impression is last impression’ असे माणसांच्या बाबत म्हटले जाते, पण मला वाटते ते कवितांच्या बाबतही तितकेच लागू आहे. एखादी कविता पहिल्या पहिल्या वाचावी वाटते. काही वेळा त्या कवितेचा form/ रचना हे त्याचे कारण असू शकते किंवा काही वेळा कवितेच्या सुरुवातीच्या ओळीच सुंदर असतात कि आपण ती कविता पूर्ण वाचतोच. सहसा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण ह्या कवितेच्या निमित्ताने माझ्या मनात हा विचार आला आणि असे वाटून गेले कि जसे एखाद्या चित्रपटाची सुरुवातच नाट्यमय किंवा काहीतरी आकर्षित करणारी असेल तर पुढे पाहत राहण्याची उत्सुकता राहते तद्वतच कवितेचे पण असावे. मला आनंद आहे ह्या कवितेवर विचार करण्याच्या निमित्ताने हे तत्व माझ्या समोर आले.

मागे एकदा प्राजक्ता (प्राजु) शी गप्पा मारताना ती म्हणाली कि जर कविता समाजत नसेल तर त्याचा उपयोग नाही, ती कविताच नाही. त्या गप्पांमध्ये मी हा मुद्दा अमान्य केला, मला तो चुकीचा वाटला. पण माझ्या मते जी कविता आपण सर्वांसमोर मांडतो (एका अर्थाने प्रकाशित करतो) ती कविता फार दुर्बोध, संदिग्ध असू नये. असा विचार माझ्या मनात आला कि कविता ह्या दुर्बोध किंवा संदिग्ध असल्याने सामान्य माणूस कविते पासून दूर जातो आणि मग कवीपासून देखील दूर जातो. ह्याचा अर्थ दुर्बोध किंवा संदिग्ध कविता लिहूच नये असे नाही, किंवा त्या प्रकाशित करू नयेत, सादर करू नयेत असे नाही. परंतु तशा कविता मांडताना तितकाच ताकदीचा वाचक, रसिक समोर असला पाहिजे हे ध्यानात घेतले पाहिजे.

हे लिहिण्याचे कारण कि हि कविता मला दुर्बोध वाटली. मी सुमारे ३ वेळा हि कविता वाचली आणि तरीही मला ती फारशी समजली नाही. मी निलेशदा, श्रीधर काका ह्यांचे प्रतिसाद देखील वाचले, पण तरीही मला फार अर्थबोध झाला नाही.

आता असा अर्थबोध न होणे ह्याचा दोष कवितेला लागतो कि वाचकाच्या सामान्य समजशक्तीला हे सापेक्ष आहे. हे लिहिण्याचे प्रयोजन एवढेच कि केवळ कविता दुर्बोध वाटली अशा प्रतिक्रियेचा अर्थ कवीने कविता चांगली नाही असा घेऊ नये.

तर जी कविता मला ठीक ठीक समजलीच नाही त्यावर अधिक भाष्य करणे कठीण. परंतु एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे मला इथे निश्चित लिहावी वाटते कि मला हा छंदमुक्त form नाही आवडला. मी ह्याला मुक्तछंद म्हणत नाहीये, तर छंदमुक्त म्हणतोय कारण कदाचित मुक्तछंदामध्ये काही प्रमाणात तरी छंद असावा. त्यामुळे मुक्तछंद हा काव्य जगतात मान्य झाला. परंतु मुक्तछंद मान्य झाल्यावर पद्य सदृश काहीही लिहिले तरी चालते असा समज कवी मंडळींनी करून घेतला आणि (हे म्हणणे माझ्या पातळीला लहान तोंडी मोठा घास असे होईल) मराठी कविता अधोगतीच्या मार्गाला लागली. मी विचारांती ह्या मताचा झालो आहे कि सकस काव्यनिर्मितीसाठी वृत्त, छंद जाती ह्यांना धरूनच काव्य निर्मिती झाली पाहिजे.

वर सर्व लिहिले असले तरीही मी असे मानतो कि आशय हा सर्वात महत्वाचा काव्यगुण मानला पाहिजे. ज्या वृत्तबद्ध कवितेत आशय नाही ती कविता दुकानात निर्जीव पुतळ्यावर चढवलेल्या पोषाखाप्रमाणे असते असे मला वाटते. आशय हा कवितेचा आत्मा आहे, हे माझे निश्चित मत आहे.

ह्या कवितेत आशय निश्चित असावा. असावा म्हणण्याचे कारण खरेतर एवढेच कि तो बऱ्याच मंडळींना सापडला, मला तो नाही सापडला. शिवाय कवयित्रीने मांडलेल्या विचारांमध्ये देखील ह्या कवितेमागची भूमिका जाणवते आणि त्यामुळे हि कविता एका विशिष्ट अन्वयाने लिहिली आहे हे मान्य करणे क्रमप्राप्त आहे.

परंतु तो आशय सुस्पष्ट नाही असे मात्र मला ठामपणे म्हणावे वाटते. प्रतीकात्मक कवितेमध्ये देखील कुठेतरी मूळ आशयाकडे अंगुलीनिर्देश असावा असे मला वाटते. तो मला इथे तितकासा स्पष्ट जाणवला नाही.

खरेतर एखाद्या कवितेतून अनेक अर्थ निघणे हे उत्तम काव्याचे लक्षण मानले जाते, जे बरोबरच आहे. परंतु अनेक अर्थ निघतात असे म्हणत असताना ते ते अर्थ हे वाचकाला जाणवले पाहिजेत हे हि निश्चित. इथे मला तसे खुपसे जाणवलेच नाही.

वरील सर्व लिहिल्यानंतर मी पुन्हा एकदा कविता वाचली, सर्व चर्चा; सर्वांची मते पुन्हा एकदा वाचली. माझ्या बाबतीत बरेचदा असे झाले आहे कि मी प्रथम कविता वाचतो तेव्हा ती आवडत नाही आणि नंतर त्यावर लिहायला लागले कि अनेक कंगोरे स्पष्ट होतात आणि मग अर्थबोध होतो आणि कविता जाम आवडून जाते. मागे एकदा एका उपक्रमात एक कविता मला रसग्रहण करायची होती आणि मी ती वाचली, अजिबात आवडली नाही. पण काहीतरी लिहिणे भाग होते, म्हणून मी त्यावर टीकात्मक लिहायला लागलो. लिहिता लिहिता एक एक घडी उलगडू लागली आणि ती कविता मला पराकोटीची आवडून गेली, आणि त्यावर मी पानेच्या पणे लिहून काढली (ओर्कुट बंद पडले आणि हे सारे कालौघात वाहून गेले आता).

तोच प्रयत्न आणि प्रयोग मी इथे परत सर्व कविता आणि सर्व चर्चा वाचून केला, परंतु काही केल्या हि कविता आतमध्ये शिरत नाही.

ह्याचे कारण काहीही असू शकते आणि त्याचा दोष मी माझ्या कडेच घेतो कारण निलेशदांसारखा प्रगल्भ कवी-वाचक जेव्हा ह्या कवितेवर इतक्या विश्वासाने बोलतो तेव्हा हा निश्चितपणे माझ्यातील दोष आहे ह्या बाबत मला शंका राहत नाही.


हे सर्व लिहित वाचत असताना खूप काही शिकायला मिळाले हा आनंद मात्र आहे, जरी कविता वाचून मला तितकासा आनंद मिळाला नाही!

Monday, November 17, 2014

जबलपूर मराठी कवी संमेलन वृत्तांत


जबलपूरच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या हर्षे सभागृहामध्ये ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ ह्या संस्थेतर्फे ‘मराठी कविता समूहा’च्या संचालकांचा जबलपूर मधील मराठी रसिकांच्या समोर ‘मराठी कवितांचा’ कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मराठी कविता समूहाच्या इतिहासात प्रथमच केवळ संचालकांचा असा कार्यक्रम साकार झाला.
कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव श्री. अनिल राजूरकर ह्यांची होती. में महिन्यामध्ये इंदूर येथे मराठी कविता समूहाचा स्नेह मेळावा झाला होता. त्याची माहिती राजूरकर सरांपर्यंत पोहोचली आणि जबलपूर येथील ह्या कार्यक्रमाचे बीज त्यांच्या मनात रुजले.
जबलपूर सारख्या हिंदी भाषिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक मंडळी वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत. जरी आता जबलपूर मध्ये मराठी भाषेमध्ये शिक्षण बंद झाले असले तरी ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ ह्या संस्थेच्या माध्यमातून काही मोजक्या मराठी मंडळींनी अजूनही मराठीचा दीप तेवत ठेवला आहे. संस्थेतर्फे विविध मराठी कार्यक्रमांचे आयोजन होत असते आणि त्यामध्येच हा संचालकांच्या कवितांच्या सादरीकरणाचा ‘मराठी कविता मेळावा’ आयोजित करण्यात आला.
संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सौ. सुमेधा पोळ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन ह्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कवींना मंचावर आमंत्रित करण्यात आले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व कवी आपापल्या ठरलेल्या क्रमानुसार मंचावर स्थानापन्न झाले, आणि ध्वनिक्षेपक श्रीधर काकांच्या हातात देण्यात आला.
नोव्हेंबरच्या महिन्यातील सुरम्य संध्याकाळ, बाहेर सुटलेला मंद गारवा, समोर बसलेला रसिक प्रेक्षक आणि मराठी कविता समूहाच्या काव्यशिलेदारांच्या हातात आलेला ध्वनिक्षेपक, म्हणजे कवितांच्या कार्यक्रमाला संपूर्णत: पूरक असे हे वातावरण!
श्रीधर काकांनी त्यांच्या शांत, धीम्या शैलीत सुस्पष्ट शब्दोच्चारांनी, प्रसन्न मुद्रेने रसिकांबरोबरचा आपला संवाद सुरू केला. महाराष्ट्राच्या सीमेपार हिंदी भाषिक प्रदेशात मराठी कविता सादर करायला बोलावणाऱ्या रसिक जनांचे सर्वप्रथम आभार मानत, श्रीधर काकांनी कार्यक्रमाचे प्रयोजन; संकल्पना आणि स्वरूप विषद केले. कार्यक्रम दोन चक्रांमध्ये होणार होता. मंचावरील सात कवी (श्रीधर जहागीरदार, उमेश वैद्य, रमेश ठोंबरे, अलकनंदा साने, सारंग भणगे, तुषार जोशी आणि विनायक उजळंबे) प्रत्येक चक्रामध्ये आपल्या दोन कविता सादर करणार, मध्ये कवींची ओळख आणि कवितेविषयीचे अल्प निवेदन असे कार्यक्रमाचे नेटके आणि आटोपते स्वरूप होते.
कार्यक्रमाचा ‘श्रीगणेशा’ ‘सात्विक बंडखोरी’ कवितेत मुरलेल्या ‘विनायक’च्या कवितेने झाला. प्रेम कवितांचे पेटंट मिळू शकेल अशी त्याची ‘पत्रकविता’ त्याने सर्वप्रथम सादर केली आणि प्रेक्षागृह जिंकून घेतलं. खळी, मिठी, मोगरा, गजरा असे त्याचे खास शब्दमोती पेरून त्याने कवितेची पहिली माळ रसिकांच्या गळ्यात घातली आणि तो त्यांच्या गळ्यातला ताईतच झाला. ह्या कवितेच्या तरल अनुभवातून रसिक बाहेर येतायत न येतायत तोच त्यांच्या समोर विनायकने त्याचा खास ठेवणीतला कॉफीचा काव्य-कपच ठेवला. विनायकची कॉफीशॉप कविता म्हणजे हमखास टाळ्या, हशा, खुसखुस आणि कुजबुजहि.
विनायकाच्या कवितानंतर कवितेची गाडी सरकली एका हरहुन्नरी कवीच्या स्टेशनवर. स्टेशनाचे नाव तुषार जोशी, नागपूर. तुषारने त्याच्या प्रेमाचे रंग खुलवणाऱ्या दोन कविता सादर केल्या. ‘पाहिले तुला हळूच’ मधून प्रेयसीचा रुपमोगरा दरवळून आला तर पुढच्या कवितेत तुषारने कवितेची ‘वसंत’ पंचमी साजरी केली. त्याच्या ‘वसंत’ कवितेतून धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनातही आपल्या जीवनसंगिनी बरोबर प्रेमाचे हळुवार क्षण कसे घालवू शकतो, ह्या कृत्रिम जीवनात कविता कशी जगू शकतो ह्याचा प्रत्यय आणला.
प्रेमाचा रंग मैफिलीत गहिरा होत जात होता आणि पुढची प्रेमसूक्ते सादर करण्याची पाळी होती सारंगची. प्रेमाचा गुलाबी रंग आपल्या ‘आठवते का काही’ ह्या कवितेतून सारंगने तरन्नुममध्ये गाऊन पेश केला, तर जन्मभराचा आपला सांगाती सोडून गेल्यानंतर जीवनातल्या संध्याकाळी दाटणारी खिन्न छटा ‘झाली संध्याकाळ’ ह्या कवितेतून सादर केल्यानंतर रसिकांच्या पापण्यांवर टीचभर पाणी खचितच तरळले असेल.
प्रेमाच्या सुटलेल्या भरधाव गाडीला थोडा विराम देत, आपल्या प्रगल्भ लेखनशैलीतून अलकनंदा काकूंनी वैचारिक स्त्रीवादी कवितांची पेशकश केली. पहिल्या कवितेतून स्त्री मधल्या सहनशक्ती आणि आव्हाने पेलण्याच्या; झेलण्याच्या स्वयंभू स्वभावाधर्माचे दर्शन अलकनंदा काकूंनी घडवले. खेळणं मागणाऱ्या मुलीच्या हातावर वास्तवाचे ज्वलंत निखारे दिल्यानंतर ती मुलगी त्यांच्याशी सहजपणे खेळते हे स्त्रीजीवनाचे एक वास्तववादी जीवनदर्शन मनाला अंतर्मुख करून गेले. एकीकडे स्त्रीच्या ह्या शाश्वत जीवनसत्याविषयी बोलल्यानंतर काकूंनी आजच्या स्त्रीच्या, विशेषत: तरूण मुलींच्या आजच्या युगातील व्यवहारावर; आचरणावर सौम्य टिप्पणी करत निरागस मुलींमधील हरवलेल्या अल्लडपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी त्यांची ‘मुली गेल्या कुठे’ हि कविता सादर केली.
काव्यसादरीकरणाची ‘शमा’ मग पुढे रमेशच्या समोर सरकली. रमेशने त्याच्या खास नर्म विनोदी शैलीत कवितेतील हास्य रंग खुलवला. तरूणवयात आवडलेली एखादी सुंदर मुलगी लग्नानंतरही भेटते आणि मग त्यातून कसले कसले ‘शिक्षण’ मिळते हे त्याच्या ‘शिक्षण’ कवितेतून शिकायला मिळाले. हळुवार कोपरखळ्या मारत अनेकांच्या मनातल्या जुन्या प्रेमाची आठवण रमेशने जागी केली, तर एकदम वेगळ्याच वळणावर जात ‘महात्म्याच्या कविता’ मधील ‘स्वप्नातला भारत’ हि उपहासाच्या अंगाने सरकारी कार्यालयातील कारभारावर टीका करत, गांधीजींना अपेक्षित स्वप्नातील भारत हा केवळ भ्रष्टाचार हा शिष्टाचार केल्यानंतरच येऊ शकतो कि काय असा प्रश्न निर्माण करून जाणारी कविता सादर केली.
आतापर्यंत वैविध्यपूर्ण काव्यवाचन झाल्यावर उमेशदांनी हार्मोनियमवर आपली बोटे सफाईदारपणे फिरवून संपूर्ण सभागृहाला एक सूरमयी सुखद धक्का दिला. हार्मोनियममधून निसटणाऱ्या सुरांमध्ये उमेशदांच्या गळ्यातील मुलायम सूर मिसळले आणि कवितांच्या सुगंधाने भारावून गेलेले सभागृह ह्या सुरावटीत बुडून गेले. पहिल्यांदा ‘जगणे उधाण वारा’ हि तरल; अलवार कविता त्यांच्या तशाच मुलायम स्वरात न्हाऊन रसिकांसमोर उमेशदांनी पेश केली, तर त्यापाठोपाठ एका वेगळ्याच बाजाचे ‘कारभारीन’ हे गीत त्यांनी गायले. कारभारीन मधल्या शेतकरी गड्याचे आपल्या कारभारनीविषयीचे कौतुकाचे ग्रामीण भाषेचा बाज घेऊन लिहिलेले शब्द आणि त्याला तशीच लावलेली उडती ग्रामीण ढंगाची चाल सर्वांना आवडून गेली, हे प्रेक्षकांनी अभावितपणे धरलेल्या तालावरून दिसून आले.
सभागृह असे स्वरमुग्ध झाल्यानंतर पहिल्या चक्रातील शेवटचे कवी श्रीधर काका ह्यांनी एक वेगळाच धागा पकडत त्यांच्या कवितेवरील (म्हणजे कविता हाच कवितेचा विषय असलेल्या) दोन कविता सादर केल्या. आपल्याच कवितेविषयी प्रामाणिकपणे भाष्य करणे आणि तरीही तिच्याविषयी एक सार्थ अभिमान व्यक्त करणारी अशी ‘माझी कविता’ हि कविता श्रीधरकाकांनी सादर केली. शब्दांवरील प्रभुत्व, विचारांवरील पकड आणि अवघड वाटणारा विषय सोपा करून सादर करण्याची त्यांची शैली ह्यामुळे हि कविता सुजाण रसिकांनी खूपच गौरविली. एक कवी सतत कवीपण वागवत असतो आणि त्याचं ते कवीपण घरभर पसरलेलं असतं, म्हणून कवीची बायको त्याला एक माळा बांधून घ्यायला लावते अशी कल्पना करून कवीचं जगण कस असतं ह्यावर आपल्या ‘पसारा’ कवितेत काकांनी प्रकाश टाकला. विनोदाची पेरणी करत, काळजाला चिमटा काढणारी त्यांची हि कविता जितकी श्रोत्यांना आवडली असेल तितकीच सर्व कवी मंडळींना देखील ती जवळची वाटली.
हे पहिले चक्र झाल्यानंतर संस्थेतर्फे डॉ. सौ. स्वाती गोडबोले आणि त्यांच्या मार्गदर्शक सौ. सारिका ठोसर ह्यांचा मराठी भाषेत त्यांनी केलेल्या संशोधन/ PHD साठी सन्मान करण्यात आला. तसेच सर्व कवी मंडळींचाही आपुलकीने गौरव करण्यात आला. काही काळाच्या विश्रांतीनंतर कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू झाले.
पहिल्या चक्राप्रमाणे ह्या चक्रात देखील कवींनी आपल्या दोन कविता सादर करायच्या होत्या. फक्त पहिल्या चक्राला प्रत्येक कवीने कविता सादर करण्यापूर्वी त्या कवीचा अल्प परिचय करून दिला जात होता, तर ह्या दुसऱ्या चक्रामध्ये कुठला वेगाने कविता सादर करायच्या असे त्याचे स्वरूप होते.
दुसऱ्या चक्राची सुरुवात केली श्रीधर काकांनी. पहिल्या चक्रात मुक्तछंदी कविता सादर केल्यानंतर दुसऱ्या चक्रात काकांनी ‘नाते’ आणि ‘चालतो’ ह्या दोन गझल सादर केल्या. दोन्ही कविता ह्या गंभीर आणि आत्ममग्न वाटल्या.
त्यानंतर उमेशदांनी ‘तू जेव्हा कुंकू लावायचीस’ आणि ‘आता मुक्या क्षणांचा मज भार सोसवेना’ ह्या दोन कविता सादर केल्या. भावविहंगम अशा ह्या दोन कवितांनी रसिकसुद्धा भावमुग्ध झाला.
ठरलेल्या क्रमानुसार पुन्हा एकदा रमेशने ‘ओटी आणि ‘अभिव्यक्ती’ ह्या दोन कविता सादर केल्या. शेतकऱ्यांच्या जीवनाचा आणि वस्तुस्थितीचा वेध घेणाऱ्या दोन्ही कविता श्रोत्यांच्या संवेदनांना हलवून गेल्या. ओटीमध्ये पावसाच्या अभावाचीच परिस्थिती जरी चित्रित केली असली तरीही कवितेच्या शेवटला एक सकारात्मक संदेश देणारी अशी ती वेगळीच कविता होती, तर ‘अभिव्यक्ती’ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कृत्रिम सहानुभूती दाखवणाऱ्या कवीवर एकप्रकारे ताशेरे ओढले आहेत.
पुन्हा एकदा अलकनंदा काकूंनी दोन चटका लावणाऱ्या कविता सादर केल्या. ‘घरभर आरसे लावून घ्यावे, कोणीतरी सोबतीला आल्यासारखे तरी वाटेल’ अशीच सुरुवात होणारी, मनाला हालवून आणि हेलावून सोडणारी कविता जेव्हा काकूंनी सादर केली तेव्हा सभागृहात कित्येक जणांचे सुस्कारे आणि खंत प्रकट करणारी चुकचुक ऐकू आली. तोच मूड पुढे नेत ‘कळवायचे राहून गेले’ हि कविता देखील रसिकांच्या मनाला चुटपूट लावून गेली.
मैफिलीचा नूर त्यानंतर पालटला तो सारंगच्या दोन कवितांनी. आतापर्यंत सादर झालेल्या कवितांहून निराळी अशी एक वीररसयुक्त ‘तानाजीची शौर्यकथा’ आणि दुसरी भक्तीरसयुक्त ‘भक्त एकादशी’ ह्या कविता आवेश आणि आवेगपूर्ण सादर केल्या. कवितांमधील हे वैविध्य पाहून सभागृह स्तिमित झाले.
भारावून गेलेल्या सभागृहाला पुन्हा आपल्या वळणावर घेऊन येत तुषारने पहिल्यांदा त्याची स्फूर्तीदायी कविता कि जी एखाद्या सुभाषिताप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक लोक वापरत असतात, ती सादर केली आणि सभागृहात एक चैतन्याची लहर पसरली. ‘मी हरलोय म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण’ अशा ओळीतून जीवनाला उर्मी देणारं तत्वज्ञान तुषारने जेव्हा कवितेतून मांडले तेव्हा प्रेक्षक त्या विचारांची उंची पाहून दिग्मूढच झाले असावेत. त्यापाठोपाठ एक अतिशय सुंदर तरल, हळुवार प्रेमळ भावना जागवणारे गीत त्याने गाऊन सादर केले. ‘तू दिसलीस आणिक माझ्या बघण्याचे गाणे झाले’ अशी एकच ओळ ह्या कवितेमध्ये प्रेमामुळे संपूर्ण जीवन कसे भारावून जाते हे सशक्तपणे दाखवून देते.
करता करता कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ येऊन ठेपली. ज्या कॉफीशॉप पासून विनायकने कार्यक्रमाची सुरुवात केली त्याच कॉफीशॉप शृंखलेतील पुढची कविता सादर करून त्याने कार्यक्रमाचा समारोपही केला. तत्पूर्वी त्याने आपली ‘उत्तान कविता’ हि एक आत्ममग्न आणि कवितेतील सच्चेपणाचा शोध घेणारी कविता सादर केली. तशी समजायला कठीण कविता, परंतु श्रोतृवर्ग इतका प्रगल्भ होता कि अशी कविता देखील त्यांनी छान समजून त्याला उत्तम प्रतिसाद देखील दिला. समारोपाला कॉफीशॉपची कविता अशी काही लज्जतदारपणे सादर केली कि संपूर्ण सभागृह खुश होऊन गेली. उत्तम मिष्टान्नांचे यथेच्छ जेवण झाल्यावर गरमागरम कॉफीचा स्वाद चाखाल्यासारखे सर्वांना झाले असावे.
सुमारे ७०-७५ प्रगल्भ रसिक, त्यांनी दिलेली मनमुराद सुयोग्य दाद, मधून अधून येणाऱ्या टाळ्या आणि हशा, वाहवा आणि आह, तुरळक आलेले काही once more अशा मस्त वातावरणात मैफल विलक्षण रंगली. सुमारे सव्वादोन अडीच तास कसे निघून गेले ते समजलेच नाही. कार्यक्रमाची सांगता श्रीधरकाकांनी आभार मानून आणि त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. जामदार ह्यांच्या संभाषणात्मक संक्षिप्त भाषणाने झाली.
एक चिरकाल मनात जपणारी आठवण घेऊन आम्ही सगळे आमच्या परतीच्या प्रवासाला सर्वांचा हृद्द्य निरोप घेऊन निघालो. जबलपूर विषयी एक न पुसली जाणारी जागा मनामध्ये आता निर्माण झाली होती.

Sunday, November 16, 2014

आकाश

उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशाने,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधाराने ।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटाने ,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही ह्याच्याच थयथयाटाने …
मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या पेटवल्या ह्या अंबराने ,
आभाळा एवढ्या चुका देखील
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने ...
असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळलेल अंबर
आधार होता पांगळयाचा
उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची
ही होती नियती,
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।
येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....
आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)
- श्रीधर जहागिरदार

=========================================

कविता म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो आणि अलीकडे फक्त वृत्तांमध्ये लिहिलेले पद्य हेच कविता असा हेकट अट्टाहास पण काही ठिकाणी दिसतो. मुक्त लिहिताना छंदांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, गद्यरूपी पद्य; आणि त्यात तेही अतिशय अर्थाविहीन लिहिणारे महाभाग कवी मशरूमसारखे वाढल्यामुळे मुक्त कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा काहीसा झाला असावा!

परंतु जेव्हा केवळ आशयगर्भच नव्हे, तर अत्यंत आशयनिष्ठ अशी मुक्त कविता समोर येते तेव्हा वरील विवादाचे किंवा काव्य; किंवा त्याहूनही कविता म्हणजे नक्की काय ह्याचे उदाहरण मिळून जाते!

वरील लेखनप्रपंचाचे कारण असे कि वरकरणी ह्या कवितेत देखील केवळ एक विचार प्रभावीपणे मांडला गेला आहे. हाच विचार गद्य स्वरुपात मांडताही आला असता खचित, परंतु ह्या कवितेची मांडणी; त्यातील अभिव्यक्ती; कवितेत परावर्तीत झालेले विचाराचे आवर्तन हे कवितेच्या मुक्त मांडणीला न्याय देतात. कवितेची मांडणी किंवा बांधणी हि आशयाला पूरक अशी असावी; ती आशयाशी प्रतारणा करणारी नसावी असे एक सूत्र ह्या कवितेच्या अनुषंगाने विचार करत असताना माझ्या मनात आले. मुक्त कविता वाचत असताना ती तशी मुक्तच योग्य आहे कि त्या कवितेवर काव्यसंस्कार करून ती अधिक शास्त्रोक्त करायला हवी होती असा एक विचार मी अलीकडे करत असतो, आणि बहुतेकवेळा मुक्त कविता वाचल्यानंतर त्या तशा कवितेतील भाव; भावना किंवा विचार हे वृत्त-छंदादी शिस्तीमध्ये लिहिले जाणे आवश्यक होते असे वाटून जाते, कारण त्या तशा कवितांचा गाभा (आशय म्हणणार नाही, कारण अनेकदा मुक्त कवितांमध्ये तो नसतोच) हा इतका ठिसूळ असतो कि त्या तसल्या गाभ्यासाठी वृत्त-छंदमुक्ती; अर्थात सूट घ्यावी हेच पटत नाही.

ह्याउलट ह्या कवितेमध्ये जो मूळ विचार प्रकट झाला आहे कि तो कदाचित वृत्तबद्ध कवितेला पेलवला नसता; किंवा असे म्हणावे कि तो वृत्तबद्ध कवितेमध्ये तितक्याच सहजतेने आणि सशक्तपणे मांडता आला नसता. (मांडता येणारच नाही असे नाही)

इतका सशक्त वैचारिक; नव्हे तात्विक आशय इतक्या सहजतेने; पण प्रभावीपणे मुक्त कवितेमध्ये मांडणारी एकच व्यक्ती आठवते.....आसावरी गुपचूप.

थोडे नमनाला घडाभर तेल झाले, पण हे सर्व विचार ह्या कवितेच्या निमित्ताने मनात येऊन गेले.

कवितेचा केंद्रबिंदू हा एकच विचार आहे; एकच तत्व आहे असे मला वाटते. अनेकदा कवितेमध्ये विविध भाव-भावना प्रकट होतात; अनेकविध विचार मांडले जातात. परंतु ह्या कवितेमध्ये मात्र एक विशिष्ट विचाराचेच प्रकटीकरण झाले आहे. तो विचार व्यक्त होण्याआधी त्याला प्रस्तावना जोडली आहे. आकाशाचे आणि माझे नाते विविध प्रकारे दाखवून, ते नाते अधिकाधिक गडद करत नेण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. विविध अंगांनी ते नाते स्पष्ट करत नेले आहे आणि आकाश हेच जणू सर्वस्व; हेच जणू सर्व विश्व अशा विचाराप्रत वाचकाला नेऊन ठेवल्यानंतर अचानकपणे त्या सर्वास्वमधील फोलपणा; किंवा आभासीपणा दर्शवून वाचकाला चकित करण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. परंतु असे चकित करणे हाच कवितेचा उद्देश नसून, मुळात कविता हि त्या मानलेल्या सर्वस्वाचे अस्तित्वच प्रश्नांकित करते; त्या अस्तित्वालाच आव्हान देते, किंबहुना सरते शेवटी त्याचे अस्तित्वच नाकारते. हे अतिशय चकित करणारे आहे; बंडखोर आहे; क्रांतीवादी आहे. एखाद्या विचाराची उत्क्रांती होत होत त्यातून मूळ विचारला, धारणेला छेद देत त्या विचाराचे ध्रुवीकरण होते आणि संपूर्णत: विरोधी असा विचार, धारणा किंवा तत्व समोर येते, हि संपूर्ण प्रक्रिया विस्मयजनक आहे. कवितेच्या आरंभीचा आणि अंताचा विचार हे दोन ध्रुवासारखे आहेत आणि कविता ह्या दोन ध्रुवांना जोडणाऱ्या अक्षासारखी वाटते.

अनेकदा मला असे जाणवते कि अशा प्रकारच्या कवितांमध्ये ‘विचार जिंकतो; आणि कविता किंवा काव्य हे मागे राहते’. इथे काहीसे असेच मला वाटते. विचार वरिष्ठ आणि कविता दुय्यम असे काहीसे चित्र इथे निर्माण होते. म्हणजे एका अर्थाने कविता त्यातील काव्यामुळे नव्हे तर त्यातील ह्या विचारामुळे हलवते, मनाला भावते. कवितेविषयी लिहिण्यापेक्षा कवितेतील content विषयी अधिक लिहिण्याचा मोह होत राहतो. अजूनही त्याविषयी खूप काही लिहिता येऊ शकते, लिहावेसे वाटते. हा मला त्या विचाराचा, एका अर्थाने त्या आशयाचा विजय वाटतो. पण संपूर्ण कविता विजयी नाही होत असे माझे मत आहे. म्हणजे एकाच खेळाडू match जिंकून देतो आणि बाकीचे खेळाडू येतात जातात तसे काहीसे होते.

पण हे म्हणत असतानाच मी आधी म्हटले तसे कविता केवळ आशयगर्भच नाही; तर आशयनिष्ठ देखील आहे. म्हणजे कविता त्यातून जो आशय प्रकट करायचा आहे त्याच्याशी प्रामाणिक आहे. हि कविता आहे, म्हणून ती अधिक खुलविण्याचा, तिला अधिक नटविण्याचा आणि त्यासाठी कवितेत काही अधिक अनावश्यक असा मसाला भरण्याचा प्रयत्न करत नाही. एका अर्थाने कविता अव्यभिचारीपणे त्यातील मूळ गाभा प्रकाशित करते आणि बाकीच्या पसा-याला फाटा देते. उगाच तिच्या आंतरिक सौंदर्यावर बाह्यदर्शी सौंदर्याचा मुलामा चढवत नाही. त्यामुळे कविता कवीच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण करते. म्हणूनच पुन्हा वाटून जाते कि कविता एक आत्मनिवेदन मांडते कि जे वैश्विक आहे; अर्थात ते सर्वांसाठी आहे; सार्वत्रिक आहे.

वर मांडलेल्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने असे वाटून जाते कि जे कवितेचे यश आहे तेच कवितेची मर्यादा पण दर्शवते का? मला तरी ह्याचे उत्तर माहित नाही, पण मनात हा विचार येऊन जातो.

मी एवढे लिहिले म्हणजे हि कविता काही फार outstanding आहे असे मला बिलकुल म्हणायचे नाही. पण कवितेमध्ये असे काही मुलभूत आहे कि जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते.

Tuesday, July 15, 2014

पांडुरंग रावो

आज विठ्ठलाचे, नाव सर्व मुखी
जगी सर्व सुखी, लोक झाले

भवदुःख सारे आज निमाले
पंढरी निघाले, वारकरी

धन द्रव्य दारा, विठु रखुमाई
जोडली पुण्याई, भक्तीरूपी

दाही दिशातून, भक्तीचे निर्झर
मुक्तीचा पाझर, चंद्रभागा

विसरला लोभ, विसरला मोह
आनंदाचा डोह, पांडुरंग

पाहिले डोळिया, पांडुरंग रावो
आता नेत्र जाओ, मिटूनिया
==================
सारंग भणगे. (जुलै २०१४)
 

Saturday, July 5, 2014

नमन

नमन कर धरोनी ज्ञानवंतास माझे
चरण कमल स्थानी शीर ठेवीन माझे


चिर अमरचि होतो ज्ञान ज्याला मिळे तो
परम अढळ स्थानी फक्त ज्ञानीच जातो


विकल विफल होता धीर त्याचा खचेना
चिवटपण मनाचे सोडतो जो कधी ना


मदन दमन केल्यावीण विद्या न लाभे
विषय क्षय न होता ज्ञान होई न जागे


अवखळ मन वारू संयमाने धरी जो
सफल सहज होतो साधना आचरी जो


अथक परिश्रमाने ज्ञानप्राप्ती नखाची
विकट बिकट आहे वाट ज्ञानार्जनाची


अविरत रत अभ्यासात मेधा जयाची
दवडत क्षण नाही शारदा फक्त त्याची


ढग जल भरलेले ज्ञानवंताप्रमाणे
उचितचि उपमा ही ज्ञान पाण्याप्रमाणे


बहुजन उदकाचा थेंब एकेक जैसे
महद् उदधि ज्ञानी सर्व लोकास भासे


जन चिखल सभोती त्यात ज्ञानी विभूती
विमळ कमळ जैसे शोभते सर्वभूती


सुमन गमन ज्याचा छंद मोठा विलासी
भ्रमरचि असतो तो ग्रंथपुष्पाभिलाषी


धवल सुयश किर्ती काय सांगू तयांची
गगन झुकुन ठेवी शीर त्यांच्या पदाशी
=========================
सारंग भणगे. (जुलै २०१४)

Sunday, June 22, 2014

आठवते का काही

सुन्न मनाने बसलो असता कानी आले काही
कोण म्हणाले कुणास ठावे, 'आठवते का काही?'
क्षणचित्रांचा पडदा झर्रकन डोळ्यापुढून गेला
डोळे मिटुनी मलाच पुसले... 'आठवते का काही?'
-----------------------------------------------------

तलम धुक्याच्या शालीमध्ये ओलेत्या अंगाने
हुळहुळणाऱ्या वाऱ्याच्या अन गोड मृदू स्पर्शाने
शहारलो होतो दोघेही आठवते का काही
                                                   
ओठांचा मी चंबू करूनी शीळ वाजवित जाता
तू ओठांना दुमडून घेई स्मित लाजरे फुटता
चुंबन त्यांचे असे घेतले आठवते का काही

मुकेच बसलो धुके पांघरून ऊंच कड्याच्या काठी
गहिवर होते मनात, होती दरीत दहिवर दाटी
मुके राहुनी किती बोललो आठवते का काही       

जरा चुकीचे वळण घेतले, धुंद मनाने जेव्हा
चमकून होते मला बघितले प्रश्नांकित तू तेव्हा
त्या वळणावर देऊळ होते आठवते का काही     

तुझ्या पापण्या झुकल्या होत्या नेत्रकडांना पाणी
हळवी असली प्रिती अपुली आठवते का राणी
डोळ्यांची भाषा आताशा आठवते का काही

हुरहुरण्याची मजा आगळी छंद असे झुरण्याचे
प्रितीमध्ये देऊन सारे पुरूनही उरण्याचे
कुरकुरण्याचे कारण तेव्हा आठवते का काही

तू जाण्याच्या जखमांनाही गंध फुलाचा येतो
रडता रडता त्या गंधाने थोडे हसून घेतो
वेडे होते मला म्हणाले आठवते का काही
मी ही वेडा त्यावर हसलो आठवते का काही
------------------------------------------------

ज्या गीताने पुन्हा उसवले गत-स्मरणांचे धागे
त्या गीताच्या वैभवास ये मुजरा करू या दोघे
किती प्यायले अमृत त्याचे..........आठवते का काही
=================================
सारंग भणगे. (२२ जून २०१४)

Sunday, May 18, 2014

आभाळ


तिचा मायेचा पदर, पर त्यालाही ठिगळ
फाटक्यानं कशी बरं झाके लाजेचं आभाळ

वरं आभाळ दिसतं तेच झालं घरा छतं
दहा दिशांचा संसारं तोचं झाला घरागत
जिण उघडं नागडं देणं देवाचं सगळं

कुठं कुठं शिवू आता सारं फाटलं आभाळ
कोरं कोरडं ठेवलं सटवाईनं कपाळ
सारं कोरडं तरीही गाली वाहतो ओघळ

देव आंधळा म्हणू कि त्याला दगडाचा म्हणू
त्याचे कटीवर हात त्याने वर केले जणू
त्याचं आभाळ कोरडं आम्हावरीच कोसळं
===========================
सारंग भणगे (१८ मे २०१४)

Monday, May 12, 2014

कृष्णा

घेत आहे सारखे ती नाव कृष्णा
द्रौपदीला वाचवाया धाव कृष्णा

खेळणे झाले पुरे हा माणसांशी
आंधळ्या कोशिंबिरीचा डाव कृष्णा

यादवीला टाळणे ना शक्य झाले
वाचण्याचा काय आम्हा वाव कृष्णा!

भारताला धर्म ग्लानी गाढ आली
अन् तुझाही झोपल्याचा आव कृष्णा

नाम-भक्ती सोड आता युद्ध कर तू
काय नाही हा अहिंसा-भाव कृष्णा!

सारंग भणगे. (2 मे 2014)

Thursday, April 17, 2014

ती मला अन मी तिला

कोण होते सोबतीला, ती मला अन मी तिला
वाळवंटी जीवनाच्या, ध्रूव ती मी काफिला

सोयरे सारेच आले द्यावयाला सांत्वना
ना दिला तो हात आम्ही एकमेकांना दिला

खेळ होता जीवनाचा चालला चोहीकडे
ज्यात नाही हार ऐसा डाव आम्ही मांडिला

पाठराखी खूप होते पाठशिवणी खेळले
आंधळ्या रात्री परंतू तूच धरले कंदिला


शेंदले पाणी जनांनी आपुल्या आडातले
तू तळाशी जीवनाचा ओघ बनुनी वाहिला
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Wednesday, April 16, 2014

नाते

तुझे माझे असे नाते जसे ओवी नि जात्याचे
पहाटेच्या दंवाचे अन् तृणाच्या लीन पात्याचे


सुगंधाचे तुझ्या कोडे कळाले ना कुणालाही
जळालो मी तरी राखेस 'तो' येतो; धुरालाही


तुझ्या गाण्याविना काही मला ऐकू न येऊ दे
मुका मी आंधळा होवो परी बहिरा न होऊ दे


नुरावी मी तरीही आपल्या मागे उरावी तू
जणू मी धूप होवोनी जळावे अन सुटावी तू


कधी माझ्यावरी कोणी रचावे काव्य शब्दांनी
मला वाचून जाणावे तुझ्या अर्थास सर्वांनी


अशी होतीस अस्तित्वात माझ्या तू मिळालेली
तुझ्या गर्भात मी, आत्म्यात माझ्या तू बुडालेली
================================
सारंग भणगे. (१६ एप्रिल २०१४)

Sunday, March 16, 2014

तुझ्या सजलेल्या किती फुललेल्या

तुझ्या सजलेल्या किती फुललेल्या
मनात स्मृतींचे थवे नभवर्खी
...
अता उरले ते उरी उललेले



मनावर ओझे अनावर झाले
उरी रुतलेले जणू शर होते
...
जसे मदनाचे तिच्या वळणांचे




जरा मरणाचे उरी भरलेले
कमी भय झाले जसे कळले की
...
मला सुख नाही तिच्या मिळण्याचे

 
मला मरणाचे असे सुख झाले
असे घडले की पुन्हा परतावे
...
कधी रडले ना, जरा रडले ते
==================
सारंग भणगे (डिसेंबर २०१३)

Saturday, January 25, 2014

सांजसंध्या

गिरीवरावरी विराट सूर्यबिंब टेकले
तमा वरी कुणीतरी सुरम्य चित्र रेखले


चितारली नभांगणात दिव्य रंगसंगती
जणू निळ्या जलाशयात रंग ते तरंगती


हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे


दिमाखदार तारका नभात पाय टाकता
गुलाब गालिचे शशांक अंथरेल स्वागता


समीर संथ थंड गार घालताच फुंकरा
उन्हात तापली धरा निवू बघे जराजरा


भराभरा घराकडे गुरे खुरे पिटाळती
रुणूझुणू रुणूझुणू जणू नुपूर बोलती


खगास आस कोटरास जायची खुणावते
प्रिये समीप जावया अधीरता दुणावते


निराश मित्र मावळे प्रिया न त्यास लाभते
वधू बनून श्यामला शशी घरी प्रवेशते


जना मनास भावते कवीसही विभाव ही
निवांत सांज सावळून जन्मते विभावरी
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Tuesday, January 21, 2014

राधा - २


प्रिय राधा,

 

कशी आहेस? कित्ती दिवसात तुझे पत्रच आले नाही! पाठवलेच नाहीस कि आपल्या post खात्याच्या कार्यक्षम कारभारामुळे मला मिळाले नाही! अर्थात तुला हे माझे पत्र मिळाले आणि त्याचे तू उत्तर लिहिलेस आणि ते मला पोहोचले तरच ते कळेल, नाही का.

 

मी तसा मजेत आहे. खरेतर ‘तसा’ हे चुकूनच लिहून गेलो. मी तसे लिहावयाला नको होते. मला कल्पना आहे कि तुला त्यातून काय वाटणार आहे याची. पण खरोखर सहज लिहिता लिहिता मी तसे लिहून गेलो गं! आत्ता माझ्याकडे पेनाचे खोडरबर देखील नाही, आणि ज्यावेळी हे पत्र लिहितो आहे त्यावेळी कुठली दुकानं उघडी असणार! तुला तर कल्पना आहेच माझी पत्र लिहायची वेळ!

 

नाही, ती वेळ बदलली नाही. बदलेल असेही वाटत नाही. आठवतंय, मी दिवसा तुला एक पत्र लिहिलं होतं, आणि मग त्याचं उत्तर येण्याऐवजी तूच घरी आली होतीस भेटायला इतक्या लांबून, मी आजारी वगैरे आहे का असे पाहायला. तुझं येणं आवडतंच गं, पण मी आजारी आहे का पाहायला आलीस, आणि मी आजारी नाही म्हटले तेव्हा कपभर चहाही न घेता निघून गेलीस............ते आवडलं नाही. म्हणूनच, ज्यावेळी कदाचित आकाशात चंद्रालाही झोप लागत असेल अशाच वेळी मी तुला पत्र लिहू शकतो! तसेही त्या चंद्राशिवाय, आकाशातल्या ताऱ्यांशिवाय, कळवळणाऱ्या काही जनावरांपेक्षा आणि माझ्या मनात तुझ्या विषयी उठलेल्या वादळांशिवाय आणखी ह्यावेळी कोण कुठे जागे असते!

 

sorry, हे देखील लिहून गेलोच! तुला सांगू, काही वेळा शब्द साथच देत नाहीत, आणि काही वेळा जणू पेनाला गळती लागल्यासारखे निबमधून ते झिरपत जातात जणू. निसरड्यावरून आपला पाय सटकतो ना तसा ह्या शब्दांचादेखील पाय घसरतो कधी कधी असेच वाटते.

 

असो! मी छान मजेत आहे. तू इतकी ओरडयाचीस म्हणून ऑफिसमध्ये वेळेत जायचा, मन लावून काम करायचा खूप प्रयत्न केला, करत असतो. पण तुला माहिती आहे ना, औषधाचा डोस एकदा दोनदा घेऊन चालत नाही. काही काही रोग असे असतात कि त्यांना वारंवार आणि सातत्याने औषध घ्यावेच लागते. पण काही काही दूरच्या गावांमध्ये कुठे दवाखाने आणि औषधाची दुकानं असतात! तिथले रोगी नाहीत का कधीतरीच औषध घेतात कुणी शहरा-बिहराकडून घेऊन आले तर, आणि मग जेव्हा औषध मिळत नाही तेव्हा खोकत राहतात; कण्हत राहतात! आपल्या देशात गरीबीच फार आहे बघ.

 

नवीन काय वाचते आहेस? म्हणजे तुला मिळत का वाचायला काही? आणि नाही मिळालं तरी काही बिघडत नाही गं. नुसती पुस्तकं वाचून कुणी मोठं होत का? पुस्तकी किडे होतो आपण. मी देखील हल्ली अजिबात पुस्तकं वाचत नाही............पहाटेपर्यंत! हं! झोपेचं माझं पहिल्यापासून तसं वाकडंच, तुला तर माहितीच आहे. मग त्याची कशाला काळजी करायची उगाच. अग काही काही माणसांना झोप कमी चालते; पुरते. मग रात्री फक्त रातकिड्यांच अद्भुत संगीत ऐकत बसण्यापेक्षा बसतो आपला काहीतरी पुस्तकाची पान उघडून, त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही.

 

काळजी करायचीच झाली तर ह्या कडाक्याच्या थंडीत डांबराच्या निगरगट्ट रस्त्याच्या कडेला कुत्र्यासारख झोपणाऱ्या त्या भिकाऱ्यांची करावी किंवा धरणामध्ये जमीन बुडालेल्या; आतड्यात फक्त पीळच उरलेल्या; सरकार दरबारी हक्काचा मोबदला मागण्यासाठी कित्येक कोस चालत तालुक्याच्या गावाला आलेल्या शेतकऱ्याची करावी, नाहीतर ....................

 

म्हणूनच मी तुला पत्र लिहित नाही! लिहायला घेतलं कि काहीतरी भलत-सलतच लिहितो जातो. जिथे सलतंय तिथे असंच होत कि काय कोण जाणे! राधे, सोलवाटलेल्यानं विव्हाळायचही नाही का गं!

 

असो, माझ्या जखमांच रक्त हळूहळू माझ्या शाईत उतरायला लागलं आता बहुदा. ते वाचून तुझ्या डोळ्यात अश्रुंच रक्त तरारेल. म्हणून इथेच थांबतो आता!...............पुन्हा उद्या लिहीनच ना तुला पत्र, ह्या रात्रीला तांबडं ढुशी द्यायला सुरुवात करायच्या वेळी!

 

आणि हो, सर्वात महत्वाचं राहिलंच कि! अग बाई, लवकरात लवकर जरा तुझा पत्ता कळव कि!

 

सारंग

राधा - १


प्रिय राधा,

 

आज प्रथमच तुला प्रिय लिहिण्याचं धाडस करतो आहे; पण खरंतर ते ‘प्रिय सागर किंवा प्रिय समीर’ हे लिहिण्याइतकंच सहज आणि उत्स्फूर्त होतं, आणि जे सहज असतं ते निर्मळ असतं असं निदान मला तरी वाटतं. त्यामुळे त्यात धाडस खरंतर नाहीये. ‘पण सहजपणे आपल्या हातून घडते ती चूक निर्मळ आणि पवित्र असली, तरीही त्याची जाणीव हि त्रासदायकच असते.’ तेव्हा ह्या धाडसाला मनावर घेऊन नकोस.

 

खरंतर यात धाडस कोणतच नव्हतं. कारण जे प्रिय असतं त्याला ‘प्रिय’ म्हणण्यात काय चूक? पण आपल्याला जे ‘प्रिय’ असतं ते जगाला ‘अप्रिय’ असेल किंवा त्याहून अधिक म्हणजे आपल्याला जे ‘प्रिय’ वाटतं, ते वाटणं त्या ‘प्रियालाच’ अप्रिय वाटत असेल तर...... तर मात्र ते निश्चितच चूक असलं पाहिजे, आणि मग ‘प्रिय’लाही ‘प्रिय’ म्हणायचं धाडस करावं लागतं!

 

असो! तुला वाटेल माझं घोडं ‘प्रिय’पाशीच अडलं कि काय! किंवा मी खरंतर तुला पत्र नव्हे तर ‘प्रिय’ ह्या शब्दाची ‘चिकित्सात्मक मीमांसा’ करून, ‘प्रिय’ असण्याचे विषदीकरण व ‘प्रियाप्रियाचे संकलनात्मक विश्लेषण’ करतो आहे कि काय! पण तसं नाहीये. मी मला जे ‘प्रिय’ आहे..........

 

पुन्हा मी ‘प्रिय’ भोवतीच रुंजी घालतोय. खरंतर हे पत्र मी माझ्या ‘भावनांची सतरंजी’ अंथरण्यासाठी लिहित होतो. पण लिहिता लिहीतच कधीतरी किंवा कदाचित त्या आधीच माझ्या साऱ्या भावनाच शुष्क होऊन गेल्या.

 

मी एकदा लिहिले होते कि ‘काही भावनांची फुलं शब्दांचा सुगंध न घेताच कोमेजतात.’ पण काही वेळेला मात्र ‘शब्दांच्या लाटा उसळत असतात, पण भावनांच्या नावा त्यावर उतरतच नाहीत’. अशा वेळच्या लिहिण्याला अर्थ उरत नाही. त्यात नकळतच शुष्कपणा येतो.

 

आज काहीशी स्थिती तशीच आहे. खरंतर तुला काही लिहायचं म्हणजे शब्द सुचण्यापेक्षा ते हृदयातून उमटायला हवेत. बुद्धीला विचार करायला संधीच मिळाली नाही पाहिजे. पण आज तसं नाहीये. माझ्या हृदयातील भावनांचा सागर ओहोटीला गेलाय कि तुझ्याबद्दलच्या प्रेमाचा झराच आटून गेलाय? कदाचित तसच असावं! अग पाऊसच पडला नाही तर तो झरा तरी कसा टिकेल!

 

चातकासारखी पावसाची वाट पाहताना; चकोरासारखा चंद्रामृतकणांसाठी झटपटताना मला जर ‘माझा पाऊस’ किंवा ‘माझे अमृतकण’ मिळालेच नाहीत तर मी जगणार तरी कसे! त्यातच जर नकाराचं विष दिलं तर मी मरणं स्वाभाविकच आहे. विष पचवायला मी नीलकंठ नाही; मी व्याधाच्या विषारी बाणानं घायाळ होऊन मरणारा ‘सारंग’; अर्थात ‘श्रीकृष्ण’ आहे. आणि खरी शोकांतिका हीच आहे कि श्रीकृष्ण असूनही मला राधेची प्रीत...............!

 

तसे तर मला हे नात्यांचे बंध नकोच होते. खरेच! हि माझी निराशा नाही, किंवा तडजोडही नाही. कुठेतरी ते पटलेलं होतं. म्हणूनच मी एकदा लिहिलं होतं,

      ‘प्रेम राखीच्या धाग्यात नसतं, प्रेम कुंकवाच्या टिळ्यात नसतं’

प्रेम अलौकिक असतं, त्याला असल्या लौकिक, भौतिक आणि प्रतीकात्मक गोष्टीत स्वारस्य नसतं.

      ‘प्रेम आत्म्याचं मिलन असतं, खुल्या हृद्याच दालन असतं’

असंही कधीतरी लिहिलं होत. मला ते पटलही होत. त्यामुळेच भौतिक सुखांच्या व आकांक्षांच्या बर्फाखालून हि अभौतिक, अलौकिक, अपार्थिव सुखाच्या अनुभूतीची नदी खळाखळा वाहतच होती. त्यामुळे एक डोळा रडत असता, दुसरा मात्र हसत होता. कोरड्या, कडक उन्हात पावलं भाजत असताना, डोक्यावर मात्र ज्ञानाचं छत्र अडग होतं. म्हणूनच मी माझ्या मनातले आवेग आणि उर्मी, त्या उसळत्या भावनांची वाफ शक्तीन व संयमानं निर्धाराच्या व ज्ञानमय निश्चलतेच्या सायीखाली कोंडू शकलो. अवखळपणे धावू पाहणाऱ्या माझ्या भावनांच्या अजाण, अबोध, असमंजस, अवखळ, नाठाळ वासराला ज्ञानाच्या दोरान संयमाच्या दावणीला जखडू शकलो.

 

त्यातूनच मला जाण आली व मला वाटू लागलं; पटू लागलं कि,

‘प्रत्येक नात्याची परिणतीच आपल्याला का अपेक्षित असते? एका सुंदर हळुवार पातळीवर आपण समांतर राहिलो तर बिघडले कुठे?

ज्याचं त्याचं प्रत्येकी एक जग असेल. त्या त्या जगातील एकमेकांच्या प्रतिमा वास्तवाशी मेळ साधणाऱ्या नसतीलही. पण जे काही होतं ते एका उच्च कलात्मक पातळीवर असेल. अनुभवातला अस्सलपणा वास्तवापेक्षाही प्रासादिक असेल.

अशा अशरीर संबंधांना नात्यात बद्ध करण्याची इच्छा का व्हावी?’ (संदर्भ ‘हृदयस्पर्शी’ – सुहास शिरवळकर)

 

ह्या विचारांनी प्रेरित झालेली माझ्या आत्म्याची कवाडं खाडकन उघडली. ज्याला प्रेमाचं नाव देत होतो, ती माझ्या मनापेक्षा जर माझ्या आत्म्याची अभिव्यक्ती असेल तर माझ्या नजरेत सारं विश्व हे समान व भेदाहीन असेल. ज्या अंतिम प्रेमाची सारेच प्रतीक्षा करीत असतात, त्याची अनुभूती प्रत्यक्ष होऊ शकली. काही क्षण का होईना, पण मनाला आत्म्याचा साक्षात्कार होऊन एका नवीन भावविश्व सृष्टीचा अविष्कार माझ्या मानस स्पर्शून गेला. त्याचे आभार कोणास मानावे हेच मला कळेना. पण मग त्याची सुरुवात जिथे झाली ते चैतन्याचे मूलगर्भ तू होतीस, म्हणून तुला हे आभार!

 

आता नात्यापलीकडच्या विश्वात आत्म्याचा प्रवेश करणे हेच जीवनाचे ध्येय राहिले. त्यासाठी अखंड, अथक प्रयत्न करणे हेच जीवनाचे खरे सार्थक! आता त्यासाठी ‘बाहेरच्या’ स्फुर्तींचा कागदी आधार नको. अंत:स्फुर्तींना बाह्यात्कारी गोष्टींचा आधार नको असतो. कारण,

      ‘आत ओसंडणाऱ्या प्रकाशाच्या लाटा, बाहेरच्या काळोखाने अंधारात नाहीत.’

शब्दांची हि कृत्रिम कारंजी इथे आता आपोआपच अस्तंगत झाली आहेत..........

सारंग.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...